चंद्रपूर माझे जन्मस्थान. आजोळ चंद्रपूर. बालपणापासून माझ्या प्रेमाची सगळी माणसे चंद्रपुरात. परम पूजनीय बापुराव महाराजांच्या परिवारात सामील झाल्यावर परम पूजनीय मायबाई महाराजांच्या मुखातून परम पूजनीय महाराजांचे चंद्रपुरातले वास्तव्य आणि त्यांना चंद्रपूर विषयी वाटणारी आत्मीयता धन्य कानांनी ऐकली होती.
"चंद्रपूर म्हणजे सत्पुरूषांचे माहेरघर" ही महाराजांची उक्ती मनोमन पटलीही होती.
योगायोगाने पत्नीही चंद्रपूरचीच लाभली. त्यामुळे चंद्रपूरच्या फ़ेर्या नियमीत व्हायला लागल्यात.
चंद्रपूरची भेट म्हणजे ग्रामदैवत महाकाली, जागृत आणि उपेक्षित असलेले तीर्थक्षेत्र अंचलेश्वर, महाराजांचे कुलदैवत असलेली एकवीरा जगदंबा, कृष्णस्वरूप असलेले योगी परम पूजनीय हयग्रीव महाराज, परम पूजनीय निकालस महाराज आणि ज्यामुळे आमचा धार्मिक पिंड घडला ते आजोळी असलेले श्रीलक्ष्मीनृसिंहाचे जागृत देवस्थान यांचे दर्शन अत्यावश्यकच. या सगळ्या ठिकाणांना भेटी देऊन मनाला परम समाधान लाभते.
चंद्रपुरात घडून येत असलेले बदल पाहून मन सुखावले. या शहराची स्वच्छतेकडे होणारी वाटचाल स्पृहणीय. त्याचबरोबर अंचलेश्वर देवस्थानाकडे होणारे दुर्लक्ष आणि परम पूजनीय हयग्रीव महाराजांच्या समाधीची उपेक्षित अवस्था पाहून मन खिन्न होत असते. भाविकांनी या ठिकाणांकडे आस्थेने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.








No comments:
Post a Comment