Friday, July 12, 2019

चिंतनीय काही - १ : चातुर्मास संकल्प

"मनाचा मवाळ, वाचेचा रसाळ,
त्याचे गळा माळ असो नसो 

आत्मानुभवी, चोखाळिल्या वाटा,
त्याचे माथा जटा, असो नसो

परस्त्रीचे ठायी, जो का नपुंसक,
त्याचे अंगा राख, असो नसो

परद्रव्य अंध, निंदेसी मुका,
तोची संत देखा, तुका म्हणे."




श्रीतुकोबांनी जवळपास ३२५ वर्षांपूर्वी हे समाजाच्या आदर्श पुरूषाचे चिंतन आपल्यासमोर मांडले होते. त्यांच्या विवेचनातला "संत" म्हणजे आदर्श पुरूष. आज चार शतकांमध्ये आपण भौतिकदृष्ट्या तर फ़ार प्रगती केली पण श्रीतुकोबांच्या कसोट्यांना आपण माणूस म्हणून उतरतोय का ? हा एक चिंतनीय विषय आहे.

आपल्या दृष्टीने संत म्हणजे कुणीतरी जटा, दाढी वाढवलेला, जंगलात, लोकांपासून अलिप्त राहणारा, जगाशी काही देणेघेणे नसणारा असा गृहस्थ किंवा स्त्री. आजकाल तर त्यात अधिक भर पडलीय. संत म्हणजे मोठमोठे आश्रम असणारा, राजकारण्यांपेक्षाही विलासात जीवन जगणारा, स्वतःचे (नवजात बाळाच्या साबणापासून ते मर्तिकाच्या सामानापर्यंत) प्रॉडक्टस बाजारात आणणारा उत्तम विक्रेता अशी इमेज होत चाललीय. नेमकी हीच वेळ आहे श्रीतुकोबांना काय म्हणायचय ते समजून घेण्याची आणि त्यांचा मार्ग अनुसरण्याची. 

व्हॉटसऍप युनिव्हर्सिटी आल्यापासून तर आपण खूपच ज्ञानी झालोय. अमुकच मुखी रूद्राक्ष, अमुकच जपाची माळ याच पूर्ण ज्ञान आपल्याला रोज प्राप्त होतय. (हा सगळा खटाटोप भौतिक सुखाच्या साधनांसाठीच असतो हे आपल्यालाही माहिती असत. देवाला देव म्हणून आपण भेटतच नाही. आपले भौतिक सुखाचे साधन घरपोच आणून देणारा नोकर म्हणूनच आपण आज देवाला भेटतो हो. आपले वाईट करू नये म्हणून नवस सायास, व्रत वैकल्यांची लाचही आपण नियमीतपणे देवाला देतो. अरे तो काय तुमच्याकडे "प्रोटेक्शन मनी" मागणारा गावगुंड आहे का ? प्रेम बीम वगैरे देवावर करायच असत हे आपण पारच विसरून गेलोय.) 

आज जो तथाकथित आध्यात्मिकतेचा कल्लोळ सर्वत्र चाललाय त्यात आपण सगळेच कळत नकळत वाहवत जातोय आणि मग केवळ बाह्य उपचारांवर आपला सगळ्यांचा भर जातोय. त्यावर श्रीतुकोबांचे हे विवेचन आहे. उग्र प्रकृतीच्या उद्धट माणसाने माळ घालून फ़ायदा नाही रे. त्यासाठी मनाने मवाळ आणि वाचेने रसाळ व्हावे लागेल. माळ घातली म्हणजे त्या विठ्ठलाच्या नावचे मंगळसूत्रच घातले. "आता तो धनी, आपण त्याचे चाकर. त्याच्या्च मर्जीने सगळे होणार. चालविता धनी तोच. तोच आपला योगक्षेम चालवणार, आपले भलेबुरे पाहणार." अशी भावना झाली म्हणजे मग कुठला उग्रपणा स्वभावात उरतो ? मग कुठला तुसडेपणा स्वभावात येईल ?

आजकाल अनुभव न घेता एखाद्या गोष्टीवर मार्गदर्शन करणारे आध्यात्मिक पुरूष सर्वत्र झालेत. आपण एखाद्याला काही मार्ग दाखवतो, त्या मार्गावर पुढे काय भलेबुरे आहे ? याचा आपल्याला अनुभव नको ? उगाचच एखाद्याला मार्ग दाखवायचा आणि तो त्यात पुढे जाऊन खड्ड्यात पडला तर जबाबदारी कोणाची ? तो मार्ग आपल्याला माहिती असायला आपल्याला त्याचा अनुभव पाहिजे. जी अशी आत्मानुभवी व्यक्ती आहे त्याच्या केवळ बाह्यांगाकडे पाहूनच आपण त्याची परीक्षा करणार आहोत का ? त्याच्या जटा वाढल्या असोत किंवा नसोत, आत्मानुभव किती आहे ? हे महत्वाचे. समर्थ रामदास स्वामी तर म्हणतात, "जो संसारतापे पोळला, तोच अध्यात्मसुखा अधिकारी झाला." मग आजकालचे किती लोक हा आत्मानुभव घेऊनच मग मार्गदर्शन करतात ?

गेल्या १० वर्षात इंटरनेट नावाच्या जादूने तर माणसांचे आयुष्य जगण्याचे संदर्भच पार बदलून गेलेत. प्रत्येकाचा मोबाईल लॉक्ड आणि जवळपास ९० % व्हॉटसऍप वाल्यांचा एक गुप्त समूह. घरच्यांपासून, मुलाबाळांपासून लपवून हे वासनेचे थैमान प्रत्येकाच्या हातात आहे. गोंडस समर्थन "आम्ही मॉडर्न आहोत. आमची प्रायव्हसी असते. प्रत्येकाची स्पेस प्रत्येकाला मिळायला हवी" तरी बर अजूनही हे सगळ कुटुंबासोबत एकत्र बघण्याचा बेशरमपणा आपल्या रक्तात आला नाही. पण हे असच चालत राहिल तर पुढल्या २० वर्षात हे नक्की होणार. २० वर्षांपूर्वी एखाद्या घरात वडील मुलाची सिगारेट पेटवताहेत, किंवा सासू सुनेच्या ग्लासात दारू (हो हो, वाईन असली तरी ती दारूच. उगाच वाईन, शॅम्पेन म्हणत त्याचे उदात्तीकरण करू नका.) ओतते आहे, हे दृष्य दुर्मीळ होत आणि समाजमनाला धक्का पोहोचवणार होत. आज हे प्रकार सर्रास दिसताहेत. आणि म्हणूनच असंख्य बलात्काराच्या आरोपांखाली (आरोप रीतसरपणे न्यायासनासमोर सिद्ध होऊन) गजाआड असलेला एखादा बाबा "मला पेरणी करण्यासाठी जेलमधून तात्पुरती रजा हवी" असल्याचा अर्ज करतो तेव्हा आपल्याला काहीही वाटत नाही. कुठे चाललोय आपण ?

ते सोडा हो. साध्यासाध्या भांडणांमध्ये, वादविवादामध्ये आपण सर्रास दुस-याच्या आईचा, बहिणीचा गलिच्छ उल्लेख करतो. मुंबईसारख्या शहरात तर ७५ % मुलांची आणि आजकाल मुलींचीही साधी साधी वाक्येही, बोलताना बहिणीच्या उल्लेखाच्या गलिच्छ शिवीशिवाय, सुरूच होत नाही. ("भें--, मला आठवणच राहिली नाही." इतक साध आणि निरूद्देश). यात काही चूक आहे असे आपल्याला वाटेनाच झालेय. ते सगळे "इन थिंग, स्लॅंग" आहे हे आपले त्याचे लटके समर्थन. या सगळ्यात आपण त्या मातृशक्तीची प्रचंड अवहेलना करतोय. आज आपण दुस-याच्या आई बहिणींचा उद्धार करतोय. उद्या हीच वेळ आपल्यावर येणार हे आपण लक्षातच घेत नाहीत. मग श्रीतुकाराम महाराज काय म्हणताहेत. आपली धर्मपत्नी सोडली तर इतर स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन हा अगदी कामभावना विरहित असला पाहिजे. स्त्री ही केवळ भोगवस्तू नसून मातृशक्ती आहे याची जाणीव चांगल्या दोन तीन लेकरांच्या बापाला येत नसेल तर तो माणूस म्हणून का गणावा ? आदिम कामभावनाच सर्वस्व मानणारा तो मानवरूपी पशूच.

बर आजच्या बायकाही काही कमी नाहीत. गेल्या १०-१२ वर्षात "लिव्ह इन" हे नवीन फ़ॅड जन्मलय. कुठल्याही कौटुंबिक जबाबदारीशिवाय केवळ वासनांचे चोचले पुरवायला एकत्र राहण्याचा ट्रेण्ड समाजात आलाय आणि हळूहळू रूजत चाललाय. गेल्या २-३ वर्षांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये ज्या काही बलात्काराच्या बातम्या येताहेत त्यातल्या ८० % केसेस मध्ये दोन तीन वर्षे असेच लिव्ह इन मध्ये एकत्र राहिलेत आणि आता लग्नाला नकार देतोय म्हणून केस दाखल झालीय अशाच आहेत. ग्रामीण ते शहरी, काश्मीर ते कन्याकुमारी, अरूणाचल प्रदेश ते व्दारका, सर्वत्र याच प्रकारच्या केसेस. दूर कशाला. आपल्या आसपास बघा. लग्न ठरल्यावर मुलांच्या आणि मुलींच्याही "बॅचलर्स पार्ट्या" सुरू झाल्यात आणि त्याचा पालकांना अभिमान आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडचे अंधानुकरण आपल्याला किती वेगाने अधोगतीच्या गर्तेत नेते आहे याची आपल्याला जाणीव होण्यापलीकडे आपण गेलोय का ?

वरील सर्व आम्हाला एकवेळ आम्ही करूही. वाचेने रसाळ होऊ, मनाने मवाळ होऊ, अनुभवाशिवाय कुणाला मार्गदर्शन करणार नाही, परस्त्रीला कामभावनेने बघणार नाही पण तुकोबा, हे काय ? परद्रव्य अंध ? छे, बुवा. अहो, माझ्यापेक्षा त्याला जास्त मिळतय आणि त्याच्याकडले मला कसे मिळेल ? ह्या विचारात तर आजच्या युगात सगळेच आहोत. मग ते मिळवण्यासाठी साम, दाम, दंड भेद मार्ग आम्ही अवलंबू. त्याची येथेच्छ निंदानालस्ती करू. आम्हाला तुमच्या कल्पनेतला संत व्हायचे नाही तुकोबा.

बाबांनो, आजपासून चातुर्मास सुरू होतोय. श्रीतुकोबांच्य या उपदेशातले एकतरी आपण या चार महिन्यात आचरणात आणू. किमान तसा संकल्प घेऊन प्रयत्न तर करू. सत्य संकल्पाच्या मागे विश्वातील सा-या शुभ शक्ती एकवटून उभ्या असतात. याचा अनुभव मला आहे मग आपल्यालाही येईल. आणि काय आहे, चार महिन्याचा संकल्प ही नेट प्रॅक्टीस आहे. ही जमली तर पूर्ण जीवनाच्या मॅचमध्ये आपण तसेच खेळू.


II सर्वेपि सुखिनः सन्तू, सर्वे सन्तू निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तू, मा कश्चित दु:खमाप्नुयात II








No comments:

Post a Comment