Wednesday, July 22, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २२ नाभाग, अंबरीष आणि भक्ताभिमानी भगवंत

मनुपुत्र नभग याचा मुलगा नाभाग हा एका दीर्घ तपावरून परतला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या सगळ्या मोठ्या भावांनी आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वाटप आपापसात करून घेतलेले आहे आणि जेव्हा त्याने स्वतःच्या वाट्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा आपले बाबा आम्ही तुझ्या वाट्याला ठेवलेले आहेत असे त्याला उत्तर मिळाले. ही सर्व कथा नाभागाने आपल्या पित्याला सांगितली.


पित्याने त्याला अत्यंत सात्विक अशा ऋत्विजांच्या यज्ञात जाऊन त्यांना यज्ञकर्मात योग्य ती मदत करण्याबाबत उपदेश केला. पित्याची आज्ञा प्रमाण मानून नाभागाने यज्ञस्थळी जाऊन तो यज्ञ पुरा करण्यासाठी त्या अंगिरस गोत्री ऋत्विजांची मदत केली. ती सर्व मंडळी प्रसन्न झाली आणि यज्ञसमाप्तीनंतर यज्ञातील उरलेले सर्व शेष धन त्या नाभागाला त्यांनी देऊ केले.


पण यज्ञ संपल्यानंतर ते शेष धन घेण्यासाठी एक काळाकभिन्न पुरूष त्या यज्ञस्थळी आला आणि त्या शेषधनावर परंपरागत माझाच अधिकार आहे असे सांगू लागला. नाभागाने याबाबत आपल्या पित्याचा सल्ला घेतला तेव्हा त्याच्या पित्याने तो पुरूष म्हणजे साक्षात रूद्रदेव असून तो तुझी परीक्षा बघण्यासाठी त्या यज्ञस्थळी आलेला आहे असे प्रतिपादन केले.


नाभाग यज्ञस्थळी परत आला आणि त्याने महादेव रूद्राचा त्या यज्ञशेष संपत्तीवरील हक्क मान्य केला व त्यांची स्तुती केली. महादेव प्रसन्न झालेत. त्यांनी त्या शेषयज्ञसंपत्तीचे दान तर नाभागाला केलेच पण तो आणि त्याचा संपूर्ण वंश श्रेष्ठ भगवतभक्त होतील असा त्याला आशिर्वाद दिला.



अशा नाभागाचा मुलगा अंबरीष. हा सुद्धा अत्यंत पराक्रमी आणि तेव्हढाच धर्मनिष्ठ होता. याला श्रीहरींचे अत्यंत प्रेम होते. त्याच्या हृदयात श्रीहरींविषयी अतिशय विमल भक्ती कायम वास करीत असे. भगवान श्रीहरी त्याच्या निर्मळ आणि निष्काम भक्तीवर कायम प्रसन्न होते. त्याच्या राज्यात साधुसंतांचे कायम पूजन होत असे. एके वेळी असेच अंबरीष राजाच्या एकादशी व्रताचे पारणे संपन्न होत असताना तिथे दुर्वास ऋषी आलेत. अंबरीष राजाने दुर्वासांने यथासांग पूजन केले आणि त्यांना व्रताच्या पारण्यात भोजनाचे निमंत्रण दिले. दुर्वास ऋषींनी ते निमंत्रण स्वीकारले आणि स्नान करण्यासाठी म्हणून ते जवळच असलेल्या नदीवर गेलेत. तिथे स्नान करताना त्यांना अंमळ जास्तच वेळ लागला.


तोवर इकडे अंबरीष राजाच्या व्रतस्थळी द्वादशी तिथी संपायला अगदी थोडा वेळ उरला होता. दुर्वास ऋषींना भोजनासाठी आमंत्रण दिलेले असल्याने ते व्रतस्थळी आल्याशिवाय भोजन करू शकत नाही आणि एकादशी व्रताचे पारणे द्वादशी तिथी संपण्याआधी केले नाही तर ते व्रत भंग झाल्याचा दोष लागतो अशा कात्रीत अंबरीष राजा सापडला. तेव्हा तिथल्या जाणत्या ब्राह्मणांनी त्याला तुलसीजल पिऊन उपवास सोडण्याचा सल्ला दिला. तुलसीदल प्राशन केल्यामुळे एकादशी उपवास सुटेल आणि भोजन न केल्यामुळे दुर्वासांच्या आधी भोजन करून त्यांचा अपमान केला असे होणार नाही. हा तोडगा अंबरीष राजाला मानवला. त्याने तसे करून एकादशी उपवासाचे पारणे केले व तो दुर्वास ऋषींची वाट बघत बसला.


स्नानादि कर्मे आटोपून दुर्वास ॠषी जेव्हा व्रतस्थळी आलेत तेव्हा राजाचे तेजःपुंज मुख पाहून त्यांनी जाणले की राजाने व्रताचे पारणे केलेले आहे. वस्तूस्थिती न जाणून घेता ते क्रोधित झालेत आणि त्यांनी अंबरीष राजाची निर्भत्सना केली आणि त्यावर शाप म्हणून आपल्या जटेतून उत्पन्न झालेली एक कृत्या अंबरीष राजाच्या संहारासाठी सोडली. हातात तलवार घेऊन ती कृत्या अंबरीष राजाला मारण्यासाठी पुढे येऊ लागली पण अंबरीष राजा आपल्या भगवत्भक्तीत मग्न होता. सदैव आपले आराध्य दैवत श्रीहरींचे चिंतन आणि स्मरण करीत बसला होता.


ती कृत्या आपल्या भक्ताचे अहित करण्यासाठी येते आहे हे बघून भक्ताभिमानी भगवंतांनी आपले सुदर्शन चक्र भक्त रक्षणासाठी सोडले. ते सुदर्शन चक्र प्रथम त्या कृत्येला निष्प्रभ करून मग दुर्वासांच्या मागे लागले. त्या सुदर्शनचक्राच्या भयाने दुर्वासांसारखे थोर ऋषी त्रिखंडात पळू लागलेत पण सुदर्शन चक्र त्यांचा पिच्छा सोडेना. ते ब्रह्मदेवांकडे आश्रयाला गेले पण ब्रह्मदेवांनी त्यांना सुदर्शनचक्राच्या प्रभावापासून वाचविण्यात आपली असमर्थता दर्शविली. ते कैलासावर महादेव शंकरांकडे गेले. त्यांनीसुद्धा या सुदर्शनचक्रापासून दुर्वासांना वाचविण्यात आपली असमर्थता दर्शविली आणि दुर्वासांना वैकुंठात जाऊन भगवान श्रीहरींच्या चरणकमलांचा आश्रय घेण्याचा उपदेश केला.


त्याप्रमाणे दुर्वास ऋषी वैकुंठात जाऊन भगवान श्रीहरींच्या चरणकमलांवर कोसळले आणि त्यांनी त्या दुःसह सुदर्शचक्रापासून मुक्तीची मागणी केली. त्याप्रसंगी भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की कायम ख-या भक्तांच्या हृदयात वास करीत असतात. ख-या भक्तीचे ते इतके भुकेले आहेत की अशा ख-या भक्तांसाठी, भक्तांच्या कामांसाठी ते वैकुंठलोकाचा आणि प्रत्यक्ष लक्ष्मीचा सुद्धा त्याग करू शकतात. दुर्वासांनी त्यांच्या एका भक्ताला अकारण दुखावले आहे तेव्हा या सुदर्शनचक्रापासून मुक्ती मिळवायची असेल तर दुर्वासांना त्या भक्तालाच शरण जावे लागेल.


दुर्वास ॠषी मनोमन खजिल झालेत आणि परत व्रतस्थळी येऊन श्रेष्ठ भागवत असलेल्या अंबरीष राजाची क्षमायाचना करू लागलेत. मूळचा सज्जन आणि मृदू हृदयी असलेल्या अंबरीष राजाने त्यांना लगेच क्षमा केली आणि दुर्वास ॠषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र पुन्हा भगवान श्रीहरींकडे जाऊन त्यांच्या करकमलांमध्ये विराजमान झालेत.



ख-या भगवत्भक्ताने निर्मळ, निष्काम भक्ती करीत असताना या संसारात येणा-या संकटांची तमा बाळगू नये. त्या संकटांचे निवारण आपले रक्षणकर्ता सदैव करतील असा दृढ विश्वास बाळगून आपल्या नियत कर्मांपासून च्युत न होता ती करीत रहावीत हा या कथेचा बोध आणि प्रसाद.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध नवमी शके १९४८ दिनांक  २२ / ७ / २०२६


२२ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



No comments:

Post a Comment