पु.ल. म्हणाले होते की नागपूरकरांच्या "या नागपूरला संत्री बिंत्री खायला" या आमंत्रणाला प्रतिसाद देण्याच्या भानगडीत मुंबईकराने पडू नये. मुंबई ते नागपूर जाणेयेणे प्रवासभाडे लक्षात घेता मुंबईत संत्री स्वस्त मिळतात.
त्याच्या अगदी १८० अंश विरोधात नागपूरकर (किंवा कुठलाही वैदर्भिय) आणि हापूस यांचे नाते आहे.
...नागपूरातले हापूसचे दर ऐकून यापेक्षा याच खर्चात दोन माणसांनी रत्नागिरीला / देवगडला जाऊन यापेक्षा दुप्पट हापूस खाऊन परतता येते हे गणित त्याच्या लक्षात येते.
इथे एक वैदर्भिय खवैय्या माणूस किमान ५ किलो आंब्याचा रस दोन तीन दिवसात खातो हे गृहीत घेतले आहे. बादल्या बादल्यांमध्ये आंब्याचा रस भरलेला, पंगतीत आग्रह करकरून १० - १० वाट्या आंब्याचा रस वाढलेला (सोबत कांद्याचे भजे, तोंडीलावणे म्हणून भोकराचे लोणचे) त्याने बघितला असतो. तेवढा हापूसचा रस दोन माणसांनी नागपुरात खायचे ठरवले तर त्या किंमतीत तेच दोघे जण कोकणात जाऊन तेवढाच रस खाऊन परतू शकतात.
आणि सगळ्यात कहर म्हणजे शेवटी तो हापूस खातही नाही आणि रत्नागिरी /देवगडलाही जात नाही.
- ठाणे/मुंबईत मुक्कामी असताना दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत नागपूरला परतताना आवर्जून दोन तीन पेट्या हापूस घेऊन जाणारा हापूस प्रेमी, बेलमपल्ली (उच्चारी बैंगनफल्ली) धर्मी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.