Wednesday, August 5, 2020

६ वर्षांपूर्वीचा एक वर्णनीय प्रवास.


काही कामांनिमित्त दोन दिवस नागपूरला घालवून सांगोल्याला परत निघालो होतो.
आदल्या दिवशी प्रवासाचे नियोजन करताना ६६० किमी साठी १४ तास ४५ मिनीटांचे नियोजन केले होते.


पण नागपूरवरून निघायलाच जवळपास अर्धा तास उशीर झाला.
खडकीला हनुमंताचे आणि कळंबला चिंतामणीचे दर्शन घेऊन निघालो तेव्हा गाडीतले दोन्ही पॅसेंजर्स (सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी) गाढ झोपी गेले होते. गेले दोन दिवस नागपुरात भरपूर भेटीगाठी, भटकंती आणि अपुरी झोप झाल्याचे परिणाम.
आर्णीला गाडीत पेट्रोल भरायला थांबलो तेव्हाही गाडीतल्या प्रवाशांची झोपमोड झाली नाही. मग मुद्दाम नाश्ता, चहासाठी थांबून या दोघींची झोपमोड करण्याचे माझ्या जिवावर आले.
सोबतीला कारच्या स्टिरीओवर भीमसेनजी, मालिनीताई, अभिषेकीबुवा, राशिद खानसाहेब सकाळचे राग गायला होतेच. एकेक बडा ख्याल आणि छोटा ख्याल एकेक तास चालणारा. मग काय ? त्याच सुरांवर तरंगत नाॅनस्टाॅप निघालो. मधे उमरखेड, हदगाव, नांदेड ही गावे कधी लागलीत ? आणि कधी मागे गेलीत ? कुणालाच कळले नाही.


दुपारी साधारण २ च्या सुमारास सौ. वैभवीची झोप उघडली.
"कुठपर्यंत आलोय ?
नाश्त्याला उमरखेडला थांबायचे ना ?"
अशी पृच्छा झाली.
"बाईसाहेब, नाश्ता विसरा. आता थेट २० किमी नंतर लातूरला जेवायलाच थांबू." माझे विजयी उत्तर.
थांबे घेतघेत गेलो की भरपूर वेळ जातो. तेच थांबे टाळून सर्वसामान्य वेगात जरी गेलो तरी भरभर अंतर कापले जाते याचा वस्तूपाठ देणारा हा प्रवास.
१४ तास ४५ मिनीटांऐवजी १४ तास ९ मिनीटांतच ६५७ किमी सुरक्षितरीत्या गाठल्याची कृतार्थता एका ड्रायव्हर लाच समजू शकेल.
- "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" या वचनावर विश्वास असलेला,
लांब पल्याचा सुरक्षित ड्रायव्हर रामराव गाडीवाले.

No comments:

Post a Comment