संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी बसेसचे पेव साधारण १९९१-१९९२ पासून फुटले. माझ्या लाडक्या चंद्रपूर शहरातूनही याच सुमारास नागपूरसाठी खाजगी बससेवा सुरू झाली.
सुरूवातीला फक्त चंद्रपूर - नागपूर, चंद्रपूर - गडचिरोली आणि चंद्रपूर - ब्रह्मपुरी या मार्गांवर असलेल्या सेवा काही कालावधीने चंद्रपूर - छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर - पुणे अशा विस्तारित झाल्यात.
२ बाय २ विना वातानुकूल आसनी - २ बाय २ वातानुकूल आसनी ते २ बाय १ वातानुकूल शयनयान इथपर्यंत बसेसचा दर्जा वाढत गेला.
फक्त एकच खंत आहे ती म्हणजे चंद्रपूरच्या पावन भूमीवर व्हाॅल्वो बसची चाके कधी धावलीच नाहीत. नाही म्हणायला गणराज ट्रॅव्हल्सने मधल्या काळात १५ मीटरची लांबचलांब मर्सिडीज बस चंद्रपूर - नागपूर मार्गावर चालवून पाहिली. एस. टी. ने ही चंद्रपूर - नागपूर - पुणे ही मल्टीअॅक्सल स्कॅनिया (ब्रँडनेमः अश्वमेध) चालवली. (आणि या आतबट्ट्याच्या व्यवहारात चांगलेच हात पोळून घेतले होते) पण चंद्रपूरमधल्या एकाही ट्रॅव्हल्सवाल्याला किंवा चंद्रपूरपर्यंत सेवा देणार्या महाराष्ट्रातल्या एकाही ट्रॅव्हलवाल्याला चंद्रपूर मार्गावर व्हाॅल्वो बस धाडावी असे वाटले नाही. असे का ? हा मला कायम छळणारा प्रश्न आहे.
- नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकात जगभरातल्या अनेक बसेस जरी भारतात अवतरल्यात तरी व्हाॅल्वो ती व्हाॅल्वोच या प्रांजळ मताचा, चंद्रपूरप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
No comments:
Post a Comment