Tuesday, August 30, 2022

देवाचिये द्वारी - ५२

 


जयास वाटे सुखाचि असावे I तेणे रघुनाथ भजनी लागावे I

स्वजन सकलहि त्यागावे I दुःखमूळ जे II

 

विषयजनित जे जे सुख I तेथेचि होते परमदुःख I

पूर्वी गोड अंती शोक I नेमस्त आहे II

 

गळ गिळिता सुख वाटे I वोढून घेता घसा फ़ाटे I

का ते बापुडे मृग आपटे I चारा घेऊन पळता II

 

तैसी विषये सुखाची गोडी I गोड वाटे परी ते कुडी I

म्हणौनिया आवडी I रघुनाथी धरावी II

 

 

इंद्रियगम्य सुखाच्या अनुभवामागे जे जे प्राणी लागले त्यांची त्यांची अवस्था गळाला लागलेल्या माशासारखी होते म्हणून ऐंद्रियजन्य सुखामागे न धावता जे प्रभू श्रीराम हे अविनाशी तत्व आहे त्याची कांक्षा सर्वसामान्य मनुष्यमात्रांनी करावी हे कळकळीचे प्रतिपादन श्रीसमर्थ करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध तृतीया, हरितालिका, शके १९४४ , दिनांक ३०/०८/२०२२)


No comments:

Post a Comment