प्रत्यक्ष भगवंतांच्या आज्ञेने स्वायम्भुव मनूची अत्यंत तेजस्वी आणि ज्ञानी कन्या, देवहुति हिचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. कर्दम ऋषीही अत्यंत आदर्श जीवन जगत भगवंतांच्या चरणाचा कायम आश्रय इच्छिणारे होते. कर्दम ऋषी आणि देवहुति यांच्या दांपत्य जीवनाचे फ़ार सुंदर वर्णन श्रीमदभागवतात आलेले आहे. महादेव शंकरांची ज्याप्रमाणे मनोभावे सेवा पार्वतीने केली त्याप्रमाणे मनुकन्या देवहुति ने आपल्या पतिदेवांची सेवा केली.
श्रीमदभागवत वर्णन करतय
विश्रम्भेण, आत्मशौचेन, गौरवेन, दमेन च
शुश्रूषया, सौहृदेन, वाचा मधुरयां च भोः ।
विसृज्य कामं दम्भं च द्वेषम, लोभम, अघम, मदम
अप्रमत्तोद्यता नित्यम तेजीयाम समतोषयत ॥
देवहुति ने कामवासना, लोभ, दंभ, द्वेष, पाप, मद इत्यादि गोष्टींना कटाक्षाने दूर ठेऊन पातिव्रत्य, गौरव, प्रेम, मधुरभाषण करून अत्यंत आत्मीयतेने आपल्या अत्यंत तेजस्वी जीवन जगत असलेल्या पतीदेवांची मनोभावे सेवा केली आणि त्यांच्याकडून नऊ कन्या प्राप्त करून घेतल्या. भगवंतांच्या आशिर्वादाने योग्यवेळी त्या कन्यांचे विवाह पृथ्वीसंचलन आणि नियमन करू शकण्याची शक्ती असलेल्या अत्यंत तेजस्वी अशा नऊ मुनीजनांशी झालेत.
यानंतर देवहुतिच्या सेवा आणि पातिव्रत्यावर प्रसन्न झालेल्या कर्दम ऋषींनी ति्च्या उदरी प्रत्यक्ष भगवंत कपिल रूपाने जन्म घेणार असल्याचा आशिर्वाद देवहुतिला दिला आणि अशा अत्यंत पवित्र, आदर्श दांपत्य जीवन जगणा-या दंपतींपोटी भगवान कपिल अवतीर्ण झालेत.
भगवंत आपल्या पत्नीच्या उदरी प्रगट झाले्ले आहेत हे कर्दम ऋषींनी जाणल्यानंतर त्यांनी त्या बालकाचे भगवंत स्वरूप जाणून त्यांची स्तुती केली आणि जन्म मृत्यूच्या फ़े-यातून कायम मुक्ती मिळण्याची भगवंतांना प्रार्थना केली. भगवान कपिलांनी त्यांची शुद्ध बुद्धीने आणि कर्माने केलेली प्रार्थना पाहून आपल्या पित्याला इच्छित वर प्रदान केला आणि त्यांना त्यांच्या सर्व कर्मबंधनांमधून मुक्ती देऊन जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्त केले.
माता देवहुतिने भगवान कपिलांचे विष्णुस्वरूप जाणून त्यांना प्रश्न केलेत. भगवान, मी म्हणजे शरीर या भावनेपासून मनुष्यमात्रांना मुक्ती कधी आणि कशी मिळेल ? हा देह धारण केल्यानंतर हा देह आणि त्याच्या अनेक लीला यापासून मी, आत्मा म्हणून वेगळा आहे हे ज्ञान मनुष्यमात्रांना कसे प्राप्त होईल ?
यानंतर भगवान कपिलांनी आपल्या मातेला जो उपदेश केलेला आहे तो कपिलगीता म्हणून ओळखला जातो. भगवान कपिल आपल्या आईला सांगताहेत, "आई, मनुष्यांचे मनच त्यांच्या बंधनाला आणि मोक्षालाही कारण होत असते. मनुष्यांच्या मनांनी मी आणि माझा देह एव्हढ्या्पुरताच विचार केला तर त्यांचे मन काम क्रोध मद इत्यादि गोष्टींकडे जाऊन या सृष्टीवर बांधल्या जाते. त्यांना जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यात हे मनच अडकवून ठेवते. तेच मन जर मनुष्य़मात्रांनी भगवंत, संत महापुरूष यांच्या शिकवणुकीत, त्यांच्या निरंतर सेवेत लावले तर ते या पृथ्वीतलावर सर्व कर्मबंधनांपासून त्या मनुष्याला मुक्ती प्राप्त करून देणारे ठरते."
"शांत, सरळ मनाचे, दयाळू, कुणालाही ताप न देणारे, सत्पुरूषांचा सन्मान करणारे माझे भक्त माझ्या चरित्राचे श्रवण आणि कीर्तन करीत राहिलेत तर त्यांना या संसारातला कुठलाही प्रसंग ताप किंवा दुःख देत नाही. अशा साधूपुरूषांचा संग जर इतरांनी केला तर त्यांच्याही मनांमध्ये त्या साधूपुरूषांची विरक्ति संक्रमित होईल आणि त्यांचीही मने हळूहळू मुक्त होऊ लागतील."
भगवान कपिल आपल्या आईला उपदेश करताना पुढे असे सांगतात, " आई, माझी खरी भक्ती करणारे सत्पुरूष केवळ माझ्यावरील प्रेमामुळे माझी भक्ती करीत असतात. आपण करीत असलेल्या भक्तीचे फ़ळ म्हणून आपल्याला मुक्ती मिळेल, भगवंताचे दर्शन मिळेल या अत्यंत सात्विक याचना सुद्धा त्यांचा मनाला शिवत नाहीत. अत्यंत निष्काम भक्ती ते करीत असतात आणि त्यामुळेच ते मला प्राप्त करून घेतात. एकदा मी त्या सत्पुरूषांना प्राप्त झालो की त्यांनी कधीही याचना न केलेली सगळी मुक्ती आदि सुखे मी त्यांना आपोआपच प्रदान करीत असतो. पण त्या सत्पुरूषांची त्याचावरही आसक्ती नसते."
आणि यानंतर भगवान कपिल यांनी आपल्या मातेला उपदेश करताना या संसारात असलेल्या मनुष्यमात्रांनी नक्की काय करावे आणि काय करू नये, आपल्या मनावर संयम ठेऊन भगवत्प्राप्तीकरिता नेमके काय करावे ? याचा अगदी व्यावहारिक उपदेश केलेला आहे. जो आज कलियुगात सुद्धा आपणा सर्वांना अत्यंत उदबोधक आहे आणि प्रत्यक्ष आचरणात आणण्याजोगा आहे. त्याप्रमाणे वर्तन ठेवल्यानंतर मनुष्यमात्रांना एका दिवसात या जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्ती मिळेल असे आश्वासन भगवान कपिल आपल्याला देत नाहीत. त्यांनी या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करून आपल्या मनाला वळण लावल्यानंतर हळूहळू आपल्या मनात, वर्तनात बदल होऊन एकदिवस आपल्याला त्या सच्चिदानंदस्वरूप भगवंताची प्राप्ती नक्की होईल अशी ग्वाही मात्र भगवान कपिल देत आहेत. या जगातून. जन्म मरणांच्या अनंत फ़े-यांमधून मुक्ती मिळवू इच्छिणा-या आपल्यासारख्या समस्त सांसारिक जनांनी श्रीमदभागवताच्या तृतीय स्कंधातील अठ्ठाविसावा अध्याय हा मुळापासूनच वाचण्याजोगा आहे. तो अध्याय कायम वाचनात ठेऊन त्यात दिलेल्या मार्गाचे पालन सातत्याने करीत राहणे हीच कपिल गीतेची फ़लशृती आहे.
त्यानंतरच्या एकोणतीस, तीस, एकतीस आणि बत्तीसाव्या अध्यायात भगवान कपिलांनी मनुष्यमात्र त्यांच्या गर्भावस्थेपासून ते मृत्यूपश्चात आपल्या कर्मबंधनांमुळे कशा प्रकारची दुःखे भोगतात याचे भयंकर चित्र आपल्या आईला उपदेश करण्याच्या मिषाने आपल्या सर्वांसमोर ठेवलेले आहे. अगदी याच प्रकारचे वर्णन श्रीगुरूचरित्रातल्या एका अध्यायाय आलेले आहे. ते वर्णन नुसते ऐकले जरी तरी या संसाराच्या आणि त्यात वारंवार जन्म मृत्यूचे फ़ेरे घेण्यामुळे निर्माण होणा-या भयावह स्थितीची जाणीव मनाला होते आणि मनात वैराग्य उत्पन्न होते.
तृतीय स्कंधाच्या तेहेतीसाव्या अध्यायात आपण सर्व जीवांच्या वतीने माता देवहुतिने भगवान कपिलांचे आभार मानलेले आहेत, त्यांची स्तुती केलेली आहे.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य त्रयोदशी शके १९४८ दिनांक १२ / ७ / २०२६
१२ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
No comments:
Post a Comment