"राखावी बहुतांची अंतरे" या नीतीने नेमस्तपणे पापभीरू जीवन जगत आल्यानंतर
सज्जन माणसाच्या आयुष्यात एकवेळ अशी येते
की आता कुणालाही कसलेही explaination द्यावेसे वाटत नाही.
त्या माणसाविषयी कसलेही गैरसमज बाहेर पसरले असोत तो माणूस त्या गैरसमजाबाबत अत्यंत उदासीन असतो. एकेकाळी आपल्याबाबत गैरसमज होऊच नयेत म्हणून कायम धडपडणारा तो माणूस, कायम स्वतःचे मन मोडून जगणारा तो माणूस आता स्वतःविषयीच्या वंदता, गैरसमज कानावर आलेत तरीही कसलीच पर्वा करीत नाही.
कुणालाही कसलेही स्पष्टीकरण द्यायला आपण बांधील नाही इतका तो मुक्त होतो.
त्याचे असे हे मुक्त होणे त्याच्या स्वतःसाठी चांगले असले तरी आसपासच्या वावरणा-यांचे यात नुकसान होते. ते तसे होऊ नये म्हणून त्या सज्जन व्यक्तीने आजवर प्रयत्न केलेले असतात पण नंतर त्याचाही नाईलाज होतो. आणि गंमत म्हणजे हे असे नुकसान होतेय हे ज्यांचे नुकसान होतेय त्यांनाही कळत नसते किंवा कळले तरी वळून घ्यायचे नसते.
स्वतः स्वतःच्याच आयुष्यात जबाबदारीने वागलो, स्वतः स्वतःलाच उत्तरदायी असलो की तेवढे पुरेसे आहे. आपण चुकीचे कधीच वागलेलो नाही आणि आजवरच्या जीवनाचा विचार केला तर कधी वागणारही नाही एवढा विश्वास स्वतःचा स्वतःवर असला की पुरे. इतके स्व स्वातंत्र्य मनातून मिळवले की झाले.
आता या वृत्तीला कुणी उच्छृंखल म्हणोत, कुणी बेफाम म्हणोत, कुणी स्वार्थी म्हणोत पण ...
त्यावरचे उत्तर वाचायला पुन्हा पहिल्या ओळीपासून वाचा.
- "की फर्क पैंदा" या अत्यंत स्वातंत्र्य उदगाराचा मनापासून आनंद घेणारा मुक्त आणि मस्त प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment