Sunday, November 5, 2017

अतिथी देवो भव ?





कालचा आणि आजचा ब्रम्हचैतन्य विचार पाहिला आणि तो फ़ेसबुकवरच्या दोन ग्रूप्समध्ये टाकला पण. नंतर थोडा स्वतःशीच विचार करू लागलो असता कळल की आजकालच्या युगात अभ्यागताचेच स्वागत सत्कार करणे सर्वसामान्य गृहस्थींना दुरापास्त झाले आहे. (अपवाद विरळा आहेत.) तर अतिथीचे स्वागत करायला कुणाची वृत्ती असणार ? (अभ्यागत : जो येणार हे प्रथमपासूनच अवगत असते तो. आणि अतिथी म्हणजे जो तिथी न कळवता, वेळी अवेळी, येतो तो.)

बालपणी आम्ही इतवारीत कुहीकर वाड्यातल्या दोनच खोल्यांच्या घरात रहात असू. परिस्थिती बेताचीच होती. पण आमच्या आई दादांची मने विशाल असल्याने त्या गैरसोयीत सुद्धा एका मावशीचे साक्षगंध, दोन मामेबहिणींच्या मंगळागौरी आणि असे तत्सम अनेक कार्यक्रम आम्ही बालपणी अनुभवले. पै पाहुण्यांचा मुक्काम सदैव असायचाच. नागपुरात खरतर इतर नातेवाईकांची त्यामानाने प्रशस्त घरे त्याकाळातही होती पण आमच्या दादांचा फ़टकळ असला तरी आंतरीक स्नेहाने भरलेला स्वभाव आणि आमच्या आईची कुणासाठीही अपार कष्ट सोसण्याची तयारी यामुळे सर्वांना आमच्याच कडे प्रशस्त वाटे. त्या वाड्यातल्या छोट्या घरात पहाटे ४, ४.३० च्या सुमारास नळ येत असे आणि नळ जाण्याआधी अंघोळी वगैरे उरकून पुन्हा दिवसभराच्या वापरासाठी पाणी भरून ठेवावे लागे. त्यामुळे मुक्कामाला असलेल्या पाहुण्यांनाही पहाटे उठणे आणि आवरणे क्रमप्राप्त असे. तरीही सगळ्यांचे प्रेम आम्ही अनुभवले.

आज मात्र अगदी जवळच्या नातेसंबंधांमध्येही जाण्यासाठी फ़ोनाफ़ोनी करून जाण्याची गरज पडते. मन कुठेतरी खंतावते. जिव्हाळा आटत चाललाय हे लक्षात येते. आपण एकटे त्यात कुठेकुठे पुरू शकणार हा जाणिवेने मन खंतावते आणि थरकापते सुद्धा.

प्रश्न परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूलतेचा नाही. आज आपली वृत्ती तपासून बघण्याची गरज आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्येच ह्या प्रकार जास्त वाढीला लागल्याचे पहायला मिळाले. गेली ४-५ वर्षे नागपूर आणि विदर्भाबाहेर होतो त्यामुळे हा प्रकार आतिथ्याची खाण असलेल्या विदर्भात तरी नसेल ही मनाची समजूत गेल्या वर्षभरातल्या इथल्या वास्तव्याने खोटी ठरवली आहे.

असो, कालाय तस्मै नमः.

No comments:

Post a Comment