Friday, September 23, 2022

आणि आमचा पंगा झाला - ३

 यापूर्वीचे पंगे इथे आणि इथे वाचा.


रविवार सकाळ. सकाळची आन्हिके, पूजा अर्चा वगैरे आटोपून आपण प्रसन्न चित्ताने फ़ेसबुक वगैरे बघत बसलेले असतो. एव्हढ्यात फ़ेसबुक मेसेंजर वाजते. एरव्ही फ़ेसबुक मेसेंजरकडे दिवसेंदिवस ढुंकूनही न बघणारे आपण आता हातातच मोबाईल असल्याने पटकन मेसेंजर उघडतो आणि मेसेज वाचतो. (बाकी मला माझ्याच मेसेंजरमध्ये जायला वेळ नाही. इथल्या काहीकाही बावाजींना बायकांच्या मेसेंजरमध्ये शिरून "जे१ झाले का ?" वगैरे आंबटशौक कसे जमतात ? हे मला कळत नाही.)


"सर, जालन्यावरून मुंबईला जायचे होते. सगळ्या गाड्या फ़ुल्ल आहेत. अगदी नंदीग्राम, तपोवन सुद्धा. एखादी एसी बस वगैरे आहे का ? सिनीयर सिटीझन आहेत हो सोबत." - काही वर्षांपूर्वी जुजबी ओळख झालेला एक बस कम रेल्वेफ़ॅन मित्र.


"जालना ते मुंबई थेट बसेस तर मला माहिती नाहीत पण औरंगाबादवरून मुंबईपर्यंत चिकार बसेस आहेत. खूप सा-या एसी बसेस आहेत." - १९८९ पासूनचा आपला अनुभव आपण टाईप करतो.


"सर, पण जालना ते औरंगाबाद कसे जायचे ?" बसेसची फ़्रिक्वेन्सी कशी आहे ?" -  मुंबई - पुणे - नाशिक या त्रिकोणापुढे कधीही प्रवास न केलेले हे बसफ़ॅन कोकरू.


"जालना ते औरंगाबाद दर पंधरा मिनीटांना एखादी बस मिळेल. ५० - ५५ किमी तर अंतर आहे. पण मला सांगा तुम्ही नंदीग्राम , तपोवन एक्सप्रेससाठी end to end quota ट्राय केलाय का ? " - सिनीयर सिटीझन्सच्या बसप्रवासातल्या कष्टांची काळजी असलेला आणि इतर कुणाची आई ती आपली आईच असे सहानुभूतीने मानणारा मी.


"म्हणजे काय करू सर ?" - तोच बस कम रेल्वेफ़ॅन मित्र


"म्हणजे नंदीग्राम एक्सप्रेससाठी जालना ते मुंबई असे तिकीट बघण्यापेक्षा आदिलाबाद ते मुंबई असे तिकीट try करून बघा. कदाचित २०० - ३०० रूपये तिकीट जास्त बसेल पण बसप्रवासापेक्षा, एजंट गाठा त्याच्याकडून तिकीट येईपर्यंतच्या अनिश्चिततेत हिंदकळत रहाण्यापेक्षा ते बरे पडेल." - जगमित्र असलेला फ़ुकट सल्लागार मी.


"सर, खरंच की ! नंदीग्रामला आदिलाबाद ते मुंबई RAC 5 आहे." - तोच बस कम रेल्वेफ़ॅन मित्र


"मग ताबडतोब घ्या. १०० % कन्फ़र्म होणार. बोर्डिंग पॉईंट मात्र जालना टाका." - एका गाडीला कुठल्या प्रकारचे किती कोचेस लागतात ? कुठल्या प्रकारचा किती कोटा आहे ? याचा पक्का अभ्यास असलेला रेल्वेफ़ॅन, मी.


ह्यानंतर भयाण शांतता. साधं "धन्यवाद" पण आपल्या नशीबी नसते. आत्मीयतेने एखाद्याला केलेली अशी मदत इतक्या कृतघ्नपणे संपते. मला ही फ़ेसबुक मेसेंजरवर फ़ारसे रमायला आवडत नाहीच म्हणून मी ही तिथे फ़ारसा थांबत नाही.


काही काळांनंतर त्या मित्राच्या जालना - मुंबई ट्रीपबद्दल आपण फ़ेसबुकवर वाचतो. एक लाईक करून आपण पुढे जातो.


पुन्हा काही दिवसांनी पुन्हा तोच कृतघ्न माणूस मेसेंजरवर येतो. 


"सर, मला साधारण डिसेंबरमधे नागपूर - भंडारा - चंद्रपूर - गडचिरोली असा दौरा करायचाय. मला थोड मार्गदर्शन, तिकीटे बुकिंग वगैरे करायला मदत कराल ?" - तोच कृतघ्न माणूस मेसेंजरवर.


"या सगळ्या कन्सलटन्सीचे पैसे लागतील." - मागच्या कृतघ्न अनुभवावरून शहाणा झालेला अतिव्यापारी दृष्टीकोनातला मी.


यानंतर मी सरळ ब्लॉक होतो आणि असल्या कृतघ्नांच्या तावडीतून सुटलेला मी त्या "पाताळविजयम" नावाच्या मद्रासी सिनेमातल्या राक्षसासारखा हॉ..हॉ..हॉ.. असे विकट हसत सुटतो.


- प्रभू रामचंद्रांचा "धर्मज्ञ आणि कृतज्ञ" असण्याचा गुण कायम अंगी बाळगणारा पण कृतघ्नांशी पंगे घ्यायला कधीही न घाबरणारा, राम प्रकाश किन्हीकर.  



No comments:

Post a Comment