Thursday, December 10, 2020

भारतीय रेल्वे: एकात्मता आणि कुरघोड्याही.

वाटवा, कृष्णराजपुरम, इज्जतनगर, अरक्कोणम, अजनी, मौला अली, बण्डामुण्डा, भगत की कोठी, इथल्या आणि यांसारख्या असंख्य छोट्या विभागातल्या नागरिकांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले पाहिजेत. भारतीय रेल्वेमुळे त्यांना एक राष्ट्रीय ओळख प्राप्त होऊ शकली आहे. भारतीय रेल्वे या ठिकाणांच्या एंजिन शेडसना अनुक्रमे अहमदाबाद, बंगलूरू, बरैली, चेन्नई, नागपूर, हैद्राबाद, राऊरकेला, जोधपूर अशी नावे सहजच देऊ शकली असती पण भारतीय रेल्वेने त्या त्या शहरातील या छोट्या विभागांचे नाव आपल्या एंजिनांव्दारे भारतभर नेले. प्रचलित केले.


भारतासारख्या खंडप्राय देशात राष्ट्रीय एकात्मता सुस्थापित करण्याचे फ़ार मोठे आणि अवघड काम रेल्वे अखंड करीत असते. मालदा टाऊन चे एखादे एंजिन २००० किमी दूर पार पश्चिमेकडल्या टोकात हाप्याला सापडू शकते आणि उत्तरेकडे असलेल्या लुधियाना शेडचे एंजिन पार श्रीलंकेच्या व्दाराशी असलेल्या रामेश्वरमलाही सापडू शकते.


त्याचबरोबर प्रांतवादही भारतीय रेल्वेच्या संचालनात, तुरळक का होईना, बघायला मिळतो. मध्य रेल्वेत कायम प्राधान्याची वागणूक मिळत असणारी विदर्भ एक्सप्रेस, इतवारी या नागपूरच्या उपनगर असलेल्या पण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे्च्या अखत्यारित असलेल्या जागी गेली की तिला मिळणारी वागणूक एकदम बदलते. जयपूर - चेन्नई सुपर एक्सप्रेस जयपूर ते भोपाळ हा प्रवास पश्चिम रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे या आपल्या राज्यातून करताना राणीसारखी प्रवास करते पण भोपाळपुढे हबीबगंजला तिचे जणू राज्यच खालसा होते.


बरीच अशी उदाहरणे आहेत.


- रेल्वे गाड्यांच्या राज्यातल्या राजा आणि राण्यांचा (नेहमीच अखिल भारतवर्षीय विचार करणारा) राजपुत्र.  




No comments:

Post a Comment