मागे आपण बघितलेल्या जडभरताच्या कथेच्या समांतर किंवा अगदी विरूद्ध जाणारे हे अजामिळोपाख्यान. आयुष्यभर भगवतभक्ती केलेला जीव केवळ आयुष्याच्या अखेरच्या काही क्षणात वात्सल्यबुद्धीने का होईना एका जड जीवाच्या मायेत अडकतो आणि त्यासाठी अगदी हातातोंडाशी आलेला मुक्तीचा घास त्याला दुरावतो. त्यानंतर त्याला या पृथ्वीतलावर दोन अधिक जन्म घ्यावे लागतात ही जडभरताची कथा. पण अजामिळाची कथा याच्या अगदी विरूद्ध जाणारी आहे. तरीही दोन्हीही कथांचा संदेश आणि सारांश एकच आहे. म्हणून विरूद्ध भासणारी तरीही समांतर प्रवास करणारी ही दोन आख्याने.
अजामिळ नावाचा एक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला जीव होता. ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो शास्त्राने निषिद्ध असे वर्तन करून आपले व कुटूंबाचे पोट भरीत असे. चोरीमारी, जुगार, लूटपाट या त्याचा मुख्य व्यवसाय होता. जगणा-या अनेक जीवांना त्रास देत देत आपले जीवन जगत असताना ८८ वर्षात त्याने असंख्य पापे केलीत.
अजामिळाचे आपल्या धाकट्या पुत्रावर फ़ार प्रेम होते. त्याचे नाव नारायण. त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे तो अगदी नारायणमय झालेला होता. त्याच्या मुखात आणि मनात सतत धाकट्या मुलाचे, नारायणाचेच नाव असायचे. अजामिळाच्या मृत्यूसमयी त्याला यमदूतांचे भीषण दर्शन झाले आणि त्याच्या मुखातून जवळच खेळत असलेल्या आपल्या मुलाला "नारायणा" अशी आर्त हाक गेली. प्राणान्ताच्या समयाला अत्यंत आर्त भावनेने प्रभूंचे नाम मुखात आल्यामुळे तिथे विष्णूदूत धावून आलेत आणि अजामिळाला वैकुंठलोकी घेऊन जाण्याचे प्रयत्न करू लागलेत.
त्याला यमलोकी नेऊन त्याच्या जन्मभराच्या पापकर्मांबद्द्ल यमयातना देऊ इच्छिणारे यमदूत आणि त्याला वैकुंठलोकी घेऊन जाणारे विष्णूदूत यांचा बराच वाद त्याठिकाणी झाला. यमदूतांनी पापी जीवांच्या मृत्यूनंतरच्या गतीबाबत विष्णूदूतांना सांगितले. श्रीमदभागवताच्या षष्ठ स्कंधातील पहिल्या आणि दुस-या अध्यायात हा संवाद प्रत्येक जीवाने वाचण्यासारखा, ऐकण्यासारखा आणि मनन करण्यासारखा आहे. यमदूतांचे बोलणे श्रवण करून आपल्यासारख्या संसारलिप्त मनुष्यमात्रांमध्ये मनोमन बोध होऊन आपण आपसूकच पापकर्मे करण्यापासून वंचित राहतो. हा संवाद नुसता श्रवण केला तरी आपल्यासारख्या मनुष्यमात्रांची पापे नष्ट होतात ती अशी.
अंतिमतः विष्णूदूतांनी यमदूतांना उपदेश करून अंतिमसमयी कुठल्या का रूपाने होईना पण ज्या जीवच्या मुखात, स्मरणात भगवंताचे नाम आलेले आहे त्याला वैकुंठप्राप्तीच झाली पाहिजे अशी श्रीविष्णूंची आज्ञा यमदूतांना सांगून अत्यंत पापी असलेल्या अजामिळाला वैकुंठलोकाला नेले. श्रीशुकदेव महाराज राजा परिक्षितीला उपदेश करताना सांगतात की राजा अत्यंत पापी जीव जरी असला तरी त्याला केवळ भगवंताच्या नामाने, स्मरणाने, पश्चात्तापाने, प्रायश्चित्तमुळे, भगवंतावरील निःसीम भक्तीमुळे जेवढा वैकुंठलोक प्राप्त होऊ शकेल तेव्हढा इतर यज्ञ यागादि कर्मांमुळे होऊ शकणार नाही. भगवंताच्या नामाचे प्रेम आणि भक्तीच त्याला त्याच्या पापकर्मांपासून तारून नेईल. मात्र एकदा पश्चात्ताप झाल्यानंतर आणि त्याने भगवंताजवळ आपली पापे कबूल केल्यानंतर पुन्हा त्याने पापमार्गाकडे जाऊन उपयोग होणार नाही.
अजामिळ आणि जडभरत. वरवर अगदी विरूध्द वाटणारी दोन आख्याने. पण दोघांचेही सार एकच. शेवटल्या क्षणी नाम साधल्या गेले पाहिजे. शेवटल्या क्षणी जीव जर संसारातल्या कुठल्याही गोष्टीत अडकून राहील तर जडभरताप्रमाणे अनेक कष्टमय जन्म पुढे घ्यावे लागतील पण जर अजामिळासारखे नाम साधले तर मात्र विनासायास भगवंतप्राप्ती होईल. म्हणून अनेक संतांनी आपल्याला आयुष्यभर नाम साधण्याचा कायमच उपदेश केलेला आहे. तसा साधण्याचा आपण सगळेच प्रयत्न करूयात.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध तृतीया / चतुर्थी शके १९४८ दिनांक १७ / ७ / २०२६
१७ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
No comments:
Post a Comment