Wednesday, February 13, 2019

लोकसभा निवडणूक अंदाज २०१९ : महाराष्ट्र - २ (मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र)

या पूर्वील अंदाज इथे बघा : लोकसभा निवडणूक अंदाज २०१९ : महाराष्ट्र - १ (खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा)

विदर्भ आणि खान्देश या भाजपला कायम साथ देणा-या प्रांतांनंतर आपण आज वळूयात मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या दोन प्रांतांच्या मूडकडे.



१५. हिंगोली :

हिंगोली मतदारसंघात २०१४ मध्ये कॉंग्रेसचे राजीव सातव फ़क्त दीड हजाराच्या मताने निवडून आले होते. "नोटा" ला जवळपास ३००० मते मिळाली होती हे लक्षणीय. मुंबई, कोकणानंतर शिवसेनेनी मराठवाड्यात आपला मतदार तयार केला होता. त्यामुळे हिंगोली लोकसभा युतीतर्फ़े शिवसेनेने लढवली होती. सुभाषराव वानखेडेंना हा चुटपुटता पराभव खूपच झोंबला असेल. यंदा मोठी गमतीची परिस्थिती आहे. युती नाही त्यामुळे भाजपची मते शिवसेनेकडे वळणार नाहीत. पण यंदा सातव ही लढायला इच्छुक नाहीत असे ऐकीवात आहे. भाजपने इथे चांगला उमेदवार दिला तर भाजपची सरशी इथे होऊ शकते. मराठा आरक्षण दिल्याचा सगळ्यात जास्त फ़ायदा भाजपला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात होईल असे माझे आकलन आहे. यंदा इथला मतदार भाकर फ़िरवणार आणि देशाच्या कलाप्रमाणे भाजपला मतदान करणार.

माझे भाकित हिंगोली : भाजप.

१६. नांदेड :

२०१४ मधे नांदेड लोकसभा मतदासंघात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण जवळपास ८०,००० च्या मताधिक्याने निवडून आले होते. भाजपच्या डी. बी. पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या इतर निवडणुकांमधेही एखाद दोन अपवाद वगळता अशोकरावांनी आपला आणि कॉंग्रेसचा वरचष्मा नांदेड जिल्ह्यात कायम ठेवलाय. त्यामुळे पुन्हा नांदेड कॉंग्रेसच्या ताब्यात जाणार असे वाटतेय. प्रश्न असा आहे की अशोकराव २०१९ ला लोकसभा लढवायला इच्छुक आहेत का ? अशोकरावांऐवजी त्यांच्या पत्नी अमिता यांनी हा मतदारसंघ लढवला तर भाजप टक्कर चांगली देऊ शकेल. पण अंतिमतः कॉंग्रेसच जिंकेल असा अंदाज आहे.

माझे भाकित नांदेड : कॉंग्रेस.

१७. परभणी :

परभणी मतदारसंघातून २०१४ ला सेनेचे संजय जाधव राष्ट्रवादीच्या विजय भांबळेंवर १,२६,०००  च्या मताधिक्याने मात करून निवडून आलेले होते. यंदा युती नाही. भाजपकडे स्वतःचा उमेदवार निवडून आणण्याइतकी ताकद आणि पक्षाचे कॅडर नसले तरी सेनेचा उमेदवार पाडण्याइतके सामर्थ्य नक्कीच आहे. वर्षानुवर्षे मतदासंघ मित्रपक्षाला सुटण्याचे तोटे भाजपला इथे भोगावे लागताहेत. मतदारसंघात दुष्काळ आणि विकासाचा अभाव हे मुख्य मुद्दे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इथे जोर आहे. त्यामुळे यावर्षी भाजप सेनेच्या पाडापाडीच्या राजकारणात ही जागा राष्ट्रवादी पटकावणार असा अंदाज आहे.

माझे भाकित परभणी : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

१८. जालना :

जालना हा मतदासंघ भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा. आपल्या रांगड्या, परखड शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. या शैलीचे त्यांना काही तोटे झाले असले तरी मतदारसंघात जनतेला हीच शैली जास्त भावते हे ते ओळखून आहेत. २०१४ ला त्यांनी कॉंग्रेसच्या विलास औताडेंचा दोन लाखावर मतांनी पराभव केला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात महत्वाचा ठरेल आणि दानवेंना पुन्हा त्याचा फ़ायदा होईल अशीच चिन्हे आज तरी दिसताहेत.

माझे भाकित जालना : भाजप.

१९. औरंगाबाद :

२०१९ मधे मोठा उलटफ़ेर घडणार असेल तर तो औरंगाबाद मतदारसंघात घडेल असा माझा अंदाज आहे. ब-याच वर्षांपासून हा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहे. सेनेचे चंद्रकांत खैरेंनी आपल्या राजकारणाच्या शैलीने पक्षाबाहेर आणि पक्षातही अनेक विरोधक निर्माण करून ठेवले आहेत आणि ते सगळे २०१९ च्या लोकसभेसाठी दबा धरून वाट बघताहेत. शिवाय गेली अनेक वर्षे औरंगाबाद महापालिकाही सेनेच्या ताब्यात आहे. औरंगाबाद शहराचा जेव्हढा विकास गेल्या दशकात व्हायला हवा होता तेव्हढा झाला नाही ही शहरवासियांची प्रबळ भावना आहे. या सगळ्या नाराजीचा फ़टका खैरे साहेबांना आणि शिवसेनेला बसेल असा अंदाज आहे. पण शिवसेनेवरच्या नाराजीचा फ़टका कॉंग्रेससाठी लाभ ठरेल अशी स्थिती नाही. भाजपने चांगला दमाचा उमेदवार दिला तर औरंगाबाद भाजपकडे येऊ शकते आणि मोठा उलटफ़ेर होऊ शकतो.

माझे भाकित औरंगाबाद : भाजप.

२०. बीड :

२०१४ मध्ये भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा १,३६,००० मतांनी पराभव केला होता. हा मुंडेसाहेबांनी बांधलेला मतदारसंघ. इथे भाजपचे संघटन मजबूत आहे. राष्ट्रवादीची ही चांगली ताकद इथे आहे. मुंडेसाहेबांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कन्येनी हा मतदारसंघ लढवला आणि जिंकला सुद्धा. पंकजाताईंचे या मतदारसंघासाठीचे काम हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्याच पारड्यात घालेले असा अंदाज आहे.

माझे भाकित बीड : भाजप.

२१. उस्मानाबाद :

२०१४ मध्ये सेनेचे रवींद्र गायकवाड इथून निवडून गेले होते. राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते पदमसिंग पाटील यांचा त्यांनी २,३०,००० मतांनी पराभव केला होता. पण मधल्या काळात गायकवाड साहेब चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिलेत. (एअर इंडियातले चप्पलमार प्रकरण) त्यामानाने मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्षच झाले. यंदा युती नसल्यामुळे भाजपची मते सेनेच्या विरोधात जाणार आणि पुन्हा राष्ट्रवादी विजयी होणार असा अंदाज आहे. या सीटसाठी पवारसाहेब आपला पूर्ण जोर लावणार हे नक्की. आणि ही जागा ना सेनेला, ना भाजपला जाता शेवटी राष्ट्रवादीलाच जाणार.

माझे भाकित उस्मानाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

२२. लातूर :

लातूरमध्ये २०१४ ला भाजपच्या डॉ. सुनील गायकवाड यांनी कॉंग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा २,४०,००० मतांनी पराभव केला होता. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला गेलेला हा मतदारसंघ २०१४ नंतर मात्र सतत भाजपला साथ देत राहिलाय. विलासराव देशमुखांनंतर कॉंग्रेसमधे त्यांच्या तोडीचा नेता लातूरातून झाला नाही याचा फ़टका कॉंग्रेसला बसतोय. उलट भाजपमधे संभाजीराव निलंगेकरांनी इथे चांगलाच जम बसवलाय. इथे महापालिका, ग्रामपंचायती सगळीकडे भाजपचाच जोर आणि बोलबाला राहिलाय. त्यामुळे २०१९ मध्येही हा मतदारसंघ भाजपकडेच राहिल अशी खात्री आहे.

माझे भाकित लातूर : भाजप.

२३. सोलापूर :

२०१४ ला भाजपच्या शरद बनसोडेंनी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा दीड लाख मतांनी पराभव करून मोठ्ठा धक्का दिला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय पण त्याचा फ़ायदा कॉंग्रेसला किती मिळेल ? हा प्रश्नच आहे. वय लक्षात घेऊन स्वतः शिंदेसाहेब ही निवडणुक लढतील का ? हा ही मोठा प्रश्न आहे. भाजपने आपले अंतर्गत वाद मर्यादेत ठेवलेत तर ही जागा पुन्हा भाजपला मिळू शकेल. कॉंग्रेसचे पक्षसंघटन भाजपमधल्या अंतर्गत वाद आपल्या फ़ायद्यासाठी वापरू शकेल एव्हढे मजबूत नक्कीच नाही. त्यामुळे ही जाग २०१९ मध्येही भाजपच्याच पदरात जाईल असा अंदाज आहे.

माझे भाकित सोलापूर : भाजप.

२४. माढा :

खरतर माढा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला. पण गेल्या निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षाचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीची चांगलीच शिट्टी वाजवली होती. निवडणुकीदरम्यान मी सांगोल्यात होतो. तिथे परंपरागत शेकापच्या गडात, देवेंद्र फ़डणवीसांची जंगी सभा या डोळ्यांनी बघितलीय. शेवटपर्यंत सदाभाऊंचा जोर खूप वाढला होता. पण २३,००० च्या निसटत्या मताधिक्याने मोहिते पाटील विजयी झाले होते. 
२०१९ मध्ये राष्ट्रवादीमध्येच मोहिते पाटलांवर खूप नाराजी आहे आणि याचा अंदाज घेऊनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माढातून स्वतः निवडणुकीला उतरण्याचा मनोदय जाहीर केलाय. भाजपला इथे चांगली संधी होती पण धनगर आरक्षणाविषयी झालेली दिरंगाई भाजपला इथे भोवेल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा शरद पवार उभे राहिले किंवा न राहिले तरी ही जागा राष्ट्रवादी पुन्हा घेणार असा अंदाज आहे.

माझे भाकित माढा : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

२५. सांगली :

परंपरागत कॉंग्रेसकडे असलेला हा लोकसभा मतदासंघ. वसंतदादांची पुण्याई कॉंग्रेसला अगदी २०१४ पर्यंत पुरली. पण २०१४ मधल्या नव मतदारांनी दादांना पाहिले नसल्याने त्यांनी भाजपच्या पारड्यात मत टाकले आणि भाजपचे संजयकाका पाटील कॉंग्रेसच्या प्रतीक पाटलांवर २,३९,००० मते जास्त घेऊन विजयी झालेत. त्यानंतर भाजपने इथे चांगलाच जोर दाखवलाय. महापालिका जिंकून इथला मूड दाखवलाय. त्यात पुन्हा चंद्रकांतदादा इथे स्वतः जातीने लक्ष देऊन असतातच. त्यामुळे २०१९ मध्येही हा मतदारसंघ भाजपच्याच पारड्यात जाणार यात शंका नाही. सेनेचा इथे जोर कधी नव्हताच त्यामुळे सेना इथे दगाफ़टका करेल तरी चिंता नाही.

माझे भाकित सांगली : भाजप.

२६. सातारा :

सातारा मतदारसंघात २०१४ मधे छत्रपती उदयनराजे भोसले ४,५०,००० च्या मताधिक्याने विजयी झाले होते. या मतदारसंघात राजे ज्या पक्षात असतात तो किंवा राजेंचा आशिर्वाद ज्या उमेदवाराला असतो तो उमेदवार विजयी होतो हा इतिहास आहे. यंदाही त्यात फ़ारसा फ़रक पडेल असे वाटत नाही. गेल्या वेळी इथे भाजपने किंवा सेनेने उमेदवारही दिला नव्हता. या वेळी भाजप सेनेने उमेदवार दिला तरी राजे किमान ३,५०,००० च्या मताधिक्याने विजयी होतील. राष्ट्रवादीविषयी राजे कितीही परखड बोललेत तरी राष्ट्रवादी इथून राजेंनाच उमेदवारी देणार आणि ते निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

माझे भाकित सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस.


२७. कोल्हापूर :

कोल्हापूर मतदारसंघ हा स्वातंत्र्योत्तर काळापासून कॉंग्रेसी विचारसरणीचाच राहिलेला आहे. कॉंग्रेस एकसंघ असताना पवार गट आणि पक्षश्रेष्ठींचा गट यांच्या साठमारीत कुठला तरी एक गट इथे सेनेची साथ द्यायचा. तसा इथे सेनेचा स्वतःचा जोर नाही. तसाच भाजपचेही पक्ष संघटन मजबूत नाही. पण गेल्या दोन तीन वर्षात चंद्रकांतदादांनी गंभीरपणे पक्ष बांधणीला सुरूवात केलीय. त्याची फ़ळे येत्या लोकसभेत इथे दिसतील असा अंदाज आहे. 
गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांनी सेनेच्या संजय मंडलीकांवर २७,००० मतांनी निसटता विजय मिळवला होता. भाजपने कॉंग्रेसमधल्या नाराज उमेदवारांवर भिस्त ठेवून त्यांना आयात न करता आपला नवा दमाचा उमेदवार दिला तर फ़ासे नक्की भाजपच्या बाजूने पडतील असा अंदाज आहे. कोल्हापूरकर विकासाच्या बाजुने मतदान करतीलच. चंद्रकांतदादांची भूमिका इथे महत्वाची ठरेल आणि त्यांचा कस इथेच लागेल असा अंदाज आहे.

माझे भाकित कोल्हापूर : भाजप.

२८. हातकणंगले :

साखर उत्पादक श्रीमंत शेतक-यांचा हा मतदारसंघ. या मतदारसंघातून गेल्यावेळी राजू शेट्टी हे त्यांच्या स्वतःच्या करिष्म्यावर कॉंग्रेसच्या कलाप्पाण्णा आवाडेंचा पावणेदोन लाख मतांनी पराभव करून निवडून आले होते. शरद जोशींनंतर शेतक-यांच्या प्रश्नांची कळकळ असणारा हा नेता अशी त्यांनी ख्याती कमाविली होती. पण राजू शेट्टी भाजपवर नाराज होऊन भाजपची साथ सोडून निघून गेलेत त्यामुळे यंदा भाजप त्यांच्या विरोधात लढणार हे नक्की आहे. राजू शेट्टींनीही त्यांच्या राजकारणाने अनेक जवळच्या सहका-यांना दुखावलेले आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीत त्यांना मदत करेल पण कार्यकर्ते किती मनापासून काम करतील ही शंका आहे. आणि सध्या राजू शेट्टींचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीशीही म्हणावे तितके जमत नाही अशा बातम्या येताहेत.
हा सगळ्या साठमारीत भाजपला इथे चांगली संधी आहे. इथल्या मतदारांना सत्ताधारी पक्षाचा खासदार लाभूनही सत्तेचे फ़ायदे उपभोगायला मिळालेले नाहीत. त्यामुळे भाजपने इथे वजनदार उमेदवार दिला तर राजू शेट्टींवरच्या नाराजीचा फ़ायदा कॉंग्रेसला न मिळता भाजपला मिळेल.

माझे भाकित हातकणंगले : भाजप.



पुढील भाग ३.  : पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र
पुढील भाग ४.  : मुंबई आणि कोकण








No comments:

Post a Comment