Friday, August 7, 2020

मराठी भाषा मृतप्राय वगैरे होतेय काय ? एक ज्वलंत प्रश्न.

आजकाल

"जावे लागेल, करावे लागेल" अशा वाक्यरचनांऐवजी "जायला लागेल, करायला लागेल"
'स्वयंपाक' या शब्दा ऐवजी प्रतिशब्द 'जेवण'. 
"ती जेवण करतेय" म्हणजे स्वयंपाक करतेय ? की स्वतःच खातेय ? हे कळणे कठीण. आपण आपला आपला संदर्भानुसार अर्थ लावून घ्यायचा.
"माला" (मला या शब्दाऐवजी) 
"इकडे" (इथे ऐवजी) आणि "तिकडे" (तिथे ऐवजी) इत्यादी शब्द, वाक्यरचना सर्रास कानावर पडताना दिसतात.
अरेरे ! मराठी प्रमाण भाषेचा मूळस्त्रोतच असे दूषित प्रवाह स्त्रवू लागला तर सकल मराठी भाषेचे काय होणार ? हा प्रश्न आपणा सर्वांच्या मनात येईलही. पण काळजी नको, 
काहीही होणार नाही.

कारण आजवर मराठी टिकलेली आहे ती तिच्या असंख्य बोलींमुळे.
 
"आमचीच भाषा प्रमाण. तुम्ही वैदर्भीय, मराठवाडी, खान्देशी असली कसली रे अशुध्द भाषा बोलताय ?" हा गेली ५० वर्षे जपलेला वृथाभिमान आता...
मुले नातवंडे इंग्रजी माध्यमातून शिकून,

 "अरे बावन्न म्हणजे फिफ्टी टू", 
"ते विमान वगैरे नाही म्हणायचं, से एरोप्लेन",
"शी! परीक्षा वगैरे कसले डाउनमार्केट शब्द वापरताय ? 'एक्ज्ञाम्स' म्हणा."

 या आकलन पातळीवर आल्यामुळे यानंतर आपले (तथाकथित चिरंतन व 'अ क्षर'  वगैरे ) लेखन वाचणार कोण ? या चिंतेच्या (आणि थोड्या केविलवाणेपणाच्या) पातळीवर मराठी सारस्वतांचा अभिमान आलाय. "माझ्या साहित्यिक वगैरे असण्याची माझ्या घरच्यांच्या लेखीच किंमत शून्य आहे. आपले लेखन आपली मुले, सुना, लेक, जावई, नातवंडे वाचत नाहीत कारण त्यांना त्यातले काहीच कळत नाही." हे शल्य अगदी जिव्हारी बसणारे आहे. 
म्हणून मग "माझे लेखन मृतप्राय होतेय म्हणजे मराठी भाषाच मृतप्राय होतेय" या अहंमन्य समजूतीवर आधारीत ही मराठी भाषेविषयीची ओरड आहे.

त्यामानाने एकेकाळी हिणवल्या जाणार्‍या गडचिरोली, गोंदिया, धुळे, नांदेड, लातूर, सोलापूर एव्हढेच काय सिंधुदुर्गातही उत्तम मराठी बोलतात आणि संस्कृती टिकवतात असे म्हणावे लागेल. इतकेच कशाला महाराष्ट्राबाहेर इंदूर, बडोदा आणि ग्वाल्हेरला, तिथल्या अल्पसंख्य मराठी भाषिकांनी गेली ३५० वर्षे मराठी चांगली टिकवून ठेवलेली आहे.

माझ्या घरची मराठी अशी माझ्या डोळ्यांसमोर लयाला जायला लागल्यावर, मला अचानक "मराठी भाषा मृतप्राय होत चालली आहे." असा साक्षात्कार होण्याचे साहित्यिक आत्मभान वगैरे; गेल्या काही वर्षातच काहीकाही मराठी सारस्वतांना आले असण्याचे खरे कारण आपल्या लक्षात आले असेलच.

म्हणूनच गेली काही वर्षे, सातत्याने,
"मराठी भाषेची आजची अवस्था" , 
"मराठी भाषेचे भविष्य",
"मराठी सारस्वताची दशा आणि दिशा" यांसारख्या विषयांवर असंख्य साहित्य संमेलनांमधे परिसंवाद झडत गेलेत, घडवून आणले गेलेत. 
शिळ्या कढीला ऊत आणल्यासारखेच फोल, सपक आणि बेचव. त्यांचे फलितही शून्य. दर साहित्य संमेलनांनंतर शासनदरबारी जे ठराव वगैरे जातात ना ? त्यासारखेच.

असो. गेल्या ३५ वर्षात महाराष्ट्राची भरपूर भ्रमंती आणि विविध ठिकाणी वास्तव्य झाल्यामुळे दिसलेले जळजळीत वास्तव मांडलेय.

लिहीण्यासारखे, बोलण्यासारखे भरपूर आहे पण या माध्यमाची मर्यादा लक्षात घेऊन थांबतो.

- चांदा ते बांदा भटकंती केलेला आणि महाराष्ट्राच्या सर्वप्रांतीय वास्तव्यात तिथल्या भाषेचा आणि संस्कृतीचा डोळस अभ्यास केलेला मराठीप्रेमी राम परखडकर मास्तर (एक डाव धोबीपछाड फेम)

No comments:

Post a Comment