Saturday, December 5, 2020

महाविद्यालयीन जीवनातले आमचे psephology चे प्रयोग.

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराडला सप्टेंबर १९८९ मध्ये आमची ऍडमिशन झाली आणि लागलीच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध पदांसाठी अंतर्गत निवडणुकांचे वारे वाहू लागले. तत्पूर्वी नागपूर विद्यापीठात या निवडणुका व्हायच्यात पण राजकीय पक्षांचा हस्तक्षेप फ़ार वाढू लागल्याने त्यात हाणामा-या आणि राडेच जास्त होऊ लागलेत. ही वाढती डोकेदुखी नको म्हणून नागपूर विद्यापीठाने सर्व प्रकारच्या विद्यार्थी निवडणुका रद्द करून विविध पदांसाठी थेट नियुक्त्यांचे धोरण अवलंबिले होते. पण आमच्या शिवाजी विद्यापीठात मात्र या निवडणुका अगदी गांभीर्याने आणि शांततेच्या वातावरणात व्हायच्यात.

त्यावेळी आमच्या महाविद्यालयात २२ जागांसाठी निवडणुका व्हायच्यात. General Secretary, Social Gathering Secretary, Debating and Cultural Secretary, Magazine Secreatry, Cricket Secretary, Football Secretary अशा २२ जागा आणि प्रत्येक वर्गाचा Class Rpresentative (CR) अशा जागांसाठी निवडणुका घेतल्या जायच्यात. त्यातले General Secretary (GS) आणि Social Gathering Secretary (SGS) म्हणजे वर्षभरासाठीचे जणू पंतप्रधान आणि गृहमंत्री असा त्यांचा थाट असायचा. Debating and Cultural Secretary कडे वर्षभराच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी असे तर Magazine Secreatry कडे महाविद्यालयाच्या भित्तीपत्राची (मुक्तांगण) चावी असे. त्यावर दर आठवड्याला कुणाकुणाचे लेख प्रकाशित करायचे ? वगैरे निर्णय तो / ती स्वतंत्रपणे घेऊ शकत असे आणि दरवर्षीच्या महाविद्यालयीन वार्षिकांकाची प्रकाशन जबाबदारी असे. सगळ्याच जागांसाठीच्या निवडणुका मोठ्या हिरीरीने लढल्या जात.



या निवडणूकांचे संचालन करण्यासाठी निवडणूक आयोगाप्रमाणे आमच्याच महाविद्यालयातील काही प्राध्यापकांची समिती असे. त्यांच्याकडून निवडणुकीची तारीख, अर्ज भरण्याची तारीख, परत घेण्याची तारीख, प्रचाराची आदर्श आचारसंहिता, इत्यादि नियम जाहीर होत असत. अर्ज भरले जात, अक्षरशः लोकसभा निवडणुकीसारखी प्रचाराची रणधुमाळी वगैरे होई. मतदान पत्रिकांवर मतदान होई. पांढरी मतदान पत्रिका महाविद्यालयीन स्तरावरच्या २२ जागांसाठी आणि रंगीत मतपत्रिका Class representatives साठी अशी विभागणी असे. त्यासाठी आमच्या कार्यशाळेतली शिक्षकेतर कर्मचारी मंडळी मतपेट्या तयार करीत. आमची प्राध्यापक मंडळीच निवडणुकांची निरीक्षक असत. मतपत्रिकेची पहिली उभी घडी नंतर आडवी घडी, निवडणूक समितीने दिलेल्या विशिष्ट प्रकारच्या पेननेच विशिष्टच ( √ किंवा x ) खूण करून मतदान हा सगळा तामझाम अखिल भारतीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांसारखाच असे.

निवडणुकीत दोन पॅनेल्स असायचीत. विदर्भाच्या विद्यार्थ्यांचे "फ़्रेंडस पॅनेल" आणि विदर्भाव्यतिरिक्त (जळगाव, सोलापूर , कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई) विद्यार्थ्यांचे "शिवाजी पॅनेल". कराडला तेव्हा फ़क्त तीनच शाखांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सोय होती. स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) आणि यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering).  एका शाखेत एका वर्गात साधारण ६० ते ७० विद्यार्थी असे प्रत्येक शाखेचे (७० x ४ =) २८० विद्यार्थी तर तीन शाखांचे मिळून ७०० ते ८०० च्या आसपास एकूण विद्यार्थीसंख्या असे. तेव्हा नागपूर विद्यापीठ कोट्याचे (तेव्हा नागपूर विद्यापीठाच्या अधिक्षेत्रात एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नव्हते. म्हणून नागपूर विद्यापीठ क्षेत्रातील मुलांचा कराड, सांगली, नांदेड, VJTI मुंबई, SPCE मुंबई आणि COE पुणे येथे काही विशिष्ट जागांचा कोटा असे. या सगळ्या ऍडमिशन्स विश्वेश्वरय्या प्रांतिक अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फ़े व्हायच्यात.) प्रत्येक वर्गात १२ विद्यार्थी असायचे. म्हणजे नागपूरच्या विद्यार्थ्यांची ( किमान १२ विद्यार्थी x ३ शाखा x ४ वर्षे) १४४ ते १७० संख्या असे. ७०० - ७५० मध्ये १७० मध्ये आम्ही अल्पसंख्येतच असायचो. पण या निवडणुकांमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांची एकजूट आणि नागपूरव्यतिरिक्त दुस-या गटांच्या काही विद्यार्थ्यांना शेवटल्या क्षणी आपल्याकडे वळवून घेण्याचे कसब खरोखर वाखाणण्याजोगे होते. 

मला आठवतेय १९८९ च्या निवडणुकीत जळगाव आणि सोलापूर गटाचा पाठिंबा आदल्या दिवशी मिळवून आमच्या ’फ़्रेंडस पॅनेल" ने आपला General Secretary (GS) बसविला होता. निवडणुकांच्या आदल्या रात्री खूप उशीरा आमच्या सिनीयर विद्यार्थ्यांनी काहीतरी बैठक घेतली आणि आम्हा सगळ्या नागपुरी मतदारांपर्यंत मतदानाचा पॅटर्न असलेल्या चिठ्ठ्या पोहोचल्यात. General Secretary (GS) आपला आणि Social Gathering Secretary (SGS) त्यांचा बसवायचा असा तो पॅटर्न होता. त्यांच्या पॅनेलच्या सोलापूर आणि जळगावच्या मतदारांपर्यंतही General Secretary (GS) साठी फ़्रेंडस पॅनेल ला मतदान करण्याचे निरोप गेलेत आणि अल्पमतात असतानाही आम्ही टी. व्ही. एस. भट्टात्रिपाद या आमच्या अंतिम वर्षातल्या उमद्या सिनीयरला General Secretary (GS) म्हणून निवडून आणले होते. त्यावर्षी निवडणुकांनंतर शिवाजी पॅनेलमध्ये  हे फ़ुटीर विद्यार्थी आणि निष्ठावंत विद्यार्थी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप रंगलेत.

निवडणूकांसाठी विद्यार्थ्यांच्या खूप सभा वगैरे व्हायच्यात. कॅण्टीनसमोर असलेला पिंपळाचा बांधलेला पार हे स्टेज असायचे. एकापेक्षा एक जोरदार भाषणे व्हायचीत. आज महाराष्ट्रातले ख्यातनाम साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले मिलींद जोशी तेव्हा अगदी बाळासाहेब ठाक-यांसारखीच शाल वगैरे अंगावर पांघरून त्यांच्याच शैलीत "उद्याचा सूर्य उगवणार तो शिवाजी पॅनेलच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच." वगैरे गर्जना करायचेत. गर्दी सगळ्या भाषणांना व्हायची. टाळ्या मिळायच्यात, हुर्यो उडायची. भारतीय निवडणुकांसारखाच एक दिवस आधी जाहीर प्रचार थंडावत असे. मग वैयक्तिक भेटीगाठी, सेटलमेंट वगैरेंवर भर असायचा. एकंदर मोठी मौज असे.

पण तरीही निवडणुका या खूप छान वातावरणात व्ह्यायच्यात. दोन वेगवेगळ्या पॅनेल्समधून एकाच पोस्टसाठी निवडणूक लढवायला निघालेले दोन तरूण बहुतांशी एकत्र चहा पिताना कॅण्टीनमध्ये दिसत असत. कधीकधी ते एकमेकांचे रूम पार्टनर्सपण असत. त्यामुळे राजकीय विरोध हा वैयक्तिक विरोधापर्यंत कधीच जात नसे. ब-याचदा तर एखाद्या पोस्ट साठी हरलेला विद्यार्थी पुढे वर्षभर त्या जिंकलेल्या आपल्या मित्राला त्याच्या कार्यात सल्ला देताना (आणि तो जिंकलेला मित्रही तो सल्ला ऐकून अंमलात आणताना) दिसायचा. हिरीरीने निवडणुका लढवल्या गेल्यात तरी वातावरण अगदी निरोगी असायचे.

व्दितीय वर्षात जाईपर्यंत बरेच समविचारी मित्र जमलेत. मैत्रीमध्ये सारखीच कौटुंबिक पार्श्वभूमी, सारख्या आवडीनिवडी हे जुळून आले. मग कुठेतरी नाशिकजवळच्या ओझरच्या विजय कुळकर्णीचे (आता कै. विजय. २०११ मध्ये त्याचे अपघाती दुःखद निधन झाले.) घट्ट मैत्र नागपूरच्या रामशी जमले, सांगलीचा गायक सतीश तानवडेचे सूर नागपूरच्या नकलाकार रामशी चांगलेच जुळले. आम्हा सर्वांनाच निवडणुकीच्या राजकारणात स्वारस्य नव्हते. निवडणुकांमध्ये भाग घेणारे भावी उमेदवार म्हणून आमच्याकडे बघितले जायचे.  आमच्या अंतिम वर्षात Social Gathering Secretary म्हणून सतीशच उभा राहणार याविषयी आमच्या दुस-या वर्षात इतर मुलांची खात्री झाली होती. विजयचे नाव भावी Magazine Secretary  म्हणून आणि माझे नाव भावी Debating and Cultural Secretary  म्हणून घेतले जात होते. दरम्यान आम्ही सगळेच विद्यार्थी परिषदेच्या कामात गुंतलो होतो. सातारा जिल्ह्याच्या तत्कालीन कार्यकारिणीत आम्हा सगळ्यांना विविध जबाबदा-याही मिळालेल्या होत्या. (याविषयीची गंमत कथा नंतर कधीतरी.)  त्यामुळे महाविद्यालयातल्या निवडणुका लढवायला आम्ही अगदी नाखुषच होतो. पण तृतीय वर्षात त्या लढवाव्या लागतीलच अशीच चिन्हे सगळीकडे दिसत होती.







मग त्यावर आम्ही एक उपाय शोधला. निवडणूक आणि त्याच्याशी संबंधित कामे टाळण्यासाठी आमच्या डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली. आम्ही त्याकाळचे प्रणव रॉय आणि योगेंद्र यादव झालोत. (त्या काळचे हं. त्याकाळी प्रणव रॉय आणि योगेंद्र यादव प्रत्येक निवडणुकांचे सखोल आणि निःष्पक्ष विश्लेषण हे दोघे सादर करायचेत त्यामुळे तेव्हा ते आदर्श होते. प्रणव रॉय दर आठवड्याला The World This Week हा सुंदर कार्यक्रम दूरदर्शनवर सादर करायचेत. आम्ही सगळे तरूण त्या कार्यक्रमाचे फ़ॅन होतो. ) 

आमच्या निवडणूक अधिका-यांची या ओपिनियन पोल साठी आम्ही अधिकृत परवानगी घेतली आणि एक फ़ॉर्मच टाईप करून आणला. त्या दोन पानांच्या "निवडणूक निकाल अंदाज वर्तवा स्पर्धेच्या" फ़ॉर्मवर 

१. General Secretary (GS) कोण होणार ?

२. Social Gathering Secretary (SGS) कोण होणार ?

..

..

..

२३. सगळ्यात जास्त मार्जिनने कोण जिंकणार ?

२४. सगळ्यात कमी मार्जिनने कोण जिंकणार ?

२५. तुमच्या वर्गाचा Class Representative ( C. R. ) कोण होणार ?

वगैरे प्रश्न होते. तो फ़ॉर्म आम्ही आमच्या महाविद्यालयात असलेल्या फोटोकॉपी सेंटरवर (झेरॉक्स सेंटर) ठेवला. निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत सहभागी होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी तो फ़ॉर्म भरून आमच्या रूमवर आणून द्यायचा आणि १ रूपया स्पर्धा सहभाग शुल्क द्यायचे असे ठरले. प्रथम क्रमांकाला १५० रूपयांचे, व्दितीय क्रमांकाला १०० रूपयांचे आणि तृतीय क्रमांकाला ५० रूपयांचे बक्षीस जाहीर केले. त्याबद्दल "निवडणूक निकाल अंदाज वर्तवा स्पर्धा" असे बॅनर्स मुक्तांगण (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) आणि इतरत्र चिकटवलेत. आणि आमची हॉस्टेल रूम प्रतिसादाची वाट पाहू लागली. त्याकाळी आमचा महिनाभराचा सगळा खर्च (मेसबिल वगैरे धरून) ४५० ते ५०० रूपयांमध्ये भागायचा. तेव्हा एक रूपया गुंतवणुकीत १५० रूपये बक्षीस हे प्रलोभन मोठे होते. 

निवडणुकीच्या आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत प्रतिसाद जवळपास नव्हताच. अर्थात या उपक्रमात आमची गुंतवणूक २० रूपयांच्या वर नव्हतीच. (फ़क्त फ़ॉर्म टायपिंगचा खर्च) त्यामुळे आम्ही त्याबाबतीत निश्चिंत होतो. फ़क्त या स्पर्धेला प्रतिसाद मिळायला हवा असे आम्हा तिघांनाही मनापासून वाटत होते.

संध्याकाळी ६ नंतर जबरदस्त प्रतिसादाला सुरूवात झाली. रात्री ११.३० पर्यंत ७५० मतदारांपैकी जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आमच्याकडे वट्ट ७०० रूपये ७०० प्रतिसाद जमा झालेत. आमच्या महाविद्यालयातल्या मुली या सगळ्याच राजकारणापासून दूर रहात असल्याने त्यांच्यापैकी कुणाचा फ़ारसा प्रतिसाद नव्हता. 

७०० पैकी ३०० रूपये बक्षीसात वाटल्यानंतर आम्हा तिघांच्या वाटेला उरलेले ४०० रूपये येणार असल्याने आम्ही खुष होतो. Cambridge कंपनीचा Gold शर्ट त्याकाळी १५० रूपयात येत असे.  Cambridge च्या शोरूम समोरून जाताना तसला शर्ट विकत घेण्याची एकमेकांची मनिषा तिघांनाही माहिती होती. लगेचच तो विकत घेण्याची नामी संधी आम्हा तिघांनाही चालून आलेली होती. त्यामुळे आम्ही हरखलो होतो पण..

त्यापेक्षाही एक नामी गोष्ट त्या रात्री आम्हा तिघांच्याही लक्षात आली. निवडणूकीत मतदार संख्येच्या २.५ टक्के ते ३ टक्के मतदारांचा कौल ही योगेंद्र यादव, प्रणव रॉय सारखी Psephologist मंडळी गोळा करतात आणि त्यावर आपले निवडणूक निकाल अंदाजाचे कार्यक्रम चालवतात. आमच्याकडे उद्याच्या निवडणूकीतल्या ९० % मतदारांचा कौल आमच्या हातात होता. उद्याच्या निवडणुकीतले सगळे निकाल आदल्या दिवशीच आमच्या हातात होते. आम्ही सगळे फ़ॉर्म्स चाळलेत. उद्याच्या निवडणूकीत कोण जिंकणार ? कुठल्या पोस्ट वर धक्कादायक निकाल लागणार ? याची सगळी माहिती आमच्याजवळ होती. फ़क्त सगळ्यात जास्त मार्जिन आणि सगळ्यात कमी मार्जिनने जिंकणा-या उमेदवाराची होती.

निवडणूका झाल्यात. त्याच्या पुढल्या दिवशी मतमोजणी होती. मतमोजणीही भारतीय निवड्णूक आयोगाप्रमाणे, उमेदवाराचा प्रतिनिधी, काऊंटिंग टेबल्स, प्रत्येक टेबलवर निरीक्षक अशा पद्धतीने मोठ्ठ्या ड्रॉइंग हॉलमध्ये व्हायची. आम्ही आमच्या निवडणूक निकाल अंदाज स्पर्धेच्या निमित्ताने अधिकृत परवानगी काढून आत प्रवेश मिळवला. अधिकृतरित्या सर्वाधिक मार्जिन, सर्वात कमी मार्जिन याबाबत आकडे आम्हाला आमच्या निवडणूक आयोगाकडूनच मिळाले असते. आणि तेच प्रमाण मानून बक्षीसे द्यायची होती.

आमच्या माहितीप्रमाणेच निकाल लागलेत. साहजिकच ७०० पैकी बहुतांशी मुलांची सगळी उत्तरे बरोबर होती. विजयी उमेदवार ठरला तो "सर्वात जास्त मार्जिन" आणि "सर्वात कमी मार्जिन" अचूक वर्तवणारा विद्यार्थी.

Psephology विषयी आकर्षणातून केलेला पहिला प्रयोग यशस्वी ठरला. आम्ही निवडणूकीच्या राजकारणातून स्वतःला अलिप्त ठेवण्यात यश मिळवले, उद्या होणा-या निवडणूकांचे निकाल आदल्याच दिवशी कळल्याचे सुख अनुभवले आणि स्वतःसाठी स्वकमाईतून एक एक Cambidge Gold चा शर्टही मिळवला.


- तरूण Sephologist रामेंद्र रॉय यादव.

No comments:

Post a Comment