Tuesday, August 23, 2022

देवाचिये द्वारी - ४५

 


विरक्ते विवेके असावे I विरक्ते अध्यात्म वाढवावे I

विरक्ते धारिष्ट धरावे I दमन विषई II

 

विरक्ते राखावे साधन I विरक्ते लावावे भजन I

विरक्ते विशेष ब्रम्हज्ञान I प्रगटवावे II

 

विरक्ते भक्ती वाढवावी I विरक्ते शांति दाखवावी I

विरक्ते येत्ने करावी I विरक्ती आपुली  II

 

विरक्ते सदक्रिया प्रतिष्ठावी I विरक्ते निवृत्ती विस्तारावी I

विरक्ते नैराशता धरावी I सदृढ जिवेसी II

 ग्रंथराज श्रीमत दासबोधाच्या दुस-या दशकाच्या विरक्तलक्षण नावाच्या नवव्या समासात श्रीसमर्थ समाजातल्या विरक्त पुरूषाचे लक्षण निवेदन करत आहेत. जो विरक्त आहे त्याने विवेक धरून अध्यात्म वाढवावे, अध्यात्माचे जे साधन त्याला कळले ते समाजात वाढेल अशी कृती करावी, समाजाला भजनाकडे प्रवृत्त करावे, चांगल्या कर्माकडे समाजाचा कल वाढेल असे प्रयत्न करावेत आणि समाजमनाला शांतीचा दाखला आपल्या आचरणातून द्यावा. मनुष्यमात्रांच्या स्वाभाविक वृत्तीपाठीमागे न जाता त्याउलट भगवंताकडे जाण्याची निवृत्ती विरक्त मनुष्याने प्रतिपादन करावी अशी अपेक्षा श्रीसमर्थ विरक्तांकडून करत आहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण एकादशी, शके १९४४ , दिनांक २३/०८/२०२२)


No comments:

Post a Comment