Tuesday, May 6, 2025

नामस्मरण: अचानक स्फ़ुरलेले काही विचार

श्रीमद्भगवतगीतेच्या दहाव्या अध्यायात प्रत्यक्ष भगवंताने त्याच्या स्वतःच्या विभूती सांगून ठेवल्या आहेत.

त्यात " यज्ञानाम जपयज्ञोस्मि " असे सांगितलेले आहे.


कलियुगात साधली जाणारी एकमेव साधना म्हणजे भगवंताचा जप. भगवंताने हेच सांगितले, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांसकट सगळ्या संतांनीही हेच सांगितले. " मय्येव मन आधस्त्व, मयी बुध्दीम निवेशय " ( हे साधका, तू तुझे मन, तुझी बुध्दी माझ्याकडे लाव ) इतकी या सगळ्या संत विभूतींची साधी अपेक्षा.


किती कमी साधनात, किती कमी श्रमात ही साधना होते हो. फक्त मन हेच त्याचे साधन. बरे त्याला फार नियम वगैरेंचे बंधनही नाही. अगदी हाॅस्पिटलच्या बेडवर असतानाही मन जागृत असेपर्यंत ही साधना करता येईल की नाही ?


आज अनेक सद्भक्त मंडळीही हे सोपे साधन करता करता त्या साधनाच्या आनुषंगिक बाबींच्या चर्चेत अडकलेले पाहिले म्हणजे खरोखर वाईट वाटते. जप करायला आसन कुठले घ्यावे ? माळ तुळशीची की स्फटिकाची ? जप करताना तोंड कुठल्या दिशेला करावे ? या सगळ्यातच अडकून आपण मूळ साध्यापासून तर दूर जात नाहीये ना याचा विचार खर्‍या पारमार्थिक व्यक्तींनी करायला हवा असे मनापासून वाटते.


या संदर्भात परम पूजनीय ब्रम्हचैतन्य महाराजांचेच एक वाक्य आहे. 


" साखर कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते. उभ्याने, बसून, झोपून  कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते. " हे नामाबद्दल चिकित्सा करणार्‍या साधकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.


मन एकाग्र झाल्यावर नाम घ्यावे ? की नाम घेता घेता मन एकाग्र होईल ? या चिकित्सेत फार न पडता फक्त नाम घेत जावे. 


" नकळत पद अग्निवरी पडे,

न करी दाह असे कधीही न घडे,

अजित नाम घडो भलत्या मिसे,

सकल पातक भस्म करितसे." 

हा श्लोक लक्षात ठेवावा आणि आपली जपसाधना अचल अविरत करीत जावी. 


- अचानक अंतःप्रेरणेने सुचलेले सर्वांपर्यंत सहज पोहोचवणारा साधक, वैभवीराम प्रकाश किन्हीकर




No comments:

Post a Comment