Friday, May 30, 2025

चॅट जीपीटीचे शिक्षण, MSRTC Volvo - पुढे सुरू

मी माझ्या मागील लेखात लिहील्याप्रमाणे चॅट जीपीटीला अजून बरेच शिकायचे आहे. यावेळेस मी चॅट जीपीटी ला महाराष्ट्र एस टी च्या व्हाॅल्वोचे संकल्पचित्र काढून मागितले तेव्हा त्याने जी चित्रे दिलीत ती रंगसंगतीमध्ये बिहार राज्य परिवहन मधल्या व्हाॅल्वो बसेसशी मेळ खातायत.



MH 04 नंबरवरून ही खाजगी मालकीची (बहुतेक पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सची) व्हाॅल्वो वाटतेय.

महाराष्ट्र एस टी म्हटले की लाल किंवा लाल पांढरा रंग हेच चॅट जीपीटीला माहिती आहे. सुंदर निळ्या रंगसंगतीतल्या "शिवनेरी" बसेसचे फोटो अजून त्या चॅट जीपीटीला बघायला मिळालेले नाहीत असे दिसतेय.

चॅट जीपीटी शिकते आहे. त्याला अजून भरपूर शिकायचे आहे.


या नंबरची एक शिवशाही बस खरोखर आत्ता सेवेत आहे. Antony Body. पेण पासिंग.


बाय द वे, कर्नाटक राज्य परिवहन मधल्या मल्टी एक्सल व्हाॅल्वो बसेसची (Sleep Like a Baby) भ्रष्ट्र काॅपी करून एका जोडप्याचा फोटो आपल्या मल्टी एक्सल स्कॅनिया बसेसवर टाकण्याचा आपल्या महाराष्ट्र एस टी चा हास्यास्पद प्रयोग आठवतोय का कुणाला ?

व्हाॅल्वो बसेस काढण्यात चॅट जीपीटी तरबेज झाले की त्याला त्या प्रयोगाबद्दलही अवगत करून द्यावे म्हणतोय.

- अभियांत्रिकीचे विद्यार्थी असोत वा ही अशी कृत्रिम बुध्दीमत्ता साधने (AI tools) सर्वांकडूनच परिपूर्णतेचा आग्रह धरणारा, जुन्या काळचा पंतोजी, प्रा. वैभवीराम मास्तर.


MH 04 नंबरवरून ही खाजगी मालकीची (बहुतेक पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सची) व्हाॅल्वो वाटतेय.



एस टी च्या स्वमालकीच्या काही काही नव्या बसेस MH 01 ताडदेव पासिंगच्या आहेत खर्‍या.


माणसांची व्यक्तीमत्वे जोखण्यात काळाने घडवलेला बदल

फार फार प्राचीन नाही, अगदी ३० - ३५ वर्षांपूर्वी एक काळ खरंच असा होता की एखा माणसाचे व्यक्तिमत्व तो किंवा ती कुठले साहित्य वाचताहेत, कुठली गाणी त्याला किंवा तिला आवडतायत यावरून जोखले जायचे. ब्रँडेड कपडे, चपला बुटं, महागडे गाॅगल्स हे सगळे तेव्हाही होते पण त्यावरून माणसांची आर्थिक स्थिती कळत असे ; त्यांची व्यक्तिमत्वं, त्यांची अभिरूची नाही, त्यांची संस्कृती नाही.

पुल, जीएंचं साहित्य होतं तसंच इतरही अनेक लेखकांचं साहित्य तेव्हा होतंच. सुनीताबाईंच्या "आहे मनोहर तरी" च्या जोडीला इतर चटोर लेखकांनी प्रसवलेल्या "मनोहर कहानियाँ" सुध्दा होत्या. "केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर" हे गाणे जिवापाड आवडणार्या वर्गासोबत बाबा सैगलचं "थंडा थंडा पानी" आवडणारी पब्लिकपण खूप होतीच की. पण एकंदर समाजाचीच "उच्च अभिरूची" हा संकल्पनेतली धारणा पक्की होती.
आजकाल मात्र समाजानेच "सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते" याचा स्वीकार केलाय. महागड्या घड्याळी, गाॅगल्स ; ब्रँडेड कपडे, बुटं चपला ह्यावरच माणसांची व्यक्तिमत्व तोलली जाऊ लागलीत. एकमेकांची साहित्यिक, सांगितिक, सांस्कृतिक अभिरूची जाणून घेण्याइतपत दोन व्यक्तींमधला संवादच थांबल्याचे हे परिणाम. त्यामुळे बाह्य आवरणावरूनच व्यक्तींना समाजात जोखणे क्रमप्राप्त झाले. आजकाल तर घराघरांमध्ये अगदी निकट नात्यांमधलाही संवाद संपत चाललेला आहे.
श्रीसमर्थांनी लिहील्याप्रमाणे आज सगळ्या समाजाची स्थिती "सुख सुख म्हणता हे दुःख ठाकूनी आले" अशी झालेली आहे. माणसे झपाट्याने एकटी पडत चाललेली आहेत. व्यक्ती म्हणून, समाज म्हणून भौतिक सुखांची नवनवीन क्षितीजे गाठत असताना आत्मिक समाधानाच्या जमिनीचा आधार आपण झपाट्याने गमावत चाललोय हे आपल्या लक्षातही येत नाही इतकी आपली भौतिक सुखांकडे धाव आणि मोठेपणाची हाव वाढत चाललेली आहे. यातून थोडा वेगळा विचार करणारा, तसे जगू पाहणारा विरळा माणूस हळूहळू वेड्या माणसांच्या यादीत जातोय.
- ३० वर्षांपासून समाजातल्या सगळ्या बदलांचा तटस्थ निरीक्षक आणि स्वतःच्या शाश्वत सुखाच्या कल्पनांबाबत अगदी दृढ धारणा असलेला एक अभ्यासक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, May 24, 2025

अनुबंध: सजीव आणि निर्जीवांशी सुद्धा

 प्रत्येक जागेच्या काहीकाही vibesअसतात. आठवडी बाजाराच्या तर विशेषच.


जन्मापासून तारूण्यापर्यंत नागपूरच्या महाल भागात आयुष्य घालवल्याने महालच्या बुधवार बाजाराविषयी विशेष जिव्हाळा होता. त्यातही कांदे बटाटे एका विशिष्ट विक्रेत्याकडून, फळभाज्या एक दोन विशिष्ट जणांकडूनच, पालेभाजी एका विशिष्ट माणसाकडूनच, भाजीच्या accessories (सांबार, आले, लिंबू, मिरच्या गोडलिंब वगैरे) एका विशिष्ट जागेहूनच अशी बरीच वर्षांची सवय होती.

शिक्षणासाठी, नोकरीसाठी मधली १७ - १८ वर्षे बाहेरगावी घालवल्यानंतर पश्चिम नागपूरमधल्या घरी स्थलांतरित झालो तरी दर रविवारी भाजी घ्यायला महालातच जात होतो. तिथे गेल्याशिवाय भाजी घेतल्यासारखे वाटतच नव्हते. तिथे मोठी इमारत उभी करण्यासाठी तिथला जुना बाजार पाडला तेव्हा घरातली कुणीतरी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यासारखा मी शोकाकूल झालो होतो. आता महालात गेलो तरी त्या नवीन चाललेल्या बांधकामाकडे हल्ली एक नजरसुध्दा टाकावीशी वाटत नाही.

नागपूरच्या महाल बाजारासारखाच चंद्रपूरचा गोल बाजार मला अत्यंत प्रिय आहे. बालपणी सुट्यांमध्ये उन्हाळेच्या उन्हाळे आणि सगळ्या दिवाळी सुट्या आजोळी, चंद्रपूरला घालवल्यामुळे माझा आणि गोल बाजाराचा हा ऋणानुबंध दृढ झालेला आहे. आजही मी चंद्रपूरला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा काम असो नसो, गोलबाजारातून एक चक्कर मारून येतो, माझे हरवलेले बालपणाचे दिवस जगून घेतो.

सांगोल्यातल्या बैल बाजाराच्या मैदानावर भरणारा रविवारचा आठवडी भाजीबाजारही तसाच माझ्या मनात घर करून आहे. सांगोल्यात आमचे वास्तव्य उणेपुरे ३० च महिने होते पण तो बाजार मनात अजूनही तिथे मिळणार्या भाजीसारखाच ताजा आहे.

मनात तसाच ताजेपणा सोलापूरच्या नवी पेठेतल्या बाजाराचा आहे.

१० वर्षांपूर्वी नागपुरात परतलो आणि मग सोनेगावच्या गुरूवारच्या आठवडी भाजी बाजारात जाणे होऊ लागले. गेली ३ - ४ महिने नेमके गुरूवारी संध्याकाळी असे काही काम निघायचे की त्या बाजारात जाऊन भाजी आणणे व्हायचेच नाही. काल खूप दिवसांनी भाजी आणायला तिथे गेलो तेव्हा जाणवले की बर्याच कालावधीनंतर भेटणार्या जिवलग बालमित्रासारखा हा बाजार नव्याने मला भेटतो आहे. त्याला भेटून मला आणि मला भेटून त्यालाही खूप खूप आनंद झालेला आहे. काल परतताना पिशवीत नुसती भाजीच नाही तर मनात एक नवा ताजेपणा घेऊन परतलो होतो.

- एकदा आपले म्हटले की कितीही वर्षांनी भेटलोत तरी मधली काही वर्षे नसल्यासारखीच, तो अनुभव पुसून टाकत, नव्याने पण जुन्याच संदर्भांसह भेटणारा,

व्यावहारिक जगाच्या दृष्टीने असला अव्यवहारी वागणारा

आणि

सजीव व निर्जीव सृष्टीच्याही vibes शी स्वतःच्या vibes कायम जुळवत असणारा एक अत्यंत संवेदनशील माणूस

प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, May 20, 2025

स्टेअरींग: एक चक्र आणि बदलणा-या कालचक्राचा वेध

टाटा मोटर्स सुरूवातीच्या काळात मर्सिडीज बेंझशी कोलॅबोरेशन मध्ये बसेस आणि ट्रक्सचे उत्पादन करायची. बसेस, ट्रक्स च्या काऊल्सवर मर्सिडीज बेंझचा तारा असलेला लोगोही असायचा.




मला वाटतं त्यानंतर बराच काळ टाटा आणि फोर्स मोटर्स सुध्दा त्यांचे गियर बाॅक्स मर्सिडीज बेंझच्या सहकार्यानेच बनवायचेत.



१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात बसवर, ट्रक्सवर टाटांचा T वाला लोगो दिसायला लागला पण मर्सिडीज बेंझ असताना आणि टाटा मध्ये बदल झालेला असतानाही टाटाचे स्टेअरींग हे ४ आर्या (spokes) असलेलेच असायचे. ते स्पोक्सपण अतिशय बारीक असायचेत. जणू १२ एम एम चे स्टील राॅडस च.



१९८० च्या दशकात नव्या, २ च स्पोक्स असलेल्या स्टेअरींगवाल्या गाड्या आल्यात. नवे स्टेअरींग्ज चकचकीत आणि थोडे जाड होते. आमचे बालपणीचे सगळे एस. टी. प्रवास ड्रायव्हरच्या मागील बाकड्यावर, इतर प्रवाशांकडे पाय करून, ड्रायव्हरकाकांचे ड्रायव्हिंग स्कील्स बघण्यातच जायचे त्यात आम्हाला ते चार स्पोक्सवाले स्टेअरींग आणि त्या जुन्या गाड्या एकदम डाऊनमार्केट वाटायच्यात तर नव्या, २ स्पोक्स असलेल्या स्टेअरींग वाल्या गाड्या अपमार्केट वाटायच्यात.



१९९० चे दशक खूप वेगाने जागतिकीकरण व प्रगती घेऊन आले. मला आठवतंय आमच्या UPSC च्या अभ्यासात Dunkel Draft आणि GATT करारावर आमच्या खूप चर्चा झडल्या होत्या. सगळ्यांचाच सूर हा GATT करार आपल्या भारतासाठी खूप तोट्याचा ठरेल असा सूर होता. आज ३० वर्षांनी जाणवतेय की ह्या जागतिकीकरणाचा सगळ्यात जास्त फायदा आपणच करून घेतलाय.
असो, जागतिकीकरणानंतर भारतात नवनवीन वाहन उद्योग आलेत, अनेक परदेशी कंपन्यांशी आपल्या कंपन्यांनी कोलॅबोरेशन्स केलीत. गाड्यांकडे, त्यांच्या स्पेअर पार्टसकडे बघण्याचा आपला नवीन दृष्टीकोन बनला.
आता एखाद्या कारचे २ स्पोक्सचे स्टेअरींग म्हणजे त्या कंपनीचे Cost Cutting Measures समजल्या जाऊ लागले. Alto. तर ३ किंवा ४ स्पोक्सचे स्टेअरींग हे lavish गाडीचे लक्षण समजल्या जाऊ लागले. टाटा मोटर्सनेही आपले २ स्पोक्सचे स्टेअरींग बदलून त्यांच्या BS 6 दर्जाच्या बसेस आणि ट्रक्ससाठी ४ स्पोक्सचे (नव्या मांडणीत) स्टेअरींग्ज आणायला सुरूवात केली. चक्र फिरून पुन्हा ५० वर्षांपूर्वीच्या पूर्वपदावर आले. कदाचित आणखी २ दशकांनी पुन्हा कमी स्पोक्सवाले स्टेअरींग्ज हे Inn Thing ठरतील. कारण चक्र हे कायम फिरतच असते. अर्थात २५ वर्षांनी स्टेअरींग हे गोलच असेल की विमानाच्या जाॅयस्टिकसारखे एखाद्या दांड्यासारखेच असेल हे सांगणे कठीण आहे. आजच बहुतांशी कार्सचे स्टेअरींग फ्लॅट तळाचे यायला सुरूवात झाली आहे.




- "स्टेअरींगः एक अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय बदलांच्या प्रतिकांचा शोध आणि जागतिकीकरणाचे परिणाम" या लठ्ठ प्रबंधाचे किडकिडीत लेखक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, May 7, 2025

तबियतेने केलेल्या प्रवासातले एक रेल्वेफ़ॅनिंग

बरोबर १० वर्षांपूर्वीचा प्रवास.  ठाण्यावरून शिरपूरसाठी आम्ही कुटुंब सकाळी निघालो. संध्याकाळपर्यंत शिरपूरला पोहोचलो असतो तरी चालले असते.


३५० किमी पूर्ण प्रवास हा चारपदरी असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गाने होणार होता. ३५० किमी प्रवासाला फार तर ६ तास लागले असते म्हणून आम्ही अधिकच रमत गमत निघालो होतो.


शहापूरच्या जवळ भरपेट नाश्त्यासाठी तबियतीने थांबणे, थळ घाटात (कसारा घाटात) थांबून जिथे जिथे रेल्वेमार्ग रस्त्याखालील बोगद्यांमधून पसार होतात, तिथले फोटो काढणे वगैरे रेलफॅनिंग  सुरूच होते. 


इगतपुरीनंतर घोटीजवळ रस्ता आणि रेल्वेमार्ग अगदी एकमेकांजवळून जातात. तिथे रेल्वेमार्गावर इंग्रजी S आकाराचे वळण आहे. रस्त्याच्या कडेला गाडी तबियतीत थांबवली आणि एक छोटे टेकाड ओलांडून साधारण अर्धा तास रेल्वेफॅनिंग केले.


माझ्या या प्रेयसीने मला निराश केले नाही. मुंबई - भुसावळ पॅसेंजर नाशिककडे गेली, भुवनेश्वर - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्सप्रेस मुंबईकडे गेली. तोच हा व्हिडीओ.





- प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे नव्हे तर मार्ग पूर्णपणे अनुभवत, आनंद घेत जाणे यातच खरे प्रवासाचे आणि जीवनाचेही इंगित आहे असे समजणारा, प्रवासी पक्षी, वैभवीराम.

चॅट जीपीटी शिकतेय पण हळूहळू

चॅट जीपीटी (or any ai tool for that matter) शिकत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला माझी लाडकी महाराष्ट्राची एस टी काढायला सांगितल्यावर त्याने काहीच्या काही चित्रे काढून दिलीत. मुंबईची बेस्ट बस हल्लीचे बाॅलीवुडवाले जशी दाखवतात तशी. जुन्या सिनेमांमध्ये बाॅलीवुडवाले त्यांच्या सिनेमांमध्ये बेस्ट बसेस छान दाखवायचेत. अगदी खर्याखुर्या. पण आजकाल बाॅलीवुडवाले खाजगी आॅफिस बसेसना बेस्टच्या रंगात रंगवून, बेस्टचा लोगो वगैरे डकवून बेस्टच्या बसेस म्हणून खपवतात. उदाहरणार्थ अनिल कपूरचाः नायक.

तसेच काहीसे चित्र आपल्या एस टी विषयी काही दिवसांपूर्वी हे चॅट जीपीटी दाखवत होते. पण आज त्याला विचारल्यानंतर त्याने दिलेल्या चित्रांमध्ये बरीच सुधारणा दिसली.
त्यात या एका बसचा नंबरसुध्दा MH 14 / BT 3812 हा खर्याखुर्या एस टी चा च नंबर आहे.


हा नंबर खर्
याखुर्या एस टी चा आहे पण या बसचा दरवाजा मागे दाखवला गेलाय. तो पुढे असायला हवा होता. आणि लेलँडच्या बसला टाटाची फ्रंट ग्रील बसवलीय.

MH 40 / Y ही सिरीज हिंगणा कार्यशाळेने बांधलेल्या एस टी बसची च आहे पण तो नंबर मात्र एस टी बसला मिळालेला नाही. Y सिरीजमध्ये 5999 पर्यंतच नंबर्स एस टी ला मिळालेत. त्यानंतर एस टी साठी MH 40 / AQ 6XXX सिरीज सुरू झाली.


MH 40 / Y पर्यंत बरोबर आहे. पण या सिरीजमध्ये शेवटली एस टी ही 5999 ही आहे.

त्यामुळे एक चित्र सोडले तर बाकी चित्रांवरचे बसगाड्यांचे नंबर्स म्हणजे परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर माहिती नसताना काहीतरी इकडचे तिकडचे, peripheral लिहून पेपरची पाने भरून काढणार्या टिपीकल street smart विद्यार्थ्याप्रमाणे चॅट जीपीटी वागलाय.


MH 12 सिरीजमध्ये BT सिरीजची एस टी नक्कीच नाही.


कोल्हापूर महापालिका परिवहन बसचा नंबर आपल्या एस टी ला दिलाय. दरवाजा पुन्हा एकदा मागल्या बाजूला दाखवलाय. दरवाजा पुढे हवा होता.

त्यानंतर आम्ही त्याला आपल्या एस टी तल्या निम आराम (हिरकणी) बसेसचे चित्र काढायला सांगितले. त्यात तो पूर्णपणे गंडला.


"हिरकणी" पूर्णपणे गंडलीय. नंबर खर्याखुर्या एस टी चा आहे पण "हिरकणी" ला हिरवा रंगाचा पट्टा कुठे असतो ? किंबहुना हिरकणीची रंगसंगती कशी असते ? याविषयी या विद्यार्थ्याला काहीही माहिती नाही. बाकी आयशर चेसिसवर "हिरकणी" हे जरा नवीनच आहे.


रत्नागिरी पासिंगची "हिरकणी" एस टी ? सिंधुदुर्ग आणि रायगड पासिंगच्या हिरकण्या एस टी त आहेत. आणि "अर्ध लक्झरी" काय ? एक तर "सेमी लक्झरी" म्हणा नाहीतर "निम आराम" तरी म्हणा.


हा नंबर सुध्दा खर्याखुर्या एस टी बसचा आहे. हिरकणीला पांढर्या रंगावर हिरवा पट्टा असतो हे आत्ता या विद्यार्थ्याला कळलेय. या निम आराम बसमधली आतली आसनेसुध्दा जरा आरामदायक प्रकारची दाखवलेली आहेत. चॅट जीपीटी शिकतेय.

शिकतंय पोरगं. पण अजून त्याला खूप पल्ला गाठायचा आहे हे नक्की.

- "Real Time Measurement of Learning Outcomes and Inference about Learning Curves by AI tools" या लठ्ठ शोधनिबंधाचे किडकिडीत लेखक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, May 6, 2025

नामस्मरण: अचानक स्फ़ुरलेले काही विचार

श्रीमद्भगवतगीतेच्या दहाव्या अध्यायात प्रत्यक्ष भगवंताने त्याच्या स्वतःच्या विभूती सांगून ठेवल्या आहेत.

त्यात " यज्ञानाम जपयज्ञोस्मि " असे सांगितलेले आहे.


कलियुगात साधली जाणारी एकमेव साधना म्हणजे भगवंताचा जप. भगवंताने हेच सांगितले, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांसकट सगळ्या संतांनीही हेच सांगितले. " मय्येव मन आधस्त्व, मयी बुध्दीम निवेशय " ( हे साधका, तू तुझे मन, तुझी बुध्दी माझ्याकडे लाव ) इतकी या सगळ्या संत विभूतींची साधी अपेक्षा.


किती कमी साधनात, किती कमी श्रमात ही साधना होते हो. फक्त मन हेच त्याचे साधन. बरे त्याला फार नियम वगैरेंचे बंधनही नाही. अगदी हाॅस्पिटलच्या बेडवर असतानाही मन जागृत असेपर्यंत ही साधना करता येईल की नाही ?


आज अनेक सद्भक्त मंडळीही हे सोपे साधन करता करता त्या साधनाच्या आनुषंगिक बाबींच्या चर्चेत अडकलेले पाहिले म्हणजे खरोखर वाईट वाटते. जप करायला आसन कुठले घ्यावे ? माळ तुळशीची की स्फटिकाची ? जप करताना तोंड कुठल्या दिशेला करावे ? या सगळ्यातच अडकून आपण मूळ साध्यापासून तर दूर जात नाहीये ना याचा विचार खर्‍या पारमार्थिक व्यक्तींनी करायला हवा असे मनापासून वाटते.


या संदर्भात परम पूजनीय ब्रम्हचैतन्य महाराजांचेच एक वाक्य आहे. 


" साखर कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते. उभ्याने, बसून, झोपून  कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते. " हे नामाबद्दल चिकित्सा करणार्‍या साधकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.


मन एकाग्र झाल्यावर नाम घ्यावे ? की नाम घेता घेता मन एकाग्र होईल ? या चिकित्सेत फार न पडता फक्त नाम घेत जावे. 


" नकळत पद अग्निवरी पडे,

न करी दाह असे कधीही न घडे,

अजित नाम घडो भलत्या मिसे,

सकल पातक भस्म करितसे." 

हा श्लोक लक्षात ठेवावा आणि आपली जपसाधना अचल अविरत करीत जावी. 


- अचानक अंतःप्रेरणेने सुचलेले सर्वांपर्यंत सहज पोहोचवणारा साधक, वैभवीराम प्रकाश किन्हीकर




Monday, May 5, 2025

चंद्रपूर आणि व्हॉल्व्हो बस यांचे नाते

संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी बसेसचे पेव साधारण १९९१-१९९२ पासून फुटले. माझ्या लाडक्या चंद्रपूर शहरातूनही याच सुमारास नागपूरसाठी खाजगी बससेवा सुरू झाली.

सुरूवातीला फक्त चंद्रपूर - नागपूर, चंद्रपूर - गडचिरोली आणि चंद्रपूर - ब्रह्मपुरी या मार्गांवर असलेल्या सेवा काही कालावधीने चंद्रपूर - छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर - पुणे अशा विस्तारित झाल्यात.
२ बाय २ विना वातानुकूल आसनी - २ बाय २ वातानुकूल आसनी ते २ बाय १ वातानुकूल शयनयान इथपर्यंत बसेसचा दर्जा वाढत गेला.
फक्त एकच खंत आहे ती म्हणजे चंद्रपूरच्या पावन भूमीवर व्हाॅल्वो बसची चाके कधी धावलीच नाहीत. नाही म्हणायला गणराज ट्रॅव्हल्सने मधल्या काळात १५ मीटरची लांबचलांब मर्सिडीज बस चंद्रपूर - नागपूर मार्गावर चालवून पाहिली. एस. टी. ने ही चंद्रपूर - नागपूर - पुणे ही मल्टीअॅक्सल स्कॅनिया (ब्रँडनेमः अश्वमेध) चालवली. (आणि या आतबट्ट्याच्या व्यवहारात चांगलेच हात पोळून घेतले होते) पण चंद्रपूरमधल्या एकाही ट्रॅव्हल्सवाल्याला किंवा चंद्रपूरपर्यंत सेवा देणार्या महाराष्ट्रातल्या एकाही ट्रॅव्हलवाल्याला चंद्रपूर मार्गावर व्हाॅल्वो बस धाडावी असे वाटले नाही. असे का ? हा मला कायम छळणारा प्रश्न आहे.
- नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकात जगभरातल्या अनेक बसेस जरी भारतात अवतरल्यात तरी व्हाॅल्वो ती व्हाॅल्वोच या प्रांजळ मताचा, चंद्रपूरप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
यापूर्वीच्या सविस्तर आठवणींचा लेख इथे.



Sunday, May 4, 2025

नागपूरकर आणि हापूस

पु.ल. म्हणाले होते की नागपूरकरांच्या "या नागपूरला संत्री बिंत्री खायला" या आमंत्रणाला प्रतिसाद देण्याच्या भानगडीत मुंबईकराने पडू नये. मुंबई ते नागपूर जाणेयेणे प्रवासभाडे लक्षात घेता मुंबईत संत्री स्वस्त मिळतात.

त्याच्या अगदी १८० अंश विरोधात नागपूरकर (किंवा कुठलाही वैदर्भिय) आणि हापूस यांचे नाते आहे.
एकतर वैदर्भिय माणसाला हापूसचे अजिबात कौतिक नाही. खूप जणांनी शिफारस केल्यानंतर "तो हापूस हापूस म्हणतात तो आंबा खाऊन तरी बघू" असे म्हणून तो हापूस विकत घ्यायचा विचार करतो न करतो तोच...
...नागपूरातले हापूसचे दर ऐकून यापेक्षा याच खर्चात दोन माणसांनी रत्नागिरीला / देवगडला जाऊन यापेक्षा दुप्पट हापूस खाऊन परतता येते हे गणित त्याच्या लक्षात येते.
इथे एक वैदर्भिय खवैय्या माणूस किमान ५ किलो आंब्याचा रस दोन तीन दिवसात खातो हे गृहीत घेतले आहे. बादल्या बादल्यांमध्ये आंब्याचा रस भरलेला, पंगतीत आग्रह करकरून १० - १० वाट्या आंब्याचा रस वाढलेला (सोबत कांद्याचे भजे, तोंडीलावणे म्हणून भोकराचे लोणचे) त्याने बघितला असतो. तेवढा हापूसचा रस दोन माणसांनी नागपुरात खायचे ठरवले तर त्या किंमतीत तेच दोघे जण कोकणात जाऊन तेवढाच रस खाऊन परतू शकतात.
आणि सगळ्यात कहर म्हणजे शेवटी तो हापूस खातही नाही आणि रत्नागिरी /देवगडलाही जात नाही.
- ठाणे/मुंबईत मुक्कामी असताना दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत नागपूरला परतताना आवर्जून दोन तीन पेट्या हापूस घेऊन जाणारा हापूस प्रेमी, बेलमपल्ली (उच्चारी बैंगनफल्ली) धर्मी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, May 1, 2025

एक झोका : आठवणींचा

आज संध्याकाळी घरी परतताना थोडासा रिमझिम पाऊस पडत होता. गाडीत नेमका "गारवा" अल्बम लागलेला होता.

मराठी गाण्यांमध्ये मी पुण्याची गाणी आणि मुंबईची गाणी असे दोन प्रकार मानत आलेलो आहे. शब्दप्रधान गायकीची, मोजक्याच वाद्यवृंदासह घनगंभीर गायलेली गाणी पुण्याच्या (गायक / वादक / गीतकार) संचातली असतात.
तर सुंदर वाद्यवृंदात, शब्दांना हवे तितकेच महत्व देऊन केलेली मेलोडियस गाणी ही मुंबईच्या (गायक / वादक / गीतकार) संचातली असतात हे माझे निरीक्षण आहे.
तर "गारवा" अल्बम टिपीकल पुणेरी संचातला आहे. गाणी, त्यांची सुरावट ऐकता ऐकता आणि बाहेरचे कुंद, सर्द वातावरण बघता अनुभवता मी ३५ वर्षे भूतकाळात गेलो.
अचानक मला पुण्यावरून कराडचा प्रवास एस. टी. ने करणारा द्वितीय किंवा तृतीय वर्ष अभियांत्रिकीतला राम दिसायला लागला. सातारा बसस्टॅण्ड साधारण दुपारी ३.०० - ३.३० ला सोडलेले. सातार्याची खिंड ओलांडून त्यावेळेसच्या NH 4 ने बस कराडच्या दिशेने धावतेय. वातावरणात मळभ दाटून आलेले. दूरवरचा साखर कारखाना आणि तिकडे ऊस घेऊन जाणार्या ट्रॅक्टर्सची, बैलगाड्यांची रांग दिसतेय. उद्यापासून पुन्हा काॅलेज, सबमिशन्स, अभ्यास याचे रहाटगाडगे सुरू होणार या जाणीवेने मन हळुहळू कातर होत चाललेय. उंब्रज बसस्थानकावरून बस कराडकडे निघाली की चाफळ फाट्याकडे बघून बसमधूनच त्या दिशेला हात जोडत, "रामराया, सांभाळून घे रे बाबा. सीतामाई, लक्ष राहू दे गं बाई. लक्ष्मणा, वेळीप्रसंगी धावून ये रे बाबा."
"हनुमंता, सदैव सोबत रहा रे मित्रा. रामदासस्वामी महाराज, आशीर्वाद कायम पाठीशी असू द्यात." अशी अत्यंत करूणायुक्त भावनेने या सगळ्यांना घातलेली साद आठवते.
काहीकाही स्वर, काहीकाही दिवसवेळा अशा असतात की अगदी बालपणीचा कुहीकर वाडा आठवतो. त्या वाड्यातल्या दोन खोलींच्या २२५ स्केअर फूटच्या घरातली हिवाळी दुपार आठवते. आईच्या कुशीत, कधी तिच्या मांडीवर डोके ठेऊन गोधडी पांघरून पसरलोय. आई काहीतरी बोलतेय, कधी तिच्याविषयी, कधी तिच्या आपल्याबद्दलच्या स्वप्नांविषयी, कधी एखादी गोष्ट सांगतेय तर कधी संत गजानन प्रार्थना स्तोत्र पुटपुटतेय. त्या ग्लानीतच झोप लागतेय.
ते सुख, तो आनंद पुन्हा भोगावासा वाटण्यासाठी यानंतर किती जन्म घ्यावे लागतील ? हे सांगता येणार नाही. या जन्मात तर आता आईच्या मांडीवर झोपायला आता आई नाही, कुहीकरांचा वाडाही नाही आणि आता ते बालपणही नाही.
कुठल्या क्षणी कुठल्या एखाद्या वासामुळे, स्वरामुळे, वातावरणामुळे मन किती आणि कुठे जाईल ? किती भूतकाळात जाईल ? किती भविष्यात घेऊन जाईल ? काहीच सांगता येत नाही. मन तिथेच रमून जाते.
गाडीच्या टायर्सना, एंजिनला नेहेमीची सवय झाली आहे म्हणून गाडी सुखरूप घरी घेऊन आली एव्हढेच. बाकी आज मन भलतीकडेच होते. हात यांत्रिकपणे स्टिअरींगवर, गियर नाॅबवर आणि पाय सरावाप्रमाणे ब्रेकवर, अॅक्सीलेरेटरवर चालत होते, बस्स.
- मनाला जेवढे ताब्यात ठेवण्याचा जेवढा अट्टाहासाने प्रयत्न करू तेवढे मन नाठाळ घोड्याप्रमाणे उधळते हे जाणणारा (आणि त्याचबरोबर कधीकधी कसलाही प्रयत्न न करता मन इतके नितळ तळ्यासारखे होते की मनाच्या खोलखोल तळ्यात आपण आरपार बघू शकतो, त्याचा अंदाज घेऊ शकतो हा अनुभव घेणारा) सर्वसामान्य माणूस प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.