Thursday, July 25, 2019

वैगई एक्सप्रेस पॅटर्न.

१९८४ मध्ये माधवराव शिंदे रेल्वेमंत्री झाल्यावर त्यांनी रेल्वे कोचेसची ’रेक शेअरींग’ ही कल्पना आणली. एखाद्या गाडीचा रेक गंतव्य स्थानी पोहोचल्यानंतर जर काही तास नुसताच पडून राहत असेल तर तोच रेक दुस-या गाडीला वापरून मग दुस-या गाडीचा येणारा रेक या गाडीच्या पाठवणीसाठी वापरायचा ही त्यांची कल्पना. 

म्हणजे त्याकाळी कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस संध्याकाळी १७.३० च्या आसपास नागपूरला यायची आणि तिची परतीची वेळ दुस-या दिवशी सकाळी १०.४० असायची. तर दादर - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस पहाटे ५.३० ला नागपूरला यायची आणि रात्री २२.१० ला परतायची. मग संध्याकाळी आलेली महाराष्ट्र त्याच रात्री सेवाग्राम म्हणून जायची आणि पहाटे आलेली सेवाग्राम लगेचच ५ तासात तय्यार होऊन महाराष्ट्र म्हणून जायची. या रेक शेअरींग साठी मी रात्री जागून केलेले संशोधन इथे वाचायला मिळेल.

आजही ब-याच गाड्यांमध्ये हे शेअरींग सुरू आहे. "ऑप्टिमायज़ेशन ऑफ़ रिसोर्सेस" हा शब्दही जेव्हा फ़ारसा प्रचलित नव्हता तेव्हापासून भारतीय रेल्वे ही प्रथा अंगिकारते आहे.

पण या सगळ्या शेअरींग मध्ये मला भावलेले शेअरींग म्हणजे वैगई आणि पल्लवन एक्सप्रेसचे शेअरींग. ते शेअरींग माहिती नसल्यामुळे माझी उडालेली तारांबळ मी या लेखात लिहीलेली आहे पण मग त्या शेअरींगची उपयुक्तता जाणवली आणि तशाच प्रकारचे शेअरींग आपण कुठेकुठे वापरू शकतोय याविषयी बुद्धीला चालना मिळाली.

१५ ऑगस्ट १९७७ रोजी तामिळनाडूची सांस्कृतिक राजधानी, मदुरै आणि राजकीय राजधानी चेन्नई यांना जोडणारी वैगई एक्सप्रेस सुरू झाली. विशेष रंगसंगतीचे डब्बे, त्यांना मॅचिंग रंगसंगतीचे डीझेल एंजिन आणि मीटर गेजवर धावत असूनही ब्रॉड गेज गाड्यांना लाजवेल असा वेग यामुळे पहिल्याच दिवशी या गाडीने मदुरै ते चेन्नई एग्मोर हे ४९५ किमी चे अंतर ७ तास ५ मिनीटांत पार केलेले होते. (मदुरै: ०६.००, चेन्नई एग्मोर: १३.०५) पुढे सुरक्षेच्या कारणास्तव या गाडीचा वेग थोडा मंद करण्यात आला. हेच अंतर ही गाडी ७ तास ३० मिनीटांत कापायला लागली.
(सध्याच्या ब्रॉडगेज अवतारात ही गाडी मदुरै ते चेन्नई अंतर ७ तास ३५ मिनीटांत तर परतीचे अंतर ७ तास ४० मिनीटांत कापते. जवळपास ८५ %  मार्ग  एकेरी असूनही.)



मीटर गेज अवतारातली वैगई एक्सप्रेस. विशिष्ट रंगसंगतीतले एंजिन आणि त्याच रंगसंगतीतले डब्बे. 
(Pic credit: Mani Vijay Sir & www.irfca.org)


मीटर गेज अवतारातली वैगई एक्सप्रेस. विशिष्ट रंगसंगतीतले एंजिन आणि त्याच रंगसंगतीतले डब्बे. 
(Pic credit: Mani Vijay Sir & www.irfca.org)


मीटर गेज अवतारातली वैगई एक्सप्रेस. विशिष्ट रंगसंगतीतले एंजिन आणि त्याच रंगसंगतीतले डब्बे. 
(Pic credit: Mani Vijay Sir & www.irfca.org)

या गाडीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच राहिली कारण चेन्नईला सकाळी जायला अगदी आदर्श होती. पण हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागले की परतताना या गाडीला मदुरैपर्यंत परत पोचताना फ़ार उशीर होतोय. परतीच्या प्रवासात एंजिन मागे फ़िरवून वगैरे ही गाडी मदुरै ला पोचेपर्यंत रात्रीचे २२.०० / २२.३० व्हायचेत. मग काय करूयात ? हा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला. इतक्या उशीरा मदुरैला पोचण्याची वेळ नागरिकांना सोयीस्कर वाटेना.

मग १५ ऑगस्ट १९८५ रोजी पल्लवन एक्सप्रेस सुरू झाली आणि तिरूचिरापल्ली ते चेन्नई एग्मोर हा ३३७ किमी चा प्रवास ५ तास ३५ मिनीटात शक्य झाला. पण यात मजा अशी होती की पल्लवन एक्सप्रेस तिरूचिरापल्ली ते चेन्नई एग्मोरला गेली की लगेच दुपारी १३.०० च्या सुमारास परतून वैगई एक्सप्रेस व्हायची आणि वैगई दुपारी १३.३० ला पोचली की दुपारी १४.३० ला पल्लवन म्हणून निघून निवांतपणे तिरूचिरापल्लीला पोहोचायची. पल्लवन आणि वैगई एक्सप्रेसमध्ये हे अत्यंत उपयुक्त रेक शेअरींग सुरू झाले. (२०१३ मध्ये पल्लवन एक्सप्रेसचा विस्तार हा आणखी ९० किमी वाढवून कराईकुडी पर्यंत करण्यात आला.)


वैगई एक्सप्रेसचा मार्ग




पल्लवन एक्सप्रेसचा मार्ग

विदर्भाचा विचार केला तर अशा पद्धतीची जनशताब्दी किंवा वंदे भारत एक्सप्रेस अकोल्यावरून मुंबईसाठी सुरू करता येईल. नागपूरवरून मुंबईसाठी गाड्या आहेत, अमरावतीवरूनही मुंबईसाठी गाडी आहेच. अकोल्यावरून सकाळी निघून नऊ तासांमध्ये मुंबईत पोचणारी गाडी परतीच्या प्रवासात फ़क्त जळगावपर्यंतचा ७ तासांचा प्रवास करू शकेल असे वेळापत्रक करता येईल. जळगाववरून सकाळी सकाळी निघून ७ तासात मुंबईला पोचणारी एक्सप्रेस लवकर परतीच्या प्रवासाला निघू शकेल आणि अकोल्याला खूप रात्र होण्याआधी पोहोचू शकेल.

म्हणजे, एक रेक
अकोला: --/०६.००
विदर्भ संपर्क क्रांती एक्सप्रेस
मुंबई: १५.००/--

मुंबई: --/१५.३०
खान्देश संपर्क क्रांती एक्सप्रेस
जळगाव: २२.३०/--

आणि दुसरा रेक
जळगाव: --/०६.००
खान्देश संपर्क क्रांती एक्सप्रेस
मुंबई: १३.००/--

मुंबई: --/१३.३०
विदर्भ संपर्क क्रांती एक्सप्रेस
अकोला: २२.३०/--

यात आणखी एक भर घालता येईल. खान्देश संपर्क क्रांतीला धुळ्यावरून सकाळी ६.०० च्या सुमारास निघालेले काही कोचेस चाळीसगावला जोडता येतील. आणि परतीच्या प्रवासात तेच कोचेस चाळीसगावलाच काढून रात्री २२.३० पर्यंत धुळ्याला नेता येतील. 

अशा वैगई-पल्लवन पॅटर्नच्या गाड्या कुठेकुठे सुरू करता येतील याचा विचार करता आणखी काही मार्ग मला सुचलेत.

शेगाव-रायपूर-नागपूर, नागपूर-रायपूर-शेगाव, 

नागपूर-हैद्राबाद-बल्लारशाह, बल्लारशाह-हैद्राबाद-नागपूर,

पुणे-हैद्राबाद-सोलापूर, सोलापूर-हैद्राबाद-पुणे,

अकोला-हैद्राबाद-नांदेड, नांदेड-हैद्राबाद-अकोला

तुम्हाला अजून काही मार्ग सुचतायत ?

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर (२५०७२०१९)


No comments:

Post a Comment