आज संध्याकाळी घरी परतताना थोडासा रिमझिम पाऊस पडत होता. गाडीत नेमका "गारवा" अल्बम लागलेला होता.
मराठी गाण्यांमध्ये मी पुण्याची गाणी आणि मुंबईची गाणी असे दोन प्रकार मानत आलेलो आहे. शब्दप्रधान गायकीची, मोजक्याच वाद्यवृंदासह घनगंभीर गायलेली गाणी पुण्याच्या (गायक / वादक / गीतकार) संचातली असतात.
तर सुंदर वाद्यवृंदात, शब्दांना हवे तितकेच महत्व देऊन केलेली मेलोडियस गाणी ही मुंबईच्या (गायक / वादक / गीतकार) संचातली असतात हे माझे निरीक्षण आहे.
अचानक मला पुण्यावरून कराडचा प्रवास एस. टी. ने करणारा द्वितीय किंवा तृतीय वर्ष अभियांत्रिकीतला राम दिसायला लागला. सातारा बसस्टॅण्ड साधारण दुपारी ३.०० - ३.३० ला सोडलेले. सातार्याची खिंड ओलांडून त्यावेळेसच्या NH 4 ने बस कराडच्या दिशेने धावतेय. वातावरणात मळभ दाटून आलेले. दूरवरचा साखर कारखाना आणि तिकडे ऊस घेऊन जाणार्या ट्रॅक्टर्सची, बैलगाड्यांची रांग दिसतेय. उद्यापासून पुन्हा काॅलेज, सबमिशन्स, अभ्यास याचे रहाटगाडगे सुरू होणार या जाणीवेने मन हळुहळू कातर होत चाललेय. उंब्रज बसस्थानकावरून बस कराडकडे निघाली की चाफळ फाट्याकडे बघून बसमधूनच त्या दिशेला हात जोडत, "रामराया, सांभाळून घे रे बाबा. सीतामाई, लक्ष राहू दे गं बाई. लक्ष्मणा, वेळीप्रसंगी धावून ये रे बाबा."
"हनुमंता, सदैव सोबत रहा रे मित्रा. रामदासस्वामी महाराज, आशीर्वाद कायम पाठीशी असू द्यात." अशी अत्यंत करूणायुक्त भावनेने या सगळ्यांना घातलेली साद आठवते.
काहीकाही स्वर, काहीकाही दिवसवेळा अशा असतात की अगदी बालपणीचा कुहीकर वाडा आठवतो. त्या वाड्यातल्या दोन खोलींच्या २२५ स्केअर फूटच्या घरातली हिवाळी दुपार आठवते. आईच्या कुशीत, कधी तिच्या मांडीवर डोके ठेऊन गोधडी पांघरून पसरलोय. आई काहीतरी बोलतेय, कधी तिच्याविषयी, कधी तिच्या आपल्याबद्दलच्या स्वप्नांविषयी, कधी एखादी गोष्ट सांगतेय तर कधी संत गजानन प्रार्थना स्तोत्र पुटपुटतेय. त्या ग्लानीतच झोप लागतेय.
ते सुख, तो आनंद पुन्हा भोगावासा वाटण्यासाठी यानंतर किती जन्म घ्यावे लागतील ? हे सांगता येणार नाही. या जन्मात तर आता आईच्या मांडीवर झोपायला आता आई नाही, कुहीकरांचा वाडाही नाही आणि आता ते बालपणही नाही.
कुठल्या क्षणी कुठल्या एखाद्या वासामुळे, स्वरामुळे, वातावरणामुळे मन किती आणि कुठे जाईल ? किती भूतकाळात जाईल ? किती भविष्यात घेऊन जाईल ? काहीच सांगता येत नाही. मन तिथेच रमून जाते.
गाडीच्या टायर्सना, एंजिनला नेहेमीची सवय झाली आहे म्हणून गाडी सुखरूप घरी घेऊन आली एव्हढेच. बाकी आज मन भलतीकडेच होते. हात यांत्रिकपणे स्टिअरींगवर, गियर नाॅबवर आणि पाय सरावाप्रमाणे ब्रेकवर, अॅक्सीलेरेटरवर चालत होते, बस्स.
- मनाला जेवढे ताब्यात ठेवण्याचा जेवढा अट्टाहासाने प्रयत्न करू तेवढे मन नाठाळ घोड्याप्रमाणे उधळते हे जाणणारा (आणि त्याचबरोबर कधीकधी कसलाही प्रयत्न न करता मन इतके नितळ तळ्यासारखे होते की मनाच्या खोलखोल तळ्यात आपण आरपार बघू शकतो, त्याचा अंदाज घेऊ शकतो हा अनुभव घेणारा) सर्वसामान्य माणूस प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment