Tuesday, September 27, 2016

एक वेगळ्या वाटेवरचा प्रवास आणि अनुभव

१९ आॅॅगस्ट २०००. शनिवार. सकाळचे ७ वाजताहेत. कल्याण स्टेशनवरून आईला गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसवून दिलय. आता मोकळा वेळ. कॉलेजला आज सुट्टी आहे. (शनिवार रविवार सुट्ट्या. अहाहा ! गेले ते दिन गेले.) आत्ता घरी, पवईला, जाऊन काय करायच हा मोठ्ठा प्रश्न आहे. कारण मला सुट्टी असली तरी पार्टनर्सना नाही. ते आपापल्या ऑफ़िसांमध्ये गेलेले असणार आणि आज अर्धा दिवस कामकाज असल तरी दुपारी ४ शिवाय परतणार नाहीत. सगळ्या लोकल्स आता मुंबईच्या दिशेने गर्दी ओसंडून वाहताहेत आणि एव्हढ्या गर्दीत मुद्दाम घरी जाऊन  करणार तरी काय ? हा प्रश्नच आहे.

अचानक लक्षात येतय की इथूनच जवळ माळशेज असल्याच आपण वाचलय. जाऊन बघूयात. एकटाच ? हो. त्याला काय हरकत आहे. सगळ्या मित्र मंडळींच कधी जमेल काही सांगता येत नाही. आता तस खास काम पण नाही. जाऊन हे "माळशेज माळशेज " म्हणजे तरी नक्की काय ? बघूनच येऊयात. त्यावेळी जवळ मोबाईल इत्यादी साधने नव्हतीच. त्यामुळे कुणाला कळवण्याचा वगैरे प्रश्नच नव्हता. खिसा चाचपून पाहिला. कल्याण ते कांजूरमार्ग रिटर्न तिकीट होतेच. शिवाय वर १०० ची नोटही. मग काय जमतय आपल आज माळशेज.



लगोलग मी स्टेशन सोडून कल्याण रेल्वे स्टेशनसमोरच असलेल्या बस स्टॅंडकडे जातोय. साधारण कल्याण - नगर मार्गावर माळशेज असल्याची माहिती असल्याने नगर फ़लाटाकडे जातोय तर तिथे एक बस अगदी निघण्याच्या तयारीत. कंडक्टर काकांना " काका, बस माळशेज ला जाइल नं ? " हा प्रश्न विचारून आम्ही आत. (पत्ता विचारणे, ही बस नेमकी आपल्या गंतव्य स्थळी जाणार की नाही याबद्दल खात्री करून घेण्यासाठी विचारणे यात आपण कधी लाजत नाही. नंतरच्या होणा-या तोट्यांपेक्षा सुरूवातीला थोडे बावळट ठरलो तरी हरकत नाही.)

बस सुरू झालीय. आजवर कधीही न केलेल्या मार्गावरून प्रवास करीत असल्याने प्रवासाची उत्सुकता आहेच. खिडकीची जागा मिळाली नसली तरी जमेल तेव्हढे बाहेर बघून निसर्गाचा आस्वाद घेणे सुरू आहे. आजवर माझी समजूत ही की मुरबाड हे वाडा, मोखाडा बाजूला असावे. पण आमच्या मार्गावर मुरबाड येतय. "इतका सुंदर आणि रमणीय निसर्ग मुंबईच्या इतका जवळ आणि आजवर आपल्याला माहितीच नाही." या जाणीवेने मन जरा खंतावतेय.


(Photo courtesy : www.mygola.com) 

साधारणतः २ तासांच्या प्रवासानंतर माळशेज घाटाला सुरूवात झालीय. मुरबाडनंतर खिडकीची जागा मिळाल्याने आता निसर्गाच सौंदर्यपान मनसोक्त सुरू आहे. कधी थोडासा तर कधी चांगला जोराचा पाऊस लागतोय. वाटेत धबधबे रस्त्यावर आणि रस्त्यावरून जाणा-या वाहनांवर कोसळतायत. घाटात धुकं धुकं. वा दिल खुष.

साधारणतः अर्धा तास घाट चढल्यानंतर गाडी घाटमाथ्यावर येतेय आणि कंडक्टर काका आवाज देतायत "चला, माळशेज वाले उतरून घ्या." बस थांबतेय आणि उतरणारा मी एकटाच. आजूबाजूला घनदाट धुके. माळशेजविषयी मी जे काही ऐकल, वाचल त्यावरून माळशेज म्हणजे खंडाळा लोणावळा माथेरान सारखे हिल स्टेशन असावे अशी माझी समजूत. तिथे जरा ब-यापैकी हॉटेल्स, गेलाबाजार टप-या असतील. एखाद्या टपरीवर मस्त चहा भजी हाणू, थोडी भटकंती करू आणि दुपारी परतू असा माझा बेत. 

पण तिथे सकाळी साडेनऊच्या सुमारास आसपास दाट धुके आणि मी. तिसरं कुणीही नाही. आजवर बघितलेल्या हिंदी इंग्रजी सिनेमांतले धुक्याचे सीन्स आठवायला लागले आणि आतल्या आत पंढरी घाबरायला लागली. थोड इकडे तिकडे फ़िरल्यावर एक माणूस दिसला. त्याच्या जवळ विचारपूस केल्यानंतर त्याने एम. टी. डी. सी. चा रस्ता दाखवला. रस्ता म्हणजे काय ? धुक्यात एकीकडे बोट करून "सरळ जावा" असा सल्ला दिला आणि आमची स्वारी त्या अज्ञात दिशेने निघाली.

आत्ताच घाट चढून आलेलो असल्याने मी ज्या दिशेकडे धुक्यातून जातोय त्या दिशेला दरी आहे हे मला नक्की माहिती होत. मग आता किती पावलांवर दरी असेल ? वाट दाखवणारी व्यक्ती खरंच माणूस असेल ? की एखादा चकवा ? शंकांच मनात थैमान.

घनदाट धुके. अगदी १० फ़ुटांवरचे दिसत नाहीये. अंदाजा अंदाजाने मी पुढे जातोय. पुढे एकदम एक भकास घरवजा बिल्डींग दिसतेय. आत एक मिणमिणता टेंभा पेटलेला दिसतोय. मनुष्यमात्रांची कुठलीही खूण नाही. आत जाण्याची आपली तर हिंमतच नाही. त्या घराला कसाबसा वळसा घालून आणखी पुढे सरकतोय. मग ते एम. टी. डी. सी. च हॉटेल दिसतय. भांड्यात जीव पडतोय.

आत फ़ार गर्दी नाही. रेस्टॉरंट मध्ये जाऊन मेन्यू कार्ड चाळतोय तो धक्काच. साधे कांदेपोहे ३० रूपयांना ? चहा १० रूपयांना. (१९९९ मध्ये हा दर खूप जास्त होता.) माझ्याजवळ वट्ट ७८ रूपये आणि परतीच कल्याणपासूनच तिकीट आहे. चहापोहे शक्यच नाहीत. अशा वातावरणात फ़क्त चहा पितोय. आणि आल्यापावली परत.

परतताना धुकं जरी तेव्हढंच असलं तरी भीती थोडी कमी झालेली आहे. झपझप चालत पुन्हा हायवेवर येतोय. माळशेजच म्हणाव तस सौंदर्य जरी बघायला मिळालं नाही तरी " Destination is important but journey towards the destination is more beautiful and should be enjoyed. " या उक्तीवर विश्वास असल्याने तिथपर्यंतचा प्रवासही खूप एंजॉय केला.

अर्धा तास परतीच्या बसची वाट बघतोय. सकाळचे जवळपास साडेदहा वाजताहेत. कल्याणकडे जाणा-या बसेस नाहीत, ट्रक नाहीत, टेम्पो नाहीत. मुरबाडकडून एक दुचाकी येतेय. त्याला थांबवून चौकशी केल्यावर समजतय की घाटात एका तीव्र वळणावर एक ट्रेलर अडकलाय आणि त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झालीय. वाहतुक सुरळीत व्हायला किमान ३-४ तास नक्की जातील.


 Courtesy : holidayiq.com

त्या एकाकी जागेवर शांत ४ तास उभे राहून बसची वाट बघण्यापेक्षा घाटातून जमेल तेव्हढं अंतर कापत चालत जाण्याचा विचार पक्का होतोय. तेव्हढाच घाट आपल्याला जवळून अनुभवता येईल. निसर्ग खुणावत होताच. मग आम्ही निघालोच. मध्ये एखादी गाडी वगैरे मिळालीच तर लिफ़्ट मागून उतरू घाट. आत्ता तर चालायला सुरूवात करूचयात. चराति चरतो भगः. (मोक्याच्या वेळी स्वतःच्या समर्थनासाठी अशी सुभाषित सुचणे  यासारखं दुसरं सुख नाही, तुम्हाला सांगतो.) 

एक सर येतेय. आता भिजायचच हा विचार पक्का आहे त्यामुळे खिशातलं पैशांच पाकीट प्लॅस्टीकमध्ये टाकून निर्धास्त झालोय आणि सचैल भिजतोय. (मोबाईल तेव्हा नव्हता हा केव्हढा मोठ्ठा फ़ायदा होता नाही ? नाहीतर त्याचीच काळजी लागून राहिली असती आणि मनमुराद आनंद उपभोगता आला नसता.) मस्त पावसात भिजत उतरतोय. मधेच तो माळशेजमधला बोगदा लागतोय. अजूनही दोन्ही बाजूंनी वाहनांचे चिन्ह नाही. रस्त्यावर आडोशाला थांबलेली काही तुरळक स्थानिक वाटसरू मंडळी आणि मी एक भटका मुसाफ़िर. वा ! अवर्णनीय आनंद.


(Photo courtesy : www.mygola.com)

तंद्रीतच उतरतोय. मध्ये मध्ये असंख्य धबधबे लागतायत. मघाशी बसमध्ये होतो. आता मस्त प्रत्येकाखाली भिजून त्यांचा आनंद घेतोय. किती वेळेला भिजलो आणि किती वेळेला अंगावरचे कपडे जोरदार वा-यांमुळे वाळलेत याचा हिशेब ठेवणे सोडलेय. स्वतःची कंपनी स्वतःला किती एंजॉय करता येते याचा नवीन वस्तूपाठ.

गाड्या मध्येच अडकल्या आहेत हे किती छान झालय न ? नाहीतर मुंबईतल्या अशा पावसाळी सहलीवर निघणा-या, बसेस भरभरून येणा-या आणि आपल्या गोंगाटाने, कर्क्कश्श गाण्यांने आणि दारूकामाने वातावरण बिघडवून टाकणा-या मंडळींचीच गर्दी आज माळशेजमधे असती. आज मी आणि निसर्ग. मध्ये कुणीही नाही. 


(Photo courtesy : www.mygola.com)

मध्येच ते ट्रॅफ़िक जॅम झालेल वळण येतय. मोठ्ठा ट्रेलर वळणावर आडवा फ़सलाय. इकडची वाहतूक इकडे, तिकडची तिकडे. दोन तीन कल्याणकडे जाणा-या बसेसही अडकल्यायत. आतले प्रवासी हताश होऊन वाट बघतायत. तेव्हढा नागर संपर्क सोडला तर मी पुन्हा वाटेने एकटाच घाटपायथ्याकडे वाटचाल करतोय.

शेवटी जवळपास ४ तास पायपीट केल्यानंतर पायथ्याशी असलेल्या सावर्णे गावातल्या, एका धाब्यावर विसावतोय. भूक खूप लागलीय. "चराति चरतो भगः" हे जरी खरं असलं तरी "अती चराति प्रज्वालितो जाठराग्निः" हे पण तेव्हढच खरय. (दुसरं सुभाषित अस्मादिकांच आहे. संस्कृत जाणकारांनी मार्गदर्शन करावे. सध्या आमच्या कन्येचा संस्कृतचा अभ्यास घेण्याच्या निमित्ताने आमचंही संस्कृत भाषेच पुनर्विलोकन सुरू आहे. त्यामुळे सुभाषितात एकाची भर पडली.)

धाबा साधासाच आहे. टिपीकल ट्रकवाल्यांसाठीचा. खाटा वगैरे टाकलेला. त्यातल्याच एका खाटेवर बसतोय आणि काय मजा ! पाय आपोआप हलतायत. आता मी ४ तासांच्या पायपीटीनंतर बसलोय ते माझ्या पायांना माहितीच नाही जणू. ते अजूनही चालतायत. धाबा मालकाला सगळी हकीकत सांगतोय आणि त्याच्या कडून माहिती मिळतेय की मी जवळपास ११ किमी अंतर पायीच उतरलोय. स्वतःच्या वल्लीपणाच कौतुक वाटतय. दोन तंदुरी रोट्या आणि दालफ़्रायवर जेवण भागतय आणि परतीसाठी एक बस घाट उतरून येताना दिसतेय. आनंद !

परत कल्याण आणि लोकलने कांजूर आणि तिथून पवई. घरी परतल्यावर पार्टनर्सना हा प्रकार वर्णन करून सांगतोय. ते अचंभित. " लेका, तू कधी काय करशील याचा नेम नाही बुवा. " अशी टिपीकल मकरंद अनासपुरे स्टाईल दाद.

अगदी अविस्मरणीय. जन्मभरासाठी मर्मबंधातली ठेव होऊन राहिलेला वेगळाच आणि अगदी unplanned प्रवास. आज परमेश्वराच्या अधिक जवळ गेल्याचे जाणवले. 








8 comments:

  1. Mast shirshak, asmadikana suchlela subhashit ajunch sunder, me anekda malshej la jaun aloy, bus, car, bike ani cycle suddha, ani tumcha pravas vachtana ghatatla ekan ek valan rasta mtdc resort agdi dolya samor ubha rahila

    ReplyDelete
  2. Mast shirshak, asmadikana suchlela subhashit ajunch sunder, me anekda malshej la jaun aloy, bus, car, bike ani cycle suddha, ani tumcha pravas vachtana ghatatla ekan ek valan rasta mtdc resort agdi dolya samor ubha rahila

    ReplyDelete
  3. Mast narration!

    Regard, Ramakrishna Naidu.

    ReplyDelete
  4. Simply superb! Being a lover of solo trips, it was a treat to read

    ReplyDelete
  5. Surekh..apratim...sir mi geli nahi kadhi pn tumchya nimittyane....jaun aali as watay....

    ReplyDelete
  6. Surekh...apratim...mi kadhi gele nahi sir,pn tumchya nimittyane jaun aali as watay...

    ReplyDelete