Wednesday, October 25, 2023

प्रवाशांच्या सेवेसाठी की अडवणुकीसाठी ?

 चला सणासुदीचे दिवस आलेत. प्रवाशांच्या गर्दीचे दिवस आलेत. आपापल्या आप्तजनांना भेटण्यासाठी लांबवरचे प्रवास करून आपापल्या घरट्यात परतणा-या पिल्लांचे दिवस आलेत.


त्याचबरोबर नेमके हेच दिवस साधून मध्य रेल्वेच्या पुणे ते नागपूर मार्गावर काही ना काही कारणांनी रेल्वे यार्डांचे रिमॉडेलिंग, मार्गाचे नूतनीकरण, रूट रिले इंटरलॉकिंग इत्यादी तांत्रिक कारणे सांगून या मार्गावरील रेल्वेगाड्या ऐन गर्दीच्या वेळी रद्द करून प्रवाशांना खाजगी बसेसची अव्वाच्या सव्वा भावाची तिकीटे काढण्यास भाग पाडण्याचेही दिवस आलेत. गेल्या तीन चार वर्षांपासून मी हा प्रकार नियमितपणे होताना बघतोय. यामागे काही अर्थपूर्ण हितसंबंध, साटेलोटे नसतीलच याची कुणीही खात्री देऊ शकत नाही.


त्यात आपली महाराष्ट्र एस. टी. नियोजनशून्य. नागपूर ते पुणे मार्गावर नवीन आलेल्या स्लीपर बसेस सुरू केल्यात ख-या पण आपला 1970 च्या दशकातला खाक्या काही एस. टी. ने सोडला नाही. या बसेस नागपूर ते पुणे या प्रवासासाठी तब्बल 16 तास घेत आहेत. नागपूरवरून निघाली की कोंढाळी - तळेगाव - अमरावती - मूर्तिजापूर - अकोला - खामगाव - चिखली - जालना - छत्रपती संभाजीनगर - देवी अहिल्यानगर हे सगळे थांबे घेत घेत या बसेस पुण्याला पोहोचणार. दर थांब्यावर बस थांबली की प्रवाशांची चढ उतार होणार, बसच्या आतल्या भागातले दिवे लागणार, प्रवाशांची झोपमोड होणार. हे दर तासातासाला. कोण कशाला या बसेसना पसंती देतोय ?


आपलेच नियोजन, आपलीच संसाधने यांना मध्यवर्ती ठेऊन नियोजन करण्याचे दिवस आता संपलेत हे ज्या दिवशी एस. टी. च्या ध्यानात येईल, त्या दिवसापासून एस. टी. चा तोटा कमी व्हायला सुरूवात होईल. आता प्रवाशांची गरज मध्यवर्ती ठेऊन नियोजन व्हायला हवेय. मला वाटते 2017 च्या दिवाळीत एस. टी. ने नागपूर ते पुणे या मार्गावर "दुरांतो" बससेवा सुरू केली होती. नागपूरवरून निघाल्यानंतर फ़क्त अमरावती बायपास इथले प्रवासी घेऊन ती बस खाजगी बसेससारखी कुठेही न थांबता थेट छत्रपती संभाजीनगर आणि देवी अहिल्यानगर इथले थांबे घेत पुण्याला 14 तासात पोहोचायची. या बसेसना दिवाळीत दोन्ही बाजूंनी तुफ़ान प्रतिसाद मिळाला होता.


यावर्षीही एस. टी. ने आपल्या नवीन स्लीपर बसेसबाबत हा प्रयोग करून पहायला हरकत नाही. नागपूरवरून निघाल्यानंतर समृद्धी महामार्गाने फ़क्त वर्धा (येळाकेळी टोल, इंटरचेंज क्रं 4), अमरावती / यवतमाळ (नांदगाव खंडेश्वर टोल, इंटरचेंज क्रं 7), इथे थांबून प्रवासी घेऊन सहा तासात जालना, सात - साडेसात तासात छत्रपती संभाजीनगर, साडेनऊ तासात देवी अहिल्यानगर करीत बारा ते साडेबारा तासात पुण्याला पोहोचणारी सेवा एस. टी. ने दिवाळीत दिली तर ती हाऊसफ़ुल्ल जाईल. वर्धेपासून येळाकेळी टोल (इंटरचेंज क्र. 4 पर्यंत) आणि यवतमाळ / अमरावती पासून नांदगाव खंडेश्वर टोल (इंटरचेंज क्र. 7 पर्यंत) एस. टी. ने प्रवाशांची ने आण करण्यासाठी या बसेसच्या वेळेवर जर आपली फ़ीडर बस सर्व्हिस पाठवली तर वर्धा, अमरावती / यवतमाळ इथल्या प्रवाशांनाही हा प्रवास सुखकर होईल. आज सगळी नवीन संसाधने उपलब्ध आहेत पण "योजकस्तत्र दुर्लभः" हे विधान एस. टी. च्या बाबतीत प्रकर्षाने अनुभवायला येतेय हे ही खरेच. 


ओ यष्टीवाले. करा रे हा नवीन प्रयोग. आणि ओ रेल्वेवाले. या तरी दिवाळीत अशी दुष्काळी कामे काढून प्रवाशांची गैरसोय करू नका.


- प्रवाशांच्या हिताची कायम काळजी असलेला रेल्वे आणि बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


यासंबंधीचा माझा व्लॉग इथे 

No comments:

Post a Comment