भगवान श्रीकृष्णांचा जन्म ऐन मध्यरात्रीच्या सुमाराला झाला तर भगवान श्रीरामांनी ऐन दुपारी जन्म घेतला. याचे अनेक व्यावहारिक अर्थ आपल्याला अनेक संत मंडळी सांगतात. दुपारच्या वेळी पोटात भुकेचा आगडोंब उसळला असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून जो श्रीरामांची वाट बघतो, त्यांची आराधना करतो त्यालाच श्रीराम मिळतात आणि त्याची तहानभूक हरण करतात. तसेच ऐन मध्यरात्री वासनांनी तनात आणि मनात थैमान घातले असताना जो त्यावर विजय मिळवून भगवान श्रीकृष्णाची आराधना करतो त्यालाच श्रीकृष्ण प्राप्त होतात आणि त्याच्या मनातल्या सर्व वासना घालवून त्याचे मन अगदी निर्मळ करतात.
काही कवी कल्पना अशा की प्रभू श्रीरामांनी सूर्यवंशात जन्म घेतला आणि भर दुपारी सूर्यनारायणाला प्रथम दर्शन दिले. त्याप्रसंगी श्रीरामांचे मनमोहक बालरूप पाहून सूर्यनारायण आपली चाल चालायचा विसरला आणि एकाच जागी थांबून श्रीरामांचे दर्शन घेत राहिला. त्यामुळे चंद्राला त्यांचे दर्शन उशीरा मिळाले. त्यामुळे चंद्राची दर्शनाची आस पुरविण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपला हा अवतार चंद्रवंशीयांमध्ये घेतला आणि चंद्राला आपले प्रथम दर्शन देऊन त्याला पावन केले. कुठल्याही महिन्यातल्या वद्य अष्टमीच्या दिवशीचा चंद्रोदयाची वेळ आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यादिवशी चंद्रोदय हा साधारण मध्यरात्रीच्याच वेळी होत असतो. भक्त आणि भगवंत यांच्यातील नात्याचा, भक्ताच्या मनातील भावना पूर्ण करण्याच्या भगवंताच्या प्रयत्नांचा किती सुंदर आविष्कार !
इकडे वसुदेव कारागृहात परतल्यानंतर गोकुळातून आणलेल्या आदिमायेने मोठा टाहो फ़ोडला. कारागृहात पहारा देत असताना झोपे गेलेले सगळे द्वारपाल जागे झाले आणि त्यांनी कंसाला देवकीच्या पोटी नवीन बालकाचा जन्म झाल्याची वार्ता दिली. कंस लगोलग तिथे आला आणि इतर सहाही जणांप्रमाणे त्याने ही छोटी बालिका देवकीच्या कुशीतून ओढून तिला आपटून ठार मारायला निघाला असतानाच ती त्याच्या हातून निसटली आणि तिने विजेसारखी आकाशात जाऊन आकाशवाणी केली, कंसा, तुझा वैरी, देवकीचा आठवा पुत्र, सखेनैव गोकुळात वाढतो आहे आणि तुझा तो नाश करणार हे अटळ आहे. भगवंताची माया ही भल्याभल्या साधू पुरूषांना चकवून गेलेली आहे तिथे कंसासारख्या दुष्टाच्या हाती ती अशी थोडीच लागणार ?
कंस मनातून भयंकर घाबरला. त्याने वसुदेव आणि देवकीची कारागृहातून सुटका केली. त्यांचा यथोचित आदर करून त्यांना मुक्त केले आणि सतत देवकीच्या आठव्याचा ध्यास धरून बसला.
इकडे गोकुळात नंदबाबा आणि यशोदामैय्यांना खूप काळाने पुत्र झाल्यामुळे सा-या गोकुळवासियांना अगदी आनंद झाला होता. व्रजभूमीतल्या सगळ्या घरात अगदी उत्स्फ़ूर्तपणे साफ़सफ़ाई, झाडझूड सुरू झाली. सर्वत्र गोमयाचे सडे घातले गेलेत, सुंदर रांगोळ्या काढल्या गेल्यात. भगवंताच्या व्रजभूमीतल्या आगमनाने सर्व चर आणि अचर सृष्टीसुद्धा मोहरून गेली होती. व्रजभूमीतल्या वृक्षांमधून वाहून वाहून वारा भगवंताची स्तुतीपर गाणी गात होता. त्याच्या गाण्यांनी पुलकित होत सगळे वृक्ष त्याच तालावर डोलत होते. गाई, वासरे आणि व्रजभूमीतल्या गोपांकडले समस्त गोधन छान शृंगारले गेले. त्या गाई वासरांनाही आपल्यासोबत खेळणा-या नव्या सवंगड्याच्या आगमाची वार्ता कळली होती. त्यांचाही आनंद अनावर होत होता.
गोकुळाचे पालनकर्ते नंदबाबा आणि यशोदामैय्या हे इतके प्रेमळ आणि सगळ्या गोपांमध्ये लाडके होते की नंदबाबांचा पुत्र बघायला सगळे गोप गोपी भल्या पहाटे अनेक भेटवस्तू घेऊन भगवंताच्या दर्शनासाठी नंदबाबांच्या वाड्यावर जमलेत. भगवंतांना बघितल्यावर त्या गोप गोपींचा आनंद मनात मावत नव्हता. त्यांनी अनेकविध रागांमधून आनंदगाणी गाऊन आपला उत्साह व्यक्त केला. आपल्या घरातले दूध, दही, लोणी ते एकमेकांच्या अंगावर उडवू लागलेत, नाचू लागलेत, आनंदोत्सव साजरा करू लागलेत.
नंदबाबांनीही सगळ्या गोपगोपींचा यथोचित सत्कार केला. भगवंताच्या आगमनापाठोपाठ गोकुळात अष्टसिद्धी आणि नवनिधी आपसूकच आल्यात. भगवंताच्या चरणाशिवाय इतरत्र कुठेही न राहणारी महालक्ष्मीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गोकुळात येऊन निवास करती झाली. गोकुळाची भरभराट सुरू झाली.
आपण सर्व भाविक जनांच्या घरी आणि मनात रोजच पहाटे पहाटे असा नंदोत्सव साजरा झाला तर ? भगवंत आपल्या घरी आला आहे, तो इथे खेळणार, बागडणार आहे ही भावना मनात ठेऊन रोजच सकाळी आपण आपल्या मनात असा आनंदोत्सव साजरा केला तर ? त्या सर्वव्यापी भगवंताला आपले मन कळणार नाही असे थोडेच आहे ? रोज रोज आपण असा मनात उत्सव करीत गेलो तर एके दिवशी तो आपल्या मनात प्रगट होईलही. आणि एकदा त्याने एखादी जागा व्यापली की मग तो तिथून काहीही केल्या जात नाही. आपल्या मनात त्याने कायम ठाण मांडावे यापेक्षा आपल्या इथल्या जीवनाचे अधिक दुसरे कुठले उद्दिष्ट असले पाहिजे. तो आला त्याने आपल्या मनाचा ताबा घेतला. झालेच या जन्मोजन्मोंतरीच्या फ़े-याचे काम. त्याच्या चिंतनातच इथले आयुष्य संपले आणि येरझार संपली की.
करायचा आपल्या मनांमध्ये रोज असा नंदोत्सव, आनंदोत्सव ?
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १९४८ दिनांक २७ / ७ / २०२६
२७ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
No comments:
Post a Comment