Wednesday, January 6, 2021

वाहनांचे ओव्हरटेकिंग : एक विचार

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात सर्वत्र रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो. त्यानिमित्ताने परवा प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीवर माझे लक्ष गेले आणि जरी अपेक्षित आकडेवारी असली तरी मी चरकलोच. होणा-या एकूण अपघातांमध्ये ३१.२६ % अपघात हे ओव्हरटेकिंगच्या दरम्यान होतात असे आढळून आलेले आहेत.


आपण गाडी चालवत जात असताना जर कुणी आपल्यापेक्षा हळू गाडी चालवत असेल तर त्याच्याविषयी "काय मंद आहे हा माणूस / ही बाई ? निवांत जातोय. " अशी भावना आपल्या सगळ्यांच्याच मनात येते. (काहीकाही घटनांमध्ये ही मनातली भावना ओठांपर्यंत येऊन काही शब्दांची अदलाबदलही होते, हा भाग निराळा.) आणि जर एखादा माणूस आपल्यापेक्षा वेगात जात असेल तर "काय घाई आहे हा माणसाला ?" असे आपले मन म्हणते. (विदर्भात "काऊन आगभुकाई करत बे ?" किंवा दिल्ली, हरियाणा, पंजाब कडे " ओय, क्या तूने अपनी नानी ब्याहनी है क्या ? इतनी जल्दी जा के ?" वगैरे शेलके उदगारही निघतात.) मनुष्य स्वभाव मोठा विचित्र आहे. माझे तेव्हढे खरे असे आपल्याला कायम वाटत आलेले आहे.

 मग ओव्हरटेकिंग करताना आपल्यातली ९० % मंडळी उत्सुक का असतात ? याचा मी खोलवर जाऊन विचार केला. आणि लक्षात आले की यामागे मनुष्यमात्रांची स्वातंत्र्याची भूक ही आदिम प्रेरणा आहे. प्रत्येक मनुष्यमात्रांला स्वतंत्र राहायला आवडते. आपले निर्णय आपण स्वतः घ्यायला आवडते. कामाच्या ठिकाणी, घरी, समाजात असे आपले निर्णय आपल्याला घ्यायला मिळणारी भाग्यवान मंडळी फ़ार दुर्मिळ असतात. म्हणून मग रस्त्यांवर गाडी चालवताना मनुष्याला जास्तीत जास्त स्वातंत्र्य उपभोगायचे असते. आपल्या विचारांच्या लयीवर चालणा-या वेगाचे स्वातंत्र्य. या स्वातंत्र्यात बाधा येते ते आपल्याच मार्गाने समोरून जात असलेल्या गाडीमुळे. त्या समोर जाणा-या गाडीमुळे एकतर आपल्याला समोरचा रस्ता, त्यावरील पुढील वळणे, रस्त्यातले अनेक अडथळे ह्यांच्या बाबतीत स्वतःचा विचार करण्याचे स्वातंत्र्य नाहीसे होते. पुढल्या माणसाने ब्रेक मारला तर आपल्यालाही ब्रेक मारावा लागतो, त्याने खड्डा चुकवायला डावीकडे वळण घेतले तर आपलीही प्रतिक्षिप्त क्रिया अगदी तशीच होते. म्हणून मग मागच्या चालकाला वैताग येतो. त्या वेळापुरते त्याचे, आपल्या गाडीच्या संचलनाबाबतचे, निर्णयस्वातंत्र्य बाधित होते आणि म्हणून त्या घुसमटीत ओव्हरटेकिंगचे प्रकार घडतात. 




अर्थात बेफ़ाम ओव्हरटेकिंगमुळे होणा-या अपघातांचे समर्थन करण्याचा हेतू नाहीच. पण ओव्हरटेकिंग हे "आवश्यक राक्षस" (necessary evil) म्हणून आपण स्वीकारलेले आहेच. ओव्हरटेकिंग नसते तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा वेग अत्यंत धीमा झाला असता. "समाजातल्या सर्वात दुबळ्या घटकाचा विचार करून नियोजन" वगैरे समाजवादी विचार देशाच्या नियोजनाबाबतीत खरे आहेत. रस्ता वाहतुकीत असे झाले तर आपल्याला एखाद्या बैलगाडीच्याच वेगाने गाड्या चालवाव्या लागतील, हो नं ?


परवा चंद्रपूरवरून येताना संध्याकाळी तिन्हीसांजेला निघावे लागले. मला संध्याकाळी अंधारात गाडी चालवायला आवडत नाही. पहाटे लवकर निघून आपले लक्ष गाठणारा असा मी पहाटपक्षी आहे. मागे एका लेखात लिहील्याप्रमाणे पहाटेचा आणि रात्रीचा अंधार जरी शास्त्रीय दृष्ट्या सारखाच असला तरी पहाटेच्या अंधाराला क्षणोक्षणी उजाडत जाणा-या प्रकाशाची आशावादी किनार असते जी रात्रीच्या अंधाराला नसते. मी क्वचितच रात्री ड्रायव्हिंग करतो. पण काही कामांनिमित्त चंद्रपूरवरून संध्याकाळी निघून रात्री नागपूरला पोहोचणे घडलेच. गाडी चालवताना माझ्या लक्षात आले की रात्रीच्या वेळेला आपल्या समोर साधारण आपल्याच वेगाने धावत असलेल्या गाडीइतका आधार दुस-या कुणाचा नसतोच. त्या माणसाच्या निर्णयस्वातंत्र्यावर विश्वास ठेऊन आपण त्याच्या पाठोपाठ साधारण तीन सेकंदांच्या अंतराने चालत राहिलो की रात्रीच्या ड्रायव्हिंगचा ताण बराचसा कमी होतो. एकतर समोरून येणा-या गाड्यांच्या फ़्लडलाईटसची लाट समोरच्या वाहनाच्या काचेवर फ़ुटते, त्या आपत्तीला तो तोंड देत असतो व आपण सुरक्षित असतो आणि समोरचा रस्ता कसा आहे ? त्यावर काय निर्णय घ्यायचेत ? हे सर्वस्वी तो ठरवतो. फ़क्त त्याने चूक केली तर त्याची चूक त्याच्याबरोबर तुम्हालाही भोगावी लागू शकते हा भाग अलहिदा. पण पहिल्यांदा निवडतानाच समोरच्या चालकाचे ड्रायव्हिंग पाहून योग्य निवड केली तर ९० % प्रश्न सुटू शकतात. (हे वाक्य जोडीदार निवडीबाबतही तेव्हढेच खरे आहे हो.) 


तसेही रात्रीच्या वेळेला आ्पल्या दृष्टीचा आवाका मर्यादितच झालेला असतो. दिवसा आपली दृष्टी आपल्या शारिरीक दृष्टी एव्हढी असते तर रात्री आपली दृष्टी आपल्या गाडीच्या हेडलाईतसच्या प्रकाशाएव्हढीच असते. त्यामुळे फ़ार वेगात गाडी चालवणे शक्य नसते. 





गाडीच्या चालनामध्ये महत्तम (मराठीत Maximum) माझे काही आडाखे आहेत. कुठलीही गाडी असो, तिच्या स्पीडोमीटरमध्ये बरोबर निम्मा वेग हा स्पीडोमीटरच्या सगळ्यात वरच्या बाजूला असतो. त्या वेगाशी आपल्या वेगाच्या डायलने, उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, जास्तीत जास्त १० ते १५ डिग्रीचा कोन करून गाडी चालवणे म्हणजे ब-यापैकी सुरक्षित वेग. उदाहरणार्थ: फ़ोटोत दाखविलेल्या माझ्या वॅगन आर चा महत्तम वेग १८० किमी प्रतितास. अर्धा वेग म्हणजे ९० किमी प्रतितास. मग जर माझी गाडी मोकळ्या रस्त्यावर ८० किमीप्रतितास ते १०० किमीप्रतितास चालवली तर ते गाडीच्या आणि माझ्याही प्रकृतीसाठी सर्वोत्तम. पण मधल्या वेगाशी ४५ डिग्रीचा कोन असलेल्या डायलने गाडी चालवणे म्हणजे (डाव्याबाजुला तर काहीही विशेष न घडता चालून जाईल पण उजव्या बाजूला डायलचा ४५ डिग्रीचा कोन करून चालवणे म्हणजे) अनियंत्रित गाडी होऊन अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे.

"If you want to travel fast, travel alone but if you want to travel longer, travel with people"  असे म्हटले जाते. त्यामुळे इथला प्रवास संपवून एकटेच परमेश्वराच्या भेटीला जायचे असेल तर वेगात जा बापडे, पण जर दीर्घायुषी होऊन मित्र, मैत्रिणी मुलांसोबत नातवंडांसमवेत जगायचे असेल तर वेग मर्यादेत ठेवा आणि ओव्हरटेकिंगचे योग्य निर्णय घ्या हे कळकळीचे सांगणे. 

- १,९०,००० किमी ड्रायव्हिंग करून (पृथ्वीला जवळपास जणू पाचवी प्रदक्षिणा पूर्ण करत आलेला पर्यटक) आपले उपदेशामृत पाजणारा ड्रायव्हर, राम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment