Friday, August 5, 2016

राम तेरे कितने नाम

आपले नाव ही अशी एकच आपल्या आयुष्यातली गोष्ट आहे की ज्याविषयी आपला चॉइस कुणीही विचारत नाही आणि आपल्याला त्याचे जन्मभर पालन करावे लागते. या अनुभवातून गेल्यानंतर त्यानंतर मात्र आपल्याला इतर कुणीही "नावे" ठेवू नयेत म्हणून आपण कायम प्रयत्नशील असतो. आपल्या बहुतेक सगळ्यांची जन्मनावे मोठी मजेशीर असतात. "टेकडी, टोमदेवी, खेमदेव" वगैरे थोडी ऑफ़बीट जन्मनावे ठेवण्याकडे बारश्यावेळी उपस्थित असलेल्या गुरूजींचा कल असतो. माझ्याही मुलीच्या बारशावेळी जन्मनाव "ली" वरून निघाले. आम्ही सगळ्यांनीच "लीना" नाव सुचवले पण आमच्या श्रीपादराव तेलंगांनी "छे ! ही कसली मॉडर्न नावे ठेवताय ?" म्हणत आमचा प्रस्ताव धुडकावून लावीत "लीलावती" हे नाव ठेवले. (मला तेव्हढच "भास्कराचार्य" झाल्याचा फ़ील.) तर तात्पर्य म्हणजे जन्मनाव हे थोड वेगळ्या वळणाच असाव हा सगळ्या जुन्या मंडळींचा कल असतो आणि त्यामुळे आपली जन्मनावे अशी विविक्षित अशी झालेली आहेत.

मला वाटत मागल्या काही पिढ्यांमध्ये बालमृत्यूच प्रमाण फ़ार होत. त्यामुळे एखाद्या कुटुंबात मूल वाचत नसल्यास " पहिल्या मुलाला दगडू, कचरा, केरपुंजा इत्यादी नावे ठेवण्या"चा नवस बोलला जात असे आणि तो पाळला जात असे. व्यावहारिक नावांची ही कथा तर जन्म नावांच्याही अशा वेगळेपणामागे तेच कारण असावे असा माझा अंदाज.

पण १९७२ मध्ये माझ्या बारशावेळी आलेले गुरूजी मात्र फ़ारच प्रागतिक आणि पुढारलेल्या विचारांचे असावेत. किंवा त्या काळातील मॅटीनी स्टार "जितेंद्र" चा त्यांच्यावर फ़ार प्रभाव असावा. माझे जन्माक्षर "जी" वरून आल्यानंतर त्यांनी "जितेंद्र" असे नाव पक्के केले. मला थोडे कळायला लागल्यावर माझे "जितेंद्र" नाव आवडेनासे होते याचे कारणही पांढरी पॅंट, पांढरा शर्ट आणि चकचकीत पांढरे शूज घातलेला फ़िल्लमस्टार जितेंद्र हाच माझ्या डोळ्यासमोर असायचा. "जितेंद्र" हे हनुमंताचे नाव आहे हे ब-याच उशीरा कळल्यावर मात्र या नावाचा मी सहर्ष स्वीकार केला.





 मी आणि माझ्याहून एकच दिवसांनी मोठा असलेला माझा मामेभाऊ श्री. सचिन सगदेव. 


माझ्या बारशावेळी वास्तविक माझ्या आईने माझे नाव १९७० च्या दशकातले थोडे पॉप्युलर असे "पराग" असे ठेवले होते. पण मी किन्हीकरांच्या घरातला सगळ्यात मोठा नातू म्हणून बारशाचा मोठ्ठा समारंभ नागपुरात झाला. माझे आजोबा राजाभाउ किन्हीकर आणि प्राचार्य राम शेवाळकर यांचा ब-याच वर्षांपासून चांगला घरोबा होता त्यामुळे माझ्या बारशाला आशिर्वादांसाठी राम शेवाळकर पण आलेले होते. नाव ठेवण्याचा विधी झाल्यानंतर आई बाहेर आली आणि सगळ्यांनी नाव विचारले. तिने "पराग" असे सांगितल्यावर "हे कसले मॉडर्न नाव ?" असा आश्चर्योदगार निघाला असण्याची शक्यता आहे. माझ्या आजोबांनी "नको नको, माझ्या नातवाचे नाव रामभाउंसारखे "राम" च असायला हवे असा हट्ट धरला आणि पाळण्यात जरी माझे नाव "पराग" ठेवले तरी व्यवहारात पहिल्या दिवसांपासून मी "राम" झालो.


१९८७ च्या दरम्यान नागपुरात असताना वयाच्या १६ १७ व्या वर्षी मिश्या आणि मते फ़ुटू लागलीत आणि दै. तरूण भारतात विविध लेखन सुरू केले. नाट्य, सांस्कृतीक, राजकीय, सामान्य ज्ञान असा कुठलाही विषय मला वर्ज्य नसायचा. त्यात काहीवेळा जवळच्या, परिचयातल्या व्यक्तींवर टीकात्मक लिहीण्याचा प्रसंग यायचा. मग मी माझ्या वृत्तपत्रीय लेखनासाठी "प्रा. पाणिनी सव्यसाची" हे टोपण नाव धारण केले. (प्राध्यापक होण्याची मनिषा तेव्हापासून.) या नावाने लिहीताना ब-याच गमती जमती झाल्यात. साधारणतः १९९६ पर्यंत हे नाव लेखनासाठी वापरले आणि त्यानंतर मुंबईला नोकरीनिमित्त गेल्यामुळे नियमित वृत्तपत्रीय लेखन सुटले. पण हेच नाव माझ्या इ मेल साठी मी व्यापकतेने वापरतो. पाणिनी हा आद्य संस्कृत व्याकरणकार. जवळपास निर्दोष आणि एकमेवाव्दितीय ("व्दिवचन" हा प्रकार फ़क्त संस्कृत भाषेच्या व्याकरणात आहे. उदा. भ्रातरौ रामलक्षणौ". इतर भाषांमध्ये सर्वत्र एकतर एकवचन किंवा अनेकवचन.) असे व्याकरण त्याने प्रसवले. आणि सव्यसाची म्हणजे उजव्या आणि डाव्या हाताने सारख्याच क्षमतेने काम करू शकणारी व्यक्ती. अर्जुनाचे एक नाव "सव्यसाची" होते. उजव्या आणि डाव्या हाताने सारख्याच क्षमतेने लिहू शकणारे गांधीजी पण सव्यसाचीच मानायला हवे. म्हणून मग वृत्तपत्रात १९८७ ते १९९६ "प्रा. पाणिनी सव्यसाची"


(हेच ते तथाकथित प्राध्यापक पाणिनी सव्यसाची. ब-याच तत्कालीन वाचकांचा माझे लेखन वाचून ही व्यक्ती चाळीशीची असावी असा गैरसमज व्हायचा. तो मी नव्हेच च्या अगदी उलट "अहो, मीच तो" हे मला समजावून सांगावे लागायचे.)

माझ्याप्रमाणेच माझ्या वडीलांचे आणि धाकट्या भावाचे जन्मनाव पण छान ठेवण्यात आले. "व्यंकटेश".  मला वाटत जन्म नावांबाबत आम्ही सुदैवीच ठरलोत. आणि किन्हीकरांचे मूळ नाव चैत्रे. कारंजा लाड जवळ किन्ही गावाची वतनदारी (ती तीन पिढ्यांपूर्वीच, आजोबांच्या काळात नष्ट झाली.) असल्याने "किन्हीकर". म्हणून मग मुळाचा शोध घेताना "जितेंद्र व्यंकटेश चैत्रे"

आज जाणवतय आपण आपल्या मूळ नावाचा तर शोध घेतला मूळ आनंदमयी स्वरूपाच्या शोधाला सुरूवात करूयात का ? ते पण फ़ार छान असेल आणि त्याचा शोध घेता घेता आणि ते समजून घेतल्यावर न जाणो पुन्हा नवीन नाव धारण करून या भूतलावर नवीन रूपाने येण्याची गरज भासणारही नाही.





No comments:

Post a Comment