Showing posts with label चैत्र पौर्णिमा. Show all posts
Showing posts with label चैत्र पौर्णिमा. Show all posts

Sunday, April 13, 2025

चैत्र पौर्णिमेची एक आठवण: कायम काळजात रुतून बसलेली

मी बालपणापासूनच खूप नातेवाईकांशी, मित्रांशी अगदी नियमित पत्रसंवाद साधलेला आहे. आणि मलाही तितकीच पत्रे अनेक नातेवाईक आणि मित्रांकडून प्राप्त झालेली आहेत. मला आलेली सगळी पत्रे मी अगदी जतन करून ठेवलेली आहेत कारण त्यातले काही काही नातेवाईक असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात अवघी दोन तीन पत्रे लिहीली असतील त्यातले एक पत्र मला आलेले आहे. 


मी आणि माझ्या प्रिय पत्नीचे लग्न फ़ेब्रुवारी २००० मध्ये ठरले, मार्च २००० मध्ये साक्षगंध साखरपुडा विधी झाला आणि लग्न मात्र डिसेंबर  मध्ये झाले. त्या ८-९ महिन्यांच्या प्रियाराधनाच्या काळात मी माझ्या वाग्दत्त वधूला आठवड्यातून तीन अशी पत्रे पाठवलीत. तिनेही तितक्याच उत्कटतेने तेव्हढीच उत्तरे मला लिहीलीत. मी पाठवलेल्या पत्रांची तिने एक फ़ाईलच करून ठेवली होती तर तिने पाठवलेली एकूण एक पत्रे मी जतन करून ठेवली होती.



लग्नानंतर मग आम्ही माझे पत्र त्यावर तिचे उत्तर अशी ती सगळी पत्रे पुन्हा लावून जपून ठेवलीत. तो काळच वेगळा होता. 


चैत्र पौर्णिमेला सौ. वैभवीच्या माहेरी कुळाचार असतो. मला अत्यंत आवडते म्हणून तिने पुरणपोळी आणि वडाभात याच दिवशी शिकून घरचा कुळाचार केलेला होता. बरोबर २५ वर्षांपूर्वी. तिने पाठवलेले ते पत्र आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याची एखादी गोष्ट शिकून घेण्याची तिची मनिषा ही माझ्या काळजात खोल रूतून बसलेली आहे. दरवर्षीची चैत्र पौर्णिमा माझ्या अशीच, ह्याच आठवणीत लक्षात राहते.




एका संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी जन्मभराचेच नव्हे तर अनंत जन्मांच्या पलिकडले नाते असेच जोडले जात असेल का ?


- सौ. वैभवीच्या सहवासात असताना "अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी" या वृतीने जगत असलेला, संपूर्ण वैभवीमय झालेला प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



सजणा पुन्हा स्मरशील ना