भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जन्मशताब्दी १९८९ मध्ये होती. म्हणून तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी १९८८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात शताब्दी एक्सप्रेस या गाडीची घोषणा केली. आणि लगेच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फ़ॅक्टरी ने शताब्दी एक्सप्रेससाठी विशेष डबे बांधायला सुरूवात केली. राजधानी गाड्या राज्यांच्या राजधान्यांना देशाच्या राजधानीशी जोडणा-या विशेष वर्गाच्या गाड्या होत्या तर शताब्दी एक्सप्रेस ही देशाच्या राजधानीला आसपासच्या राज्यातल्या महत्वाच्या शहरांना जोडणारी सेवा होती. ही गाडी आपला प्रवास सकाळी लवकर सुरू करून संध्याकाळी उशीरा संपवीत असे त्यामुळे या गाडीला शयनयान डब्यांची गरज नव्हती. फ़क्त वातानुकूल खुर्ची यान (AC Chair Car) डबे या गाडीला लागत असत.
राजधानीप्रमाणेच शताब्दीही संपूर्ण वातानुकुलीत सेवा होती आणि त्याच्या तिकीटांमध्ये नाश्ता, चहा, जेवण सगळे समाविष्ट असायचे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असायच्यात आणि यांची तिकीटेही विमानाच्या तिकीटांसारखी लंबीचवडी आणि एवंगुणविशिष्ट अशी असायचीत.
सुरूवातीला बराच काळ शताब्दी गाड्यांना आपले निळ्या आणि क्रीम रंगातले चेन्नईच्या इंटिग्रल कोच फ़ॅक्टरीने तयार केलेले कोचेस लागायचेत. एल एच बी कोचेसचा नवा जमाना आल्यानंतर एकेका शताब्दीला नवेनवे कोचेस मिळू लागलेत. निळ्या आणि राखाडी रंगातले किंवा संपूर्ण राखाडी रंगातले. याबाबतीत रेल्वेने कधीही एका विशिष्ट प्रकारच्या गाडीसाठी एकसारखी रंगसंगती ठरवून तसेच कोचेस त्या दर्जाच्या सगळ्या गाड्यांना देण्याचे धोरण अवलंबले नाही. इथे लतेरेपणा केला. एल एच बी चे शताब्दी कोचेस निळ्या + राखाडी आणि राखाडी अशा दोन वेगवेगळ्या रंगसंगतीत यायचेत. कधीकधी एकाच शताब्दीला काही डबे या रंगसंगतीतले तर काही त्या रंगसंगतीतले असे जोडले जातात.
मधल्या काळात फ़क्त नवी दिल्ली - अमृतसर शताब्दी साठी अमेरिकन एक्सप्रेस गाड्यांना असतात तसे कॉर्युगेटेट पत्र्यापासून बनलेले (जास्त ताकदवान) असे कोचेस जोडलेले होते. संपूर्ण भारतीय रेल्वेवर फ़क्त याच गाडीला असे कोचेस मिळत होते. तो एकच रेक भारतीय रेल्वेने प्रायोगिक तत्वावर बनवला आणि या गाडीला दिला. नंतर त्या प्रयोगाचे काय झाले हे कळले नाही. हा आणखी एक लतेरेपणा.
तेजस राजधानीप्रमाणे तेजस रंगसंगतीतल्या, गाडीने विशिष्ट वेग धारण केल्यानंतर कोचेसची दारे आपोआप बंद होणारे आणि गाडी थांबल्यावरच आपोआप उघडणारे चेअर कार कोचेस, काही शताब्दी गाड्यांना जोडण्याचे प्रयोग भारतीय रेल्वेने केलेत. पण हा प्रयोगही फ़ार काळ चालला नाही. आणि आता वंदे भारत गाड्या आल्यानंतर शताब्दी चेअर कार कोचेसचे उत्पादनच भारतीय रेल्वेने थांबवल्याची बातमी अगदी कालच प्राप्त झाली. म्हणजे शताब्दी एक्सप्रेस गाड्या पुढल्या ७ ते ८ वर्षात भारतीय रेल्वेतून नामशेष होणार हे नक्की.
काळाबरोबर बदलले पाहिजे हे जरी खरे असले तरी काही काही सहज जपण्याजोग्या गोष्टी जपत राहिल्या पाहिजेत हे भारतीय रेल्वे विसरलीय हे नक्की.
- शताब्दी रेल्वेने अनेकवेळा प्रवास घडलेला आणि शताब्दी एक्सप्रेस जाणार म्हणून पुलंच्या "साला ती आठ नंबरची ट्राम तरी ठेवायला हवी होती" असे हळहळणा-या मुंबईकराच्या चालीवर शताब्दीसाठी मनात हळहळणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
९ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६




No comments:
Post a Comment