Monday, September 20, 2021

जनन मरण भय हरण करी परी

 {Disclaimer: नास्तिक, पुनर्जन्मावर, कर्मसिध्दांतावर विश्वास नसणार्यांनी मला माफ करावे. पोस्ट तुमच्यासाठी नाही रे बाबांनो.

संतकवी दासगणूंनी श्रीगजाननविजय ग्रंथात लिहील्याप्रमाणे
"ब्रम्हज्ञान सांगणे त्याला, ज्यासी अनुताप पूर्ण झाला,
उगीच तर्कटी वात्रटाला,
स्फोट त्याचा करू नये."
या सिध्दांतावर पहिल्यापासून चालतोय. तुमचे चार्वाक तत्वज्ञान (Eat drink and be merry, ऋणम कृत्वा घृतम पिबेत वगैरे) तुमच्याजवळ सुरक्षित असू द्यात.}
घरी बाप्पा आले की त्या दहा दिवसात,
शारदीय नवरात्रातल्या नऊ दिवसात आणि
चैत्र नवरात्रातल्या नऊ दिवसात घरच्या सायंकालीन नित्योपासनेनंतर भजनाची पाच पदे म्हणायची असा आम्ही दंडक घातला आणि गेल्या ३ वर्षांपासून तो पाळल्याही जातोय. कधी कुणी अभ्यागत / अतिथी सोबत असले तर असले नाहीतर आम्ही तिघेही मोठ्या आनंदाने ही भजनसेवा परमेश्वरासमोर सादर करतोच.
आमच्या गुरूमहाराजांकडे गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळाहून दर गुरूवारी भजनाची अखंडित परंपरा आहे त्यामुळे अक्षरशः शेकडो भजने उपलब्ध आहेत. त्यातली बहुतांशी पाठही झालेली आहेत.
आज त्यातल्याच एका भजनाच्या ओळीवर मनात चिंतन सुरू झाले. ती ओळ होती,
"जनन मरण भय हरण करी परी, चरणी शरण दृढ केशव किंकर"
आपल्या सर्वांनाच या जीवनात मरणभय असतेच. मृत्यु कधी येईल ? कुठे येईल ? कसा येईल ? या भितीतच आपण जगत असतो पण इथे संतांना जननभय असल्याचे जाणवते.
खोलवर विचार केला तर हे जननभय मृत्युभयापेक्षा जास्त भीषण आहे असे आपल्या लक्षात येईल. ८४ लक्ष योनींमधून फिरून आल्यानंतर आज आपल्याला मानवजन्म प्राप्त झालाय, उत्तम संस्कारमय घरात जन्म झालाय, कुटुंब, मित्रमैत्रिणी, सखेसोबती उत्तम मिळालेत पण हे सगळे पुढल्या जन्मी असेच मिळेल ? याची खात्री काय ? या जन्मातल्या चांगल्या वाईट कर्मांचा भार पुढल्या जन्मी वहावा लागला आणि पुढला जन्म सध्यापेक्षाही चांगला किंवा वाईट मिळाला तरी पुढल्या जन्मी बुध्दी सात्विक, ईश्वरपरायणच असेल याची खात्री ती काय ?
संतांना वाटणारी ती ही "जननभीती" म्हणूनच संतांनी या जन्मानंतरच "पांडुरंगा, तुझ्या चरणांशी अक्षय्य जागा दे." अशी एकच मागणी केलीय.
आपण पुराणांकडे पाहिले तर राक्षसांना कायम मरणभीती आहे. म्हणून मरणापासून वाचण्यासाठी त्यांनी विविध देवांकडून मृत्यु टाळण्यासंबंधी विविध वर मागून घेतलेले आढळतात.
तर संतांना, याच्या अगदी उलट, पुढल्या जन्माचीच भीती. म्हणून या जन्मातच त्यांनी परिपूर्णता गाठून अक्षय्य भगवंताचाच कायमचा आश्रय घेतलेला दिसतो. "पुनरपि संसारा येणे नाही" ही संतांची भूमिका.
भजनांमधले साधे साधे शब्दही चिंतनीय असतात आणि शांत चित्ताने त्यात डोकावलोत तर त्यांच्या गर्भातला अर्थही आपल्याला कळतो याचे प्रत्यंतर.
- राम प्रकाश किन्हीकर

No comments:

Post a Comment