Friday, January 16, 2026

भारतीय रेल्वेचा लतेरेपणा भाग - ५ (गरीब रथ एक्सप्रेस)

भारतीय रेल्वेत सगळ्यात लतेरे आणि आपलीच मनमानी करणा-या रेल्वेमंत्र्यांची यादी करायची असेल तर लालू यादव या इसमाचे नाव अग्रगण्य ठरेल. त्यापाठोपाठ ममता बॅनर्जी आणि सी के जाफ़र ’शरीफ़’ (?) आणि नितीशकुमार यांचा्ही नंबर लागेल. पण लालूचा लतेरेपणाच्या बाबतीतला स्वॅग काही वेगळ्याच लेव्हलचा होता.


२००६ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात लालूने गरीब रथ ही संकल्पना मांडली आणि ४ ऑक्टोबर २००६ रोजी पहिली गरीब रथ एक्सप्रेस ही पंजाबमधल्या अमृतसर शहरातून बिहारमधल्या सहरसा या शहरासाठी रवाना झाली. खरेतर ही कल्पना मोठी उदात्त होती. कष्टकरी, श्रमकरी वर्गाला परवडणारा वातानुकूलित प्रवास उपलब्ध व्हावा, आपल्या जन्मभूमीवरून कर्मभूमीपर्यंत लांबच्या प्रवासात त्यांना परवडणा-या दरात आरामदायक प्रवास करता यावा म्हणून संपूर्ण वातानुकुलित पण प्रवासभाडे विना वातानुकूल शयनयान दर्जापेक्षा थोडेसेच जास्त असणारी ही गाडी लालूने भारतीय रेल्वेत आणली. 


पहिल्या गरीब रथ एक्सप्रेससाठी पंजाबमधल्या कपूरथळा रेल्वे कारखान्याला विशेष प्रकारचे कोचेस बनविण्याची ऑर्डर देण्यात आली. पहिल्या गरीब रथ एक्सप्रेससाठी असलेले कोचेस हे त्या काळातील भारतीय रेल्वेच्या कोचेसच्याच रंगसंगतीतले म्हणजे काळपट लाल रंगातले होते. नंतर मग त्यांना हिरवा आणि पिवळा रंगाचा पट्टा अशी रंगसंगती प्राप्त झाली. तेव्हा एक वेगळा प्रयोग म्हणून या रंगसंगतीकडे बघितले गेले. पण नंतर इंटरनेट सर्वत्र आणि सुलभपणे उपलब्ध झाल्यानंतर या रंगसंगतीमागे असलेले लालूचे पाकिस्तान प्रेम उघड झाले. पाकिस्तान रेल्वेची सुद्धा नेमकी हीच रंगसंगती आहे. म्हणजे या समाजवाद्यांची थेरं कुठल्या टोकाला जाऊ शकतात ? हे एका साध्या उदाहरणावरून कळून येते.




भारतात बहुतेक सर्व महत्वाच्या आणि गर्दीच्या मार्गांवर गरीब रथ रेल्वे सुरू झाली त्यामुळे लवकरच ही सेवा लोकप्रिय झाली. या सेवेसाठी कपूरथळा येथला रेल्वे कारखाना विशेष प्रकारचे कोचेस बनवायचा. त्यापूर्वी वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात प्रत्येकी ८ शायिका (बर्थस) असलेले ८ कक्ष (bays) असायचेत. म्हणजे वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात एकूण ६४ शायिका असायच्यात. गरीब रथच्या कोचेसमध्ये समोरासमोरील दोन बर्थसमधली जागा थोडी कमी करून असे ९ पूर्ण आणि १ अर्धा असे कक्ष होते. म्हणजे वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयानातील ६४ शायिकांऐवजी गरीब रथ मध्ये एका कोचमध्ये ७२ अधिक ३ अशा ७५ शायिका होत्या. साहजिकच समोरासमोर बसणा-या प्रवाशांना थोडी कमी लेगरूम मिळू लागली. पण तरीही प्रवाशांची त्याला हरकत नव्हती कारण असा कमी लेगरूममध्ये आखडून प्रवास करण्याचा वेळ हा ३ - ४ तास असायचा आणि त्यानंतर आपापल्या शायिकांवर आपली पथारी पसरून झोपी जाणे हाच कार्यक्रम असायचा. इतक्या परवडणा-या तिकीटांच्या किंमतीत असा वातानुकूल शयनयानातून प्रवास करायला मिळणे हा प्रवाशांच्या दृष्टीने आनंदोत्सव असायचा.


मला आठवतय नागपूर ते पुणे या प्रवासासाठी वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गाचे प्रवासभाडे साधारण ९५० ते ९७५ रूपये असायचे तेव्हा गरीब रथ मधील वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात फ़क्त ५८५ रूपयांत प्रवास करता यायचा. तेव्हा विना वातानुकूल शयनयान वर्गाचे भाडे ३७५ रूपये इतके होते. थोडेसेच रूपये जास्त देऊन वातानुकूल प्रवास इच्छिणा-यांसाठी हे थोडी कमी लेगरूम चालण्यासारखी होती. आणि गरीब रथ गाडीला इतर प्रिमीयम गाड्यांप्रमाणे मधले थांबे सुद्धा मर्यादितच होते त्यामुळे प्रवास हा जलद वेगाने होत असे.


पण लालूच्या अती लोभामुळे या प्रकाराला मधल्या काळात दृष्ट लागली. प्रत्येक कक्षात मुख्य बाजूला समोरासमोर प्रत्येकी ३ असे एकूण ६ आणि पॅसेजच्या बाजूला (गाडीच्या धावण्याच्या दिशेला समांतर) असे २ साईड बर्थस असे ८ बर्थस असायचेत. त्याऐवजी साईड बर्थसना पण मध्ये एक जादाचा बर्थ बसविण्याची आणि एका कक्षात एकूण ९ बर्थस बसविण्याची कल्पना लालूच्या डोक्यातून आली. मुख्य बर्थसमध्ये एकावर एक असे ३ बर्थस अशी रचना सहज राहू शकते पण साईड बर्थसना बोगीच्या वक्राकार छतामुळे आधीच हेडरूम कमी असते त्यात मध्ये हा तिसरा बर्थ म्हणजे अजिबातच हेडरूम मिळत नव्हती. (उदाहरणार्थ खालील चित्र बघा) आणि त्यातही त्या साईडच्या मधल्या प्रवाशाने दिवसाच्या वेळी प्रवास कुठल्या आसनावर बसून करायचा ? या प्रश्नाचे समर्पक उत्तर कुणाहीजवळ नव्हते. त्यामुळे बसण्यावरून प्रवाशांमध्ये भांडणे होऊ लागलीत. आधीच साईडच्या मधल्या बर्थ वर कमी हेडरूममुळे झोपून वैतागलेला प्रवासी बसायला स्वतःची निश्चित अशी जागा नसल्याने अधिकच वैतागू लागला. सर्वसामान्य लोकांनी आरामदायक वातानुकूल प्रवास करावा म्हणून सुरू केलेली सेवा सर्वसामान्य लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू लागली. केवळ त्रिस्तरीय वातानुकूल शयनयानातून प्रवास करण्याइतपत आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून ही साईड मिडल बर्थची पिळवणूक आपण सहन करतो आहे ही भावना सर्वसामान्य प्रवाशांमध्ये बळावू लागली.




लालूने मग हेच साईड मिडल बर्थ विना वातानुकूल शयनयान वर्गातही आणून तिथेही जादा प्रवासी नेण्यासाठी सर्व रेल्वे विभागांना निर्देश दिले. वर्षभरातच प्रवाशांच्या असंख्य तक्रारी रेल्वे विभागांकडे पोहोचल्यात आणि रेल्वेने ही साईड मिडल बर्थसची कर्मदरिद्री कल्पना सोडून दिली.






रेल्वेमंत्री म्हणून लालूची राजवट संपल्यानंतर नवीन गरीब रथ गाड्यांची घोषणा झाली नाही पण जुन्या गाड्या चालूच राहिल्यात. प्रवाशांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभल्यामुळे असेल कदाचित. आता गरीब रथ गाड्यांसाठी त्रिस्तरीय वातानुकूल शयनयानात इकॉनॉमी श्रेणीचे नवीन एल एच बी कोचेस आहेत त्या गरीब रथना लागायला लागल्यात. एल एच बी कोचेसमध्ये तसेही प्रत्येकी ८ बर्थस चे ९ कक्ष (bays) असतात. त्यामुळे या प्रकारच्या इकॉनॉमी कोचेसमध्ये असे १० मुख्य कक्ष (प्रत्येकी ६ बर्थसचे) आ्णि साईडचे ९ कक्ष (प्रत्येकी २ बर्थसचे) असे ७८ बर्थस आणि शेवटल्या कक्षात केवळ मुख्य ३ बर्थस अशी ८१ शायिकांची रचना असू लागली.


गरीब रथ मध्ये No Frills Service म्हणून वातानुकुलित शयनयान वर्गात रेल्वेकडून मिळणारे अंथरूण पांघरूण कधीही मिळत नसत. मधल्या काळात कोरोनानंतर जवळपास सर्वच वर्गांमध्ये ही व्यवस्था वैकल्पिक झाली आणि त्यामुळे केवळ गरीब रथ मध्येच ही सुविधा मिळत नाही हे सर्वसामान्यांचे वैषम्य थोडॆ कमी झाले असावे.


तर असा हा गरीब रथचा लालूच्या लालची स्वभावाचा आणि लतेरेपणाचा प्रवास. भारतीय लोकांची काटकसरी आणि Value for Money जोखून बघण्याची मनोवृत्ती यामुळे या गाडीला लोकाश्रय टिकलेला आहे. नाहीतर त्या त्या रेल्वेमंत्र्याची कारकीर्द संपल्यानंतर नव्या रेल्वेमंत्र्याने त्याच्या पूर्वसुरीने सुरू केलेल्या, पूर्वसुरीचे brain child असलेल्या गाड्यांना मारून टाकण्याच्या प्रयत्नात लालूची गरीब रथ टिकली हे आश्चर्यच म्हणावे लागेल. समाजवादी मंडळींच्या खूप उदात्त कल्पना सुरूवातीला मांडून "डोंगर पोखरके उंदीर निकाल्या" सारखे त्यातून काहीतरी इंटुक दाखवेगिरी करायची या भूमिकेतली ही गाडी. 


- गरीब रथ मधून प्रवास करताना साईड मिडल बर्थवर बसलेल्या प्रवाशांचे हाल आणि वैताग अगदी जवळून बघितलेला एक सर्वसामान्य प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१६ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


No comments:

Post a Comment