Saturday, January 17, 2026

नामयाचा जो जिव्हार

सकाळी उठलो आणि फ़ोनमध्ये युट्यूब उघडले. आज सकाळी सकाळी आवरताना, स्वयंपाक करताना, अभिषेकी बुवांचा शिवमत भैरव ऐकण्याची खूप मनापासून इच्छा झाली होती. "जितेंद्र अभिषेकी" हे नाव युट्यूब च्या शोध सदरात टाइप केले आणि अभिषेकी बुवांनीच गायलेला एक परिचित अभंग पहिल्या नंबरवर दिसला. मग तोच लावला. म्हटलं शिवमत भैरव यानंतर ऐकूयात. सकाळ छान सुरू झाली आणि मनात दिवसभरासाठी विचारचक्रही सुरू झाले.


संत जनाबाईंचा "संत भार पंढरीत" हा अभंग होता. आजवर अक्षरशः शेकडो वेळा ऐकलेला हा अभंग अभिषेकी बुवांनी छानच गायलाय. आणि अभिषेकी बुवांइतकाच छान आजच्या तरूण मंडळींपैकी केतकी माटेगावकरने पण गायलाय. सुंदर ठेहराव घेत, नजाकतीने, त्यातल्या जागा समजून. माझ्या प्ले लिस्ट मध्ये केतकीने गायलेला पण अभंग आहे. काहीकाही सूर दरवेळी ऐकताना मनाला हळवे करतात, डोळ्यात पाणी तरळवतात.


पण आज त्यातले शब्द वेगळ्याच अर्थाने खुणावू लागलेत. "सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार" या शब्दांनी दिवसभर मनात पिंगा घातला होता. संत जनाबाई ह्या त्याकाळात संत नामदेवांच्या घरी वाढलेली संत नामदेव महाराजांच्या कुटुंबातील एक दासी. आजच्या युगाच्या भाषेत सांगायचे तर गृह मदतनीस सखी. संत नामदेवांच्या घरी त्याकाळी त्यांचे सगळेच कुटुंबिय अभंग रचनेत आणि ईश्वरभक्तीत रममाण झालेले होते. त्याचाच परिणाम त्यांच्या या दासीवर झाला असण्याची शक्यता आहे. संत नामदेवांच्या सहवासात विचारांना पक्की बैठक लाभलेल्या आणि ईश्वराप्रती पूर्ण समर्पण पावलेल्या संत जनाबाईंनी फ़ार सुंदर शब्द या अभंगात लिहीलेत. "सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार" 


संत नामदेव महाराजांनी सर्व संतांची माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांना आपला सखा मानले होते आणि त्यांना ते आपला जिव्हार मानत असत असा एक लौकिकार्थ या अभंगातून संत जनाबाईंना मांडायचा आहे. जिव्हार या शब्दाचा एक अर्थ "जिवलग मित्र, आत्मा, प्रिय सखा" असाही होतो आणि आपण सर्वसामान्य मंडळी जिव्हार हा शब्द "हृदय" या अर्थाने सुद्धा वापरतो. एखादी गोष्ट "जिव्हारी लागणे" म्हणजे ती गोष्ट हृदयात खोचली जाणे, अगदी नेहेमीसाठी त्या गोष्टीचे स्मरण होणे या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. जिव्हार या शब्दाचा आपल्या वापरातला आणखी एक अर्थ म्हणजे आपले मर्मस्थळ.


संत ज्ञानेश्वर माऊली या सकल मराठी माणसांचे मर्मस्थळ आहेत मग ते त्यांचे शिष्य असलेल्या संत नामदेवांचे मर्मस्थळ असल्यात म्हणून नवल ते काय ? मग मनात विचार येऊन गेला की आपणही आपल्या अगदी सुहृद नातेवाईकांमध्ये, अतिशय जवळच्या मित्रमंडळींमध्ये त्यांचा त्यांचा जिव्हार होऊ शकू का ? इतकी आत्मीयता, प्रेम आपण आपल्या जवळच्या मंडळींमध्ये आपल्या वागण्या बोलण्याने आणि प्रेमळ निःस्वार्थ वृत्तीने निर्माण करू शकू का ? आणि असे जर आपण जगात वागत गेलोत तर "किंबहुना सर्वसुखी" या माऊलींनीच दाखविलेल्या आनंदाप्रत आपण सहज पोहोचू शकू, नाही का ? 


"सगळ्या मोठ्या गोष्टी या अत्यंत साध्याच असतात" असे एका पाश्चात्य विचारवंताचे मत आहे. त्या इतक्या साध्या असतात की सर्वसामान्य माणसांचा सुरूवातीला त्यावर "छे ! छे ! एव्हढी मोठी गोष्ट इतकी साधी कशी असू शकेल ?" असा अविश्वास असतो. तसेच आपण आपल्या सुहृद नातेवाईकांचा आणि जवळच्या मित्रमंडळींचा जिव्हार बनण्य़ाच्या प्रक्रियेचे आहे. त्या प्रक्रियेची मूलतत्वे फ़ार साधी आहेत आणि ती आपल्याला आपल्या प्रेमळ, निःस्वार्थ वागण्या बोलण्यातून रूजवत जायची आहेत हे इतके सोपे आहे. एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांचा तरी जिव्हार आजवर बनलोय का ? किंवा भविष्यात बनू शकतो का ? या प्रश्नाच्या धांडोळ्यात आणि त्यासाठी आपली वागणूक कशी असावी ? हे नियोजन करण्यात आजचा दिवस छान गेला.


"जिव्हार" या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे आपली जीभ. "ज्ञानोबामाऊली म्हणजे्च माझी वाणी आहेत, माझ्या सर्व अभंगांची प्रेरणा आहे "या अर्थाने तर संत नामदेवांना ज्ञानोबामाऊलींचा उल्लेख या अभंगात करायचा नव्हता ना ? हे शोधण्यात संध्याकाळ दरवळून गेली. यापूर्वी शेकडो वेळा ऐकलेल्या आणि सकाळपासून मनात रूंजी घालत असलेल्या या अभंगाने मनात अर्थाची निरनिराळी वलये निर्माण केलीत, मन अधिक सात्विकतेकडे ओढले, अधिक ईश्वरप्रवण केले हे मात्र नक्की.


- अनेक जन्म घेऊन संतांच्या चरणाची केवळ धूळ होण्याची तरी पात्रता लाभावी या प्रामाणिक आकांक्षेचा एक साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१७ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Friday, January 16, 2026

भारतीय रेल्वेचा लतेरेपणा भाग - ५ (गरीब रथ एक्सप्रेस)

भारतीय रेल्वेत सगळ्यात लतेरे आणि आपलीच मनमानी करणा-या रेल्वेमंत्र्यांची यादी करायची असेल तर लालू यादव या इसमाचे नाव अग्रगण्य ठरेल. त्यापाठोपाठ ममता बॅनर्जी आणि सी के जाफ़र ’शरीफ़’ (?) आणि नितीशकुमार यांचा्ही नंबर लागेल. पण लालूचा लतेरेपणाच्या बाबतीतला स्वॅग काही वेगळ्याच लेव्हलचा होता.


२००६ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात लालूने गरीब रथ ही संकल्पना मांडली आणि ४ ऑक्टोबर २००६ रोजी पहिली गरीब रथ एक्सप्रेस ही पंजाबमधल्या अमृतसर शहरातून बिहारमधल्या सहरसा या शहरासाठी रवाना झाली. खरेतर ही कल्पना मोठी उदात्त होती. कष्टकरी, श्रमकरी वर्गाला परवडणारा वातानुकूलित प्रवास उपलब्ध व्हावा, आपल्या जन्मभूमीवरून कर्मभूमीपर्यंत लांबच्या प्रवासात त्यांना परवडणा-या दरात आरामदायक प्रवास करता यावा म्हणून संपूर्ण वातानुकुलित पण प्रवासभाडे विना वातानुकूल शयनयान दर्जापेक्षा थोडेसेच जास्त असणारी ही गाडी लालूने भारतीय रेल्वेत आणली. 


पहिल्या गरीब रथ एक्सप्रेससाठी पंजाबमधल्या कपूरथळा रेल्वे कारखान्याला विशेष प्रकारचे कोचेस बनविण्याची ऑर्डर देण्यात आली. पहिल्या गरीब रथ एक्सप्रेससाठी असलेले कोचेस हे त्या काळातील भारतीय रेल्वेच्या कोचेसच्याच रंगसंगतीतले म्हणजे काळपट लाल रंगातले होते. नंतर मग त्यांना हिरवा आणि पिवळा रंगाचा पट्टा अशी रंगसंगती प्राप्त झाली. तेव्हा एक वेगळा प्रयोग म्हणून या रंगसंगतीकडे बघितले गेले. पण नंतर इंटरनेट सर्वत्र आणि सुलभपणे उपलब्ध झाल्यानंतर या रंगसंगतीमागे असलेले लालूचे पाकिस्तान प्रेम उघड झाले. पाकिस्तान रेल्वेची सुद्धा नेमकी हीच रंगसंगती आहे. म्हणजे या समाजवाद्यांची थेरं कुठल्या टोकाला जाऊ शकतात ? हे एका साध्या उदाहरणावरून कळून येते.




भारतात बहुतेक सर्व महत्वाच्या आणि गर्दीच्या मार्गांवर गरीब रथ रेल्वे सुरू झाली त्यामुळे लवकरच ही सेवा लोकप्रिय झाली. या सेवेसाठी कपूरथळा येथला रेल्वे कारखाना विशेष प्रकारचे कोचेस बनवायचा. त्यापूर्वी वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात प्रत्येकी ८ शायिका (बर्थस) असलेले ८ कक्ष (bays) असायचेत. म्हणजे वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात एकूण ६४ शायिका असायच्यात. गरीब रथच्या कोचेसमध्ये समोरासमोरील दोन बर्थसमधली जागा थोडी कमी करून असे ९ पूर्ण आणि १ अर्धा असे कक्ष होते. म्हणजे वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयानातील ६४ शायिकांऐवजी गरीब रथ मध्ये एका कोचमध्ये ७२ अधिक ३ अशा ७५ शायिका होत्या. साहजिकच समोरासमोर बसणा-या प्रवाशांना थोडी कमी लेगरूम मिळू लागली. पण तरीही प्रवाशांची त्याला हरकत नव्हती कारण असा कमी लेगरूममध्ये आखडून प्रवास करण्याचा वेळ हा ३ - ४ तास असायचा आणि त्यानंतर आपापल्या शायिकांवर आपली पथारी पसरून झोपी जाणे हाच कार्यक्रम असायचा. इतक्या परवडणा-या तिकीटांच्या किंमतीत असा वातानुकूल शयनयानातून प्रवास करायला मिळणे हा प्रवाशांच्या दृष्टीने आनंदोत्सव असायचा.


मला आठवतय नागपूर ते पुणे या प्रवासासाठी वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गाचे प्रवासभाडे साधारण ९५० ते ९७५ रूपये असायचे तेव्हा गरीब रथ मधील वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात फ़क्त ५८५ रूपयांत प्रवास करता यायचा. तेव्हा विना वातानुकूल शयनयान वर्गाचे भाडे ३७५ रूपये इतके होते. थोडेसेच रूपये जास्त देऊन वातानुकूल प्रवास इच्छिणा-यांसाठी हे थोडी कमी लेगरूम चालण्यासारखी होती. आणि गरीब रथ गाडीला इतर प्रिमीयम गाड्यांप्रमाणे मधले थांबे सुद्धा मर्यादितच होते त्यामुळे प्रवास हा जलद वेगाने होत असे.


पण लालूच्या अती लोभामुळे या प्रकाराला मधल्या काळात दृष्ट लागली. प्रत्येक कक्षात मुख्य बाजूला समोरासमोर प्रत्येकी ३ असे एकूण ६ आणि पॅसेजच्या बाजूला (गाडीच्या धावण्याच्या दिशेला समांतर) असे २ साईड बर्थस असे ८ बर्थस असायचेत. त्याऐवजी साईड बर्थसना पण मध्ये एक जादाचा बर्थ बसविण्याची आणि एका कक्षात एकूण ९ बर्थस बसविण्याची कल्पना लालूच्या डोक्यातून आली. मुख्य बर्थसमध्ये एकावर एक असे ३ बर्थस अशी रचना सहज राहू शकते पण साईड बर्थसना बोगीच्या वक्राकार छतामुळे आधीच हेडरूम कमी असते त्यात मध्ये हा तिसरा बर्थ म्हणजे अजिबातच हेडरूम मिळत नव्हती. (उदाहरणार्थ खालील चित्र बघा) आणि त्यातही त्या साईडच्या मधल्या प्रवाशाने दिवसाच्या वेळी प्रवास कुठल्या आसनावर बसून करायचा ? या प्रश्नाचे समर्पक उत्तर कुणाहीजवळ नव्हते. त्यामुळे बसण्यावरून प्रवाशांमध्ये भांडणे होऊ लागलीत. आधीच साईडच्या मधल्या बर्थ वर कमी हेडरूममुळे झोपून वैतागलेला प्रवासी बसायला स्वतःची निश्चित अशी जागा नसल्याने अधिकच वैतागू लागला. सर्वसामान्य लोकांनी आरामदायक वातानुकूल प्रवास करावा म्हणून सुरू केलेली सेवा सर्वसामान्य लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू लागली. केवळ त्रिस्तरीय वातानुकूल शयनयानातून प्रवास करण्याइतपत आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून ही साईड मिडल बर्थची पिळवणूक आपण सहन करतो आहे ही भावना सर्वसामान्य प्रवाशांमध्ये बळावू लागली.




लालूने मग हेच साईड मिडल बर्थ विना वातानुकूल शयनयान वर्गातही आणून तिथेही जादा प्रवासी नेण्यासाठी सर्व रेल्वे विभागांना निर्देश दिले. वर्षभरातच प्रवाशांच्या असंख्य तक्रारी रेल्वे विभागांकडे पोहोचल्यात आणि रेल्वेने ही साईड मिडल बर्थसची कर्मदरिद्री कल्पना सोडून दिली.






रेल्वेमंत्री म्हणून लालूची राजवट संपल्यानंतर नवीन गरीब रथ गाड्यांची घोषणा झाली नाही पण जुन्या गाड्या चालूच राहिल्यात. प्रवाशांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभल्यामुळे असेल कदाचित. आता गरीब रथ गाड्यांसाठी त्रिस्तरीय वातानुकूल शयनयानात इकॉनॉमी श्रेणीचे नवीन एल एच बी कोचेस आहेत त्या गरीब रथना लागायला लागल्यात. एल एच बी कोचेसमध्ये तसेही प्रत्येकी ८ बर्थस चे ९ कक्ष (bays) असतात. त्यामुळे या प्रकारच्या इकॉनॉमी कोचेसमध्ये असे १० मुख्य कक्ष (प्रत्येकी ६ बर्थसचे) आ्णि साईडचे ९ कक्ष (प्रत्येकी २ बर्थसचे) असे ७८ बर्थस आणि शेवटल्या कक्षात केवळ मुख्य ३ बर्थस अशी ८१ शायिकांची रचना असू लागली.


गरीब रथ मध्ये No Frills Service म्हणून वातानुकुलित शयनयान वर्गात रेल्वेकडून मिळणारे अंथरूण पांघरूण कधीही मिळत नसत. मधल्या काळात कोरोनानंतर जवळपास सर्वच वर्गांमध्ये ही व्यवस्था वैकल्पिक झाली आणि त्यामुळे केवळ गरीब रथ मध्येच ही सुविधा मिळत नाही हे सर्वसामान्यांचे वैषम्य थोडॆ कमी झाले असावे.


तर असा हा गरीब रथचा लालूच्या लालची स्वभावाचा आणि लतेरेपणाचा प्रवास. भारतीय लोकांची काटकसरी आणि Value for Money जोखून बघण्याची मनोवृत्ती यामुळे या गाडीला लोकाश्रय टिकलेला आहे. नाहीतर त्या त्या रेल्वेमंत्र्याची कारकीर्द संपल्यानंतर नव्या रेल्वेमंत्र्याने त्याच्या पूर्वसुरीने सुरू केलेल्या, पूर्वसुरीचे brain child असलेल्या गाड्यांना मारून टाकण्याच्या प्रयत्नात लालूची गरीब रथ टिकली हे आश्चर्यच म्हणावे लागेल. समाजवादी मंडळींच्या खूप उदात्त कल्पना सुरूवातीला मांडून "डोंगर पोखरके उंदीर निकाल्या" सारखे त्यातून काहीतरी इंटुक दाखवेगिरी करायची या भूमिकेतली ही गाडी. 


- गरीब रथ मधून प्रवास करताना साईड मिडल बर्थवर बसलेल्या प्रवाशांचे हाल आणि वैताग अगदी जवळून बघितलेला एक सर्वसामान्य प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१६ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Thursday, January 15, 2026

चिंतनक्षण - १०


 "परमार्थात दंभ आला की तो प्रपंचच झाला." - डॉ. सुहास पेठे काका


आपले जीवन अधिक उन्नत व्हावे ही सगळ्या मनुष्यमात्रांची इच्छा असते. आपले जीवन अधोगतीला जावे असे कुणालाही कधीच वाटत नाही. आणि वाटूही नये. उन्नतीकडे मन धावणे ही मनुष्यमात्रांची स्वाभाविक वृत्ती आहे.


जीवनात थोडे कडूगोड अनुभव घेतल्यानंतर मग आपल्या मनुष्यमात्रांच्या सर्वसामान्य आकलनाच्या पलिकडे एक शक्ती आहे आणि त्या शक्तीकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या तिच्या आराधनेने आपल्याला मिळू शकतात हे सुद्धा मनुष्यमात्रांना जाणवते. त्या शक्तीला ईश्वर, सदगुरू अशी अनेक नावे प्रत्येकजण आपापल्या अनुभवांती देतो आणि तिची उपासना करू लागतो.


उपासना करीत असताना त्या त्या मनुष्य मात्रांना निरनिराळे अनुभव येत असतात. हे अनुभव कधी आपल्या इंद्रियांना जाणवणारे असतात तर ते कधी इंद्रियांनी वर्णन करता न येण्याइतके परेंद्रिय असतात. त्या मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धी प्राप्त करून स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यात सुखानुभव प्राप्त होऊ शकतात हे सुद्धा त्या सिद्धीप्राप्त व्यक्तीच्या लक्षात येते. इथेच नेमका सांभाळण्याचा क्षण असतो.


आपण ही उपासना, ही साधना जर या जगातल्या गोष्टींसाठी सुरू केलेली असेल तर बरीच मंडळी या सिद्धीप्राप्तीनंतर थांबतात, सिद्धींना भुलतात, सिद्धीत गुंततात. जी ईश्वरी शक्ती आहे ती थोडी विचारी आहे. सगळ्यांनाच आपल्यापर्यंत पोहोचू न देता विविध टप्प्यांवर विविध परिक्षा पाहून, तावून सुलाखून निघालेल्या साधकांनाच केवळ आपल्या चरणाशी अक्षय्य प्रवेश देणारी आहे. म्हणून कवी म्हणतो


मुझे जो कराना था पथ पार

बिठाए उसपर भूत पिशाच्च

रचाए उसमे गहरे गर्न

और फ़िर करने आया जॉंच.


खरा साधक जर या सिद्धींना भुलला तर तो ती ईश्वरी शक्तीची परिक्षा नापास झाला असे समजले जाते. आपली उपासना, साधना ही या जगातल्या गोष्टींसाठी आहे ? की त्या सर्वशक्तीमान ईश्वरावरील प्रेमापोटी, त्याला जाणण्यापोटी आहे याचा विवेक सगळ्या साधकाने सदैव जागृत ठेवला पाहिजे. हा विवेक नसला की त्या साधकाचा सर्वसामान्य संसारी मनुष्य होतो. कितीही उंची गाठली तरी अंतिमतः परमार्थात त्याचे अधःपतनच होते. लौकिक आयुष्यातली सर्व सुखे त्याला व त्याच्या अनुयायांना मिळतात पण ज्या कार्यासाठी ही साधना आरंभिली होती ते कार्य मात्र अनेक जन्म दूर राहते.


परम आणि अर्थ हे दोन शब्द मिळून परमार्थ हा शब्द तयार होतो. परम म्हणजे सर्वोच्च आणि अर्थ म्हणजे प्राप्त करून घेण्याची वस्तू. मनुष्य जीवनात प्राप्त करून घेण्याची सर्वोच्च वस्तू म्हणजे परमार्थ. पण इथेच भलेभले चुकतात. परम वस्तू ऐवजी सहज पुरूषार्थाने प्राप्त होणा-या गोष्टी अशा व्यक्ती निवडतात आणि आपल्याच जीवनाला धन्य मानतात. 


एका गुरू आणि शिष्याची अशीच एक बोधकथा आहे. तो शिष्य बरीच साधना करून पाण्यावरून चालत जाण्याची सिद्धी प्राप्त करतो आणि एकेदिवशी आपल्या गुरूजींना सांगतो "गुरूजी, आता तुम्हाला ही आपल्या आश्रमासमोरील नदी ओलांडून पैलतीरावर जाण्यासाठी या नावेक-यांची मनधरणी करण्याची, त्यांना त्यांच्या नावेतून प्रवासासाठी प्रवासमूल्य देण्याची गरज नाही. अनेक वर्षांच्या साधनेनंतर मी पाण्यावरून चालण्याची सिद्धी प्राप्त केलेली आहे. मी तुम्हाला अतिशय भक्तीभावाने माझ्या खांद्यावरून रोज पैलतीरी नेऊन सोडेन आणि परतही घेऊन येईन."


ते गुरूजी खिन्नपणे हसतात आणि म्हणतात. "अरे वत्सा. ज्या गोष्टीचे लौकिक मूल्य केवळ काही रूपये आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तू आपल्या आयुष्यातली काही वर्षे आणि इतकी मोठी साधना खर्ची घातलीस ? ही सिद्धी तर मला ब-याच वर्षांपासून येते. पण ती वापरून मी माझी साधना खर्ची घातली नाही."


शिष्य खजील होतो आणि परमार्थात आजवरच्या साधनेचा बॅलन्स शून्य झालाय हे मनी उमजून नव्याने साधनेला लागतो.


आपण हा परमार्थ मार्ग का निवडलाय ? आपल्याला यातून नक्की काय साधायचे आहे ? हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला अगदी प्रांजळपणे विचारावे. जर या जगातल्या लौकिक गोष्टींसाठी, सोयी सुविधांसाठी, क्षणैक प्रसिद्धीसाठी आपण हा मार्ग निवडला असेल तर आपण परमेश्वरप्राप्तीच्या आपल्या अंतिम ध्येयाला कधीही पोहोचू शकणार नाही हे नक्की लक्षात ठेवावे. हा सगळा दंभ आहे. आणि परमार्थात हा दंभ म्हणजे संसारच आहे. या अविवेकी मार्गाने आपल्याला पुढले अनेक जन्म घेत रहावे लागतील आणि त्यातही आपली साधना, आपला अक्षय्यपदाचा शोध सुरूच ठेवावा लागेल हे पक्के लक्षात ठेवावे.


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष वद्य द्वादशी शके १९४७ दिनांक १५ / १ / २०२६


१५ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Wednesday, January 14, 2026

सकारात्मक विचारसरणी : एक पुस्तक वाचण्याचा नव्हे तर जगून बघण्याचा एक भाग.

सोशल मिडीयावर राहून आणि सातत्याने लिखाण करून आता जवळपास १८ वर्षे झालीत. पहिल्यांदा ऑर्कुट, नंतर फ़ेसबुक आणि सोबतच ब्लॉगस्पॉटवर स्वतःचा ब्लॉग लिहीणे. सुरूवातीला ब्लॉग लिखाणाला प्रतिसाद फ़ार कमी होता पण चिकाटीने ४ - ५ वर्षे लेखन सुरू ठेवले. मग हळूहळू वाचकसंख्या वाढू लागली.


सगळ्याच सोशल मिडीयांवर समानशील व्यक्ती भेटल्यात. आपल्यासारखाच विचार करणारे, जीवन जगणारे दुसरे कुणीतरी आहे ही भावनाच आपला एकटेपणा दूर करून जीवन जगायला बळ देणारी असते. आपल्यासारखीच जीवनमूल्ये घेऊन जगणारी असंख्य मंडळी या जगात आहेत ही भावना जगातल्या आणि आपल्याही अंतरातल्या चांगुलपणावर विश्वास दृढ करणारी असते.


या सोशल मिडीयावर वावरताना काही पथ्ये पाळावीच लागतात. फ़ार जास्त एकांगी होऊन, मनस्वीपणे आपली मते प्रदर्शित करून, आपल्या मनातल्या वैयक्तिक रागाला तिथे मूर्त स्वरूप देऊन अजिबात चालत नाही. सगळ्याच वाचकांच्या जीवनात काही ना काही कटकटी, दुःखे, नकारात्मकता, अडचणी असतातच. त्यामुळे आपणही आपली दुःखे, कटकटी, नकारात्मकता तिथे मांडली तार वाचकांना "घरचे झाले थोडे आणि व्याहाने धाडले घोडे" अशी अवस्था होऊन जाते. म्हणून मी कटाक्षाने या गोष्टी तिथे टाळतो. कुणाचीतरी निर्वीष खिल्ली उडवणे, राजकारण्यांवर टीका टिप्पणी करणे हे चालते पण माझे बहुतांशी लेखन हे सकारात्मक असते. सुदैवाने मला लिहायला माझे छंद, माझा अवलीपणा, मला शिक्षण नोकरीदरम्यान आलेले असंख्य गंमतीदार अनुभव, माझे प्रवास असे अनेक विषय असतात. त्यामुळे मुद्दाम एखाद्या घटनेबाबत, व्यक्तिंबाबत नकारात्मक लिहावे असे काही नसते.


काही काही नियमित वाचकांकडून एक आश्चर्ययुक्त पृछा कायम येतेच. "सर, तुम्हाला सगळीकडेच कशा चांगल्या व्यक्ती भेटतात ? कधीतरी काही बदमाष, कटकट्या आणि अप्रामाणिक व्यक्ती भेटल्या असतीलच की." अशी विचारणा झाली की मग मनात विचार सुरू होतात आणि यानिमित्ताने आत्मपरिक्षण सुरू होते.


कावेबाज, बदमाष माणसे जगात सगळीकडे असतीलच. सुदैवाने माझ्या वाट्याला कमी आलीत. जी काही थोडी आली असतील त्यांचा लेखाजोखा मी पटकन पुसून टाकला. धडा शिकलो पण त्या घटना अगदी मनातून पुसून टाकल्यात. माझ्याबाबतीत झालेले अपमान, बदमाषी यांना मी मनात फ़ारसा थारा दिला नाही. त्यातून धडा शिकलो पण ती घटना मनाला चटका देत ठेवली नाही.

 

आता त्यातली एखादी घटना क्वचित आठवलीच तरी राग, चीड न येता, त्या माणसाविषयी कीव वाटते किंवा कुठल्या परिस्थितीत ती व्यक्ती अशी कावेबाज वागली असेल ? याचा मी अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो, सोडून देतो.


शिक्षकी पेशात पहिल्यापासून असल्याने कायम संपर्क तरूण मुलांशी, घडविण्याजोगा मातीच्या गोळ्यांशी, आला. ९९ % विद्यार्थी बाह्य जगाच्या दुनियादारीशी अपरिचित, निरागस असे असतात. आपल्या सकारात्मक वागण्याबोलण्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर कितपत होतोय ? याचे दरवर्षी नवनवे प्रयोग करताना स्वतःच्याच व्यक्तीमत्वात खूप सकारात्मकता येत गेली. बाह्य जगाच्या दृष्टीने भाबडा तर भाबडा, पण शिक्षक होण्याचे perks काय असतात ? हे मास्तरकी केल्याशिवाय कळत नाही. दरवर्षी तेच तेच विषय जरी शिकवायचे असलेत तरी दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळे असतात. त्यांची एकंदर बुद्धीमत्ता, त्यांची शिकण्याची पद्धती, त्यांचा कल आणि दरवर्षी बदलणारे तंत्रज्ञान या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून मग दरवर्षी आपल्या शिकवण्यात बदल करावा लागतो. दरवर्षी ही अशी आपली आपल्याशीच शर्यत असते. मागील वर्षापेक्षा अधिक चांगले होण्याची. कालपेक्षा आज आपण जास्त अपडेट आणि अपग्रेड झालोय की नाही ? हे बघण्याची शर्यत. स्वतःमध्ये निरंतर उत्कृष्टतेचा समावेश करण्याची धडपड. 


मला वाटतं की ही धडपड, ही शर्यतच आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ प्रदान करते. ख-या अर्थाने जीवनाला गती देते. ही धडपड, शर्यत जर थांबली तर मग जीवन दिशाहीन होऊन जाईल. उद्या काय करायचे ? या प्रश्नाचे उत्तर तयार नसेल, उद्याच्या कार्यक्रमांनी आजची आपली डायरी भरली नसेल तर संपलंच की सगळं. मी सर्वसामान्य माणूसच आहे त्यामुळे कधीकधी या कामांच्या सततच्या रगाड्याचा कंटाळा येतोही. एखाद्यादिवशी त्या डायरीचे दर्शनही नको वाटतं. नको तो टाइमटेबल असे सुद्धा वाटते. पण कधीमधी हे असे वाटणे हे सुद्धा स्वाभाविक आहे हे मनाने स्वीकारले की जीवनाची रंगत अजून वाढते. ९९ वेळा आपले आजच्या दिवसाचे नियोजन चुकले हे डायरीतल्या कामांवर मारलेल्या फ़ुल्यांमधून कळले तरीसुद्धा १०० व्या दिवशी ती फ़ुल्या मारलेली कामे आपल्या डायरीत घेणे आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करून त्यावर राइट मार्क घेणे हीच तरी खरी जीवनाची मजा आहे, नाही ?


"Power of positive thinking" हे Norman Vincent Peale चे पुस्तक, UPSC / MPSC ची तयारी करताना, फार वर्षांपूर्वी वाचले होते. त्यातले एक अक्षरही आता लक्षात नाही. पण एक मात्र नक्की जाणवतंय की सकारात्मक विचारसरणी आणि त्याप्रमाणे आपला स्वतःचा आचार हा एक सातत्याने प्रयत्नरत असण्याचा आणि प्रत्यक्ष अनुभवण्याचा भाग आहे.

 

आणि एकदा असे आपले आचरण राहिले की कटकट्या, कावेबाज मंडळींनी कितीही कट कारस्थाने केलीत तरी तुमच्यावर काही फरक पडत नाही. आणि तुम्ही कपटाने विचलित होत नाही म्हटल्यावर त्यांचा पराभव अटळ असतो. मग ती सगळी मंडळी आपसूकच तुमच्यातला त्यांचा रस कमी करतात, तुमच्यापासून दूर जातात. अंतिमतः फायदा तुमचाच होतो.


- "The only rule of life is that there is no single rule that suits all" हे सत्य अनुभवलेला आणि तरीही स्वतःचे नियम मांडणारा एक सरळ साधा शिक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१४ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Tuesday, January 13, 2026

एका उपवधू तरूणाचे कल्पक प्रताप

इसवीसन १९९९. एका तरूणाच्या लग्नासाठी त्यांच्या घरात हालचाली सुरू झाल्या. नोकरी लागून चांगली ४ वर्षे झालेली होती. त्यामुळे आता त्याने दोनाचे चार हात करावेत अशा चर्चा घरात आणि त्याच्या परिचितांमध्ये सुरू झालेल्या होत्या. मुलगा वाचनवेडा, पुस्तक दिसले की कर फ़स्त अशा सवयीचा. तसा साधा सरळ. कुणाच्या अध्यात मध्यात नसणारा. त्याचबरोबर विनोदप्रिय. जीवनाला खेळकर अंगाने घेणारा. त्यामुळे त्याच्या मनात त्याला हव्या असलेल्या जीवनसाथी / जीवनसारथ्याची कल्पना अगदी पक्की होती. आजूबाजूचा समाज आणि एकंदरच काळ बदलायला सुरूवात झालेली आहे याची त्याला कल्पना आलेली होती. अशा वेळी जीवनाच्या अशा महत्वाच्या टप्प्यावर आपल्याला साथ देणारी मुलगी जर आपल्या अनुरूप असली नाही तर जीवनाचे काय हाल होतील ? या कल्पनेने तो थोडा बावरला होता.



त्याकाळी त्याचा इतर चारचौघांसारखाच ठरवून केलेला विवाह होणार होता. तोपर्यंतच्या जीवनाच्या एकूणच धबडग्यात, संघर्षात प्रेम वगैरे करणे आणि त्याचे विवाहात रूपांतर होणे ही कल्पना सुद्धा त्याला आलेली नव्हती. आणि प्रेमविवाहासाठी लागणा-या बहुतांशी बाजू त्या मुलाच्या उणे बाजूकडीलच होत्या. उत्कृष्ट रूप नसणे, सर्वांवर, विशेषतः मुलींवर प्रथमदर्शनी छाप पाडणारे व्यक्तीमत्व असणे, मुलींवर खर्चायला शिल्लक पैसे असणे वगैरे वगैरे गोष्टी नव्हत्याच. प्रेमविवाह जरी असले तरी या गोष्टी त्याने आसपास घडताना बघितल्या होत्या त्यामुळे त्या मार्गाने तो जाणारच नव्हता. मग अशा ठरवलेल्या विवाहात आपल्याला अनुरूप अशा मुलीची निवड एकाच बघण्यात होईल का ? तिचे खरे व्यक्तीमत्व आपल्याला कळेल का ? आपल्या व्यक्तीमत्वाला साजेशी अशी वाचनाची आवड असलेली, विनोदप्रिय, खेळकर स्वभावाची आणि अगदी सहज जीवन जगणारी किंबहुना जीवनावोषयी फ़ार असोशी नसणारी मुलगी नक्की आपल्याला एक अर्ध्या तासाच्या "मुलगी बघण्याच्या" कार्यक्रमातून जीवनसाथी म्हणून मिळेल का ? हे विचार त्याला भेडसावत होते. कारण हे गणित जर चुकले तर आयुष्य हुकले ही त्याची धारणा अगदी पक्की होती.


मग त्याने त्यावर खूप विचार करून एक प्रश्नावली तयार केली. त्यात त्या वधूच्या नावापासून, टोपणनावापासून ते शैक्षणिक पात्रतेपर्यंत आणि त्यापुढेही इतर आवडीनिवडींबाबत काही प्रश्न होते. ते प्रश्न वरवर बघता निरूपद्रवी वाटत असले तरी त्यांच्या आलेल्या उत्तरांमध्ये तो तरूण त्याच्याशी त्या मुलीची मते, आवडीनिवडी जुळतात की नाही ? हे ताडून बघणार होता. म्हणजे या मुलाचा आवडीचा चित्रपट "प्रहार", "एक रूका हुआ फ़ैसला", "थोडासा रूमानी हो जाए" असायचा आणि त्या मुलीचा आवडता चित्रपट "मोहरा" असायचा. त्याची आवडती डिश ही पुरणपोळी असायची तर तिची पास्ता असायची. 






नाही, तशी आवडनिवड भिन्न असायला हरकत नव्हती. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" हे मनापासून मानण्याइतका तो आणि त्याच्या घरची मंडळी सुसंकृत होती. कुठलीही आवडनिवड ही अत्यंत वैयक्तिक बाब असते आणि ती तशी असणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, त्यात अधिक उणे असे काही नसते ही त्याची अगदी प्रामाणिक धारणा होती. पण जीवनरथाची दोन्हीही चाके एकाच आकाराची असलीत की रथ अधिक सुलभतेने अनेक अडथळ्यांना पार करतो हे त्याचे पक्के प्रमेय होते आणि त्यासाठी आपल्याच आकाराचे चाक तो आपल्या जीवनरथाला शोधत होता. आवडीनिवडी थोड्या इकडेतिकडे असल्यात तरी तिच्या घरची संस्कृती आणि आपल्या घरची संस्कृती यात साम्यस्थळे किती आहेत ? आणि विसंगती किती आहेत ? हे तो त्या प्रश्नावलीवरून शोधणार होता. म्हणजे पुरणपोळी आणि वडाभाताचे जेवण झाल्यानंतर संध्याकाळी बाहेर पाणीपुरी, रगडा पॅटीस खाऊन घरी पुन्हा पिठलंभात खाल्यानंतर त्या घरात "पोटात अगदी गोपालकाला झालाय" असे म्हणतात ? की "पोटात आज अगदी कॉकटेल झालय" असे म्हणतात हे त्या प्रश्नावलीवरून त्याला कळणार होते. अगदीच भिन्न संस्कृतीत, संस्कारात वाढलेले दोन जीव फ़ार क्वचितच एकत्र आणि (त्याच्या दृष्टीकोनातून) सुखाचा समाधानाचा संसार करू शकतात यावर त्याचा दृढ विश्वास होता.


स्त्री पुरूष समानतेच्या काळात केवळ मुलाकडूनच अशा प्रकारची माहिती मुलीकडून मागवली जावी हा अन्याय झाला असता हे त्याला मान्य होते. तामुळे या प्रश्नावलीच्या आधी "थोडेसे माझे" म्हणून स्वतःचे एक मनोगत, आपला हेतू विशद करणारे Preamble  त्यात समाविष्ट केलेले होते. (केंद्रीय नागरी सेवा परिक्षां साठी भारतीय राज्यघटनेचा खूप अभ्यास केल्याचे असे परिणाम होतात. कुठेही आपले Preamble वगैरे टाकणे. छे !) त्यात त्या तरूणाने अशाच प्रकारची माहिती या किंवा वधूपक्षाने ठरविलेल्या इतर कुठल्याही फ़ॉर्मॅटमध्ये देण्याची तयारी दर्शवलेली होती.



घरच्या मंडळींनी त्याचा हा आग्रह पाहून मोठ्या कष्टाने त्याला परवानगी दिली. घरच्यांचेही बरोबरच होते. त्याकाळी हा एक मोठा प्रयोग होता. "तो मुलगा काय स्वतःला मोठा टिकोजीराव समजतोय की काय ?" असा लोकापवाद पसरविणारा होता. पण तो उपवधू मुलगा आपल्या विचारांवर ठाम होता. लोकांनी काहीही म्हटले तरी आपल्याला हवी असलेली जीवनसंगिनी ही आपल्याला, आपल्या कुटुंबातील संस्कारांना अनुरूप अशीच असली पाहिजे असा त्याचा अत्याग्रह होता.


पण या फ़ॉर्मचे फ़ार प्रयोग करण्याची वेळ आली नाही. दोन मुली बघितल्यानंतर तिस-याच मुलीकडून त्याला आणि त्याच्याकडून तिला पसंतीचा होकार कळवला गेला आणि ती अगदी त्याच्या जीवनात अनुरूपपणे आली आणि ते दोघेही एकमेकांमध्ये विरघळून गेलेत.


आज त्या घटनेला पाव शतकाहून अधिक काळ लोटला आहे तरी आजही त्याकाळच्या या प्रश्नावलीच्या या सुखद आठवणी त्याला स्वतःवरचा, स्वतःच्या निर्णय क्षमतेवरचा आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीवरचा विश्वास अगदी दृढ करायला मदत करतात. 


- तारूण्यात मनाला अनेक पंख फ़ुटत असलेत तरी विचाराने आणि एका ध्येयाने जगणारा वागणारा कल्पक आणि विचारी तरूण, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


(त्याचे लग्न कसे जुळले ? आणि इतर गंमतीजंमतीच्या आठवणी इथे) 


१३ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Monday, January 12, 2026

शिक्षक प्राध्यापकांनो. ऐका हो ऐका.

आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. राष्ट्रीय युवक दिवस. आज महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आजच्या दिवसाची आठवण करून दिली. त्यांच्या युवक असण्याचे महत्व त्यांना ठसवले. स्वामीजींच्या चरित्रातील एक चारित्र्य निर्माणाची कथाही सांगितली. विद्यार्थ्यांनी ती मन लावून ऐकली, त्यांना ती पटलीही पण फ़ार काळ त्यांच्या मनःपटलावर ती राहील असे मात्र वाटले नाही. अशी चरित्रे ऐकून, वाचून त्या विचाराने झपाटले जाण्याचे दिवस आता संपलेत असे वाटून गेले. आता विविध समाजमाध्यमांवरील रील्ससुद्धा २० सेकंदांपेक्षा अधिक कालावधीच्या नसतात कारण आपल्या सगळ्यांचाच लक्ष देऊन एखादी गोष्ट ऐकण्याचा, शिकण्याचा कालावधी कमालीचा कमी झालेला आहे.


मधल्या काळात आम्हा प्राध्यापकांना आपापल्या विषयातले MOOC (Massive Open Online Courses) तयार करण्यासाठी आय आय टी च्या तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभले. त्यात त्या सगळ्यांनीच स्पष्ट सूचना दिल्यात की तुमची ऑनलाईन लेक्चर्स चित्रित करताना एव्हढी खबरदारी घ्या की एक लेक्चर हे फ़क्त १० ते १२ मिनीटे कालावधीचे असावे. कारण त्यांच्याकडे असलेल्या एका अहवालानुसार अभियांत्रिकी विद्यार्थ्या्चा, एकाचवेळी एकूणच लक्ष देण्याचा, शिकण्याचा कालावधी हा फ़क्त १० ते १२ मिनीटे एव्हढाच आहे. म्हणूनच आय आय टी च्या तज्ञ प्राध्यापकांची ऑनलाईन्स लेक्चर्स ही छोटी छोटी असतात. एका तासात, एकाच लेक्चरमध्ये एखादी संकल्पना विद्यार्थ्यांच्या गळी उतरवायची असेल तर ती संकल्पना अशी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून ५ - ६ लेक्चर्समध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगितली तर ती त्यांच्यापर्यंत अधिक चांगली पोहोचते हा आय आय टी चा अभ्यास आहे. आणि तिथली बहुतांशी प्राध्यापक मंडळी याचे पालन करीत असतात.


आजकाल महाविद्यालयात १ तासाचे लेक्चर घ्यायचे म्हटले की विद्यार्थ्यांना तब्बल तासभर आपल्या विषयात गुंतवून ठेवण्यासाठी आम्ही प्राध्यापक मंडळी किती तारेवरची कसरत करतो हे सगळ्यांच्या लक्षात येईल. बरे आपल्या विषयावरील ऑनलाईन कण्टेण्ट डाऊनलोड करून तसेच विद्यार्थ्यांना शिकवणे हे आमच्यातल्या हाडाच्या प्राध्यापकाला मंजूरच नाही. आमचे अनेक व्यवसायबंधू तसे करतात खरे, पण त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांना किती अनादर वाटतो हे आम्हाला माहिती आहे. आणि असा अनादर डोळ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ पगारासाठी शिकवणे हे मरणाहून मरण आहे हे सुद्धा आम्हाला कळतय. त्यामुळे आपला विषय तर विद्यार्थ्यांना शिकवायचाय, त्यांची लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता ही अत्यंत कमी आहे हे लक्षात घेऊन थोडी मौजमस्ती करीत, थोडी त्यांच्या विश्वातली गंमत करीत, त्यांना आपण त्यांच्यातलेच एक वाटलो पाहिजेत याची काळजी घेत आणि तरीही आपल्या विषयाशी बांधून ठेवत तासभर शिकवणे ही खरोखर तारेवरची कसरत आहे.


आजकालच्या इंटरनेटच्या महाविस्फ़ोटाच्या आणि चॅट जीपीटी किंवा तत्सम कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांच्या काळात एखाद्या विषयाची माहिती अतिशय मुबलकपणे विद्यार्थ्यांना वर्गखोलीच्या चार भिंतीबाहेर उपलब्ध आहे. ती माहिती ते त्यांच्या अतिशय रचनात्मक वेळात घेऊ शकतात. त्यासाठी महाविद्यालयात जाऊन, विशिष्ट वेळेला एका वर्गखोलीत बसून ती माहिती घेण्याचे प्रयोजन त्यांना उरले नाही. एखाद्या विद्यार्थ्याचा अत्यंत रचनात्मक वेळ रात्री ११ ते १२ असू शकतो आणि या वेळात त्याने / तिने शिकलेले त्याच्या / तिच्या डोक्यात कायमचे राहू शकते. त्यासाठी भर दुपारी प्राध्यापकांकडून लेक्चर्स ऐकून त्याविषयावर चिंतन मनन करण्याची गरज उरलेली नाही. बहुतेक दुपारची वेळ ही तशीही मेंदूच्या फ़ार रचनात्मक कार्यासाठी भारतीय उपखंडात तरी विद्यार्थ्यांकडून पसंत केली जात नाही हे माझे वैयक्तिक निरीक्षण. मग अशावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता, माहितीचा महापूर हा आपल्या शिक्षकी पेशालाच अकाली निवृत्त करतोय की काय ? अशी एक भितीची भावना आम्हा प्राध्यापकवर्गात बघायला मिळते.


पण इथेच कधी नव्हे ती प्राध्यापकांची मोठी भूमिका येते. आणि ती म्हणजे माहिती आणि ज्ञान यात असलेला फ़रक आपल्या विद्यार्थ्यांना जाणवून द्यायची. आंतरजालावर अफ़ाट माहिती उपलब्ध आहे. तिच्यातून योग्य ते निवडून त्या माहितीचे ज्ञानात, कौशल्यात कसे रूपांतर करायचे ? याचे मार्गदर्शन आजकालच्या शिक्षकांकडून अपेक्षित आहे. इंग्रजी भाषेत सांगायचे तर शिक्षक हा एक Knowledge Facilitator म्हणून विद्यार्थ्यांना हवाय. त्याहून पुढली गोष्ट म्हणजे आज विद्यार्थ्यांना हे सुद्धा अगदी प्रेमाने समजावून सांगावे लागेल की आज आपण अभ्यासक्रमात जे काही शिकतोय ते कमी अधिक कालावधीनंतर कालबाह्य होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिकण्याच्या वर्षात "एखादी गोष्ट शिकायची कशी ?" हे जर विद्यार्थ्यांनी शिकले ते त्यांच्या जीवनात पुढेपुढे नवनवीन विद्या, कौशल्ये शिकू शकतील. अगदी कुठल्याही वयात, कुठल्याही नोकरी व्यवसायात स्वतःला अपग्रेड करू शकतील, अपडेट ठेऊ शकतील. जीवनभर विद्यार्थी म्हणून नवनवीन गोष्टी शिकण्याचे त्यांना त्यांच्या जीवनात कायकाय फ़ायदे मिळणार आहेत ? हे त्यांना एकदा कळले की ते आपला वेळ, शक्ती "एखादी गोष्ट शिकायची कशी ?" याच्या अभ्यासातच घालवतील.


त्यासाठी शिक्षक प्राध्यापकांनाही आपले जुने धोरण, जुन्याच नोटसवरून पुढे चालू, तेच ते घिसेपीटे जोक्स त्याच त्याच वेळी अशा सवयी निग्रहाने त्यागाव्या लागतील. नवीन जगात काय सुरू आहे ? नवी पिढी कसा विचार करतेय ? आपल्या विद्यार्थ्यांना आजच्या बाह्य जगात कुठल्याकुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे ? याचे अद्ययावत ज्ञान शिक्षक प्राध्यापकांना घेत रहावे लागेल. आणि बाह्य जगात वावरताना केवळ विद्यार्थ्यांना शिकवणारे पंतोजी म्हणून न वावरता विद्यार्थ्यांचा कायम सांगाती म्हणून वावरावे लागेल. आज विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आलेली आहे. 







- आज ३० वर्षांपासून अध्यापन करीत असलेला आणि जवळपास दोन पिढ्यांमधील विद्यार्थी, त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांच्यातील शिक्षणाचा दृष्टीकोन डोळसपणे अभ्यासणारा, त्यांच्याहून तिस-याच पिढीतला एक शिक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


 

१२ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Sunday, January 11, 2026

भूगोल, नद्या आणि रेल्वे

आम्ही आहोत भूगोल प्रेमी. शाळेत आम्हाला भूगोल शिकवायला आमचे पितृतुल्य असे वेरूळकर सरांसारखे अतिशय उत्तम शिक्षक होते. त्यामुळे अगदी शालेय जीवनापासून भुगोलाची खूप गोडी लागली. शालेय जीवनानंतर महाविद्यालयीन जीवनासाठी, नोकरीसाठी म्हणून घराबाहेर पडल्यानंतर भुगोलात शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष दृष्टीपथास पडल्या आणि जिज्ञासा अधिकच वाढली. प्रत्येक प्रवासात त्या त्या जागेच्या भुगोलाचा वेध घेत प्रवास करण्याची सवय लागली.


बालपणापासून श्रीसमर्थांच्या "बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा" उपदेशाप्रमाणे रोज संध्या, पूजा घडत गेल्या. त्यात सुद्धा रोजच्या संध्येत, पूजेत "गोदावर्याः उत्तरे तीरे, रेवायाः दक्षिणे तीरे" या संकल्पातील देवाला आपले लोकेशन सांगण्यामुळे भुगोलाशी असलेला संबंध रोज थोडा थोडा दृढ होतच गेला. बाय द वे, पुलंनी म्हटल्याप्रमाणे पूजा करीत असताना आपण देवाशी फ़ार बोलतो हे मला पटते. पण हा आपल्या आत्मनिवेदन भक्तीचा एक प्रकार आहे हे समजून आम्ही त्या बोलांचा आनंद घेतो. 


एका मानववंशशास्त्रज्ञाच्या मते आपण सगळेच महाराष्ट्रीय देशस्थ गोदावरीच्या उत्तर किंवा दक्षिण तीरावर वाढलेल्या संस्कृतीतले आहोत. एव्हढेच नव्हे तर त्यांच्या मते आपण मराठी मंडळी ना आर्य वंशाचे आहोत ना द्रविड वंशाचे. आपण सगळेच इथले मूलनिवासी आहोत. गोदावरीच्या दोन्हीही तीरांवर आपली देशस्थ संस्कृती वाढली. प्रशस्त आणि ऐसपैस. आजही महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकाचा उत्तर भाग इथल्या संस्कृतीत अनेक साम्यस्थळे आहेत. इथे अनेक शतकांपासून रोटी बेटी व्यवहार होत आहेत. इथल्या खाद्यसंकृतीही एकच आहेत. आता आधुनिक जगात राज्या राज्यांच्या सीमारेषांनी, भाषेनी जरी ही माणसे वेगळी वाटत असलीत तरी त्यांच्या घरच्या चालीरिती, त्यांची एखाद्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देण्याची पद्धत, घरातले संस्कार हे सगळे अगदी एकसारखे आहेत. एव्हढच काय आपण आपल्या भारतवर्षात जर आसेतू हिमालय फ़िरलोत आणि तिथे नुसते न फ़िरता प्रत्येक प्रांतातल्या टिपीकल घरांचा आढावा घेतला, त्यांना त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की चालीरिती वरवर जरी वेगळ्या भासल्यात तरीही आतल्या संस्कारांचा धागा एक आहे. आणि हे पहाणे मोठे विलोभनीय असते.


पहिल्यांदा मी नागपूरच्या उत्तरेला प्रवास केला तो म्हणजे नागपूर ते इंदूर असा. या प्रवासात आपल्याला कर्कवृत्त नावाचा पृथ्वीच्या पोटावरचा एक अदृश्य पट्टा लागणार हे मला माहिती होते. रात्री आमची रेल्वे नागपूरवरून निघाली. मी आपला भुगोल आठवत प्रवास करीत जागा होतो. गाडीतले सहप्रवासी एव्हढेच काय माझे कुटुंबिय सुद्धा गाढ झोपी गेले होते. उत्सुकतेमुळे मला मात्र द्विस्तरीय वातानुकूल शयनयानासारख्या (मराठीतला "सेकंड एसी") आरामदायक कोचमध्ये सुद्धा झोपच नव्हती. रात्री साधारण कर्क वृत्त ओलांडल्यानंतरच मी झोपी गेलो. तेव्हा स्मार्टफ़ोन्स, गुगल वगैरे नव्हते. नाहीतर या प्रवासात मी नक्की कुठे  कर्क वृत्त ओलांडले ते मला अचूक कळले असते. असो, पण ही मजासुद्धा काही कमी नव्हती. आजही उत्तरेकडल्या प्रवासात जेव्हा जेव्हा मी कर्क वृत्त ओलांडतो तेव्हा तेव्हा आजूबाजूच्या वातावरणात, आसपासच्या प्रांतांमध्ये मातीत, नद्यांमध्ये काही बदल होतोय का याचासुद्धा वेध मी घेत असतो. 


पुणे ते सातारा हा प्रवास मी रेल्वेमार्गे, रस्तामार्गे अक्षरशः शेकडो वेळा केलाय. महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा नदी पुणे ते सातारा रस्ता प्रवासात नक्की कुठे आपल्याला ओलांडते हे मला कुतूहल असायचे. कारण पुण्याहून निघताना महाबळेश्वर उजवीकडे पण कराडला कृष्णामाय रस्त्याच्या डावीकडे असायची. मग ही नेमकी आपल्या उजवीकडून डावीकडे कुठल्या ठिकाणापाशी जाते ? हा प्रश्न मला बरेच दिवस छळत होता. कारण कराडला, सांगलीला, नरसोबाच्या वाडीला कृष्णेचा विस्तार बघितला असल्याने त्याच विस्ताराच्या कृष्णेचा मी पुणे ते सातारा प्रवासात मागोवा घ्यायचो. पण ब-याच उशीरा कळले की पुणे ते सातारा रस्त्यावर वाई फ़ाटा ते सातारा या दरम्यान अगदी छोट्या स्वरूपाची कृष्णा नदी आपल्या रस्त्याला ओलांडून उजवीकडून डावीकडे जाते. महाबळेश्वर वरूनच उगम पावणा-या आणि महाबळेश्वर ते कराड ही कृष्णेपेक्षा अगदी वेगळी वाट चोखाळणा-या कोयना नदीला तर आम्ही अगदी कराड शहराच्या हद्दीत रस्त्याच्या उजवीकडून डावीकडे जाताना बघायचो. आणि या दोन बहिणींचा प्रितीसंगम तर कराडला शिकत असताना आमची रोजची संध्याकाळ रमण्याचे ठिकाण होते.


पुणे ते सातारा ते कराड ते सांगली हा रेल्वेमार्ग रस्ता मार्गापासून इतका फ़टकून का चाललाय ? हे सुद्धा आमचे एक कुतूहलच होते. पुणे ते कराड हे रस्ता मार्गाने फ़क्त १६५ किलोमीटर्सचे अंतर रेल्वेमार्गाने २०२ किलोमीटर्सचे का असावे ? हा आम्हा सर्व वैदर्भिय विद्यार्थ्यांना भेडसावणारा प्रश्न. पण मग तत्कालीन सरकारपुढली अभियांत्रिकी आव्हाने लक्षात आलीत. मोठ्या नद्या कमीत कमी वेळा ओलांडावा लागावा असा रेल्वेमार्ग असणे त्या काळच्या तंत्रज्ञानाला उपयुक्त होता. म्हणून पुणे ते सांगली कुठेही कृष्णा नदी न ओलांडता या रेल्वेमार्गाचे नियोजन झालेले आहे हे लक्षात आले. त्याकाळचे पुल बांधण्याचे तंत्रज्ञान इतके प्रगत नसावेत किंवा कमीत कमी पुल ओलांडावे लागावे हा आर्थिक नियोजनाचा त्यावेळेसचा भाग होता. म्हणून सातारा रोड रेल्वेस्थानक हे क्षेत्र माहुलीच्या सुद्धा ५ किलोमीटर पलिकडे आहे. सातारा शहरातून जर रेल्वेमार्ग नेण्य़ाची वेळ आली असती तर कृष्णा नदी ओलांडावी लागली असती. तो पर्याय जुन्या काळी टाळल्या गेलाय.


मग इतरही ठिकाणच्या रेल्वे मार्गांच्या नियोजनाचे रहस्य उलगडू लागले. मुंबई ते दिल्ली हा मध्य रेल्वेचा रेल्वेमार्ग बरोबर भुसावळ नंतर रावेर - ब-हाणपूर च्या खिंडीतून सातपुडा ओलांडतो आणि इटारसी गाठतो. त्याकाळात पर्वतांना ओलांडण्याचे, त्यातून काढणा-या बोगद्यांचे तंत्रज्ञान आजच्याइतके विकसित आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झालेले नव्हते. म्हणून मग नैसर्गिक रित्या असलेल्या खिंडींचा शोध ब्रिटीशांनी घेतला असला पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहारच्या गंगेच्या मैदानी प्रदेशात रेल्वेमार्गाचे जाळे खूप प्रमाणात असण्याचे कारण तिथल्या अफ़ाट लोकसंख्येइतकेच तिथे रेल्वेमार्ग टाकण्यासाठी येणारी कमी आव्हाने हे सुद्ध एक आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीतून मुंबई - पुणे, मुंबई - नाशिक हे रेल्वेमार्ग टाकायला ब्रिटीशांना अपार श्रम झालेले होते. मुंबईसारखे जगातले सर्वोत्तम बंदर आणि त्यातून समुद्रमार्गाने होणारा व्यापार ब्रिटीशांना खुणावत होते म्हणून मुंबईला त्यांनी इतर भारताशी जोडणारे रेल्वेमार्ग खूप आणि अथक परिश्रमांनी तयार केलेत.


नाशिक ते हैद्राबाद या रेल्वेमार्गाबाबत सुद्धा माझे हेच निरीक्षण आहे. एकतर मनमाड ते हैद्राबाद हा रेल्वेमार्ग बराच काळ मीटर गेज होता. या मार्गाचा रोख आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की नाशिक शहराच्या हद्दीत गोदावरी नदीचा छोटासा प्रवाह रेल्वेने ओलांडला आणि गोदावरीला आपल्या उजव्या बाजूला घेतले की थेट नांदेडपर्यंत हा रेल्वेमार्ग गोदावरीला न ओलांडता गोदावरीच्या उत्तर तीरावरून जातो.गोदावर्यां उत्तरे तीरे ते दक्षिणे तीरे हा प्रवास थेट तेलंगणातल्या बासर ब्रह्मेश्वर येथे होतो. 


आपली समजूत असते की आपले दख्खनचे पठार हे दक्षिणेकडे उताराचे होत होत गेलेले आहे. पण सहज गूगल मॅपवर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातला तुंगभद्रा आणि कृष्णेचा प्रवास बघितला आणि चकित झालो. या दोन्हीही नद्या कर्नाटकात जवळजवळ उत्तरवाहिनी ते ईशान्यवाहिनी झालेल्या आहेत. महाराष्ट्रातले एक प्रख्यात भुगोल तज्ञ आणि "भुगोलकोश" कार श्री एल के कुलकर्णींसोबतच्या चर्चेतून समजले की तुंगभद्रा नदी ही दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी उत्तरवाहिनी नदी आहे. दक्षिण भारतीय पठार आपण समजतो तसे सगळेच दक्षिणेकडे उताराचे नाही. मग कृष्णेच्या दक्षिणेला आणि तुंगभद्रेच्या उत्तरेला बशीसारखी खोलगट रचना आहे का ? याचा शोध सुरू झाला आणि नवीन भुगोल कळला. आता पुढच्या वेळी हंपी, बदामी ला जाईन तेव्हा हा नवा भुगोल डोक्यात असेल. नव्याने तो परिसर बघितल्यासारखे वाटेल.


- दरवेळी रेल्वे किंवा बसप्रवासात तिथल्या तिथल्या समाजजीवनाशी, भुगोलाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारा आणि जगभर प्रवास करून तिथल्या तिथल्या भुगोलाची अशी अनुभूती घेऊ इच्छिणारा एक प्रवासी पक्षी, भुगोलप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


११ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६