Sunday, December 13, 2020

रामराज्य: एक नवा विचार.

 "रामराज्य आले पाहिजे" अशी आपल्या सगळ्या सश्रद्ध व्यक्तिंची आंतरिक मनकामना असतेच असते. सर्वसामान्य प्रजाजनांचा आदर करणारी, सर्वांचे, न्याय्यहित साधणारी आणि म्हणूनच सर्वांना आपलीशी वाटणारी अशी दोनच राज्ये या पृथ्वीच्या इतिहासात होऊन गेलीत. एक रामराज्य आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य.

पण एक व्यक्ती म्हणून विचार केला तर लक्षात येईल की रामराज्याची सुरूवात आपल्याला आपल्या स्वतःपासूनच करावी लागेल. आपला राजा रामच आहे आणि आपण त्याच्याच अधिपत्याखाली राहतोय ही भावना दृढ करावी लागेल. मग आपल्या राजाला (त्या प्रभू रामाला) काय आवडतेय ? काय आवडत नाही ? याचे सतत व्यवधान बाळगावे लागेल. रामाला सत्यप्रियता, मनाचा सरळपणा आणि मनातला शुद्ध भाव आवडतो. हे लक्षात घेऊन आपण आपले वागणे ठेवले तर आपण सगळेच त्याच्या राज्यात राहतोय असे होईल, नाही का ? समाजपरिवर्तनाची सुरूवात स्वतःच्या वर्तनापासून करणे आवश्यक आहे.
सुरूवातीला आपण एकटेच या मार्गाने जातोय, इतरांचे काय ? असे वाटेल. पण आपणा सर्वांना आपल्या साधनावर दृढ विश्वास ठेवून आणि या मार्गाने सुरूवातीला न जाणा-या इतरांचा दुःस्वास न करता, निर्धाराने पुढे जावे लागेल. एकेकाला आपल्या वागणुकीने आपल्यात समाविष्ट करावे लागेल. आज कदाचित आपण अल्पसंख्येत असू पण ही चळवळ वाढली तर या रामराज्यात राहणारे बहुसंख्येने होतील आणि खरोखर रामराज्य येईल. आणि सत्यसंकल्पाचा पूर्णकर्ता प्रत्यक्ष प्रभू रामच असतो.
येत्या नववर्षानिमित्त आपण सगळे हा संकल्प करूयात का ? नववर्षाच्या संकल्प सिद्धीसाठी सर्वांना शुभेच्छा आणि प्रभू श्रीरामांना प्रार्थना.
- भाबडा वाटला तरी सत्यसंकल्पात अपार शक्ती असते या वचनावर दृढ विश्वास असलेला राम

No comments:

Post a Comment