Friday, November 27, 2020

एस. टी. चा आंतरराज्य मार्ग: एक विस्मृतीत गेलेला अभिनव प्रयोग

 १९८७ -१९८८ चा काल. एस. टी. ने चंद्रपूर जलद जबलपूर, यवतमाळ जलद जबलपूर आणि अमरावती जलद जबलपूर असे तीन आंतरराज्य मार्ग सुरू केलेत. हे तीनही मार्ग नागपूर - २ (सध्याचे गणेशपेठ) आगारातर्फ़े चालविले जायचे. चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावतीवरून या गाड्या सकाळी ७.०० वाजता निघायच्यात. नागपूरला सकाळी १०.३० च्या सुमारास पोहोचल्यात की त्यातली अमरावती जलद जबलपूर गाडी जबलपूरच्या फ़लाटावर (फ़लाट क्र. ४) वर लागायची आणि इतर दोन गाड्यांमधले (चंद्रपूर जलद जबलपूर आणि यवतमाळ जलद जबलपूर) थेट जबलपूरचे प्रवासी या गाडीमध्ये स्थानांतरित व्हायचेत. या दोन्ही गाड्यांची वाहक मंडळी या स्थलांतरापर्यंत प्रवाशांच्या सोबत असायचीत, प्रवाशांना मदत करायचीत. चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती या प्रत्येक ठिकाणावरून थेट जबलपूरसाठी रोज पूर्ण गाडी भरून प्रवासी मिळणे कठीण होते. म्हणून ही व्यवस्था. 


तेव्हा नागपूरवरून जबलपूरसाठी सकाळी ११.००, दुपारी १.०० आणि दुपारी ३.०० अशा तीन वेळांवर नागपूर - २ डेपोच्या गाड्या होत्या. त्यातल्या सकाळी ११.०० च्या वेळा नागपूर डेपोने अशा वाटून दिल्या होत्या.


परतीच्या प्रवासात जबलपूरवरून सकाळी ११.०० वाजता जबलपूर - अमरावती गाडी निघायची. नागपूरला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही गाडी पोहोचली की फ़लाट १ वरून हीच गाडी अमरावतीसाठी आणि फ़लाट १८ आणि १९ वरून अनुक्रमे जबलपूर जलद यवतमाळ आणि जबलपूर जलद चंद्रपूर गाड्या सुटायच्या. रात्रभर अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूरला मुक्कामी राहून सकाळी या सगळ्या गाड्या परतीच्या प्रवासाला निघायच्यात.


नागपूर ते जबलपूर हे २६० किमी अंतर कापायला त्याकाळी सात ते साडेसात तास लागायचेत. त्याकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र ७ ची (वाराणसी ते कन्याकुमारी) स्थिती तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात चांगली असली तरी तत्कालीन मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशात प्रवेश केला की रस्त्यावरचे खड्डे आपले अस्तित्व दाखवायला सुरूवात करायचेत. आता मात्र उलट परिस्थिती आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाने रस्ता बांधणीत खूप प्रगती केलेली आहे तर तत्कालीन प्रगत महाराष्ट्र या आघाडीवर जरा माघारलाय.


आज नागपूर डेपो आपली एकही गाडी नागपूर - जबलपूर मार्गावर पाठवत नाही. आज हा प्रवास पाच ते सहा तासात होऊ शकतो. खाजगी गाड्यांकडून दिवसा तरी या मार्गावर स्पर्धा नाही. दोन शिवशाही दिवसा आणि एक आसनी + शयनयान गाडी रात्रीच्या वेळेवर फ़ुल्ल चालू शकतील. फ़क्त योग्य नियोजन आणि या मार्गाची भरपूर जाहिरात प्रवाशांमध्ये होणे आवश्यक आहे. 


तशीच एखादी शिवशाही नागपूर - रायपूर मार्गावरही सकाळी जाऊन, संध्याकाळी परतीच्या वेळेवर धाडता येईल. खाजगी कडून सकाळच्या वेळेला स्पर्धा नाही. प्रवाशांना केवळ रेल्वेवर अवलंबून रहावे लागते आणि सध्य नियमित रेल्वे सुरू झालेल्या नाहीत याचा फ़ायदा एस. टी. ने घ्यायलाच हवा. शिवाय एकेकाळी नागपूर ते रायपूर या ३०० किमी प्रवासाला ७ ते ८ तास लागायचेत त्यासाठी आता फ़क्त ५ तास लागतात. (स्पीड लॉक असलेल्या आपल्या एस. टी. साठी ६ तास)  


एस. टी. ने आता नवनवीन कल्पना अंमलात आणण्याची गरज आहे.


- एस. टी. टिकावी, वाढावी असे मनापासून वाटणारा प्रवासी पक्षी, राम.




1 comment: