Saturday, May 24, 2025

अनुबंध: सजीव आणि निर्जीवांशी सुद्धा

 प्रत्येक जागेच्या काहीकाही vibesअसतात. आठवडी बाजाराच्या तर विशेषच.


जन्मापासून तारूण्यापर्यंत नागपूरच्या महाल भागात आयुष्य घालवल्याने महालच्या बुधवार बाजाराविषयी विशेष जिव्हाळा होता. त्यातही कांदे बटाटे एका विशिष्ट विक्रेत्याकडून, फळभाज्या एक दोन विशिष्ट जणांकडूनच, पालेभाजी एका विशिष्ट माणसाकडूनच, भाजीच्या accessories (सांबार, आले, लिंबू, मिरच्या गोडलिंब वगैरे) एका विशिष्ट जागेहूनच अशी बरीच वर्षांची सवय होती.

शिक्षणासाठी, नोकरीसाठी मधली १७ - १८ वर्षे बाहेरगावी घालवल्यानंतर पश्चिम नागपूरमधल्या घरी स्थलांतरित झालो तरी दर रविवारी भाजी घ्यायला महालातच जात होतो. तिथे गेल्याशिवाय भाजी घेतल्यासारखे वाटतच नव्हते. तिथे मोठी इमारत उभी करण्यासाठी तिथला जुना बाजार पाडला तेव्हा घरातली कुणीतरी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यासारखा मी शोकाकूल झालो होतो. आता महालात गेलो तरी त्या नवीन चाललेल्या बांधकामाकडे हल्ली एक नजरसुध्दा टाकावीशी वाटत नाही.

नागपूरच्या महाल बाजारासारखाच चंद्रपूरचा गोल बाजार मला अत्यंत प्रिय आहे. बालपणी सुट्यांमध्ये उन्हाळेच्या उन्हाळे आणि सगळ्या दिवाळी सुट्या आजोळी, चंद्रपूरला घालवल्यामुळे माझा आणि गोल बाजाराचा हा ऋणानुबंध दृढ झालेला आहे. आजही मी चंद्रपूरला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा काम असो नसो, गोलबाजारातून एक चक्कर मारून येतो, माझे हरवलेले बालपणाचे दिवस जगून घेतो.

सांगोल्यातल्या बैल बाजाराच्या मैदानावर भरणारा रविवारचा आठवडी भाजीबाजारही तसाच माझ्या मनात घर करून आहे. सांगोल्यात आमचे वास्तव्य उणेपुरे ३० च महिने होते पण तो बाजार मनात अजूनही तिथे मिळणार्या भाजीसारखाच ताजा आहे.

मनात तसाच ताजेपणा सोलापूरच्या नवी पेठेतल्या बाजाराचा आहे.

१० वर्षांपूर्वी नागपुरात परतलो आणि मग सोनेगावच्या गुरूवारच्या आठवडी भाजी बाजारात जाणे होऊ लागले. गेली ३ - ४ महिने नेमके गुरूवारी संध्याकाळी असे काही काम निघायचे की त्या बाजारात जाऊन भाजी आणणे व्हायचेच नाही. काल खूप दिवसांनी भाजी आणायला तिथे गेलो तेव्हा जाणवले की बर्याच कालावधीनंतर भेटणार्या जिवलग बालमित्रासारखा हा बाजार नव्याने मला भेटतो आहे. त्याला भेटून मला आणि मला भेटून त्यालाही खूप खूप आनंद झालेला आहे. काल परतताना पिशवीत नुसती भाजीच नाही तर मनात एक नवा ताजेपणा घेऊन परतलो होतो.

- एकदा आपले म्हटले की कितीही वर्षांनी भेटलोत तरी मधली काही वर्षे नसल्यासारखीच, तो अनुभव पुसून टाकत, नव्याने पण जुन्याच संदर्भांसह भेटणारा,

व्यावहारिक जगाच्या दृष्टीने असला अव्यवहारी वागणारा

आणि

सजीव व निर्जीव सृष्टीच्याही vibes शी स्वतःच्या vibes कायम जुळवत असणारा एक अत्यंत संवेदनशील माणूस

प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

1 comment:

  1. विविध रंगाच्या भाज्या आणि फळे बघून खूप आनंद होतो. विक्रेते मामा आणि मावश्या यांच्याशी बोलून समाधान वाटते

    ReplyDelete