Showing posts with label 12622 Tamilnadu Express. Show all posts
Showing posts with label 12622 Tamilnadu Express. Show all posts

Monday, January 5, 2026

भारतीय रेल्वे गाड्यांची नावे : काही हरवलेली, काही गवसलेली, काही हुकलेली काही चुकलेली

आपल्या भारतीय रेल्वेतल्या काही काही गाड्यांच्या नावांचा संदर्भच हरवत चाललाय. उदाहरणार्थ गंगा कावेरी एक्सप्रेस. ही गाडी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा ती वाराणसी ते थेट तिरूचिरापल्ली अशी गंगेला आणि कावेरीला जोडणारी होती. गंमत म्हणजे तेव्हा मद्रास ते तिरूचिरापल्ली हा रेल्वेमार्ग मीटर गेज होता. वाराणसी ते चेन्नई ही गाडी ब्रॉडगेजने प्रवास करायची तर मद्रास बीच या स्टेशनवरून बाजूच्याच फ़लाटावर असलेल्या मीटर गेज एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे स्थलांतर होऊन त्यापुढील प्रवास ही गाडी मीटर गेजने करीत असे. आज मद्रास ते तिरूचिरापल्ली (व पुढेही रामेश्वरम आणि कन्याकुमारीपर्यंत) हा संपूर्ण मार्ग ब्रॉड गेज झालेला आहे पण ही गाडी धावतेय ते छापरा ते मद्रासपर्यंतच. मद्रास शहरापासून कावेरी नदी किमान ३५० किलोमीटर दूर असूनही आज या गाडीला तेच नामाभिधान प्राप्त झालेले आहे. त्याचा संदर्भ हरवलेला आहे.



तसाच संदर्भ हरवलेली दुसरी गाडी म्हणजे आपली देवगिरी एक्सप्रेस. ही गाडी सुरू झाली तेव्हा ही मुंबई ते छत्रपती संभाजीनगर अशी धावायची. दोन शहरांना जोडणारी आणि दोन्हीकडील प्रवास एका रात्रीत करून दोन्हीही शहरातील कामाच्या माणसांना त्यांच्या त्यांच्या कामांसाठी पुढला पूर्ण दिवस मोकळा ठेवणारी ही गाडी लोकप्रिय होती. पण हळूहळू ही गाडी नांदेडपर्यंत आणि नंतर थेट सिकंदराबादपर्यंत वाढवून् छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या देवगिरी किल्ल्याचा संदर्भच हा गाडीने हरविलेला आहे. आता एखाद्या हैद्राबाद, निझामाबाद किंवा तेलंगणातल्या नागरिकाला हा देवगिरी नावाचा संदर्भ, वारसा, अभिमान कसा कळावा ? तसा आजकाल महाराष्ट्रातल्या तरी किती जणांना हा देवगिरी नावाचा वारसा माहिती आहे ? हा सुद्धा संशोधनाचाच विषय आहे म्हणा. 



याच्या अगदी उलट कथा आपल्या गोवा एक्सप्रेसची झाली आहे. १ जुलै १९९० रोजी दिल्ली वरून गोव्यापर्यंत ही गाडी सुरू करण्यात आली. गंगा कावेरी एक्सप्रेसप्रमाणेच ही गाडी दिल्ली ते मिरज हा प्रवास ब्रॉडगेजने करीत असे आणि मिरज ते गोव्यातल्या वास्को द गामा स्टेशनपर्यंत हा प्रवास मीटरगेजने करीत असे. साधारण १९९६ च्या आसपास मिरज ते लोंडा ते वास्को हा मीटर गेज मार्ग रूंदीकरणासाठी बंद करण्यात आला तेव्हा मधली ३ वर्षे ही गाडी मिरज ते दिल्ली पर्यंतच गोवा एक्सप्रेसच्या नावाने धावत असे. पण रूंदीकरणानंतर मात्र या गाडीच्या हरवलेल्या नावाचा संदर्भ तिला पुन्हा गवसला. पण मिरज, सांगली, कराडकर मंडळी या गाडीला गोवा एक्सप्रेस या नावाने कधीच ओळखत नव्हते. म्हणजे गाडीवर जरी गोवा एक्सप्रेस असे लिहीलेले असले तरी ही मंडळी या गाडीला "निजामुद्दीन एक्सप्रेस" या नावानेच ओळखायचीत. त्यामुळे फ़क्त आपल्या मिरज पासून दिल्लीला जाणा-या या गाडीला गोवा एक्सप्रेस का म्हणतात ? हा प्रश्न इथल्या स्थानिकांना कधी पडला असण्याची शक्यता नाही.


नावाची अशीच काहीशी कथा १ जुलै १९९० रोजीच सुरू झालेल्या गोंडवाना एक्सप्रेसची झाली. नागपूरकरांना दिल्लीला जोडणारी थेट गाडी म्हणून ही गाडी आठवड्यातून तीन दिवसनागपूर ते हजरत निजामुद्दीन अशी गोंडवाना एक्सप्रेस म्हणून रेल्वेने दिली खरी. पण लगेचच वर्षभरात ही गाडी आठवड्यातून ५ दिवस करून थेट बिलासपूरपर्यंत वाढवण्यात आली. तसाही नागपूरच्या रेल्वे कर्मचा-यांना नवीन गाड्या नागपूरवरून सुरू झाल्यात की त्यांची देखभाल करा, त्यांना तेलपाणी करा या सगळ्या गोष्टींचा कंटाळाच येतो म्हणा. कारण या गाडीनंतर दीक्षाभूमी एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस आणि अगदी आता आता सिकंदराबाद नागपूर एक्सप्रेस नागपूरवरून पळवण्यात आल्या पण नागपूरकर रेल्वे कर्मचा-यांना त्याचे फ़ारसे दुःख झालेले दिसले नाही.



ही गाडी बिलासपूरपर्यंत पळवल्यानंतर जरी या गाडीवरचा नामफ़लक "गोंडवाना एक्सप्रेस" असे दाखवित असला तरी समस्त छत्तीसगडी जनता या गाडीला कायम "महामाया एक्सप्रेस" या नावानेच पुकारायचेत. छत्तीसगड आणि पूर्व विदर्भ हा प्राचीन इतिहासात गोंडवनाचाच भाग असला तरी या गाडीचा "गोंडवाना" हा संदर्भ छत्तीसगडी जनतेने कायमचाच पुसून टाकला. आता तर ही गाडी आठवड्यातले ५ दिवस हजरत निजामुद्दीन ते बिलासपूर तर उरलेले २ दिवस हजरत निजामुद्दीन ते भुसावळ अशी धावते. आता पश्चिम विदर्भ, खान्देशातल्या प्रवाशांना किंबहुना रेल्वे अधिका-यांना या गाडीच्या गोंडवाना शब्दाचा संदर्भ लागणे शक्य नाही.


काही हुकलेल्या आणि चुकलेल्या गाड्यांमध्ये पहिला नंबर लागतो तो महाराष्ट्र एक्सप्रेसचा. नवी दिल्ली वरून विविध राज्यांच्या राजधान्यांना जोडणा-या जलद, अतिजलद गाड्यांची नावे त्या त्या राज्यांच्या नावांच्या एक्सप्रेस गाड्यांना दिलेली आहेत. उदाहरणार्थ नवी दिल्ली ते मद्रास ही अतिजलद आणि प्रतिष्ठित गाडी तामिळनाडू एक्सप्रेस, नवी दिल्ली ते तिरूवनंतपुरम ही जलद गाडी केरळ एक्सप्रेस, नवी दिल्ली ते बंगलोर ही प्रतिष्ठित जलद गाडी कर्नाटक एक्सप्रेस, नवी दिल्ली ते जुन्या आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबादला जोडणारी गाडी आंध्रप्रदेश एक्सप्रेस पण आंध्र आणि तेलंगणा वेगळी राज्ये झाल्यानंतर याच आंध्रप्रदेश एक्सप्रेसचे नाव तेलंगणा एक्सप्रेस असे झाले तर नवी दिल्ली ते विशाखापट्टण (मार्गे विभक्त आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या विजयवाडा) असलेल्या नव्या गाडीला आंध्रप्रदेश हे नामाभिधान प्राप्त झाले. बाकी विजयवाडा आणि विशाखापट्टण या शहरांचा रेल्वेबाबतचा भ्रातृभाव हा खरोखर बोध घेण्यासारखा आहे. विजयवाडाचे रेल्वेवाले आपल्या हक्काच्या आणि मालकीच्या रेल्वे खुशाल विजयवाड्याला प्रदान करतात. अगदी तसेच नाते रायपूर आणि बिलासपूरचे आहे. छत्तीसगडची राजधानी जरी रायपूर असली तरी रायपूरच्या हक्काच्या आणि मालकीच्या गाड्या ही मंडळी मोठ्या भावाच्या उदारतेने बिलासपूरपर्यंत वाढवू देतात. छत्तीसगड राजधानी सुद्धा रायपूर ते नवी दिल्ली ऐवजी बिलासपूर ते नवी दिल्ली अशी आहे.


या न्यायाने मुंबई ते नवी दिल्ली या मार्गावर धावणा-या जलद, अतिजलद प्रतिष्ठित गाडीला महाराष्ट्र एक्सप्रेस हे नाव द्यायला हवे होते. पण ही गाडी नागपूर ते कोल्हापूर आणि आता गोंदिया ते कोल्हापूर या मार्गावर अतिशय कूर्मगतीने धावते. या मार्गावरील इतर कुठल्याही गाडीत आरक्षित जागा मिळत नसेल तर आणि तरच प्रवासी या गाडीचा विचार करतात ही या गाडीची प्रतिष्ठा. नावाच्या बाबतीत पूर्णपणे हुकलेली ही गाडी.


शेजारच्या राज्यातली बिलासपूर ते अमृतसर जाणारी छत्तीसगड एक्सप्रेस जरी वेगाच्या, खूप भरमसाठ थांब्याच्या बाबतीत हिचाच कित्त्ता गिरवीत असली तरी ती किमान त्या राज्याच्या राजधानीला दिल्लीपर्यंत जोडते तरी पण महाराष्ट्र एक्सप्रेस मात्र नावाच्या बाबतीत पूर्णपणे हुकलेली आणि चुकलेली आहे. 


थोडा विचार केला गाड्यांच्याच नावांचे काय ? माणसांची नावे तरी अशी न हुकलेली असतात काय ? सगळ्यांचीच नावे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी असतात काय ? सगळेच राम एकवचनी आणि एकबाणी असतील असे कुठे आहे ? मला वाटतं आपल्या पिढीची नावे ठेवताना आपल्या आईवडीलांनी आणि आजीआजोबांनी अजामिळाच्या कथेची खूप पारायणे केली असावीत. मृत्यूसमयी पुत्रमिषाने का होईना पण परमेश्वराचे नाव आपल्या मुखात यावे आणि त्याद्वारे आपल्याला या जन्म मरण 

फ़े-यातून कायम मुक्ती मिळावी अशा थोड्याशा स्वार्थी हेतूने त्यांनी देवादिकांची नावे आपापल्या मुलामुलींना दिलेली असावीत. आजकाल जन्म काय किंवा मृत्यू काय कशातूनच आपल्याला मुक्त व्हावेसे वाटत नाही. आपल्याला अधिकाधिक अट्टाहासाने, असोशीने जगावेसेच वाटते. पाप पुण्याचा हिशेब करणे तर आपण केव्हाच सोडून दिलेले आहे म्हणून मग आजकाल अनेक वैचित्र्यपूर्ण, अगम्य आणि कसलाही अर्थ नसलेली अत्यंत टुकार नावे आपापल्या अपत्यांना देण्याचा एक वाह्यात ट्रेंड सुरू झालाय. 


असो. माणसेच अशी नावांच्या बाबतीत हुकलेली आहेत तर मग माणसांनीच निर्मिलेल्या रेल्वे गाड्यांनी नावांच्या बाबतीत हुकले काय ? चुकले काय ? हरवले काय ? गवसले काय ? कोण हिशेब ठेवणार ?

- बालपणी नागपूर ते चंद्रपूर प्रवासात चंद्रपूर आगाराच्या सुंदर बसला "महाकाली एक्सप्रेस" असे नाव दिलेले बघून त्या बसच्या नावाच्या सजावटीच्या किंबहुना एकंदरच त्या रूपाच्या प्रेमात पडणारा एक बस आणि रेल्वेप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


५ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Monday, February 19, 2024

रेल्वेफ़ॅन्सचे प्रयोग : गोवा एक्सप्रेसमधून प्रवासासाठी स्वीकारला आडमार्ग

१ जुलै १९९० रोजी गोवा एक्सप्रेसची सुरूवात झाली. तत्पूर्वी १९९० च्या रेल्वे अर्थसंकल्पात या गाडीची घोषणा झाली होती. तेव्हा फ़ेब्रुवारीत रेल्वे अर्थसंकल्पात नवीन गाड्यांची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली की प्रतिष्ठेच्या गाड्या त्यावर्षी १ जुलै ला सुरू व्हायच्यात आणि मग इतर गाड्या वर्षभरात धावायला लागायच्यात.


भारतीय रेल्वेत राज्यांच्या नावाच्या अनेक गाड्या आहेत. त्या त्या राज्यांच्या नावाच्या गाड्या त्या त्या राज्याच्या राजधानीच्या शहरापासून ते देशाच्या राजधानीपर्यंत प्रवाशांना जलद आणि प्रतिष्ठेची सेवा पुरविणा-या गाड्या म्हणून प्रसिद्ध आहेत. अर्थात याला काही काही राज्ये अपवाद आहेत.


तामिळनाडू एक्सप्रेस : चेन्नई ते नवी दिल्ली खूप कमी थांबे घेऊन जाणारी अती जलद एक्सप्रेस. एकेकाळी या गाडीला विजयवाडा - वारंगल - बल्लारशाह - नागपूर - भोपाळ आणि झाशी एव्हढेच थांबे होते. नंतरच्या काळात भोपाळ ते नवी दिल्ली या प्रवासात एक दोन थांबे वाढलेत तरी इंजिनांच्या वाढत्या शक्तीमुळे या गाडीची धाववेळ तितकीच राहिली. अजूनही ही गाडी रोज रात्री १० च्या सुमाराला चेन्नईवरून निघते आणि तिस-या दिवशी सकाळी ७ च्या सुमाराला नवी दिल्लीला पोहोचते. साधारण २२०० किलोमीटर प्रवास ३३ तासांत ही गाडी करते. परतीचा प्रवाससुद्धा ही गाड्या याच वेळा राखून करते. नवी दिल्ली वरून रात्री १० च्या सुमाराला निघून चेन्नईला तिस-या दिवशी सकाळी ७ च्या सुमाराला ही गाडी पोहोचते.


अत्यंत प्रतिष्ठेची गाडी. कमी थांबे असल्याने जलद व प्रवाशांसाठी सुखकर प्रवास करवून देणारी ही गाडी. एकेकाळी भारतीय रेल्वेच्या नियमानुसार या गाडीसाठी किमान ६०० किलोमीटर अंतराचे तिकीट घ्यावे लागे. त्यापेक्षा कमी अंतराच्या तिकीटावर या गाडीतून प्रवास करता येत नसे. लाल + पिवळ्या रंगांचे डबे आणि बहुतांशी वेळेला त्याला मॅचिंग रंगसंगतीची दोन दोन डिझेल एंजिने ही या गाडीची ओळख होती.


आंध्रप्रदेश एक्सप्रेस : जुन्या एकीकृत आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबादमधून दररोज सकाळी ७ वाजता निघणारी ही गाडी दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता नवी दिल्लीला पोहोचत असे. परतीच्या प्रवासात हीच गाडी संध्याकाळी ५ च्या सुमारास नवी दिल्लीवरून निघून दुस-या दिवशी संध्याकाळी ७ च्या सुमाराला हैद्राबादला पोहोचत असे. १७०० किलोमीटर अंतर साधारण २६ तासात. 


या गाडीलाही काजीपेठ - बल्लारशाह - नागपूर - भोपाळ - झाशी - ग्वाल्हेर एव्हढेच मर्यादित थांबे होते. तामिळनाडू एक्सप्रेससारखी किमान अंतराच्या तिकीटाची मर्यादा या गाडीलाही होती. या गाडीसाठीही किमान ६०० किलोमीटर अंतराचे तिकीट घ्यावे लागे. त्यापेक्षा कमी अंतराच्या तिकीटावर या गाडीतूनही प्रवास करता येत नसे. या गाडीलाही लाल + पिवळ्या रंगांचे डबे आणि दोन दोन डिझेल एंजिने मिळायची 


आंध्र आणि तेलंगण वेगळे झाल्यानंतर या गाडीला तेलंगण एक्सप्रेस असे नाव मिळाले.


कर्नाटक एक्सप्रेस आणि केरळ एक्सप्रेस : खरेतर ही गाडी सुरूवातीला केरळ - कर्नाटक एक्सप्रेस म्हणूनच आलेली होती. १९७७ साली जनता पक्ष सरकारने नवी दिल्लीवरून दक्षिणेच्या दोन राज्यांना एकसाथ जोडणारी गाडी म्हणून ही गाडी सुरू केली होती. नवी दिल्ली वरून झांशी - भोपाळ - नागपूर - वारंगल - विजयवाडा - गुडूर - रेणीगुंटा -अरक्कोणम मार्गे जोलारपेट्टी ला ही गाडी पोहोचली की केरळ एक्सप्रेस व कर्नाटक एक्सप्रेसचा मार्ग वेगवेगळा होत असे. या रेकमधले कर्नाटक एक्सप्रेसचे डबे बंगलोरला जायचे तर उरलेल्या डब्यांनिशी केरळ एक्सप्रेस कोईंबतूर - शोरनूर - एर्नाकुलम (कोचीन) या मार्गाने तिरूअनंतपुरम कडे रवाना होत असे. हिरवा + पिवळा अशा आकर्षक रंगसंगतीचे डबे या गाड्यांना लागायचेत. जुन्या केरळ - कर्नाटक एक्सप्रेसमुळे या गाडीचे नाव के के एक्सप्रेस असे पडले होते. आजही महाराष्ट्राच्या नगर - सोलापूर पट्ट्यात ही गाडी के. के . एक्सप्रेस म्हणूनच ओळखली जाते.


१९८३ मध्ये माधवराव शिंदे रेल्वेमंत्री असताना या गाड्या वेगवेगळ्या झाल्यात. आता कर्नाटक एक्सप्रेस नवी दिल्ली - झांशी - भोपाळ -इटारसी - खांडवा - भुसावळ - मनमाड - अहमदनगर - दौंड - सोलापूर - वाडी - गुंतकल - धर्मावरम मार्गे बंगलोरला जाते तर केरळ एक्सप्रेस नवी दिल्ली वरून झांशी - भोपाळ - नागपूर - वारंगल - विजयवाडा - गुडूर - रेणीगुंटा - तिरूपती - काटपाडी - जोलारपेटी - कोईंबतूर - एर्नाकुलम मार्गे तिरूअनंतपुरम ला जाते. 


आंध्रप्रदेश आणि तेलंगण ही दोन वेगळी राज्ये झाल्यानंतर आंध्रप्रदेश एक्सप्रेस ही विशाखापट्टण ते नवी दिल्ली अशी धावू लागली. ही पण सुपरफ़ास्टच गाडी. खरेतर ही गाडी आंध्रप्रदेशची राजधानी अमरावती (विजयवाडा) ते नवी दिल्ली अशी धावायला हवी होती पण आंध्रप्रदेशची रेल्वे राजधानी विशाखापट्टण पासून ही गाडी धावते. सुरू झाली तेव्हा ही गाडी संपूर्ण एसी डब्ब्यांची होती. आता या रेकमध्ये काही नॉन एसी डबे पण जोडल्या जाऊ लागलेत.


या सगळ्या प्रतिष्ठित गाड्यांना अपवाद म्हणजे छत्तीसगढ एक्सप्रेस आणि आपली महाराष्ट्र एक्सप्रेस. फ़ार पूर्वीपासून छत्तीसगढ एक्सप्रेस  ही बिलासपूर पासून हजरत निझामुद्दीन (दिल्ली) पर्यंत जायची. जेव्हा छत्तीसगढ हे वेगळे राज्य झाले नव्हते, एकीकृत मध्यप्रदेशचा भाग होते तेव्हापासून छत्तीसगढ एक्सप्रेस ही आपली प्रांतिक अस्मिता जपून आहे. पण ही गाडी एकंदर लेकूरवाळी आहे. खूप सारे थांबे घेत घेत हळूहळू ही आपला मार्ग कापते. काही वर्षांपूर्वी ही गाडी थेट अमृतसरपर्यंत वाढवलेली आहे. 


जशी आंध्र प्रदेशची रेल्वे राजधानी विशाखापट्टण तशी छत्तीसगढची रेल्वे राजधानी बिलासपूर. इतर राज्यांना मिळालेल्या राजधानी एक्सप्रेस गाड्या त्या त्या राज्यांच्या राजधानीला दिल्लीशी जोडतात पण छत्तीसगढ राजधानी एक्सप्रेस मात्र रायपूर ते नवी दिल्ली धावण्याऐवजी बिलासपूर ते नवी दिल्ली अशी धावते. रायपूरकरांनी उदार मनाने ही गाडी बिलासपूरपर्यंत नेऊ दिली. उद्या आंध्र प्रदेशला राजधानी मिळालीच तर ती विशाखापट्टण वरून धावेल यात मला काहीच शंका नाही. विजयवाडाकर तेव्हढे उदार आहेत. 


त्याच न्यायाने महाराष्ट्र एक्सप्रेस ही मुंबई ते नवी दिल्ली जाणारी प्रतिष्ठित व जलद सेवा असायला हवी होती. पण महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदिया - नागपूर ते कोल्हापूर अशी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात धावते.एकाच राज्यात सर्वाधिक प्रवास करणारी गाडी म्हणून असणारा विक्रम या गाडीच्या नावावर आहे. आणि ही गाडीही तशी लेकुरवाळीच. वाटेतली जवळपास सगळी स्टेशन्स घेऊन धावणारी ही बिनमहत्वाची बिचारी गाडी. या गाडीच्या बिचारेपणाच्या प्रवासाबद्दल मी अनेक लेख लिहीले आहेत. ते लेखाशेवटी दिलेले आहेत.


१९८९ च्या ऑगस्ट महिन्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून कराडला जाण्यासाठी मी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पाऊल टाकले त्यानंतर जुलै १९९३ मध्ये स्नातक अभियंता म्हणून तिथून बाहेर पडेपर्यंत मला महाराष्ट्र एक्सप्रेसचा प्रवास अक्षरशः शेकडो वेळा करावा लागला. पहिल्याच वर्षात सात आठ वेळा प्रवास केल्यानंतर हा प्रवास अत्यंत बोअरींग आहे याची जाणीव आम्हा सगळ्यांना झाली आणि प्रवासाचे वेगवेगळे विकल्प आम्ही शोधायला सुरूवात केली. आणि १ जुलै १९९० रोजी गोवा एक्सप्रेसची सुरूवात झाली. 


या गाडीचे नाव जरी गोवा एक्सप्रेस असले तरी अजूनपर्यंत गोव्यात ब्रॉड गेज रेल्वे पोहोचली नव्हती. कोकण रेल्वे १९९८ मध्ये सुरू झाली आणि मिरज - लोंडा - दूधसागर (तेच ते चेन्नई एक्सप्रेस सिनेमात दाखवलेले गाव) - मडगाव - वास्को द गामा हा रेल्वेमार्ग १९९० मध्ये मीटर गेज होता. त्यामुळे गोवा एक्सप्रेस ही गाडी हजरत निझामुद्दीन ते मिरज हा प्रवास ब्रॉड गेजने करायची आणि मिरजेच्या स्टेशनवर बाजुच्याच फ़लाटावर मीटर गेजची गोवा एक्सप्रेस उभी असायची. थेट गोव्याचे तिकीट असलेले प्रवासी या गाडीतून उतरून शेजारच्या मीटर गेज गाडीत बसायचेत. (पुलंचे पेस्तनकाका आठवलेत ना ? त्या प्रवासातही पुल मुंबईवरून बेळगावच्या आपल्या प्रवासात मिरजेला गाडी बदलून मीटर गेजने पुढला बेळगावपर्यंतचा प्रवास करते झाले होते.) ती मीटर गेज गोवा एक्सप्रेस गोव्याला जायची. परतीच्या प्रवासातही तसेच मीटर गेज गोवा एक्सप्रेस वास्को द गामा ते मिरज हा प्रवास करायची आणि मिरजेवरून ब्रॉड गेजची गोवा एक्सप्रेस हजरत निझामुद्दीन पर्यंत धावायची. नंतर मग मिरज - लोंडा ते मडगाव या मार्गाचे रूंदीकरण झाले आणि गोवा एक्सप्रेस थेट वास्को द गामा पर्यंत धावायला लागली.


ही गाडी मिरज - सातारा - पुणे - दौंड - मनमाड - भुसावळ - इटारसी - भोपाळ असे कमी थांबे घेत दिल्ली गाठायची. त्या गाडीचा नंबर २७०१ डाऊन आणि २७०२ अप असा होता. १ जुलै १९९० पासूनच भारतीय रेल्वेत दोन किंवा तीन आकडी गाडी नंबर्स बदलून चार आकडी नंबरांची व्यवस्था सुरू झाली होती. या गाडीला दक्षिण मध्य रेल्वेच्या सुपरफ़ास्टचा पहिला नंबर मिळाला होता. पुणे मिरज या एकेरी रेल्वे मार्गावर धावलेली ही पहिली सुपरफास्ट गाडी. या गाडी च्या आकर्षणाचा आणखी एक भाग म्हणजे आमची नेहेमीची महाराष्ट्र एक्सप्रेस जाताना आणि येतानाच्या प्रवासातही मनमाड ते पुणे हा प्रवास किट्ट काळोखात करायची. त्यामुळे आमच्या नागपूर ते कराड या प्रवासात अहमदनगर, दौंड ही स्टेशन्स लागतात ही खबर आमच्या काही दोस्तांना २ वर्षांनंतर लागली. २७०१/२७०२ हा प्रवास दिवसा ढवळ्या करायची त्यामुळे हा भाग कधी नव्हे तो बघायला मिळायचा.


त्याकाळी या गाडीच्या डब्ब्यांची पोझिशन अशी असायची. 


एस-४, एस-१, एस-२, एस-३, ए-१, ए-२, एफ़-१, एस-५, एस-६ ,एस-७, एस-८, जनरल, जनरल, जनरल + रेल्वे डाक सेवा, जनरल, गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन. (एकूण १६ डबे).


त्यावेळी ही गाडी आपला रेक ७०२१/७०२२ हैद्राबाद-ह.निझामुद्दीन दक्षीण एक्सप्रेस शी शेअर करायची. त्यामुळे ए.सी. कोचेस च्या आधी चे एस-१ ते एस-४ कोचेस ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम लिंक एक्सप्रेस चे व उरलेला रेक ह.निझामुद्दीन-हैद्राबाद असा असायचा. गाडी च्या बोर्डांवरही असेच ड्युएल मार्किंग असायचे. एकाच बोर्डावर वर हैद्राबाद-ह.निझामुद्दीन किंवा ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम आणि खाली मिरज ह.निझामुद्दीन असे मार्किंग असायचे. ७०२१ हैद्राबाद-ह.निझामुद्दीन दक्षीण एक्सप्रेस हजरत निझामुद्दीनला पहाटे पोहोचली की दुपारी हाच रेक २७०२ अप हजरत निझामुद्दीन ते मिरज गोवा एक्सप्रेस म्हणून प्रवासाला सुरूवात करायचा. तर दुपारी २७०१ डाऊन हजरत निझामुद्दीनला पोहोचली की संध्याकाळी ७०२२ अप दक्षिण एक्सप्रेस म्हणून निघत असे. 


मिरजेला वास्को द गामा ते मिरज हा प्रवास करणारी गोवा एक्सप्रेस रात्रभर प्रवास करून पहाटे पहाटे यायची तर मिरज ते हजरत निझामुद्दीन गोवा एक्सप्रेस सकाळी सात वाजता मिरजेवरून निघायची. रात्री ८:३० च्या आसपास म्हणजे १३:३० तासात ९०० किलोमीटर अंतर पार करून आम्हा नागपूरकरांना भुसावळला सोडायची. भुसावळवरून आम्हाला नागपूरला जाण्यासाठी त्या काळची अहमदाबाद - हावडा एक्सप्रेस किंवा त्यामागून येणारी दादर - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस मिळायची. सकाळी सात वाजता मिरजेवरून निघालेले आम्ही नागपूरकर १२०० किलोमीटर्सचा प्रवास आम्ही चक्क २२:३०  तासात करू शकायचोत. याच प्रवासासाठी आमची लेकुरवाळी महाराष्ट्र एक्सप्रेस तब्बल २७ तास घेत असे. त्यामुळे गोवा एक्सप्रेसने भुसावळ आणि नंतर नागपूर गाठणे हे आम्हा महाराष्ट्र एक्सप्रेस पिडीत विद्यार्थ्यांसाठी सुंदर प्रवासस्वप्न होते.


या प्रवासात एक अडचण अशी होती की ही गोवा एक्सप्रेस तेव्हा कराडला थांबत नसे. त्यामुळे ही गाडी पकडायला आम्हाला एकतर सातारा गाठावे लागे किंवा मिरजेला जावे लागे. त्यातल्या त्यात सातारा थोडे सुखावह होते. सकाळी कराडवरून निघून सातारा, तिथून सातारा स्टेशन आणि मग ही गाडी गाठावी लागे. एक दोन वेळा वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे शिकत असलेल्या माझ्या मित्राकडे आदल्या दिवशी रात्री मुक्काम करून दुस-या दिवशी सकाळी मिरजेवरूनही ही गाडी पकडली आहे. या खटाटोपाचा मुख्य उद्देश म्हणजे ही गाडी कराडला न थांबता प्लॅटफ़ॉर्मवरून धाडधाड करीत धूळ उडवीत कशी जाते याचा अनुभव घेणे असा असायचा.


रेल्वे फ़ॅनिंग हे बरेचसे संसर्गजनक आहे त्यामुळे आमच्या रेल्वे फ़ॅनिंगची लागण आमच्या रूम पार्टनर्सना झाली नसती तरच नवल. माझा अगदी जवळचा मित्र आणि रूम पार्टनर विजय कुळकर्णी (आता कैलासवासी. २०११ मध्ये दुर्दैवाने विजयचा जीवनप्रवास संपला.) आम्ही दोघांनीही आमच्या नागपूर ते कराड या परतीच्या प्रवासात भुसावळ ते सातारा ते कराड हा प्रवास गोवा एक्सप्रेसने करण्याचे निश्चित केले. १९९२ च्या हिवाळी सुट्ट्यांमध्ये विजय नाशिकवरून माझ्याकडे नागपूरला आलेला होता. आम्ही दोघांनीही नागपूर, माझे आजोळ चंद्रपूर येथे खूप धमाल मजा केली. आणि परतीच्या गोवा एक्सप्रेसने करावयाच्या तशा गैरसोयीच्या पण अत्यंत उत्कंठावर्धक प्रवासाला सुरूवात केली. 


आमचे अकोला ते कराड असे थेट तिकीट व भुसावळ ते सातारा हे गोवा एक्सप्रेसचे आरक्षण होते. अकोल्याला माझ्या मावशीकडे आम्ही गेलोत. तिथून शेगावला जाऊन संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन आणि आशिर्वाद घेतलेत आणि अकोल्याला येऊन आमच्या प्रवासासाठी सज्ज झालोत. 










दिनांक : ६ / १ / १९९२ व ७ / १ / १९९२ ची रात्र. थंडी मी म्हणत होती. तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली. अत्यंत बोचरी थंडी, बोचरे वारे. रात्री मी आणि विजय अकोला स्टेशनवर आलोत. आपल्याला दिवसाढवळ्या धावणा-या महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करून रात्री उबदार पांघरूणात झोपता आले असते असा विचार दोघांच्याही मनात झळकून गेला पण भुसावळ ते सातारा अशा सुपरफ़ास्ट रेल्वे फ़ॅनिंगचा आनंद घ्यायचा तर काही तरी किंमत मोजली पाहिजे यावर सुद्धा दोघांचेही एकमत होते. 


दिनांक : ७ / १ / १९९२ अकोला स्टेशनवर हावडा - अहमदाबाद एक्सप्रेस आली. खरेतर या गाडीपाठोपाठ येणा-या नागपूर - दादर सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये आम्हाला ब-यापैकी जागा मिळू शकली असती. पण सेवाग्राम एक्सप्रेस भुसावळला पोहोचण्याची वेळ आणि गोवा एक्सप्रेसची भुसावळवरून निघण्याची वेळ यात फ़क्त अर्ध्या तासाचे अंतर होते. तो धोका आम्हाला पत्करायचा नव्हता. हावडा - अहमदाबाद एक्सप्रेस नेहेमीप्रमाणे प्रवाशांनी भरून आलेली. दोन मिनीटांच्या थांब्यात एका डब्ब्यात आम्ही घुसलोत. रिझर्वेशन तर नव्हतेच. दरवाज्यात बसून जाऊ म्हटले तर बाहेरच्या गोठवणा-या थंडीपासून आणि गाडीच्या वेगामुळे अजून भन्नाट वेगाने वाहणा-या वा-यांपासून वाचण्यासाठी डब्ब्याचे दार बंद ठेवणे अत्यावश्यक होते. कसेबसे दार बंद करून त्याला टेकून बसलोत. दाराच्या , खिडकीच्या फ़टींमधून येणारा वारा अक्षरशः चावत होता. स्वेटर्स घालून वरून आमची पांघरूणे घेऊन आम्ही कुडकुडत ते दो्न - सव्वादोन तास काढलेत आणि भुसावळला उतरल्यानंतर पहिल्यांदा गरमागरम चहाच्या स्टॉलकडे धाव घेतली.

भुसावळनंतर मात्र आमचा प्रवास आरामदायक होता. आमची रिझर्वेशन्स होती. खिडकीच्या जागा होत्या. रेल्वे फ़ॅनिंग पूर्णपणे एन्जॉय करीत आम्ही साता-या पोहोचलोत. तिथून सातारा बसस्टॅण्ड आणि तिथून बसने कराडपर्यंत. 


आजही मला ती अकोला स्टेशनवरची गोठवणारी रात्र आठवतेय. रेल्वे फ़ॅनिंगसाठी इतकी गैरसोय सोसण्याची आम्हा तरूणांची ती तयारी. त्यानंतर मग भुसावळ ते सातारा प्रवासात आलेली मजा हे सगळेच अगदी अविस्मरणीय.


- रेल्वेवर (आणि बसवरही) मनापासून प्रेम करणारा रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

भारतीय रेल्वेची एक नावडती गाडी

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१

मध्य रेल्वेः नागपूर विभाग, एक गरीब बिच्चारा विभाग.

भारतीय रेल्वेतील एक अत्यंत दुर्मिळ क्लासचा कोच : FN - 1 कोच. त्यानिमित्ताने सेवाग्राम एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, हरिप्रिया एक्सप्रेस आणि दादर अमृतसर एक्सप्रेसच्या आठवणी.

महाराष्ट्र एक्सप्रेस : बिचारेपणाचा चलचित्र प्रवास.

Sunday, February 4, 2024

महाराष्ट्र एक्सप्रेस : बिचारेपणाचा चलचित्र प्रवास.

महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीकडे कायम होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल मी एका लेखात. तो लेख इथे. सविस्तर लिहीलेले होते. त्याचीच सचित्र झलक एकेदिवशी नागपूरजवळ पहायला मिळाली.

२६ / ०९ / २०२१ : आम्ही कुटुंबीय नागपूरजवळील वडगाव धरण येथे सहलीसाठी गेलेलो होतो.  परतताना बोरखेडी फ़ाटकात आम्हाला बराच वेळ थांबावे लागले. 

दुपारी १.५७ : महाराष्ट्र एक्सप्रेस हळूहळू बोरखेडी स्टेशनात दाखल झाली आणि प्लॅटफ़ॉर्म क्रमांक १ वर थांबवल्या गेली. तेव्हाच आता या गाडीच्या बाबतीत काहीतरी अन्यायकारक घडणार याची चाहूल आम्हाला लागली होती. कारण बोरखेडीला या गाडीचा थांबा नाही. खरेतर ही गाडी मध्य रेल्वेची. हिला प्राधान्य देऊन तसेच नागपूरपर्यंत नेले असते तर सध्याच्या वेळेच्या किमान १ तास लवकर ही गाडी नागपूरपर्यंत येऊ शकते. पण मध्ये रेल्वेचा अवसानघातकीपणा सर्वत्र आड येतो.


दुपारी २.०२ : नागपूरवरून येणारी नवी दिल्ली - चेन्नई ग्रॅंड ट्रंक (G T) एक्सप्रेस तिच्या पुढच्या थांब्याकडे, सेवाग्रामकडे धाडधाड निघून जातेय. महाराष्ट्र एक्सप्रेस बिचारी अजूनही वाट बघतेच आहे. न थांबवता जर तिला पुढे जाऊ दिले असते तर किमान बुटीबोरीपर्यंतचे अर्धे अंतर तिने कापलेच असते पण नाही.

दुपारी २.०५ : महाराष्ट्र एक्सप्रेसच्या मागून येणारी तामिळनाडू एक्सप्रेस पूर्ण वेगात येऊन महाराष्ट्रला ओव्हरटेक करून पुढे काढली जातेय. जर महाराष्ट्र एक्सप्रेस पुढे काढली असती तर या गाडीला मागाहून कमी वेगाने यावे लागले असते. पण दक्षिण रेल्वेच्या गाडीसाठी पायघड्या आणि आपल्या स्वतःच्या गाडीसाठी साधी चांगली वागणूकही नाही हे तर मध्य रेल्वेचे व्यवच्छेदक लक्षण आहे.


आता ही तामिळनाडू एक्सप्रेस बुटीबोरीला जाईपर्यंत पुढची ७ - ८ मिनीटे तरी हा ब्लॉक मोकळा होणार नाही. मग महाराष्ट्र एक्सप्रेस या स्थानकावरून हलू शकेल. म्हणजे दुपारी १.५७ ला इथून निघून जायची ती तब्बल २. १३ पर्यंत विनाकारण बोरखेडीतच पडून राहणार. १६ मिनीटांचा विनाकारण खोळंबा.

मध्य रेल्वे सोडली तर आपल्याच विभागाच्या गाड्यांना स्वतःच इतकी सावत्र वागणूक देण्याचे उदाहरण संपूर्ण भारतात इतर कुठलेही नसेल.



- महाराष्ट्रीय नावाच्या बाण्याचा, मराठी माणूस, प्रा. राम प्रकाश किन्हीकर













Tuesday, March 25, 2014

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

नोव्हेंबरच्या अखेरीच्या आठवड्यात हिवाळी सुट्टी घेतली. चि. मृण्मयीच्या शाळेतून कशीबशी आठवडाभरासाठी सुट्टी मिळवली आणि पहिल्या वहिल्या दक्षिण प्रवासासाठी सज्ज झालो. नागपूर ते चेन्नई, चेन्नई ते मदुराई, मदुराई ते रामेश्वरम ते मदुराई, मदुराई ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते तिरूवनंतपुरम, तिरूवनंतपुरम ते तिरूपती, तिरूपती ते चेन्नई आणि चेन्नई ते नागपूर असा ८-९ दिवसांचा प्रवासाचा बेत होता. त्यातील नागपूर ते चेन्नई, चेन्नई ते मदुराई, मदुराई ते कन्याकुमारी, तिरूवनंतपुरम ते तिरूपती आणि चेन्नई ते नागपूर अशी रेल्वे प्रवासाची आरक्षणे झाली होती. थांबण्याची आणि इतर प्रवासाची व्यवस्था ऐनवेळी बघू म्हणत आम्ही निघणार होतो.

२९/११/२००८ रोजी नागपूर ते चेन्नई अशी तामिळनाडू एक्सप्रेसची आरक्षणे केलेली होती. या गाडीविषयी मला पूर्वापार फ़ार आकर्षण. चंद्रपूर स्थानकात न थांबता ऐटीत रोरावत निघून जाणारी, ताडाळीच्या फ़ाटकात इटारसी शेडच्या दोन दोन डिझेल एंजिनांच्या मागे झुपकन निसटणारी, लाल पिवळ्या आकर्षक रंगसंगतीच्या डब्यांची (पूर्वीच्या काळी), आणि काळाबरोबर थांबे फ़ार न वाढलेली ही गाडी अत्यंत मस्त  आहे. आजही नागपूर ते चेन्नई या १०९० किमीच्या प्रवासात फ़क्त बल्लारशाह, वारंगल आणि विजयवाडा हे तीनच थांबे ही गाडी घेते.

शनिवार २९/११/२००८.

महाविद्यालयातून घरी आलो. पटापट जेवलो. गाडी उशीरा धावत असल्याचे वर्तमान आंतरजालावरून बघितले. दुपारी १४.२० ला निघणारी गाडी जवळपास १ तास उशीरा धावत होती. न जाणो, एखादे वेळ भोपाळ ते नागपूर या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात वेळ भरून काढेलही म्हणून दुपारी १ वाजताच घरून निघालो. चि. मृण्मयी तर उत्साहात साडेबारा वाजल्यापासूनच तयार होऊन पाठीवर छोटी सॅक लावून बसली होती. प्रवासात कपडे मोजके घ्यायचे आणि संधी मिळाली की धूवून इस्त्री करून वापरायचे असे ठरल्यामुळे सामानाचे वजन मर्यादित झाले होते. (अतिरिक्त सामान घेतल्यामुळे झालेल्या फ़जितीच्या गजाली नंतर कधीतरी.) तसही स्टेशनवर वेळ काढणे हा माझ्यासाठी  प्रश्न नसून ती एक संधी असते.





चि . मृण्मयीची प्रवासाची जय्यत तयारी

गाडी उशीरा धावतेय हे माहिती असूनही आम्ही लवकरच म्हणजे १३. ४० वाजताच स्थानकावर पोहोचलो. फलाट  क्र. २ वरून तामिळनाडू एक्सप्रेस जाते हा नेहेमीचा अनुभव. तिथे सगळा सावळा गोंधळच होता. दुपारी १२. ३० वाजता चेन्नई ला जाणारी जी . टी . एक्सप्रेस  अजूनही गेलेली नव्हती. २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यामुळे सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट  सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे सगळ्याच रेल्वे गाड्या उशीरा धावत होत्या.

नागपूर रेल्वे स्थानकावरील काही क्षणचित्रे.



१) फलाट ५ वर ८०३० हावडा-कुर्ला एक्सप्रेस उभी होती. भारतीय रेल्वेच्या लेकुरवाळ्या गाड्यांमध्ये हिची गणना होते. हावडा शेडचे तिचे एंजिन २२२७७ WAP ४ निमूट बाजूला उभे होते आणि एक नवीनच सर्वसाधारण वर्गाचा डबा गाडीला जोडला गेला .



२) पुणे शेडचे डिझेल एंजिन ११२२४ WDM ३D मोकळ्या रांगांमध्ये  निपचित पडून होते. संध्याकाळी १८.३० वाजता इथून निघणाऱ्या नागपूर-पुणे गाडीची  वेळ होईस्तोवर बिचारे  कालच्या झोपेची थकबाकी गोळा करीत असावे. 


दरम्यान चि. मृण्मयी कंटाळली . फ़लाटावर तशीही गर्दी नव्हतीच. आम्ही आमचे सामानाचे डाग एका निवांत जागी ठेवलेत आणि कन्यारत्नाला आणि तिच्या आईसाहेबांना बसायला जागा करून दिली .


३) बरोबर १३. ५५ ला (जवळपास दीड तास उशीरा)  २६१६ अप जी. टी. एक्सप्रेस फलाट २ वर आली. २२२९८ हे इरोड शेड चे WAP  ४ एंजिन तिला ओढत होते. जीटी च्या डब्यांची स्थिती याप्रमाणे.

गार्डाचा डबा-जनरल-जनरल-एच.ए १-ए १-ए २-बी १-बी २-एस १-एस २-एस ३-भोजनयान-एस ४-एस ५-एस ६-एस ७-एस ८-एस ९-एस १०-एस ११-एस १२-जनरल-जनरल-गार्डाचा डबा-पार्सल डबा. (एकूण २५ डबे)
(एच ए.१ = वातानुकुलीत प्रथम वर्ग  + वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, ए १ आणि ए २ = वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, बी १ आणि बी २ = वातानुकुलीत त्रिस्तरीय शयनयान )

४) २६१६ जीटी ने १४.०८ ला प्रस्थान केले आणि १४.११ ला विरुद्ध बाजुने २६१५ (चेन्नई-नवी दिल्ली) जीटी नागपुरात आली. ही मजा रोज २६२१ तामिलनाडू आणि २६२२ तामिलनाडू एक्सप्रेसच्या बाबतीत नागपूरला होते. नागपूर ते नवी दिल्ली हे अंतर १०९० किमी तर नागपूर ते चेन्नई अंतर १०९५ किमी. म्हणजे नागपूर हे दिल्ली-चेन्नईचा मध्यबिंदू. दोन्ही बाजुंनी तामिलनाडू एक्सप्रेस रात्री २२.३० ला निघतात आणि नागपूरला दुस-या दिवशी दुपारी १४.१० वाजता येतात आणि आपापल्या गंतव्य स्थळी तिस-या दिवशी सकाळी ०७.३० वाजता पोहोचतात. गंमतच आहे. आज जी.टी. एक्सप्रेसला उशीर झाल्याने तिने तामिळनाडू एक्सप्रेसची जागा घेतली होती.

५) आम्हाला स्टेशनवर निरोप द्यायला महाविद्यालयातील माझे दोन तरूण सहकारी प्रा. हरीओम खुंगर आणि प्रा. कु. दिशा खंडारे आलेले होते. मग त्यांच्यासोबत एक फोटो सेशन झाले. हरीओम हा माझ्यासारखाच रेल्वेप्रेमी असल्याने तो असेपर्यंत वेळ वेगवेगळ्या गाड्या बघण्यात छान गेला.


हा आम्हा प्रवासी मंडळींचा फोटो. प्रा. किन्हीकर, सौ. किन्हीकर आणि चि. मृण्मयी किन्हीकर. प्रवासात कॆमेरा आणि डायरी हा आम्हा सर्व रेल्वे प्रेमींच्या तयारीचा अविभाज्य भाग असतो 
                                     

आणि हा फोटो चि. मृण्मयीने काढलेला आहे.

६) दरम्यान इतर फ़लाटांवर २८१० हावडा-मुंबई मेल, २९६८ जयपूर-मद्रास एक्सप्रेस, २४४१ बिलासपूर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, २८४३ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस, २७१३ हैद्राबाद-नवी दिल्ली आंध्रप्रदेश एक्सप्रेस, २१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस यांची ये जा सुरू होतीच. सगळ्या गाड्यांना लालुप्रसादांच्या कल्पनेतले साइड मिडल बर्थस जोडलेले होते. प्रचंड गैरसोयीचे हे बर्थस नंतर काढल्या गेलेत. एका "तुघलकी" योजनेचा योग्य तो शेवट झाला.


आंध्र प्रदेश एक्सप्रेस. नाम फ़लक वैशिष्ट्यपूर्ण. त्यात निळ्या पट्टीने झाकलेल्या भागात कुठल्यातरी गावचे नाव असणार. ते गाव-हैद्राबाद आणि हैद्राबाद-नवी दिल्ली आंध्रप्रदेश एक्सप्रेस रेक्स शेअर करीत असणार. बहुतेक विशाखापट्टणम.

७) दरम्यान काही मालगाड्यांची ये जा सुरू होतीच. त्यातले काही दुर्मीळ योग टिपलेत.



लुधियाना शेडचे ह्या प्रकारातले एंजिन या रंगसंगतीत फ़ार क्वचित दिसते. रेल्वे प्रेमींमध्ये ही रंगसंगती "बार्बी डॉल रंगसंगती" म्हणून प्रसिद्ध आहे.


इरोड (तामिळनाडू) शेडचे ह्या प्रकारातले हे दुर्मीळ एंजिन. या रंगसंगतीत तर फ़ारच दुर्मीळ.

८) दरम्यान १६.३५ झालेत. आमच्या गाडीची उदघोषणा होत होतीच. " थोडेही समय में प्लॅटफ़ार्म नं २ पे आयेगी " हे ऐकून ऐकून कंटाळा आला. गाडी ७०-८० किमी दूर असल्यापासूनच उद्घोषणा सुरू करतात की काय ? असे वाटून गेले. दरम्यान आमची सख्खी सखी १०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस नागपुरात दाखल झाली. माझ्या एकूण  प्रवासापैकी एक तृतीयांश प्रवास मी ह्या गाडीने केलेला आहे. नागपूर ते कराड या अभियांत्रिकीच्या ४ वर्षातली ही आमची सोबती.

९) शेवटी १६.४० वाजता उत्तरेच्या टोकाला बहुप्रतिक्षित व WAP ४ एंजिनाचा लाल ठिपका दिसायला लागला. हळूहळू तो मोठा मोठा होत आमच्या जवळून जात थांबला. प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला, उशीरा का होइना, सुरूवात झाली होती. दुस-या दिवशी मदुराई ला जाणारी आमची वैगाई एक्सप्रेस दुपारी १२.३० ला होती त्यामुळे तसे टेन्शन नव्हते.


इरोड शेडचे २२६६५. इरोड शेड हे त्यांच्या एंजिन नंबरांच्या बाबतीत पझेसिव्ह आहे. २२२२२, २२५५५, २२६६६, १११११ हे सगळे स्पेशल नंबर्स त्यांच्याकडे आहेत.

प्रवास: सविस्तर

एंजिन क्र. २२६६५ द. रे. इरोड शेड WAP ४

कोच क्र. ०६०२७, द. रे.,  एच. ए. १, वातानुकुलीत प्रथम वर्ग  + वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, केबीन ए
इंटिग्रल कोच फ़ॆक्टरी, मद्रास येथे दि. १४/१०/२००६ रोजी बनविण्यात आलेला कोच.


कोचच्या अंतर्गत पॅसेजमधील सजावट.


हिवाळ्यात प्रवास करताना ब-याच जणांचा प्रश्न असतो. " हिवाळा असताना ए.सी. कशाला ? " त्याचे हे उत्तर. आतील तापमान हिवाळ्यातही १९ अंशापेक्षा खाली जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे. बाहेर कदाचित रात्री तापमान ५ अंश ते १० अंश असू शकेल. त्यामानाने आत उबदार असेल. आणि ए.सी. प्रवासाचा सगळ्यात मोठा फ़ायदा म्हणजे आवाज, धूळ इत्यादी नसल्याने प्रवासाचा थकवा कमी होतो.










आम्ही आमच्या केबिनमध्ये स्थानापन्न झालो आणि १६.५६ ला गाडी हलली. अजनी स्टेशनला सिग्नल नसल्याने १ मिनीटांकरिता थांबून मग वेग घेतला. आमच्या केबिनमध्ये आमच्या तिघांशिवाय आमचे सहप्रवासी एक सदगृहस्थ होते. चेन्नई दूरदर्शनचे सहसंचालक होते. दिल्लीला कुठला तरी रिफ़्रेशर कोर्स करून परत कामावर निघाले होते. ( त्यांनी खरंतर नावही सांगितले होते. पण गडबडीत लक्षात राहिले नाही.) चि. मृण्मयी बसल्या क्षणापासूनच प्रवासाचा पूर्ण आनंद घेण्यात मग्न झाली. केबीनमधल्या टेबलावर चित्रकलेची वही काढून चित्रे काढण्याचा घाट तिने घातला. दरम्यान कोचचा मदतनीस आला आणि स्वच्छ अंथरूणे व पांघरूणे आम्हाला देऊन निघून गेला. अर्थात भारतातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा एका गाडीत सगळ्यात वरच्या वर्गात आम्ही प्रवास करीत होतो त्यामुळे सगळ्याच गोष्टी सर्वोत्तम मिळायला हव्यात ही आमची अपेक्षा अवास्तव नव्हती.

सिंदी रेल्वे पर्यंत (४६ किमी) गाडीने ब-यापैकी वेग पकडला होता पण पुढे पाठवलेल्या मालगाडीने घोटाळा केला. सिंदीत आम्हाला २ मिनीटांसाठी थांबावे लागले. 

मग मात्र तामिळनाडू एक्सप्रेसने तिचे खरे रंग दाखवायला सुरूवात केली. पुढल्याच स्टेशनवर (तुळजापूर जि. वर्धा) त्या मालगाडीला खाडखाड धूळ चारत आम्ही मार्गक्रमू लागलो. सेवाग्राम १७.५९ ला आलो. नागपूर ते सेवाग्राम हे ७६ किमीचे अंतर आम्ही १ तास ३ मिनीटांत कापले होते.  न थांबता दक्षिणेकडे जाणा-या वळणावर गेलो. रेल्वे प्रेमींचे हे वळण खूप आवडते आहे. आमच्या ग्रूपमध्ये या वळणाचे अक्षरश: शेकड्यात फ़ोटो आहे. संपूर्ण गाडी या वळणावर दृष्टीगोचर होत असते.

हिंगणघाट वगैरे झपझप कापून चंद्रपूरलाही (वेळ १९.२७. १९२ किमी अंतर २ तास ३१ मिनीटांत. थोडक्यात मुंबई-पुणे, २ तास ३१ मिनीटांत) न थांबता थेट पहिल्या अधिकृत थांब्यावर (बल्लारशाह) आम्ही थांबलो तेव्हा संध्याकाळचे १९.३८ झालेले होते. मध्य रेल्वेचा कर्मचारीवर्ग बदलून इथे द.म. रेल्वे चा कर्मचारी वर्ग आला. आम्हीही शिदो-या सोडून जेवण करून घेतले. १२ मिनीटांनी १९.५० ला गाडीने बल्लारशाह सोडले. थोडावेळ दारापाशी उभा राहिलो. बल्लारशाह नंतर लगेचच वर्धा नदीच्या पुलावरून आमच्या मामांचे शेत दिसते. लहानपणी शेतात हुरडा खायला गेल्यानंतर तिथल्या मचाणावर चढून दूरवरच्या गाड्या बघणे हा आमचा छंद असायचा. आज गाडीतून शेत दिसतय का हा नॊस्टालजिया जपत बाहेर बघत होतो. पण किर्र अंधार पडला होता त्यामुळे हा बेत सफ़ल झाला नाही.

रात्री नेहेमीप्रमाणे ९-९.३० लाच झोपी गेलो. सहप्रवासी भला होता. त्यानेही केबिनचे दिवे मालवायला कां कूं केले नाही.
रात्री वारंगल येऊन गेले असेल. आमची झोप मोडली नाही. पहाटे पहाटे गाडी ब-याच वेळ थांबली होती. खिडकीचा पडदा बा्जूला करून पाहीपर्यंत गाडी हलली. विजयवाडा स्टेशन होते आणि आनंददायी बाब म्हणजे नागपूरवरून आमच्या डोळ्यांसमोरून आमच्या जवळपास तासभर आधी निघालेल्या २९६८ जयपूर-चेन्नई सुपर एक्सप्रेसला आम्ही ओव्हरटेक करीत होतो. विजयवाड्याला त्या गाडीला बाजूला काढून आम्हाला प्राधान्य मिळालेले होते.

भारतीय रेल्वे हे जसे राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहे तसेच ते प्रांतवादाचेही आगर आहे. लुधियानाचे एंजिन कोची ला आणि वडोदरा चे एंजिन मालदा टाउन ला जसे सापडते तसेच आपल्या विभागात आपल्या गाड्यांना प्राधान्यक्रम देण्याची वृत्तीही सर्वत्र बघायला मिळते. मुंबई ते नागपूर हा मध्य रेल्वेच्या अखत्यारीतला प्रवास अगदी दिमाखात प्राधान्याने करणारी विदर्भ एक्सप्रेस नागपूरच्या पुढे दक्षिण पूर्व रेल्वेच्या ताब्यात गेल्यावर गोंदियापर्यंत बापुडवाणा प्रवास करते. जयपूर-चेन्नई सुपर ही भोपाळपर्यंत अगदी राणी असते. नंतर मात्र तिचे संस्थान खालसा होते. हे प्रकार सर्वत्रच अनुभवायला येतात.







रविवार ३०/११/२००८.

सकाळी आमच्या केबीनमधली सर्व प्रवासी मंडळी जागी झाली तेव्हा गाडी गुडूरजवळ पोहोचली होती. पेन्ट्री कार मधून इडली सांबारचा नाश्ता आला. वर चहा ढोसत आम्ही जरा फ़्रेश झालोत. 




गुडूरनंतर मात्र गाडीला फ़ारसा वेग घेण्याची संधी मिळाली नाही. "गुमीडपुंडी" या मजेशीर नावाच्या स्टेशननंतर चेन्नईची लोकल वाहतूक सुरू झाली होती.





आणि सरतेशेवटी ज्या स्टेशनविषयी खूप वाचले होते, ऐकले होते. त्या चेन्नई सेंट्रल स्टेशनला आम्ही पोहोचलोत. सकाळचे १०.०४ वाजले होते. नियोजित वेळेपेक्षा २ तास ३४ मिनीटे उशीरा. सरासरी वेग ६३.९१ किमी प्रतीतास. अतिशय चांगला. स्टेशनच्या आधीच या "जेम्स बॉण्ड" २२००७ साहेबांनी स्वागत केले.


चेन्नईला बाहेर आलो. स्टेशनच्या जुन्या, गॊथिक शैलीतल्या इमारतीचा फ़ोटो काढला.


आटो रिक्षा स्टॆंडपर्यंत आमचे सहप्रवासी (भला माणूस) सोबत होते. त्यांनी तामिळीतून रिक्षावाल्याशी बोलून ३० रूपयांत चेन्नई एग्मोर स्टेशनपर्यंत रिक्षा ठरवून दिला. (परतीच्या प्रवासात चेन्नईच्या रिक्षांचा आम्हाला "चांगलाच" अनुभव आला. ५-७ किमी प्रवासासाठी ७० ते ८० रूपये आम्ही मोजलेत) आमची गाडी दुपारी १२.३० ला चेन्नईवरून मदुराई साठी एग्मोर स्टेशनवरून जाणार होती. प्रवासाचा पहिला टप्पा तर खूप छान आणि आनंदात पार पडला होता.





चेन्नई शहर बस सेवेतल्या काही सुंद-या. रविवार असल्याने गर्दी तशी नव्हती. रस्ते ब-यापैकी मोकळे होते. चेन्नईचे प्रथम दर्शन, निवांतपणामुळे मला आवडले.

(क्रमशः)