Saturday, January 9, 2016

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५

जानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरीयल विषयात फ़क्त आम्ही ८ च विद्यार्थी उत्तीर्ण झालो होतो. भगवंताविषयी एक कृतज्ञता दाटून आली. आम्ही एव्हढे हुशार वगैरे नसताना हा बहुमान मिळणे म्हणजे आश्चर्यच होते. मग मी श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठरविले. तसेही सुरूवातीच्या काळात महाविद्यालयात काही विशेष शिकवण्याचा भाग होत नाही हे तर आत्तापर्यंत केलेल्या तीनही सत्रांमधून पाहिलेले होते. म्हटलं जाउयात ३ - ४ दिवस. मित्रांना विचारून पाहिले पण प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी, मी यापूर्वीचा शिर्डी प्रवास १९७८ मध्ये केला असल्याने यावेळी जायला अगदी उत्सुक होतो. मग एकट्यानेच जायचे ठरवले.

घरी महिन्याच्या खर्चाव्यतिरिक्त फ़ार जास्त पैसे मागणे जिवावर आले होते. बर पैसे मागवायला आणि घरून एम. टी.  ने यायला कमीतकमी आठवडा गेला असता. मग एकट्याने जाताना थोडे "इकॉनॉमी मोड"ने जाऊयात असा विचार केला. आणि मग सुरूवात झाली एका अनपेक्षित रित्या गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवासाला.

११/०१/१९९१ रोजी सकाळी ८.०० वाजताच्या पॅसेंजरने निघायचे ठरले. महाराष्ट्र एक्सप्रेस होती खरी पण ती खूप पहाटे कोपरगावला पोहोचायची आणि जरा बचत करत जायच म्हटल तर विचार केला पॅसेंजरनेच जाउयात. वेळ वाचवून तरी काय करायचाय ? पैसा वाचवूयात. प्रश्न होता आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयापासून कराड स्टेशनपर्यंत कसे यावे ? त्यावेळी स्टेशन अगदी आडबाजुला वाटे आणि जाण्यायेण्यासाठी रिक्षा परवडण्याजोग्या नव्हत्या. कराडच्या आमच्या महाविद्यालयापासूनच्या स्टेशनपर्यंतच्या रिक्षा भाड्यात पॅसेंजरने कराड-कोपरगाव-कराड असे रिटर्न तिकीट झाले असते. (रिक्षाचालक हा एक गरीब, परिस्थितीने गांजलेला वगैरे असतो हे माझे मत कराडमध्ये पार धुळीला मिळाले होते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात टगेगिरी केलेली आहे असे दाखवल्याशिवाय रिक्षाचे लायसन मिळत नसावे.) मग एका बसचा शोध लागला. कराड- वाघेरी ही बस सकाळी ६.३० च्या सुमाराला आमच्या महाविद्यालयासमोरून जायची आणि साधारण १५ मिनीटांत स्टेशनवर पोहोचायची. (या ६ ते ७ किमी च्या प्रवासासाठी रिक्षा ५० रू. त्या काळात मागायचेत. कराड ते कोपरगाव पॅसेंजरचे तिकीट २६ रूपये आणि एक्सप्रेसचे तिकीट ५८ रूपये होते.) मग त्या बसने निघण्याचे ठरवले. भाडे ४५ पैसे फ़क्त.

११/०१/१९९१ : सकाळी पावणेसातलाच कराड स्टेशनवर पोहोचलो. कराड स्टेशनवर टाईमपास करण्याचा काही प्रॉब्लेमच नव्हता. पु. लं. नी " काही अप्स, काही डाऊन्स " या लेखात याच मार्गावरच्या स्टेशन्सचे वर्णन केलेले आहे. तिकीट खिडकी उघडण्याची वाट बघत बसलो. पावणेआठाच्या सुमाराला तिकीट खिडकीवर चुळबुळ सुरू झाली. थेट कोपरगावचे पॅसेंजर तिकीट घेतले आणि गाडीची वाट बघत बसलो. गाडी चांगली अर्धा तास उशीरा आली. आणि पंधरा मिनीटे थांबून रवाना झाली. तशीही या मार्गावर गाड्यांना गर्दी विरळाच. त्याला ही पण अपवाद नव्हती. खिडकीची जागा पटकावून या इकॉनॉमी प्रवासाचा आनंद मी लुटायला सुरूवात केली.



नीरा स्थानकात खाण्यापिण्याची छान व्यवस्था व्हायची. जुन्या, वाफ़ेच्या एंजिनांच्या काळात, नीरा स्थानकात एंजिनात पाणी भरत असावेत. ती पाणी भरण्यासाठी असणारी सोंड बराच काळ तिथे बघायला मिळाली होती. म्हणजे गाडीची पण पोटपूजा आणि प्रवाशांचीही इथेच व्हायची. मला आठवतेय १९९० च्या दशकात महाराष्ट्र एक्सप्रेस चांगली अर्धा तास नीरा स्थानकात उभी असायची. फ़ळफ़ळावळीचा भरपूर मेवा विकायला इथे असायचा. यावेळेसही अशीच पोटपूजा करून आम्ही मार्गस्थ झालोय.

घोरपडी स्टेशन आल की पुण्याच्या नागरी पाउलखुणा दिसायला लागायच्यात. मग पुण आलच आहे म्हणून दारापाशी उभा ठाकलो. पुण्यावरून पुणे - मनमाड पॅसेंजर घ्यायची हे ठरले होते. पण ती केव्हातरी दुपारी निघते या व्यतिरिक्त माहिती तेव्हा मला नव्हती. त्यामुळे थोडी रुखरूख. घोरपडी स्टेशनवरून तीन वाजता निघालेली गाडी पुण्याच्या आउटर सिग्नलला उभी राहिली. पुणे जंक्शनपाशी. इथूनच सोलापूर - वाडी हैद्राबाद / गुंटकल कडे जाणारा मार्ग आणि मिरज - कोल्हापूरकडे जाणारा मार्ग वेगळा होतोय. ५ मिनीटे वाट बघून दारातूनच बाजूने जाणा-या रेल्वे कर्मचा-याला विचारले की " दादा, गाडी का थांबवलीय ? पुण्यात कधी घेणार प्लॅटफ़ॉर्मला ? " त्याच उत्तर ऐकून दरदरून घामच फ़ुटला. तो म्हणाला " आत्ता प्लॅटफ़ॉर्म ४ वर मनमाड पॅसेंजर उभी आहे. ती आणखी ५ मिनीटांत निघेल मग या गाडीला प्लॅटफ़ॉर्म ४ वरच घेतील. " बापरे, आता काय करावे ? बरं, ही मनमाड पॅसेंजर निघून गेली तर पुण्यावरून कोपरगावकडे रात्रीशिवाय दुसरी गाडी नव्हती. म्हणजे एव्हढ्या मेहेनतीने बनविलेला आपला प्लॅन फ़िसकटणार तर.  



मग एक धाडसी निर्णय घेतला. तसाच गाडीखाली उतरलो आणि रेल्वे रूळांवरून पुणे स्टेशनकडे चालायला लागलो. धोका होता पण त्या काळात असे धोके स्वीकारण्याची खुमखुमी होती. जवळपास धावतच निघालो. दूरवरून प्लॅटफ़ॉर्मवर दौंडच्या दिशेला तोंड करून असलेले डिझेल एंजिन आणि त्यापाठी असलेली गाडी दिसली. त्याच रूळांवरून त्या दिशेने निघालो. जणू ती गाडी सुटली तर माझ्यासाठी ती थांबणारच होती. पण सुदैवाने प्लॅटफ़ॉर्मवर पोहोचेपर्यंत सुटली नाही. आत बसल्या बसल्या गाडी सुटली. हा निर्णय घेण्यात थोडा आणखी उशीर झाला असता तर मात्र नक्की गाडी मिळाली नसती.



हा प्रवास मात्र थोडा रटाळ झाला. गाडीत दौंडपर्यंत ब-यापैकी गर्दी होती. दौंडनंतर अंधारात फ़ारसे रेल्वेफ़ॅनिंग करता आले नाही. गाडी कोपरगावला किती रात्री पोहोचणार याबद्द्ल ठाम माहिती नसल्यामुळे मधेच झोपपण उरकून घेतली. १९७८ मधल्या प्रवासातल्या काय काय गोष्टी आठवतायत याचा विचार करीत प्रवास संपला.

कोपरगाव बस स्थानकावरून थोड्याच वेळात शिर्डीसाठी बस मिळाली.





प्रवासाची तिकीटे जपून ठेवण्याचा माझा छंद. या २५ वर्षांपूर्वीच्या प्रवासाची ही तिकीटे.


 कोपरगाव ते शिर्डी बस प्रवासाचा एकूण खर्च ४ रूपये ५० पैसे.

१२/०१/१९९१ : रात्री १ वाजता शिर्डीत हॉटेल / लॉज शोध मोहिम सुरू झाली. फ़ार खर्च करायचा नव्हताच आणि त्याकाळी शिर्डीत आजइतकी चकाचक आणि खूप सारी हॉटेल्सपण नव्हती. मंदीराजवळच एक साधेसे लॉज सापडले. पण मला एकट्याला तो खोली देईना. " साहेब इथे परवाच अशाच एकट्या मुलाने आत्महत्या केलेली आहे " हे त्याचे वाक्य मला हादरवून गेले. कसेतरी बाबापुता करून लॉजच्या गच्चीवरची एक खोली मिळवली. भाडे ६० रूपये फ़क्त. रात्रीचे २ वाजत आले होते. पहाटे लवकर उठण्याच्या इराद्याने झोपलो. झोपण्यापूर्वी त्या तथाकथित आत्महत्येचे स्थळ म्हणजेच मला दिलेली खोली नव्हे ना ? याची खातरजमा करून घेतली.

पहाटे काकड आर्तीच्या आवाजाने जाग आली. आवरून दर्शनाला गेलो. मंदीर परिसरात निवांत वेळ घालवला. साईबाबांचे निवांत दर्शन घेतले. त्यांना आत्म परिस्थिती निवेदन केली. परिसरातील इतर दर्शने घेतलीत. दुपारी जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि लॉजवर परतून परतीच्या प्रवासाला निघालो.

दुपारी शिर्डीवरून थेट कराडला जाणारी कोपरगाव - हुबळी ही कर्नाटक सरकारची एक्सप्रेस बस होती. इतका लांबचा प्रवास कर्नाटक राज्याच्या बसने करायचा म्हणून मी हरखलो होतो. शिर्डीच्या बसस्थानकावर बसची चौकशी केल्यानंतर कळले की दुपारी ३ वाजता ही बस येते आणि बसभाडे ७३ रूपये आहे. प्रवासाच्या या शेवटल्या टप्प्यासाठी मी माझ्या पाकिटातली रक्कम मोजली आणि हादरलोच. पाकिटात सगळे मिळून वट्ट ७० च रूपये होते. पुन्हा पुन्हा मोजले पण त्यामुळे पैसे वाढणार होते थोडेच ? मोठ्ठा प्रश्न उभा राहिला. आता परतायचे कसे ? बस आल्यावर आपली परिस्थिती कंडक्टरला सांगून पहावी का ? त्याला पटेल का ? परराज्यातल्या कंडक्टरला बाजू पटली नाही तर काय करावे ? 

डोळ्यासमोरून आत्तापर्यंत बसस्टॅण्डवर पाहिलेल्या " साहेब, आम्हाला आमच्या गावाला परत जायला पैसे नाहीत हो. पाकीट मारल्या गेलय़ " वगैरे सांगून भाड्यापुरती पैशाची याचना करणा-या व्यक्ती आल्या. आज आपल्यावरही ही पाळी आलीय का ? 

साता-याला सुधीर गोखले, विश्वास सुतार वगैरे मित्रमंडळी होती. साता-यापर्यंत तिकीट ६५ रूपये होते. साता-यात उतरून यांच्याकडे जावे की काय ? पण ही मंडळी या क्षणी कराडला हॉस्टेलला होती आणि यांच्या घरी यांचे पालकच असतील. शिवाय घरी जाउन रिक्षाचे पैसेही यांच्या पालकांना मागणेसुद्धा फ़ारसे स्वीकारार्ह नव्हते.

सुरूवातीला भांबावलो. मग घाबरलो. स्वतःवरच चरफ़डलो. " जेवताना तो पापड उगाच घेतला. नसता घेतला तर हा ३ रूपयांचा प्रश्न आला नसता. सकाळी दुस-यांदा चहा प्यायलो नसतो तर आणखी एक रूपया वाचला असता. " एक ना दोन, हज्जार विचारांनी डोक्याला मुंग्या आल्या होत्या. दिड;मुढ झालो. हनुवटी छातीत खुपसून किती वेळ शिर्डीच्या प्लॅटफ़ॉर्मवर बसलो होतो कुणास ठाउक ? जीवनात अगदी हरल्यासारखे वाटण्याचे जे काही क्षण जीवनात आलेत त्यातलाच हा तास.

आणि मग अचानक विजेसारखा एक विचार चमकला. पुन्हा स्थानक प्रमुखांकडे गेलो. आणि विचारले की औरंगाबादचे तिकीट किती ? त्यांनी सांगितले की २६ रूपये. एकदम हायसे वाटले. आता प्लॅन बदलून
औरंगाबादला जाउ. तिथे अण्णाकाकांकडे जाउ. त्यांना खरे खरे सगळे सांगू. आपली चूक अशी वडीलधा-यांसमोर मान्य करण्यात कसली आलीय लाज ? चलो औरंगाबाद.

कोपरगाव वरून औरंगाबादला जाण्याला जास्त ऑप्शन्स मिळतील या विचाराने पुन्हा कोपरगाव गाठण्याचे ठरवले. लगेच एक साधी बस मिळाली.







शिर्डी ते कोपरगाव साधारण बसचे तिकीट ३ रूपये ५० पैसे फ़क्त.



कोपरगावला औरंगाबादकडे जाणा-या बसेसच मिळाल्या नाहीत. एक तास बसफ़ॅनिंग मध्ये तिथे घालवला. मग शिर्डीवरूनच येणारी बस मिळाली.



जीव भांड्यात पाडून निघालो. त्यावेळी सध्या अस्तित्वात असलेला नागपूर - वर्धा - कारंजा - मेहेकर - सिंदखेड राजा - जालना- औरंगाबाद - शिर्डी - सिन्नर - घोटी - मुंबई हा हायवे नव्हता. सगळ्या बसगाड्या शिर्डी ते औरंगाबाद हा प्रवास एकतर नेवासे मार्गे नाहीतर येवला मार्गे करायच्यात.


कोपरगाव ते औरंगाबाद प्रवास तिकीट २६ रूपये फ़क्त.



औरंगाबादला अण्णाकाकांकडे गेलो तर ती सगळी मंडळी पुण्याला गेलेलीत. पुन्हा रिक्षा करण्याइतपत पैसे आता जवळ होतेच. त्यामुळे मग गारखेड्याला मावशी कडे गेलो. दोन्ही मावसभाऊ साधारण माझापेक्षा ५ एक वर्षांनी मोठे त्यामुळे समवयस्कच. त्यांना खरी खरी परिस्थिती सांगितली. मोठ्ठा हशा झाला आणि औरंगाबाद ते कराड प्रवासाच्या पैशाचा प्रश्न विरून गेला.

१३/०१/१९९१ : दुपारी औरंगाबादवरून निघालो. आता मात्र " इकॉनॉमी मोड " चा नाद सोडला होता. औरंगाबाद ते मनमाड आणि पुन्हा मनमाड - पुणे - कराड ह्या पॅसेंजर सलग नव्हत्या. मध्ये चांगली ८ - ८ तासांची गॅप होती. तो नाद सोडला आणि सरळ बसनेच निघालो.




औरंगाबाद ते पुणे जलद बसचे प्रवासभाडे ४६ रूपये फ़क्त. प्रवासाचा वेळ ५ तास ३० मिनीटे.


तिकीटांमागे लिहून ठेवण्याची ही मीच शोधून काढलेली पद्धत १९८३ पासूनची. तेव्हापासूनची सगळी तिकीटे, आरक्षणे माझ्या अमूल्य संग्रहात आहेत.

पुण्यात नेहेमीप्रमाणे शिवाजीनगर ते स्वारगेट प्रवास आणि पुढे कराड करता प्रस्थान.





कराड ते पुणे जलद प्रवासभाडे २६ रूपये ७५ पैसे.



आज २५ वर्षांनी मी विचार करतोय या प्रवासाने मला काय दिल ? या प्रवासाने मला प्रवासातल्या पैशांच्या व्यवस्थापनाचा धडा दिला. नंतरच्या आयुष्यातही असे खूप वेगळ्या वळणावरचे आणि संपूर्णपणे स्वतः आखलेले प्रवास केलेत. ब-याचदा एकट्याने, ब-याचदा नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या सोबत. पण दरवेळी व्यवस्थापनाचा धडा पक्का होता. आज अनेकदा शिर्डीत जाणे होते. दरवेळी दर्शनही होते. आता बसचा प्रवास नाहीये. पण गाडीतूनही जाताना शिर्डी बस स्थानकासमोरून जाताना माझा मीच मला आठवत राहतो. हताशा, निराशेचा शिर्डी बस स्थानकावरचा तो तास मी विसरू शकत नाहीये. त्या तासाने मला खूप दिल. त्याच्याविषयी कृतज्ञता भरून येते. ते दिवस आठवून डोळे आपसूकच पाणावतात, ओलावतात. बायको विचारते " काही झालय का ? "

" काही नाही. गाडीच्या काचा लावून घे. ए.सी. सुरू करूयात. शिर्डीत हल्ली धूळ किती झालीय ? काही काही कण उगाच असे डोळ्यात जातात. " मी गाडीची काच वर सरकवत उत्तर देतो. डोळ्यात नव्हे तर मनात सतत खुपणारा आणि जाणीवेचा कणच हे माझ्यावतीने बोलतो.






20 comments:

  1. i like
    Mi pan karad te kolhapur ha pravas khup vela ektyane 5 aslyapason san 2000 pasoon kela tayveli karad kolhaur ha lahan rasta hota ata 4 padri zhala ahe
    tumchae pravas varnan vachun bhutkalatil athavan aali .

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आभार.

      Delete
  2. खूपच मस्त सर 👌💐

    ReplyDelete
  3. Ramraya tumche karadche blogs vaachun college che diwas athavtat.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आभार.

      Delete
  4. Farach surekh pravas varnan Ram !!!👌👌

    ReplyDelete
  5. Very Nice! 1991 and Shirdi! OM Sri Sri Satya Sai Baba!!!
    Ramakrishna

    ReplyDelete
  6. खूप छान.... राम, तू आमच्याकडे कधी आला होतास पुण्याला...?? बहुतेक तेव्हाच आला असशील...

    ReplyDelete
    Replies
    1. नाही दादा. मी तुमच्याकडे १९९० च्या संक्रांतीला आलेलो होतो.

      Delete
  7. राम, खुप मस्त वाटले सर्व वाचुन.....तुझा व्यासंग खुप मोठा आहे......
    तुला अध्यात्मिक प्रगती साठी शुभेच्छा....

    ReplyDelete