Showing posts with label Nagpur - Pune Travel. Show all posts
Showing posts with label Nagpur - Pune Travel. Show all posts

Sunday, December 10, 2023

नागपूर - पुणे प्रवाशांसाठी खुशखबर. स्वस्त आणि मस्त एसी - नॉन एसी प्रवासाचा आता उपलब्ध झालेला ऑप्शन.

सणासुदीचे, लागून असलेल्या लांब सुट्ट्यांचे दिवस आलेत की नागपूर - पुणे - नागपूर या मार्गावरच्या प्रवाशांची वर्दळ वाढते. विदर्भात होणा-या विकासाची वाट बघून बघून विदर्भातले टॅलेंट सगळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात नोकरीनिमित्त गेलेले आहे. अशा सुट्ट्यांच्या निमित्ताने त्यांना आपल्या आप्तजनांना भेटावेसे वाटते किंवा त्यांचे आप्तजन त्यांना भेटायला जातात आणि साहजिकच नागपूर - पुणे - नागपूर या प्रवासाला सर्वत्र गर्दी होते.


नागपूर ते पुणे जायला भरपूर जागा उपलब्ध असलेल्या दोनच रेल्वेगाड्या आहेत. सकाळी नागपूरवरून निघणारी आणि दुस-या दिवशी पहाटे पुण्याला पोहोचणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास नागपूरवरून निघून दुस-या दिवशी सकाळी पुण्याला पोहोचणा-या नागपूर - पुणे एक्सप्रेस / गरीब रथ एक्सप्रेस / बिलासपूर - पुणे एक्सप्रेस. तसे तर आजकाल रोज संध्याकाळी 7 वाजून 50 मिनीटांनी अजनीवरून निघणा-या काही एसी एक्सप्रेस गाड्या, विशेष भाडे असलेल्या एक्सप्रेस गाड्याही आहेत पण त्या पुण्याला दुस-या दिवशी दुपारी उशीरा पोहोचतात त्यामुळे थोड्या गैरसोयीच्याच आहेत. 


मग प्रवाशांची धाव ट्रॅव्हल्सच्या बसेसकडे येते. पण अगदी कितीही वातानुकूल शनयान असलेल्या आणि 12 ते 14 तासात नागपूर ते पुणे पोहोचणा-या या बसेस ज्येष्ठ नागरिक आणि स्त्री प्रवाशांसाठी या बसेस अत्यंत गैरसोयीच्या आहेत. त्यांचे वेळी अवेळी असणारे थांबे. तिथे अस्तित्वात नसलेली स्वच्छ स्वच्छतागृहे. ज्येष्ठ नागरिक बहुतांशी मधुमेही असल्याने त्यांना वेळी अवेळी टॉयलेटला जावे लागणे. त्यासाठी बस थांबवावी लागण्यास अनुत्सुक ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स. शिवाय सणासुदीला, लागून आलेल्या लांब सुट्यांच्या वेळी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केलेली काहीच्या काही भाडेवाढ. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा प्रवास म्हणजे बहुतांशी लोकांना अगदी नाईलाजाने करण्याची गोष्ट असते. या विषयावर यापूर्वी मी लिहीलेल्या पोस्ट्च्या लिंक्स इथे आणि इथे.

यावर आता एक मार्ग आलेला आहे. माझ्यातल्या रेल्वेफ़ॅनने एका बातमीची नोंद घेतली आणि सगळ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक गोष्ट मला सर्वांसमोर मांडावीशी वाटली. 


आजवर 12120 अप अजनी - अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस संध्याकाळी 6.30 ला नागपूरवरून सुटायची आणि रात्री 9.50 ला अमरावती येथे पोहोचून तिथेच थांबायची. हीच गाडी आपला परतीचा प्रवास 12119 डाऊन या नंबरने पहाटे 5.30 ला सुरू करून नागपूरला सकाळी 8.15 ला पोहोचायची. तिथे अजनी यार्डात दिवसभर तिचा मेण्टेनन्स झाला की पुन्हा संध्याकाळी अमरावतीला परत जायची.


पण महिन्याभरापूर्वी मध्य रेल्वेने पुणे - भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस अमरावतीपर्यंत वाढवली आणि या गाडीचा व अमरावती - नागपूर इंटरसिटीचा रेक शेअरींग होऊ लागला. म्हणजे पुण्यावरून सकाळी 11.05 ला निघालेली 11025 डाऊन पुणे - अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस रात्री 12 वाजून 55 मिनीटांनी अमरावतीला पोहोचू लागली आणि रात्रभर मुक्काम करून सकाळी 5.30 ला अमरावती - अजनी इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून निघू लागली.


हीच गाडी अजनी, नागपूरवरून संध्याकाळी 6.30 निघून रात्री 9.50 ला अमरावतीला पोहोचते आणि पुढे तासभर थांबून रात्री 10.50 ला हीच गाडी 11026 अप अमरावती - पुणे इंटरसिटी म्हणून निघते आणि पुण्याला दुस-या दिवशी सकाळी 11.05 ला पोहोचते. या गाडीला एक एसी चेअर कार, नऊ नॉन एसी चेअर कार्स आणि चक्क एक नॉन एसी स्लीपर कोच लागतो आहे.  या गाडीने नागपूर ते अमरावती आणि अमरावती ते पुणे अशी दोन वेगवेगळी तिकीटे काढून स्लीपर कोचमध्ये केवळ 500 रूपयांच्या आसपास, एसी चेअर कार मध्ये 800 - 850 रूपयांच्या आसपास तर नॉन एसी चेअर कारमध्ये 250 -300 रूपयांच्या आसपास हा 16 तास 30 मिनीटांचा नागपूर ते पुणे प्रवास शक्य होईल. आणि साधारण आठवडाभर आधीही या गाडीची तिकीटे उपलब्ध असतील. 


10 - 12 वर्षांपूर्वीचा नागपूर ते पुणे प्रवास आठवा. एस. टी. च्या किंवा खाजगी गाड्यांच्या स्लीपर कोच येण्यापूर्वी आपण एस. टी. च्या किंवा खाजगी गाड्यांच्या चेअर कार असलेल्या बसेसमधूनच आपण प्रवास करायचो. त्यातून बसमध्ये बसून केलेला प्रवास आणि रेल्वेच्या एसी चेअर कार मधला प्रवास यात जमिन आस्मानाचा फ़रक आहे. रेल्वेत टॉयलेटस उपलब्ध असणे, वेळप्रसंगी पाय मोकळे करण्यासाठी गॅंगवेमधून चालता येणे यामुळे रेल्वेप्रवास हा फ़ारच सुखकर आहे. त्यामुळे सध्या ऐनवेळी प्रवास आखावा लागल्यास आणि ट्रॅव्हल्सने गैरसोय करत जायचे नसल्यास नागपूर - अमरावती - पुणे हा नवा प्रवासमार्ग सोयीचा आहे. 


परतीच्या प्रवासात मात्र ही पुणे - नागपूर थेट सेवा नाही बरं का. याचे कारण म्हणजे पुण्याला सकाळी 11.05 ला पोहोचलेली अमरावती - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस दिवसभर पुणे यार्डात थांबून संध्याकाळी 5.55 ला 12157 डाऊन पुणे - सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस म्हणून रवाना होते. सोलापूर येथे रात्री 9.40 ला पोहोचून ही गाडी रात्रभर सोलापूरलाच थांबते. सोलापूर यार्डातच तिची देखभाल होते आणि दुस-या दिवशी सकाळी हाच रेक 12158 अप सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस म्हणून सोलापूरवरून सकाळी 6.30 ला निघून पुण्याला सकाळी 10.30 ला पोहोचतो. तिथून लगेच 11.05 ला 11025 डाऊन पुणे - अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून निघतो आणि अमरावतीला उत्तररात्री 12.55 ला पोहोचतो. 


त्यामुळे परतीच्या प्रवासात सोलापूर ते पुणे आणि पुणे ते अमरावती / अकोला / शेगाव असा स्वस्त, मस्त आणि कमी शीण आणणारा आरामदायक प्रवास या गाडीने शक्य आहे. पण अमरावतीला हा रेक रात्रभर पडून राहून दुस-या दिवशी पहाटे नागपूरला निघत असल्याने पुणे ते नागपूर या प्रवासासाठी ही गाडी थोडी गैरसोयीची आहे. 


या सगळ्या रेक्सचे रेक शेअरींग अशा प्रकारे आहे.




तर करणार का हा प्रयोग ? अगदी आपद धर्म म्हणून करायला हरकत नाही. ट्रॅव्हल्सवाल्यांची दादागिरी आणि गैरसोय मोडून काढायची असेल तर नागपूर आणि विदर्भातल्या लोकांनी हा प्रयोग जरूर करायला हवा.


- आजवर आपल्या स्वतःच्या बस आणि रेल्वे फ़ॅनिंगचा आपल्या संपर्कातल्या नातेवाईक मित्रमंडळींना फ़ायदा करून देणारा आणि आजनंतर हा फ़ायदा सगळ्या जनतेला व्हावा या निश्चयाने असे लिखाण वारंवार करण्याचे ठरवलेला, रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Saturday, June 24, 2023

रेक शेअरींग : आता "वंदे भारत"चेही.

 


गाड्यांचे रेक्सचे शेअरींग भारतीय रेल्वेत फ़ार पूर्वीपासूनच सुरू झालेले होते. एखादी गाडी आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचल्यानंतर खूप वेळ तशीच पडून राहत असेल तर त्या स्थानापासून दुसरीकडे जाण्या-या एखाद्या गाडीसाठी त्या गाडीचा रेक रेल्वे वापरते ही कल्पना जुनी आहे. उदाहरणार्थ मुंबईवरून नागपूरला येणारी सेवाग्राम एक्सप्रेस पहाटे नागपूरला येत असे आणि थेट रात्रीच परतीच्या प्रवासाला निघत असे. या गाडीची मूलभूत देखरेख जरी नागपूरला होत असली तरी त्यासाठी दिवसभर ही गाडी नागपूरच्या यार्डात पडून राहणे म्हणजे संसाधनांचा अपव्यय आहे हे रेल्वेच्या लक्षात आलेले होते आणि म्हणूनच पहाटे आलेली ही गाडी सकाळी लगेच नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून जायची आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नागपूरला आलेली महाराष्ट्र एक्सप्रेस ही रात्री दहा वाजता सेवाग्राम एक्सप्रेस बनून जायची. आता महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियापर्यंत वाढवली गेल्याने हे रेक शेअरींग थांबलेले आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेसचे नक्की रेक शेअरींग मी स्वतः तीन रात्री आणि तीन दिवस कराड स्टेशनात थांबून शोधून काढले होते त्या संशोधनाची कथा इथे.


भारतीय रेल्वे ने दोन तीन वर्षांपासून वंदे भारत म्हणून एक नवीनच रेल्वेगाडीची संकल्पना आणलेली आहे. विदेशातल्या चकाचक गाड्यांच्या धर्तीवरच्या चकाचक गाड्या, तशा सोयीसुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे या गाड्या सर्वसामान्यांचे आकर्षण बनलेल्या आहेत. तिकीटदर जरी सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असला तरी या विमानासारखी अंतर्गत रचना असलेल्या या गाड्यांनी कधी ना कधी प्रवास करायचा ही सुप्त इच्छा सर्वसामान्यांच्या मनात आहेच. या गाड्या सध्या तरी सर्व रचना आसनांची असलेल्याच आहेत. साधारण आठ ते नऊ तास प्रवासवेळ लागत असलेल्या ठिकाणांदरम्यान सध्या या गाड्या सुरू केलेल्या आहेत. या गाड्यांमध्ये शयन व्यवस्था असलेले कोचेस येणार आहेत आणि त्यानंतर एक हजार किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी या गाड्या सुरू होतील ही हाकाटी गेली तीन वर्षे ऐकतो आहे पण अजून ते स्वप्न स्वप्नच राहिलेले आहे. 




म्हणूनच परवा एका न्यूज पोर्टलवर नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार ही बातमी वाचून ती बातमी वाचण्यासाठी ते न्यूज पोर्टल उघडले. आजकाल सगळ्याच न्यूज पोर्टल्सवर "जाणून घ्या ’या’ अभिनेत्रीने नाकारला ’हा’ चित्रपट" किंवा "या दोन स्टेशन्सदरम्यान सुरू होणार ’ही’ नवीन गाडी" असल्या आणि असल्याच उगाच सनसनाटी निर्माण करणा-या बातम्या असतात त्यामुळे त्या न्यूज पोर्टल्स उघडून बघण्याची हिंमतच होत नाही. पण यात सरळ सरळ "नागपूर ते पुणे" दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी निश्चित बातमी होती. बातमी वाचली आणि ही बातमी, त्या वार्ताहराचे बातमीबाबतचे विश्लेषण बरोबर असेल तर वंदे भारत या प्रतिष्ठेच्या गाड्यांचेही रेक शेअरींग रेल्वेने करायला सुरूवात केली आहे असे मानायला हरकत नाही.


रेल्वे नागपूर ते सिकंदराबाद तसेच सिकंदराबाद ते पुणे अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार असल्याची दाट शक्यता आहे. या दोन्हीही गाड्या मध्य रेल्वेच्या असण्याची शक्यता खूप जास्त आहे. नागपूरवरून सकाळी सहाच्या आसपास निघून साडेसहा तासात (साधारण दुपारी साडेबाराच्या वेळेला) ही वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद येथे पोहोचण्याची शक्यता आहे. तशीच पुण्यावरून सध्याच्या शताब्दीच्या वेळेला सकाळी साडेपाच, सहाला निघून आठ तासांनी दुपारी दीड ते दोनच्या सुमाराला ही वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादला पोहोचण्याची वेळ शक्य आहे.


मग नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादला दोन तीन तास थांबवून परत नागपूरकडे सोडण्यापेक्षा आणि पुणे - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस परत दुपारी अडीच -तीन वाजता सिकंदराबादवरून पुण्याकडे परत पाठवण्यापेक्षा (ही गाडी आठ तासांनी रात्री अकरा वाजता पुण्याला पोहोचेल.) नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला सिकंदराबादला पंधरा मिनीटेच थांबवून लगेच दुपारी एक वाजेपर्यंत पुण्याकडे रवाना करायची म्हणजे ती पुण्याला रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचू शकेल. आणि पुण्यावरून दुपारी दोन वाजता सिकंदराबादला येणारी पुणे - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस तशीच दुपारी अडीच वाजता नागपूरकडे सोडून नागपूरलाही ती रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचावी हा प्रयत्न मध्य रेल्वेचा असेल तर ती अत्यंत स्तुत्य बाब ठरेल.


फ़क्त नागपूर ते पुणे,  भुसावळ - मनमाड - कोपरगाव - नगर - दौंड मार्गे थेट अंतर 885 किमी पडते. पण सेवाग्राम - चंद्रपूर - बल्लारशाह - काझीपेठ - सिकंदराबाद - वाडी - सोलापूर - दौंड मार्गे हेच अंतर 1173 किमी पडते. जवळपास 288 किमी जास्त. पण जर वंदे भारत एक्सप्रेसने हा प्रवास साडेचौदा ते पंधरा तासात आणि आरामदायक होणार असेल तर या गाडीला चांगला प्रतिसाद लाभेल असे वाटते. फ़क्त या गाडीच्या तिकीटांच्या बाबतीत तर्कशुद्ध विचार करून तिकीट थोडे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात ठेवायला हवे. "उत्तम सुखसुविधा हव्या असतील तर थोडे जास्त पैसे मोजावेच लागतील." हा विचार बरोबर असला तरीही थोडे थोडे करता करता फ़ार जास्त पैसे करून या सुखसुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवून "तुमची लेको या असल्या गाड्यांमध्ये बसण्याची लायकीच नाही." असे सर्वसामान्य जनतेला अप्रत्यक्ष हिणवणेही योग्य नाही हे सुद्धा नियोजनकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.


- भारतभर चालणा-या विविध गाड्यांचे रेक शेअरींग अत्यंत आवडीने आणि आनंदाने अभ्यासणारा, एक सर्वसामान्य रेल्वेफ़ॅन, राम.