Saturday, March 11, 2023

मर्मबंधातली ठेव ही...

 माझ्या आयुष्यात ७ फेब्रुवारी, १२ मार्च आणि २ डिसेंबर हे दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. ७ फेब्रुवारीला माझी आणि माझ्या प्रिय पत्नीची लग्ननिश्चिती झाली, १२ मार्चला आमचा वाङनिश्चय झाला आणि २ डिसेंबरला आमचे लग्न झाले. हे तीन दिवस माझ्या मनावर जन्मोजन्मींसाठी कोरल्या गेलले आहेत. जणू हे दिवस म्हणजे मर्मबंधातल्या ठेवीच होऊन राहिलेले आहेत.

७ फेब्रुवारीला लग्ननिश्चिती झाल्यानंतर (त्यासंबंधी सविस्तर कथा इथे आणि इथे) आमच्यात मोजून दोन तीनदा फोनवर बोलणे झाले. त्यावर्षी १४ फेब्रुवारीला तिने मला ग्रीटिंग पाठवले पण सविस्तर पत्र वगैरे लिहीण्याइतका मोकळेपणा नात्यात अजूनही आलेला नव्हता. ते ही साहजिकच होते म्हणा. वैभवी तर स्वभावतःच अत्यंत लाजरीबुजरी आणि मी वरवर कितीही धिटाई दाखवत असलो तरी अशा गोष्टीत पुढाकार घेण्यासाठी कायम शेवटल्या रांगेत पळणारा.

लग्ननिश्चिती झाली. तत्कालीन प्रथेप्रमाणे लग्नसमारंभाविषयी उभय घरांमध्ये देण्याघेण्याच्या बाबी ठरल्यात. अर्थात या बाबींमध्ये माझा सहभाग नव्हताच. मी लग्ननिश्चिती करून मुंबईला नोकरीवर रूजू झालो होतो. पण याबाबतीत माझ्या आकांक्षा मी त्या बोलणीत सहभागी होणार्‍या माझ्या आईला आणि माझ्या मामांना फोनवरून स्पष्टपणे कळवलेल्या होत्या. त्यानुसारच अजिबात काही तणातणी किंवा ताणाताणी न होता लग्नाची बोलणी वगैरे छान पार पडलीत आणि वाङनिश्चय रविवार, १२ मार्च २००० रोजी करण्याचे ठरले.

आमचा वाङनिश्चय समारंभ चंद्रपूरला देशपांडेंच्या रहात्या घरी,  वाड्यात तर लग्न नागपूरला करण्याचे ठरले होते. किन्हीकरांकडे मी म्हणजे थोरल्या पातीची थोरली पाती. तर देशपांडेंकडेही वैभवी म्हणजे तिच्या बहिणींमधली सगळ्यात मोठी. त्यामुळे दोन्ही घरात फार उत्साह होता. मी १० मार्च रोजीच नागपूर मुक्कामी दाखल झालो. समारंभासाठी चंद्रपूरला जाण्यासाठी निमंत्रितांची यादी करायला लागलो आणि लक्षात आले की माझ्यावर प्रेम करणारी नातेवाईक, सुहृद, मित्रमंडळी इतकी होती की सगळ्यांना चंद्रपूरला समारंभासाठी घेऊन जाण्यासाठी चार ते पाच बसेस कराव्या लागल्या  असत्या. आमच्यासाठी अव्यवहार्य तर होतेच शिवाय वैभवीच्या घरच्यांच्या व्यवस्थापनाची परीक्षा बघण्यासारखे आणि त्यांच्याकडल्या व्यवस्थेवर अकारण असह्य ताण टाकणारे होते. म्हणून मग प्रत्येक कुटुंबातून एक प्रतिनिधी असे आम्ही निश्चित केले आणि तशी निमंत्रणे केलीत.

त्याकाळी नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी "गणराज ट्रॅव्हल्स" ही सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होती. (त्याविषयीचा एक लेख इथे) त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन १२ तारखेची सकाळची ८ ची नागपूर - चंद्रपूर फेरी आम्ही पूर्णपणे आरक्षित केली. परतीसाठी त्यांचीच संध्याकाळी ६ ची फेरी आरक्षित केली. अशावेळी गणराज वाले त्यांची बस त्या 'पार्टी' च्या घरापर्यंत पाठवीत असत आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवूनही देत असत. फार सोयीची अशी ही सेवा होती.

१२ मार्च उजाडला. मी मनात खूप हरखून गेलेलो होतो. बाहेरगावाहून घरी पाहुणे राहुणे मंडळी आलेलीच होती. सगळ्यांनी भराभर आवरले. ठरल्याप्रमाणे पावणेआठच्या सुमारास गणराज घरासमोर उभी झाली. माझे सदगुरू परम पूजनीय बापुराव महाराज आणि परम पूजनीय मायबाई महाराज यांचे चिरंजीव आणि मला गुरूतुल्य असलेले श्री. बाबाकाका यांच्या हस्ते नारळ वाढवून आम्ही सगळे बसमध्ये बसलोत. बस अगदी वेळेवर निघाली. गंमतीची बाब म्हणजे यावेळीही मी माझ्या आवडत्या आसनावर, ड्रायव्हर केबिनमध्येच बसलेलो होतो. माझ्यासोबत माझा बंधूवर्ग आणि मित्रवर्गपण केबिनमध्येच बसलेला होता. मौजमजेचा, उत्सुकतेचा प्रवास सुरू झाला.




प्रवासात गाणी, अंताक्षरी सगळेच सुरू होते. वाटेत जांब स्थानकावर चहापानासाठी अल्प विश्रांती घेऊन आमचा प्रवास सुरूच होता. ठरल्या वेळेनुसार साधारण सव्वातीन तासांनी, सकाळी ११.१५ ला आम्ही चंद्रपूरला पोहोचलो. पूर्ण बस आम्हीच आरक्षित केलेली असल्याने बस थेट बालाजी वाॅर्डात देशपांडेंच्या घराजवळ पोहोचली.



बसमधून उतरून आम्ही सगळे माझ्या आजोळी जाणार होतो. तिथे थोडावेळ थांबून चहापाणी वगैरे झाले की आम्ही देशपांडेंकडे कार्यक्रमस्थळी दाखल होणार होतो. चंद्रपूरातले माझे आजोळ आणि देशपांडेंचा वाडा अगदी जवळजवळ. मध्ये फक्त १ गल्ली आणि एक घर. बालपणी उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टयांमध्ये माझा मुक्काम महिनोनमहिने माझ्या आजोळीच असायचा. समवयस्क मामेभावंडे, खूप प्रेम करणारी आजोळची प्रेमळ मंडळी. त्यामुळे मी आजोळी खूप रमत असे. पण इतकी  वर्षे आम्ही दोघे इतक्या जवळ वावरत असूनही आमचा एकमेकांशी कसलाही संपर्क मात्र कधीच आला नाही ही एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती. एकेमकांचा उल्लेखही कधी एकमेकांसमोर झाल्याचे आम्हा दोघांनाही कधीच स्मरत नव्हते. माझ्या काही नातेवाईकांना मात्र माझे आजवरचे वारंवार चंद्रपूरला जाणे आणि वैभवीचे घर माझ्या आजोळच्या इतक्या जवळ असणे यावरून आमचा हा प्रेमविवाह असावा अशी दाट शंका आली होती. ती त्यांनी तशी बोलूनही दाखवली होती पण आतली प्रामाणिक गोष्ट आम्हा दोघांना आणि दोघांच्याही घरच्यांना माहिती होती. 


बसमधून उतरताना कुठेतरी वैभवी आपल्याला घ्यायला आली असेल अशी मनात वेडी आशा होती. ते तसे शक्य नाही, ती  नवरी मुलगी आहे, आज ती तिच्याच तयारीत, घाईत असेल हे डोक्याने स्वीकारले होते पण वेडे मन मात्र तिचीच वाट बघता होते. बसमधून उतरताना V for Victory (or V for Vaibhavi) अशी खूण करत आम्ही सगळे उतरलो. आजोळच्या गल्लीत शिरताना एक नजर देशपांडेंच्या गल्लीकडे गेलीच. ना जाणो चुकूनमाकून वैभवी तिथे आली असली तर ? पण तसे काही झाले नाही. आम्ही सगळे निमूटपणे आजोळच्या वाड्यात दाखल झालोत.


आजोळच्या जवळपास ३०० वर्षे जुन्या वाड्यात माझी वृद्ध आजी, लाडके मामा - मामी, बरोबरीची मामे भावंडे सगळे नागपूरकडच्या वऱ्हाडाची वाट बघत होते. चहापाणी वगैरे झाले आणि देशपांडेंकडे जेवण तयार असल्याची वर्दी घेऊन त्यांच्याकडली मंडळी आलीत. आम्हा सगळ्यांची तयार होण्याची एकच घाई सुरू झाली. जुना वाडा, त्यातले एकुलते एक बाथरूम (न्हाणीघर किंवा अंगधुणे हा त्यासाठी वापरला जात असलेला शब्द.). पन्नासाच्या गणसंख्येच्या आसपास असलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी कसे पुरे पडणार ? शेवटी खुद्द नवऱ्या मुलाने एका भांड्यात पाणी घेऊन परसदाराच्या अंगणात आपला मुखचंद्रमा धुतला. आणि प्रवासातले कपडे बदलून त्यातल्यात्यात बरे कपडे लेऊन आम्ही तयार झालो. मेकअप वगैरेंचा प्रश्नच नव्हता. चेहेऱ्याला विको टर्मरिक चोपडले आणि वरून एक पावडरचा (बहुतेक Ponds Dreamflower Talk च) थर फासला की झाले काम.

आजकालची पिढी (अगदी नवरे मुलगे सुद्धा) वाङनिश्चय, लग्न आदी समारंभात किती  नट्टापट्टा करतात हे पाहिले की अतिशय विस्मय वाटतो, हेवाही वाटतो. पण तेव्हा आम्ही उपलब्ध असलेल्या साधनांचाच वापर करून देशपांडेंकडे मांडवात दाखल झालोत.


आता मला इथे आधीच नमूद करायला हवे की बालपणापासून अंघोळ झाली की डोईवर खोबरेल तेल थापल्याशिवाय आम्ही कधीही कुठेही गेलो नाही. केशभूषा करण्याइतके केस कधीच डोईवर नव्हते आणि तेव्हा असे तेल ना लावता भुरकट केसांनी वावरणे आमच्या घरच्या व्यवहारात तरी नामंजूर होते. तसे तेल आजही माझ्या डोक्यावर होतेच. त्या तेलाचा संदर्भ आमच्या लग्नानंतर काही महिन्यांनी आमच्या बोलण्यात आला . आपल्या साक्षगंधाच्या दिवशी तू किती रे तेल चोपडले होते ? या वैभवीच्या चिडवण्याने. "अगं, ती आमची बालपणापासूनची सवय." वगैरे माझ्या सबबी तिने ऐकून घेतल्याचं नाहीत. 

मांडवात प्रवेश करताक्षणी आमच्या वऱ्हाडातल्या प्रत्येकाला वैभवीच्या दर्शनाची आस लागलेली होती. मला तर फारच. पण इतर बऱ्याच जणांनी आतापर्यंत तिचा फक्त फोटोच बघितलेला होता त्यामुळे ती प्रत्यक्ष कशी दिसते ? याचे औत्सुक्य प्रत्येकाच्या मनात होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावरून ते ओसंडून वाहात होते. आणि सगळ्यांच्या उत्सुक्याची अशी सीमा गाठल्या गेल्यावर माझ्या प्रियतमेचे आगमन झाले. त्यांच्याच वाड्यात कार्यक्रम त्यामुळे तिच्या घरातून निघून ती  मांडवात  दाखल झाली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या. रामसारख्या व्यक्तिमत्वाला असेच  सात्विक, सोज्वळ सौंदर्य हवे होते यावर आमच्याकडल्या सगळ्यांचे एकमत झाले. 

दुपारच्या जेवणाला सुरुवात झाली. मध्ये माझी आई आणि आजूबाजूला आम्ही दोघे असे जेवायला बसलोत. मला आता कुठली भूक आणि कुठली तहान ? तिच्या माझ्या जीवनातल्या आगमनाने सगळी भूक तहान मी विसरलेलो होतो. जनरीत म्हणून कसेबसे दोन घास पोटात ढकललेत. वारंवार तिच्याकडेच बघण्याचा अनावर मोह होत होता पण ते चांगले दिसेल का ? या भीडेपोटी मी तो मोह टाळत होतो.



दुपारचे जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे पुन्हा माझ्या आजोळी परतलो. आणि थोड्या वेळाने पुन्हा सगळे तयार होऊन संध्याकाळच्या वाङनिश्चय समारंभासाठी देशपांडेंच्या वाड्यात दाखल झालोत. वाङनिश्चय समारंभ अगदी पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीप्रमाणे सुरू झाल्या. प्रथम नियोजित वराची पूजा. त्याला नवे कपडे देणे वगैरे. 



नंतर मग वधूपूजेसाठी वैभवीचे मंडपात पुनरागमन झाले त्याक्षणी किन्हीकरांकडल्या सगळ्या मंडळींच्या डोळ्यातले ओसंडून वाहणारे तिच्याविषयीचे कौतुक अभावितपणे केमेऱ्यात कैद झाले होते. माझ्या आजीचे, मावस आजीचे थकलेले  वृद्ध नेत्र तिला ओवाळत होते. तिचे सात्विक सौंदर्य सगळ्यांचेच  मन मोहून घेत होते. "एका लग्नाची गोष्ट" हे नाटक आम्ही आमच्या लग्नानंतर बघितले. त्यातले "ती  परी अस्मानीची." हे गाणे या प्रसंगात अगदी चपखल बसत होते.















या वाङनिश्चय समारंभात वर पूजनामध्ये तिच्या काकाकाकूंनी मला अंगठी घातली आणि वधू पूजेत माझ्या काकाकाकूंनी तिला अंगठी घातली. आजवरच्या अनेक वाङनिश्चय समारंभात वधू आणि वर एकमेकांना अंगठी घालतात हे मी बघितलेले होते. हा प्रसंग आज कधी येईल ? याची मी चातकासारखी वाट बघत होतो. अजूनही तिच्याशी फारसे बोलणे झालेलेच नव्हते. मी माझ्या धाकट्या भावाला सांगून हा एकमेकांना अंगठी प्रदान करण्याचा एक वेगळा प्रसंग त्यांच्याच वाड्यात एका बाजूला घडवून आणला. साक्षीला केवळ दोन्हीकडली तरुण मंडळी. अशा प्रसंगी दोन्ही बाजूंनी थट्टा मस्करी रंगली आणि ती झकास लाजली. अहाहा ! माझे हृदय तिथे अगदी खल्लास. "हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे." या ओळींची आठवण झाली. फक्त हे दुःख अतिशय सुखद संवेदनेचे दुःख होते. तो क्षण आपल्या आयुष्यात "फ्रीझ " होऊन कायमचा राहावा असा तो एक दुर्मिळ क्षण.







कधीही संपू नये असा वाटणारा तो दिवस संपला. आमच्याकडली नागपूरला परत जाण्यासाठी तयारी करू लागली. मला मात्र तिला भेटण्याची, तिच्याशी बोलण्याची इतकी ओढा लागलेली होती की मी दोन दिवसांनी नागपूरला परतण्याचा माझा निश्चय जाहीर केला. आमच्याकडल्या सगळ्यांनी त्याला हसत हसत मान्यता दिली. आणि माझा चंद्रपूरचा मुक्काम दोन दिवसांनी वाढला.

त्या दिवशी संध्याकाळी देशपांडेंकडून सहज बोलावणे आले. तिला पुन्हा भेटण्याचे निमित्त मला हवेच होते. मी त्यांच्या वाड्यात पुन्हा गेलो. तिथे त्यांच्याकडली सगळी मंडळी जमून थट्टामस्करीचा माहौल होता. मला गाणे म्हणून दाखवण्याचा आग्रह झाला. मी ही लाजत लाजत अतिशय मध्यममार्ग स्वीकारून "गुरू महाराज गुरू" हे भजन सादर केले. तिच्या चेहे-यावर आनंद, कौतुक वगैरे काहीही दिसेना. माझे गाणे तिला आवडले आहे की नाही ? काहीच कळायला मार्ग नव्हता.


ती रात्र मी माझ्या मामांच्या घरी नेहेमीप्रमाणे मामे भावंडांशी गप्पा, मस्करीत काढली. झोप अशी फ़ारशी झालीच नाही. दुस-या दिवसाची मी वाटच बघत होतो. मामांच्या घरून सकाळीच मी तिला तिच्या घरी फ़ोन लावला आणि भीत भीतच विचारले "अगं, मी आज इथे तुझ्यासाठीच थांबलोय. आपण दुपारी भेटूयात का ?" ती पण याचीच वाट बघत होती बहुतेक कारण ती लगेच "हो" म्हणाली. दोघांमधले Ice Breaking कुणी करायचे यासाठीच दोघेही संकोचत होते हे आम्हा दोघांनाही कळले. थोड्या वेळाने आमच्या सासुबाईंचा मला त्यादिवशी दुपारी जेवणाला बोलावण्याचा फ़ोन आला. त्या माऊलीने मला आवडतात म्हणून त्यादिवशी स्वतःच्या शाळेत सुटी घेऊन घरी पुरणपोळीचा घाट घातला होता. 


दुपारी माझ्या आवडत्या पुरणपोळीचे जेवण करून आम्ही दोघे चंद्रपुरातल्या जयंत सिनेमात "कहो ना प्यार है" बघायला गेलो. सिनेमा बघितला कमी आणि मनमुराद गप्पा फ़ार मारल्या. ती अबोल असली तरी गप्पांची तिला ॲलर्जी नाही हे कळले आणि ती मनमोकळी आहे हे ही कळले. तो दिवस म्हणजे आयुष्यातल्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक दिवस.


आमचे लग्न पार अगदी २ डिसेंबर ला ठरले. मधला आठ नऊ महिन्यांचा कालावधी आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला मिळाला. एकमेकांना आम्ही जवळपास शंभरावर पत्रे या काळात लिहीलीत. (अर्थातच सगळी पत्रे माझ्या आणि तिच्याही संग्रहात जपून ठेवलेली आहेत.) दरवेळी मी मुंबईवरून सुट्ट्यांमध्ये नागपूरला आलो की वैभवीही चंद्रपूरवरून नागपूरला यायची. मग आम्ही खूप भटकायचो. एकमेकांशी खूप बोलायचोत. भविष्याचे खूप नियोजन करायचोत. कधीकधी लांब सुटी असली की मीच चंद्रपूरला जायचो. राहण्याचा प्रश्नच नव्हता. आजोळी रहायचो आणि आम्ही दोघे चंद्रपुरातही खूप भटकायचोत, खूप संवाद साधायचोत. नंतरच्या बावीस वर्षातल्या आमच्या संसारतले आमच्यातले अद्वैत, ऐक्य साधण्यासाठी या कोर्टशिप पिरीयड्चा फ़ार उपयोग झाला. तेव्हा कळला नाही तो पण संसारात मुरल्यावर मात्र दोघांनाही त्या दिवसांच्या या उपकारांची जाणीव झाली.


आम्हा दोघांच्याही हृदयात हे दिवस म्हणजे जन्मोजन्मीच्या मर्मबंधांची ठेव होऊन कायमचे राहिले हे काय वेगळे नमूद करायला पाहिजे ?


- वैभवीच्या स्वभावाचा, सौंदर्याचा आणि साधेपणाचा एक आशिक, राम किन्हीकर.





No comments:

Post a Comment