Sunday, August 31, 2025

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते

समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकातला हा श्लोक.


"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे

अकस्मात तो ही पुढे जात आहे

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते

म्हणोनी जनी मागुता जन्म घेते."


या जगातल्या मानवी जीवनातल्या अनित्यतेचे चिंतन आणि हे जीवन अनित्य आहे हे जाणून घेऊन या जगात कसे वागायचे हे चिंतन या श्लोकातून आलेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परवा महाविद्यालयातून परतताना गाडीत हे श्लोक लागले होते. त्यातल्या "पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते" या ओळींनी माझे मन वेधून घेतले आणि चिंतन सुरू झाले.


हे जग कर्मभूमी आहे. इथे कुठलेही कर्म न करता, अकर्मण्य अवस्थेत कुणीही राहू शकत नाही. आणि सगळ्या सहेतूक, अहेतूक कर्मांचे चांगलेवाईट फ़ळ आपल्याला मिळतच असते. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजाननविजय ग्रंथात "मागील जन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे, ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे" हा संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा उपदेश लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे कर्मे आणि त्यांची फ़ळे यातून मनुष्याची सुटका नाही. आणि कर्माची फ़ळे भोगीत राहण्यासाठी वारंवार जन्म घेत राहणे यातूनही सुटका नाही. जगदगुरू शंकराचार्यांनी "पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम" या ओळींद्वारे या वारंवार जन्म घेणे आणि मृत्यू पावणे या फ़े-यातली भयानकताच विषद केलेली आहे. कारण पुढला जन्म कुठला मिळेल ? हे आपल्या हातात नाही. त्या जन्मात आपल्या देहाला भगवंताचे स्मरण, अनुसंधान राहीलच याची खात्री नाही. मग आपली साधना पूर्णत्वाला जाईपर्यंत, आपण कायमचे भगवंत चरणी सामावून जाईपर्यंत या मृत्यूलोकात जन्म मरणाचे किती फ़ेरे घ्यावे लागतील याच्यावर आपले कसलेही नियंत्रण नसणे ही अत्यंत भयावह आणि भगवत्भक्तांच्या हृदयाचा थरकाप उडवणारी अवस्था आहे.


मग यावर उपाय श्रीमदभगवतगीतेत, श्रीमदभागवतात प्रत्यक्ष भगवंताने सांगून ठेवलेला आहे. अनेक जन्मांना कारणीभूत होणारी कर्मे करणे जर आपण टाळू शकत नसू तर किमान ती कर्मे भगवंताच्या स्मरणात करू, त्याला ती कर्मफ़ळे अर्पण करून आपण श्रीमदभागवतात सांगितलेल्या "नैष्कर्म्य" अवस्थेत जाऊ. त्यासाठीचे पथ्यच श्रीसमर्थांनी या मनाच्या श्लोकात सांगितले आहे. जर आपल्याला अशा "नैष्कर्म्य" अवस्थेत जायचे असेल तर लोभ आणि क्षोभ या दोन्हीहीपासून आपल्याला दूरच रहावे लागेल. 


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा एक दृष्टांत आहे. ते म्हणायचे, स्टेशनवर गाडी पकडायला जाताना एखाद्या गृहस्थाशी भांडण झाले म्हणून गाडी चुकली काय ? किंवा स्टेशनवर जाताना एखादा मित्र भेटला आणि त्याच्यासोबत सुखाच्या चर्चेत गाडी चुकली काय ? दोन्हींचा परिणाम एकच झाला; गाडी चुकली.


तात्पर्य आपण एकवेळ क्षोभावर मात करू शकू पण इथल्या वस्तूंच्या ममतेवर, लोभावर मात करणे कठीण आहे. मोठमोठ्या योगी पुरूषांना अखेरच्या क्षणी झालेल्या लोभामुळे त्यांच्या साधनेतले तेवढे न्यून पुरे करायला पुन्हा जन्म घ्यावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. श्रीमदभागवतात वर्णन केलेल्या जडभरताची कथा अशीच. म्हणून श्रीसमर्थ आपल्याला आधीच जागृत करत आहेत. मृत्यूच्या पथावर चालणे या जगात कुणीही चुकवू शकलेला नाही. आज एक तर उद्या आपण हे नक्की आहे. किंबहुना या जगात तेच आणि तेव्हढेच नक्की आहे. म्हणून या जगात आपल्या मनात कुणाविषयीही अपुरा क्षोभ तर नसावाच पण कुणाहीविषयी असा पूर्ण न होणारा लोभसुद्धा नसावा. "हे होऊच नये" असे म्हणणे योग्य नाही तसेच "हे झालेच पाहिजे" असेही म्हणणे योग्य नाही. जे होतेय ते त्या सृष्टीनियंत्याच्या मनाप्रमाणे होतेय हे समजावे. आपण फ़क्त साक्षीभावाने त्याकडे बघावे. त्याविषयी क्षोभ किंवा लोभ ठेऊन त्यात अडकून राहू नये. तरच ते कर्म आपल्याला चिकटणार नाही आणि कर्मांचा हा बॅलन्स बरोबर झाला की "पुनरपि संसारा येणे नाही" ही सकल जीवमात्रांची अत्त्युच्च अवस्था आपण गाठू शकू.


- प्रभातचिंतन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर भाद्रपद शुद्ध अष्टमी, ३१ / ८ / २०२५



Wednesday, August 27, 2025

बाजरीची भाकरी आणि अमूल बटर वगैरे

आत्ता एका फूड व्लाॅगरची रील बघत होतो.

उत्तर कर्नाटकात कुठेतरी तो अगदी authentic कन्नड जेवण करीत होता.
केळीच्या पानावर छान जेवण. "ग्रीन व्हेजिटेबल विथ दाल" असे वर्णन केल्यानंतर लगेच जाणवले की "अरे, ही तर आपली वैदर्भिय दाळभाजी" !
मोकळी दाळ वगैरे चटणीवर्गीय प्रकार तिथे वाढलेले होते पण त्याने "I don't know what it is" असा शेरा मारून अगदीच अरसिकतेने अक्षरशः गिळून टाकलेत. "त्या रात्री तो पोटातल्या गॅसने हैराण झाला असणार." हा एक विचार माझ्या मनात आला एव्हढंच.
कहर म्हणजे बाजरीच्या छान, मस्त फुलक्यांवर त्या हाॅटेलवाल्याने त्याला अमूल बटरचा एक छोटासाच चौकोनी तुकडा वाढला. त्या अज्ञानी माणसाने तो तुकडा बाजरीच्या त्या गरमागरम फुलक्यावर चोळला आणि तो फुलका खाल्ला.
त्याक्षणीच त्या फूड व्लाॅगरला, जुन्या संगीत नाटकांमधल्या नटांसारखे "हा, मूढा भरतकुलोत्पन्ना" असे म्हणावेसे वाटले. अरे! बाजरीच्या फुलक्यासोबत बटर ? त्यापेक्षा बासुंदीसोबत बनपाव खाल्ला असतास तर ते क्षम्य होते. बाजरीच्या गरमागरम फुलक्यावर अस्सल बेळगावी लोणी कढवून काढलेले दाणेदार, रवाळ तूप घ्यायचे असते रे. नसेल परवडत तर त्या फुलक्यावर लाकडी घाण्यातून काढलेले, मस्त शेंगदाण्याचा वास असलेले, अस्सल फल्लीतेल (शेंगदाणे तेलाला parallel वैदर्भिय शब्द) कच्चेच घ्यायचे असते रे.
बटरचा तुकडा हा पावभाजीचे टाॅपिंग म्हणून किंवा पावभाजीच्या पावाला लावून खायला ठीक आहे. बाजरीच्या फुलक्यासोबत तो खाणे हे बघणार्यालाही (लाक्षणिक अर्थाने) पचत नाही आणि खाणार्यालाही (खर्या अर्थाने) पचत नाही.
- खाण्याच्या बाबतीत सगळे कुळधर्म नीट पाळणारा, बेळगावी लोण्याइतकाच स्निग्ध आणि बेळगावी कुंद्याइतकाच गोड स्वभावाचा, रा(व)म साहेब किन्ही(हरि)हर.

Sunday, August 24, 2025

काटा रूते कुणाला ?

चंद्रपूरला जाणा-या वातानुकूलित बसमध्ये तो शिरला तेव्झ बस सुटायला अवकाश असला तरी बहुतेक मंडळी बाहेरच्या रणरणत्या उन्हापेक्षा आतच आरामशीर बसलेली होती. वास्तविक खाजगी कंपन्यांचे पेव फुटुन त्यांच्यात स्पर्धा सुरू झाल्यानंतर संपूर्ण भरलेली बस हे दृश्य दुर्मिळ झाले होते. खाजगी गाड्यांच्या पोऱ्यांची प्रवाशी मिळवण्यासाठी काशीच्या पंड्यांशी स्पर्धा करणारी धावपळ पाहून तो कुठेतरी सुखावत होता. त्याला त्याच्या बालपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याच्या सुट्या, आजोळी जाण्याचे एक महिना आधीचा बेत, मोजक्याच एस. टी. गाड्या, ८ दिवस आधी रांगेत उभे राहून वेळप्रसंगी ३ तासाच्या प्रवासासाठी ३ तास उभे राहून मिळवलेली आरक्षणे, ती विजयी मुद्रा. सगळं आठवून त्याचं त्यालाच हसू आलं.



५, ६ रांगा टाळत तो आसनांपाशी आला. तिथे आधीच कुणीतरी बसलं होतं. त्याच्या मिशांमधून पुन्हा हसू ओघळलं. मुद्दाम आरक्षण करून उशिरा बसमध्ये चढायचं आणि आपल्या आसनावर बसलेल्या माणसांवर रुबाब दाखवत त्यांचा 'मोरू' करायचा ह्या गोष्टीत तो तरुण असताना त्याला विलक्षण आनंद व्हायचा. पण आता ? "आपलं एवढं वयोमान झालं." त्यानं विचार केला, "तरीही तश्शीच मजा अजूनही येते." यातल्या ’आपलं वयोमान झाले' या विचाराशी तो थबकला. छे ! आपण एवढे काही म्हातारे दिसत नाही काही ? हं आता केस थोडे पांढरे झाले असतील. चाळीशीही नाकावर असेल. पण एकंदर पूर्वीचा रुबाबदारपणा कायम आहे. परवा कुणीतरी बोलताना म्हणालं देखील की हा चष्मा तुम्हाला शोधून दिसतोय म्हणून. केससुद्धा आज कसे अगदी स्टाईलमध्ये.....


"तुमचा सीट नंबर काय?" अचानक त्या बसलेल्या व्यक्तीने प्रश्न विचारला आणि त्याची विचारशृंखला तुटली.


त्यानं तिच्याकडे बघितलं आणि अक्षरशः हादरून, स्वप्न बघितल्यासारखाच तो बघत राहिला. तिनंही बहुधा त्याला तेव्हाचं नीट बघितलं. ती सुद्धा त्याच्याकडे विस्कारित नेत्रांनी बघत राहिली.


"तू ?” ती जवळ जवळ किंचाळलीचं


"तू?" नेमका तोही त्याचवेळी ओरडला.


"अरे आहेस कुठं ? करतोस काय ? आज इकडे कसा ? आणि अचानक ?"


"अगं हो! हो ! पहिले मला नीट बसू तर देशील. आणि हे सगळे प्रश्न मीच तुला विचारायला हवेत." 


"छे ! छे! लेडिज फर्स्ट"


"वा ! प्रश्न विचारताना 'लेडिज फर्स्ट' म्हणे आणि उत्तरे देताना ?"


"तस्साच भांडकुदळ आहेस अजून. झालं."


एव्हाना त्या बसमधलं इस्त्रीचं वातावरण बिघडलं होतं. अनेक भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पुढल्या आसनांवरच्या काही मााना १८० अंशच्या कोनांमधून वळल्या होत्या. त्यासरशी दोघंही ओशाळले. खिडकीशी ती सरकून बसली आणि तो तिच्या शेजारी.


"गाडी फक्त जांबला थांबेल" कंडक्टरने दार लावून घेता घेता पुकारा केला. बस सुरू झाली.


"कुठे जातोयसं ?"


"आवारपूरला जातोय. अगं माझ्या मोठ्या मुलाला तिथे जॉब मिळालाय ना ? त्याला भेटायला."


तिनं त्याच्याकडे पाहिलं. खरंच की ! हा एवढ्या मोठ्या पोराचा बाप झालाय. आपलीही पन्नाशी फारशी दूर नाही. केवढा काळ गेला नाही मधे !


"किती वर्षांनंतर भेटतेस गं ?" ती विचारात गढली असताना त्याने प्रश्न विचारला. तिला आश्चर्य वाटलं. हा मनकवडा वगैरे आहे की काय ? "आणि तू कुठे जातेयसं ?"


"चाल्लेय चंद्रपूरला. माझ्या मुलीसाठी स्थळ आलंय तिथलं. जरा चौकशी करून येते. ह्यांना वेळच नाही नं. अजिबात, म्हणून आपली एकटीच."


"कॉलेज सोडल्यानंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय न गं ? मधे तू पत्रंही पाठवलं नाहीस. हं! सोडताना मारे आपण वचनं, शपथा घेतल्या होत्या. नंतर विसरलीस ? तशी तू काय म्हणा....." पुढलं वाक्य त्यानं अर्धवटच सोडलं होतं. ती मात्रा अस्वस्थ होऊन खिडकीबाहेर पाहू लागली होती. एव्हाना बस गावाबाहेर पडली होती.


तो सुद्धा अस्वस्थ झाला. "एवढ्या वर्षांनी बिचारीची भेट होतेय आणि आपण पुन्हा तस्सेच हट्टी."


बराच वेळ शांततेत गेला. कंडक्टर येऊन तिकीटं तपासून निघून गेला होता. दोघंही सीटवर माना टेकवून झोपल्याचा आभास निर्माण करत होते. पण मनातली खळबळ चेहेऱ्यावर दोघांनाही लपवता येत नव्हती.


कॉलेजचे दिवस. मोरपीस गालांवरून फिरून जावं तसले दिवस. अतिशय हळुवार भावनांचे तरंग मनाच्यां त्या सरोवरात नुसत्या हवेच्या झुळुकीने उठायचे दिवस कॉलेजला असताना..


"पुण्यावरून कधी आलास, बाय द वे ?" तिच्या प्रश्नाने त्याची तंद्री पुन्हा भंगली.


"अं ? अगं पुण्याला माझी फॅमिली फक्त असते. मी हल्ली मुंबईत असतो. आज सकाळीच विदर्भ एक्सप्रेसने आलो आणि लगेच स्टॅण्डवर."


"हे रे काय ? घरी नाही का यायचं ?"


घरी येऊन तरी आपली चुकामूकच झालेली बघायची नं ? आणि तुझा लग्नानंतरचा पत्ता कुठाय मायाकडे ? साधी पत्रिकापण पाठवली नाहीस ?" तो अगदी वय विसरून २०-२५ वर्षांपूर्वीच्या गोष्टींवर तावातावात भांडायच्या पावित्र्यात आला होता. तिचा हिरमुसलेला चेहेरा पाहून मात्र तो वरमला "बाय द वे, वाय करतात तुझे मिस्टर ?"


"सध्या अमरावतीला असतात. इंजीनियर आहेत. पण मी आणि मुलं नागपूरलाच असतो." 


"आणि मुलं किती ?" तो बराच ’नॉर्मल’ला आलाय हे त्याच्या आवाजावरून जाणवत होतं.


"अरे दोन्ही मुलीचं. थोरली यंदाच एम. कॉम. झाली. धाकटी मेडिकलला. अजून शिकतेय. ए ! मीच मघापासून बडबडतेय. तुझ्याविषयी सांग ना."


"माझ्याविषयी ? हं! काय सांगणार ? मधल्या इतकी वर्षांनी आपल्याला एकमेकांपासून एवढं दूर नेलं की एकमेकांच्या संगतीत जीवन घालवण्याच्या शपथा विसरून आपण एकमेकांच्याच जीवनाविषयी विचारतोय. सांगतो. सदगुणी, सुंदर बायको आहे. एकच मुलगा जाहे. दोन वर्षांपूर्वी आपल्याच कॉलेजमधून इंजीनियर झाला आणि आवारपूरला लागलाय."


"छान ! बापाचं नाव मुलानं काढलं तर ! ए, बाकी तू अजूनही गातोस वगैरे का रे?"


बराच वेळ तो गप्प होता. बहुधा शब्दांची जुळवाजुळव करत असावा. मोठा सुस्कारा सोडून, विचारांना पूर्णविराम देत तो म्हणाला "खरं सांगू? तू निघून गेल्यानंतर मैफिलीतली सतार जी अबोल झाली ती कायमचीच. मैफिल विस्कटली ती विस्कटलीच. आताशा् तंबो-याची गवसणीसुद्धा काढत नाही मी वर्षानुवर्ष. खरंच गेले ते दिन गेले. 


वर्षा ! आठवते तुला माझी ती शेवटली मैफिल ? ’लाख चुका असतील केल्या.....' गाण्यातून तू मधूनच उठून गेलीस. खरंच वर्षा. अगं, जीवनाच्या पहाटे एखादं सत्य, सत्य वाटलं म्हणजे ते अगदी तसंच संध्याकाळी ही वाटेल असं नाही. सुरूवातीला असंच वाटलं होतं गं. पण तुला अजूनही विसरू शकलो नाही. सुखी संसाराच्या ह्या वाटचालीत कधीकधी जुन्या आठवणींचे सल असे बोचतात. थांबून थोडं मागे पहायला लावतात आणि मग वर्षा, तुझ्या नावाचं वळण आपोआप येतचं गं" बोलताना त्याला धाप लागली होती. त्याचा आवाजही कापरा झाला होता.


"शांत हो अभि. शांत हो. अरे या सगळ्या गोष्टी आत्ता पुन्हा बोलायलाच हव्यात कां ?"


अभिजित थोडा सावरला "बघ. अजून तशीच निगरगट्ट आहेस. भावनेच्या भरात अजिबात वहात नाहीस."


बस जांबच्या स्टँडमध्ये शिरली होती. फक्त तो उत्तरला, परतताना हातात एक मोठं कागदी पुडकं होतं.


"काय आणलंस ? बघू ?"


"समोसे आहेत. तुला आवडतात नां."


आता मात्र तिला भडभडून आलं. अजूनही ह्याचं आपल्या आवडी निवडी जपणं सुरूच आहे ? नकळत ह्या विचाराने मनात आणि अश्रुंनी डोळ्यात दाटी केली होती. न संकोचता तिने ते अश्रू ओघळू दिले.


बस पुन्हा सुटली होती. समोसे संपेपर्यंत कुणीही बोलत नव्हते.


"तू कशी आहेस ?" त्यानं थोड्या काळजीनं विचारलं.


"तशी सुखीच आहे. हे चांगले आहेत म्हणजे शांत, मनमिळावू वगैरे. मुलीसुद्धा छान आहेत. तुझ्यासारखंच अगदी. ए, तू नागपूरला परत कधी येतोयस? ए, रहायलाच ये ना एक दिवस आमच्या घरी. सगळ्यांशी तुझी ओळख होऊन जाईल."


"होऊन जाईल" ला तो सातमजली हसला. तो पुण्याचा आणि ती अस्सल वऱ्हाडी. त्यामुळे कॉलेजला असतानाच तिच्या 'करून राहिले, घेऊन राहिले' अशा शब्दप्रयोगांना तो असंच सातमजली हसायचा. त्याच्य असल्या हसण्याने तिचा कावराबावरा झालेला चेहरा बघून आणखीनच त्याला हसायला यायचं.


"तसं माझं नक्की नाही गं. त्यातून चिरंजिवांनी परस्पर बल्लारपूर-मुंबई रिझर्वेशन केलं असेल तर कठीण आहे."


पुन्हा बराच वेळ दोघंही गप्प होते. वरोरा मागे पडलं होतं. भद्रावतीची लालभडक कौलारू घरं दिसायला लागली होती.


"अभि, हे सगळं लौकिक, ऐश्वर्य, हे सुख, म्हणजे खर समाधान असतं का रे ? किती वेगळ्या कल्पना होत्या नाही आपल्या; आपण कॉलेजात असताना ? खरंच आपणच बदलतो की ती सगळी गद्धेपंचवीशी असते रे?"


तो काहीच बोलला नाहीं. जीवनप्रवास एकत्रे करण्याची शपथ घेतलेले ते दोन जीव 'यथा काष्ठं च काष्ठ च" प्रमाणे कॉलेजनंतर प्रवाहातून वेगळे झाले होते. कॉलेजात असताना वर्षा म्हणजे अभिजितच्या मैफिलीचा प्राण होती आणि तो आपल्या गोड गळ्यामुळे कॉलेजच्या सगळ्या स्वप्नाळूच्या गळ्यातला ताईत. दोघांचं जोडीनं फिरणं, सिनेमाला जाणं वगैरेमुळे कॉलेजात दोघांच्याही नावाची चर्चा होतीच. वर्षासारख्या हि-याला  अभिजितसारखंच कोंदण हवं यावर सगळ्यांचं एकमत होतं. नकळत एकामागून एक दाटी केलेल्या विचारांनी तो अस्वस्थ झाला. मनाच्या बंद, पारदर्शी खिडकीवर जुन्या आठवणीचे थेंब ओधळून जात होते. तो नुसता फुलून गेला होता.


बस आता चंद्रपुरात शिरली होती.


"ए, मी पाण्याच्या टाकीजवळच्या स्टॉपवर उतरते. हा माझा पत्ता, नागपूरला आलास की नक्की ये. मी उद्याच परत जातेय.


"एक मिनीट, वर्षा, एक प्रश्न गेली पंचवीस वर्ष माझ्या मनात सलत्तोय तेवढा तू मला आज विचारू दे." त्याचा आवाज त्याच्याही नकळत कापरा झाला होता.


"त्या दिवशी तू मला विचारल्यावर मी तुला नकार का दिला? हाच न तो प्रश्न ?"


"हूं."


"अभिजित अरे त्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी गेली पंचवीस वर्षे होती. काही क्षण काही आठवणी फार सलतात रे. मी पहिल्यापासून थोडी निष्ठुर आणि दगड मनाची. पण तू भावनेत लगेच वंहावत जायचास पण आज जाणवतंय मी वेदना भोगत असताना हा विचार तरी करू शकले की तू सुद्धा तेच भोगत असशील. तू तो विचारसुद्धा करू शकला नाहीस. हे लौकिक समाधान सगळं वरवरचं आहे रे. आत अंतर्मनातला आवाज माझ्याविरुद्धच कधी बंड करून उठतो. पण तू? तुला तो आवाज कधी जाणवलाच नाही. जीवनात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे गाईडसारखी तयार मिळत नाहीत, जाऊ दे. तू फार आत्मकेंद्रित होतास आणि आहेसही. एनीवे, मी चलते."


स्टॉप आला होता. ती उतरली. तो बघत असतानाच तिने रिक्षाला हात केला "गांधी चौक चलो"


रिक्षात बसताना तिने डोळ्यांना लावलेला रुमाल आणि मागे वळून न पहता निरोपादाखल हलवलेला हात त्याच्या मनात घर करून होता.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


ही कथा दै. तरूण भारत नागपूरच्या रविवारी प्रकाशित होणा-या "विविध विषय विभाग" या पुरवणीत दिनांक २७ नोव्हेंबर १९९४ रोजी प्रकाशित झालेली आहे.




Friday, July 4, 2025

आयसेनहॉवर मॅट्रिक्स आणि भेदरलेले, धांदरलेले आम्ही

आज आमच्या VNIT मधल्या प्रशिक्षणानंतर मी सध्या VNIT मध्येच काम करणार्या एका सहकर्मीकडे गेलो होतो. त्यांची सुंदर, कलात्मकरित्या सजवलेली केबिन मी बघतच राहिलो. त्यातलेच हे एक "आयसेनहाॅवर मॅट्रिक्स" माझ्या दृष्टीस पडले.

यापूर्वीही अनेकदा मी हे मॅट्रिक्स बर्याच पुस्तकांमध्ये, भाषणांमध्ये आणि बर्याच मानव विकास वर्कशाॅप्समध्ये ऐकले आणि बघितले होते.

हे कामांचे वर्गीकरण मला पटते. महत्वाच्या आणि तातडीच्या कामांना कायम प्राधान्य देऊन महत्वाच्या पण विना तातडीच्या कामांना क्रम देऊन नंतर करायचे ठरविणे.
बिन महत्वाच्या पण तातडी असलेल्या कामांना दुसर्यांकडे सोपविणे आणि बिन महत्वाचे आणि बिन तातडीचे काम सरळ टाळायचे असे हा आयसेनहाॅवर सुचवतो. कागदावर दिसायला हे मॅट्रिक्स अगदी आदर्श वाटते.
पण आमचा मुळातला स्वभावच इतका पापभिरू, भित्रा आणि धांदरट आहे की पुढ्यातली सगळीच कामे आम्हाला महत्वाची आणि तातडीची वाटतात. आता काय करायचे ? आमच्याकडून कुठल्याही कामाचे "बिन तातडीचे" किंवा "बिन महत्वाचे" असे वर्गीकरण होतच नाही. आपल्याला करावी लागणारी सगळी कामे महत्वाची आणि तातडीची असतात यावर आमचा अत्यंत दृढ म्हणावा तसा विश्वास आहे.
मग हे "आयसेनहाॅवर मॅट्रिक्स" कसे आचरणात आणायचे ? हाच सध्या आमच्यापुढला 'क्रायसिस' आहे.
- पुस्तके वाचायला आवडणारा पण त्याहूनही प्रॅक्टीकल जगायला आवडणारा एक साधा मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, July 3, 2025

बॉलीवूडच्या गाण्यांमधले हिंदी, उर्दू, पंजाबी शब्द आणि आम्हा मराठी मुलांचा होणारा गोंधळ

आधीच आपल्याला ऊर्दू मिश्रित हिंदी कळत नाही. "मकसद" हे सिनेमाचे नाव वाचून मराठीत एक "अबकडई" या नावाचे नियतकालिक निघायचे तशातला हा काही प्रकार असेल असे आम्हाला वाटले होते. त्यामुळे "दीदार ए यार", "मुगल ए आजम" वगैरे नावे कळण्याचा प्रश्नच नव्हता. मुळात अशा ऊर्दू नावांचा अर्थच कळण्याची बोंब तर मग टाॅकीजमध्ये जाऊन तो सिनेमा पाहण्याची एवढी तसदी कोण घेणार ?

तसेही त्याकाळी टाॅकीजमध्ये शिरल्यानंतर तेव्हाच्या सिनेमांचा आवाज त्याकाळच्या टाॅकीजेसमध्ये एवढ्या मोठ्यांदा घुमायचा की सुरूवातीचे काही मिनिटे एकही डाॅयलाॅग ऐकू येत नसे. टाॅकीजमधल्या अंधाराला आपले डोळे आणि आवाजाला आपले कान सरावलेत की मग सिनेमा नक्की काय आहे ? हे थोडेथोडे समजू लागायचे.
याच अजाणतेपणाने एकदा घरी "आप जैसा कोई, मेरे जिंदगीमे आएँ, तो बाप बन जाएँ" असे मोठ्याने गाताना "आचरट कार्ट्या" म्हणून थोबाड रंगवून घेतल्याची आठवण अजूनही ताजी आहे. "अहो ते सिनेमावाल्यांनीच ते गाणे तसे लिहिलेय यात माझा काय दोष ?" हा माझा निरागस प्रश्न तेव्हा कुणीही ऐकलेला नव्हता.
९० च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी सिनेमांवर पंजाबी शब्द आणि प्रथांनी आक्रमण केले. त्यामुळे आमच्यासारख्या मराठी मुलांची अधिकच पंचाईत झाली हो.
आता हेच बघा ना, "जब वी मेट" मी टाॅकीजमध्ये बघितला. घरी टी व्ही वर ही अनेकदा बघितलाय. पण अजूनही "नगाडा, नगाडा, नगाडा बजा" यानंतर ती सगळी पंजाबी मंडळी "Aqua Regia, Aqua Regia" असे केमिस्ट्रीतल्या कंपाऊंडचे नाव जोराने का ओरडतात ? हे मला न उलगडलेले कोडे आहे.
- पाचव्या सहाव्या वर्गात केमिस्ट्री शिकवणार्या सरांनी अत्युकृष्ट शिकवल्याचा परिणाम की सोन्याला विरघळवणारे कंपाऊंड "Aqua Regia" ची भुरळ पडल्याचा परिणाम की स्वतःलाच एक "Alchemist" व्हायचे होते की काय ? याचा अजूनही शोध घेत असलेला सर्वसामान्य माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, July 2, 2025

एखादी बस दिसल्यानंतरचे विचारांचे काहूर

 विश्राम बेडेकरांच्या "रणांगण" कादंबरीतले एक पात्र कुठल्याही वेळी नुसताच विविध रेल्वेगाड्या त्या त्या वेळी कुठे असतील असा विचार करीत असे. "आता दुपारचे ४ वाजलेत. म्हणजे मुंबई मेल आता नागपुरातून निघालेली असेल, हावडा मेल रायपूर स्टेशनातून हावड्याकडे रवाना झाली असेल..." वगैरे. "रणांगण" कादंबरी आम्हाला UPSC Civil Services च्या मुख्य परीक्षेत मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासात होती. "रणांगण" सोबतच मराठी साहित्यातले सौंदर्यशास्त्र नावाचा एक अत्यंत कुरूप विषय (ज्याची पुलंनी "भिंत पिवळी पडलीः एक सौंदर्यवाचक विधान या लेखात भरपूर खिल्ली उडविली होती.), अनेक विरोधाभासी आणि विनोदी विधानांनी भरलेला वि. ल. भावे कृत मराठी वाङमयाचा इतिहास (ज्याची पुलंनी "मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास" लिहून येथेच्छ टर उडविली होती.) हे ही अभ्यासाला होते. या विषयांतले आता फारसे आठवत नसले तरी याच दोन विषयांनी मुख्य परीक्षेत आमचा त्रिफळा उडवल्याचे मात्र ठळक स्मरते. चुकीचे वैकल्पिक विषय घेतल्याने देश एका चांगल्या I. A. S. अधिकार्याला मुकला हे मात्र खरंय.


"रणांगण" मधल्या त्या पात्रासारखीच काहीशी सवय मलासुध्दा आहे. प्रवासात पुढून येणारी एखादी एस. टी. दिसल्यानंतर ही आपल्या प्रस्थान स्थानावरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे हिशेब माझ्या मनातल्या मनात सुरू होतात.

आता हीच बस बघा. नागपूर जलद जळगाव. उन्हाळी जादा शेड्युल.




ही बस आम्हाला नांदुर्याला दिसली तेव्हा साधारण सकाळचे १०.४५ झाले होते. आम्ही नांदुर्याच्या हनुमंताचे दर्शन घेऊन खामगावकडे परतत होतो. आता ही बस सकाळी १०.४५ ला नांदुरा म्हणजे नागपूरवरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे calculations माझ्या डोक्यात लगेच सुरू झालेत. कितीही चांगला रस्ता मिळाला तरी नागपूर ते अकोला प्रवासाला कमीतकमी ५ तास, अकोला ते खामगाव या प्रवासाला कमीतकमी १ तास आणि खामगाव ते नांदुरा अर्धा तास प्रवासाला धरले तरीही ही गाडी नागपूरवरून पहाटे ४.०० ला निघालेली असली पाहिजे. म्हणजे अगदी पहाटपक्षी बसच. (लिंक इथे) नेहमी नागपूरवरून अमरावतीकडे जाणारी पहिली पहाटपक्षी बस म्हणजे पहाटे ५ ची नागपूर - इंदूर बस. ही बस त्या बसआधी एक तास ? अशा अडनिड्या वेळेला नागपूरवरून या बसला किती प्रवासी मिळत असतील ? अनेक प्रश्न मनात रूंजी घालत सुटतात. अगदी "रणांगण" च्या त्या पात्रासारखेच.

नागपूर उन्हाळी जादा जळगाव

मार्गे कोंढाळी - कारंजा (घाडगे) - तळेगाव - तिवसा - गुरूकुंज मोझरी - अमरावती - बडनेरा - मूर्तिजापूर - अकोला - बाळापूर - खामगाव - नांदुरा - मलकापूर - मुक्ताईनगर - दीपनगर - भुसावळ.

MH - 14 / LX 9813

Ashok Leyland Comet Vishwa model

BS VI

Built by Ashok Leyland, Vijaywada plant.

२ बाय २ आसनव्यवस्था. एकूण ४१ आसने.

ज. जळगाव आगार

स्थळः नांदुरा
दिनांकः १४/६/२०२५
वेळः सकाळी १०.४५ वाजता

- एक बस पाहिली की अनेक विचारांचे, calculations चे काहूर मनात येणारा बसफॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, July 1, 2025

वेगळी वाट चोखाळणारी बस

वेगळी वाट चोखाळण्याचा मक्ता फक्त मनुष्यमात्रांनीच घेतलाय की काय ? आमच्या एस. टी. बसेस सुध्दा वेगळा मार्ग चोखाळू शकतात म्हटलं.

अमरावती वरून मलकापूर ला जाण्यासाठी मूर्तिजापूर - अकोला - बाळापूर - खामगाव - नांदुरा हा राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहे. हा महामार्ग आता खूप छान झालेला आहे. अनेक वर्षांपासून चालू असलेले या महामार्गाचे नष्टचर्य संपलेले आहे.

पण ही बस अमरावती ते मलकापूर प्रवासासाठी मात्र दर्यापूर - आकोट - शेगाव - खामगाव - नांदुरा ही जरा  वेगळी वाट चोखाळतेय. हा मार्गही छान आहे. 




अमरावती जलद मलकापूर

MH 40 / Y 5788

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने बांधलेली आणि नंतर पोलादात पुनर्बांधणी केलेली बस.

TATA 1512 Cummins

BS III

बु. मलकापूर आगार (मलकापूर आगार, बुलढाणा विभाग)

कोल्हापूर विभागातही को. मलकापूर आगार आहे.

दोन दोन मलकापूर आगारांप्रमाणेच आपल्या महाराष्ट्र एस. टी. त 

व. तळेगाव (वर्धा जिल्हा)

आणि

पु. तळेगाव (पुणे जिल्हा)

अशी सारख्या नावांची आगारे आहेत.

स्थळः शेगाव

दिनांकः १२/०६/२०२५

संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी.

आजूबाजूच्या भयंकर उकाड्यामुळे एखाद्या काकूंनी आपल्या पदराने, ओढणीने स्वतःला वारा घालावा तशी ही बस रेडिएटर वरचे छोटे ग्रील उघडून स्वतःला वारा घातल्याचे दृश्य भासमान होते आहे. त्यादिवशी वातारणात खरंच खूप उकाडा होता.

- बसेस आणि रेल्वेजना मानवी रूपात कल्पणारा, एक बसप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर