Showing posts with label Sant Dnyaneshwar. Show all posts
Showing posts with label Sant Dnyaneshwar. Show all posts

Saturday, January 17, 2026

नामयाचा जो जिव्हार

सकाळी उठलो आणि फ़ोनमध्ये युट्यूब उघडले. आज सकाळी सकाळी आवरताना, स्वयंपाक करताना, अभिषेकी बुवांचा शिवमत भैरव ऐकण्याची खूप मनापासून इच्छा झाली होती. "जितेंद्र अभिषेकी" हे नाव युट्यूब च्या शोध सदरात टाइप केले आणि अभिषेकी बुवांनीच गायलेला एक परिचित अभंग पहिल्या नंबरवर दिसला. मग तोच लावला. म्हटलं शिवमत भैरव यानंतर ऐकूयात. सकाळ छान सुरू झाली आणि मनात दिवसभरासाठी विचारचक्रही सुरू झाले.


संत जनाबाईंचा "संत भार पंढरीत" हा अभंग होता. आजवर अक्षरशः शेकडो वेळा ऐकलेला हा अभंग अभिषेकी बुवांनी छानच गायलाय. आणि अभिषेकी बुवांइतकाच छान आजच्या तरूण मंडळींपैकी केतकी माटेगावकरने पण गायलाय. सुंदर ठेहराव घेत, नजाकतीने, त्यातल्या जागा समजून. माझ्या प्ले लिस्ट मध्ये केतकीने गायलेला पण अभंग आहे. काहीकाही सूर दरवेळी ऐकताना मनाला हळवे करतात, डोळ्यात पाणी तरळवतात.


पण आज त्यातले शब्द वेगळ्याच अर्थाने खुणावू लागलेत. "सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार" या शब्दांनी दिवसभर मनात पिंगा घातला होता. संत जनाबाई ह्या त्याकाळात संत नामदेवांच्या घरी वाढलेली संत नामदेव महाराजांच्या कुटुंबातील एक दासी. आजच्या युगाच्या भाषेत सांगायचे तर गृह मदतनीस सखी. संत नामदेवांच्या घरी त्याकाळी त्यांचे सगळेच कुटुंबिय अभंग रचनेत आणि ईश्वरभक्तीत रममाण झालेले होते. त्याचाच परिणाम त्यांच्या या दासीवर झाला असण्याची शक्यता आहे. संत नामदेवांच्या सहवासात विचारांना पक्की बैठक लाभलेल्या आणि ईश्वराप्रती पूर्ण समर्पण पावलेल्या संत जनाबाईंनी फ़ार सुंदर शब्द या अभंगात लिहीलेत. "सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार" 


संत नामदेव महाराजांनी सर्व संतांची माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांना आपला सखा मानले होते आणि त्यांना ते आपला जिव्हार मानत असत असा एक लौकिकार्थ या अभंगातून संत जनाबाईंना मांडायचा आहे. जिव्हार या शब्दाचा एक अर्थ "जिवलग मित्र, आत्मा, प्रिय सखा" असाही होतो आणि आपण सर्वसामान्य मंडळी जिव्हार हा शब्द "हृदय" या अर्थाने सुद्धा वापरतो. एखादी गोष्ट "जिव्हारी लागणे" म्हणजे ती गोष्ट हृदयात खोचली जाणे, अगदी नेहेमीसाठी त्या गोष्टीचे स्मरण होणे या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. जिव्हार या शब्दाचा आपल्या वापरातला आणखी एक अर्थ म्हणजे आपले मर्मस्थळ.


संत ज्ञानेश्वर माऊली या सकल मराठी माणसांचे मर्मस्थळ आहेत मग ते त्यांचे शिष्य असलेल्या संत नामदेवांचे मर्मस्थळ असल्यात म्हणून नवल ते काय ? मग मनात विचार येऊन गेला की आपणही आपल्या अगदी सुहृद नातेवाईकांमध्ये, अतिशय जवळच्या मित्रमंडळींमध्ये त्यांचा त्यांचा जिव्हार होऊ शकू का ? इतकी आत्मीयता, प्रेम आपण आपल्या जवळच्या मंडळींमध्ये आपल्या वागण्या बोलण्याने आणि प्रेमळ निःस्वार्थ वृत्तीने निर्माण करू शकू का ? आणि असे जर आपण जगात वागत गेलोत तर "किंबहुना सर्वसुखी" या माऊलींनीच दाखविलेल्या आनंदाप्रत आपण सहज पोहोचू शकू, नाही का ? 


"सगळ्या मोठ्या गोष्टी या अत्यंत साध्याच असतात" असे एका पाश्चात्य विचारवंताचे मत आहे. त्या इतक्या साध्या असतात की सर्वसामान्य माणसांचा सुरूवातीला त्यावर "छे ! छे ! एव्हढी मोठी गोष्ट इतकी साधी कशी असू शकेल ?" असा अविश्वास असतो. तसेच आपण आपल्या सुहृद नातेवाईकांचा आणि जवळच्या मित्रमंडळींचा जिव्हार बनण्य़ाच्या प्रक्रियेचे आहे. त्या प्रक्रियेची मूलतत्वे फ़ार साधी आहेत आणि ती आपल्याला आपल्या प्रेमळ, निःस्वार्थ वागण्या बोलण्यातून रूजवत जायची आहेत हे इतके सोपे आहे. एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांचा तरी जिव्हार आजवर बनलोय का ? किंवा भविष्यात बनू शकतो का ? या प्रश्नाच्या धांडोळ्यात आणि त्यासाठी आपली वागणूक कशी असावी ? हे नियोजन करण्यात आजचा दिवस छान गेला.


"जिव्हार" या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे आपली जीभ. "ज्ञानोबामाऊली म्हणजे्च माझी वाणी आहेत, माझ्या सर्व अभंगांची प्रेरणा आहे "या अर्थाने तर संत नामदेवांना ज्ञानोबामाऊलींचा उल्लेख या अभंगात करायचा नव्हता ना ? हे शोधण्यात संध्याकाळ दरवळून गेली. यापूर्वी शेकडो वेळा ऐकलेल्या आणि सकाळपासून मनात रूंजी घालत असलेल्या या अभंगाने मनात अर्थाची निरनिराळी वलये निर्माण केलीत, मन अधिक सात्विकतेकडे ओढले, अधिक ईश्वरप्रवण केले हे मात्र नक्की.


- अनेक जन्म घेऊन संतांच्या चरणाची केवळ धूळ होण्याची तरी पात्रता लाभावी या प्रामाणिक आकांक्षेचा एक साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१७ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Tuesday, November 14, 2023

बंधनापासूनी उकलली गाठी

जगदगुरू श्रीतुकारामबाबा लिहून गेले 


"बंधनापासूनी उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश"


हा जीव जोवर "मी देह" या बंधनात अडकून इतर जगाला स्वतःपेक्षा वेगळे मानीत राहील तोवर तो बंधनात आहे आणि जोवर एकदा ही गाठ उकलली की त्याला स्वतःमधल्या आणि जगामधल्या समस्त प्राणीमात्रांमधल्या अभिन्नतेचा, अद्वैताचा साक्षात्कार होईल आणि मग इतर सगळे प्राणीमात्र आणि आपण यात भिन्नत्व नाही या अभेदतत्वाचे त्या जीवाला ज्ञान होईल आणि मग जीवाला परब्रम्हाला खरी मिठी मारता येईल.


त्यातच त्या जीवाला ज्ञानोबामाऊलींचा 


"क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली"  


चा सुद्धा प्रत्यय येईल. कारण तो जीव आणि परब्रम्ह यांच्यात भेद उरला नाही याची प्रचिती आल्यानंतर जीवाने मिठी मारायची तरी कुणाला. जो मिठी मारतो आणि ज्याला मिठी मारायची ते दोन्ही एकच असल्यावर ही मिठी कशी होणार ?


स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या 

"Each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity within by controlling nature, external and internal. Do this either by work, or worship, or psychic control, or philosophy – by one or more or all of these-and be free. All power is within you; you can do anything and everything." 

या वाक्यात श्रीतुकोबांच्या आणि ज्ञानेबामाऊलींच्या याच तर तत्वाचे प्रतिपादन केलेले आहे. 


"एकम सत, विप्रा बहुधा वदन्ती" या वेदवाणीनुसार एकाच सत्याचा अनेकांना अनेक प्रकारांनी साक्षात्कार झाल्यानंतर ते सर्व वेगवेगळ्या मार्गांनी एकाच मुक्कामाला गेलेले असतील हा निष्कर्ष आपण काढू शकतोच.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर यांचे सायंकालीन चिंतन (कार्तिक शुद्ध प्रतिपदा) दिनांक १४ / ११ / २३. 

Thursday, June 29, 2023

पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती.

 


आज सकाळी सकाळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक श्री. विंदा करंदीकर यांची कविता आठवली.


पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा

सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा

खूप करतो दंगा मस्ती, खोड्या करण्यात आहे अट्टल

मास्तर म्हणतात "करणार काय ? न जाणो असेल विठ्ठल."


पांडुरंग हे सगळ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत. शैव आणि वैष्णव या दोन्हीही सांप्रदायांना सारखेच प्रिय. आपण मराठी माणसे आपल्या देवाशी इतके सख्य करतो की आपल्या मित्रासारखी त्याचीही चेष्टा आपण करतो. म्हणूनच विंदांना ही कविता सुचली असावी. या कवितेत पांडुरंगाच्या काळ्या रंगावरून त्याला चिडवण्यात विंदांची सख्यभक्तीच मला जास्त दिसली.


पंढरपूरला पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती खरेतर काळ्या पाषाणाची आहे. पांडुरंग म्हणजे पांढरा रंग. "पांढरा" हा शब्दच मुळी पांडु या शब्दापासून आलेला आहे. त्या काळ्या रंगाच्या मूर्तीतून अत्यंत दिव्य अशा प्रकारची तेजस्वी प्रभा बाहेर पडत असल्याचे भक्तांना दिसत आलेली आहे. बरे ही अनुभूती फ़क्त संत मंडळी घेतात काय ? नाही. पांडुरंग हा सर्वसामान्य माणसाचा देव आहे. आपल्या वारकरी भक्तांसारखा भाजी भाकरीवर राजी असणारा हा देव आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या मूर्तीतून चैतन्यमय असणारे हे तेज आपण सर्वसामान्यही सहज बघू शकतो. कधीतरी पंढरपूरला गेल्यावर सगळे व्यापताप विसरून. स्वतःचा देह, स्वतःला विसरून एकदा फ़क्त आपण विठ्ठलाकडे नीट डोळे भरून बघितले की त्या काळ्या विठ्ठलातून अत्यंत दिव्य अशा प्रकारची प्रभा, तेज बाहेर पडत असल्याचे आपल्यालाही दिसेल. आपण बाह्य जगात फ़ार गुंततो. तेच गुंतणे आपण देवासमोरही घेऊन जातो. मग दर्शन हा फ़क्त एक उपचार उरतो. दर्शन घेणे, आपल्या मागण्या मागणे आणि बाहेर पडणे यात आपल्या चित्तात त्याच्याविषयी काय आणि किती प्रेम उत्पन्न झाले ? या प्रश्नाचे उत्तर आपण शोधतच नाही. पण स्वानुभवावरून सांगतो की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसालाही ही दिव्य प्रभा अनुभवण्याचा हा अनुभव येणे फ़ार कठीण नाही.


"देवाच्या सख्यासाठी, पडो जिवलगांच्या तुटी" या स्थितीपर्यंत अगदी आपण नाही पोहोचलो तरी क्षणभर स्वतःला विसरून त्याच्या ’दर्शना’ साठी आपण आलोय ही भावना मनात स्थिरावली की आपोआप ती मूर्ती चैतन्यरूप होते आणि त्यातून एक दिव्य तेज, अलौकिक प्रभा बाहेर झळकत असल्याचा ज्ञानोबामाऊलींचा अनुभव आपणही घेऊ शकतो.


मी पहिल्यांदा तिरूपतीला गेलो होतो तेव्हा हा अनुभव मला तिथेही आला होता. तिथली बालाजीची मूर्तीही अशीच काळ्या पाषाणातली आहे. मी पहिल्यांदा तिथे जातोय म्हटल्यावर तिथे नेहेमी जाणा-या माझ्या एका मामेभावाने मला एक टीप दिली. तो म्हणाला, "राम, तू मुख्य सभामंडपात जाशील ना तेव्हा तिथे खूप गर्दी असते. बालाजीसमोर गेल्यानंतर तिथे डोळे भरून पाहीपर्यंत आपल्याला तिथली मंडळी थांबू देत नाहीत. तितका वेळच नसतो. तेव्हा तू मुख्य मंडपात प्रवेश करशील त्या क्षणापासून सरळ बालाजीकडे लक्ष ठेव. तिथे बालाजीकडे जाताना थोडा उतार आहे, त्यामुळे दूरून तुला दर्शन होत राहील. अगदी पुढे मूर्तीसमोर जाईपर्यंत दोन तीन मिनीटे तुला डोळेभरून दर्शन घेता येईल. इतर बहुतांशी मंडळी त्या मंडपात गेल्यानंतर सुरूवातीला तिथे असलेले सोने चांदी जड जवाहिरेच निरखत बसतात आणि बालाजीसमोर आल्यानंतर तिथे थांबू न दिल्याबद्दल, त्याचे डोळा भरून दर्शन न झाल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाला दोष देतात. ते सगळे वैभव आपल्याला प्रदक्षिणा करतानाही बघता येते. मुख्य मंडपात फ़क्त बालाजीच." 


मी त्याचा सल्ला ध्यानात ठेवला आणि अगदी तसेच केले. बालाजीची मूर्ती मला चांगली दोन तीन मिनीटे निरखून बघता आली. त्या मूर्तीतूनही अशीच दिव्य प्रभा बाहेर पडतानाचा हा जन्म धन्य करणारा अनुभव माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिकाला आला. त्यानंतर मी दोन तीन वर्षातच पंढरपूरजवळ सांगोला येथे नोकरीनिमित्त गेलो. तिथे गेल्यावर काय ? पंढरपूर फ़क्त पंचवीस किलोमीटरवर. अगदी अर्ध्या तासात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणे येणे व्हायचे. पांडुरंगाचे मनसोक्त दर्शन दरवेळी व्हायचे. दरवेळी माझ्या लक्षात आले की त्या मूर्तीतून बाहेर पडणारी प्रभा आपण बघू शकतोय. त्यासाठी स्वतःला, स्वतःचे इतर व्याप ताप विसरण्याची विशेष कवायत मला करावी लागत नाही. माझा हा मित्र एव्हढा दयाळू आहे की त्याच्यासमोर गेल्यावर तो आपसूकच माझ्या मनात इतर कुठलीही भावना राहू देतच नाही. फ़क्त तो आणि मी हेच दोघे या जगात उरलोत. आम्ही दोघे आणि त्याचा माझा शब्देवीण संवादू.


हा अनुभव तर आला. आता तो आणि मी ह्या दोन व्यकी नाहीतच, तो आणि मी एकच आहोत. "क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली." हा ज्ञानोबामाऊलींचा अद्वैतानंदाचा अनुभव आलेला नाही. तो अनुभव यावा असे विशेष मागणेही नाही. तसा अट्टाहासही नाही कारण त्याच्या माझ्या नात्यातले आजवरचे सगळे आनंदी अनुभव, त्यानेच, मी न मागता सुद्धा दिलेले आहेत. मग हा अनुभव सुद्धा तोच देईल. योग्य वेळी. या जन्मात, पुढच्या जन्मात, कदाचित आजही. तो जगन्नियंता आहे. त्यालाच हे सगळे ठाऊक आहे. भक्ताने कसलाही अट्टाहास न धरता फ़क्त त्याचे सान्निध्य अनुभवत रहावे याविणा दुसरा आनंद कुठलाच नाही हे आता मला कळलेले आहे.


॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर (आषाढी एकादशी, शोभन नाम संवत्सर, शके १९४५ ) 

Sunday, August 7, 2022

देवाचिये द्वारी - २९

 



कोणाचे हे घर हा देह कोणाचा I

आत्माराम त्याचा तोचि जाणे II


मी तू हा विचार विवेके शोधणे I

गोविंदा माधवा याच देही II


देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा I

सहस्रदळी उगवला सूर्य जैसा II


ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती I

या नावे रूपे ती तुम्ही जाणा II



मी कोण, मी कोणाचा या प्रश्नांचा धांडोळा स्वतःच्या अंतःकरणात घेऊन याच देहात असलेल्या परमेश्वराची अनुभूती साधक मंडळींनी घ्यावी असे अत्यंत आग्रहाचे प्रतिपादन माऊली आपण सर्व साधकांना करताहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध दशमी, शके १९४४ , दिनांक ०७/०८/२०२२)

Saturday, August 6, 2022

देवाचिये द्वारी - २८

 


अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस I

रचिले विश्वासे ज्ञानदेवे II


नित्य पाठ करी इंद्रायणीतीरी I

होय अधिकारी सर्वथा तो II


असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन I

उल्हासेकरून स्मरण जीवी II


अंतकाळी तैसा संकटाचे वेळी I

हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य II


संतसज्जनांनी घेतली प्रचीती I

आळशी मंदमती केवी तरे II


श्रीगुरूनिवृत्ती वचन प्रेमळ I

तोषला तात्काळ ज्ञानदेव. II



अशा हा साध्या सोप्या हरीपाठाचे स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आणि उल्हासाने जो मनुष्यमात्र पठण, चिंतन करेल त्याच्या सर्व संकटांमध्ये आणि अंतकाळी प्रत्यक्ष हरी त्यांना सांभाळील हे वचन आपल्या गुरूंच्या, श्री निवृत्तीनाथा महाराजांच्या सामर्थ्यबळावर माऊली आपल्याला या अभंगातून देत आहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध नवमी, शके १९४४ , दिनांक ०६/०८/२०२२)

Friday, August 5, 2022

देवाचिये द्वारी - २७

 



सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी I

रिकामा अर्धघडी राहू नको II


लटिका व्यवहार सर्व हा संसार I

वाया येरझार हरीविण II


नाममंत्र जप कोटी जाईल पाप I

रामकृष्णी संकल्प धरूनी राहे II


निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी I

इंद्रिया सवडी लपू नको II


तीर्थी व्रती भाव धरी रे करूणा I

शांती दया पाहुणा हरी करी II


ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान I

समाधी संजीवन हरिपाठ. II



या संसारातल्या सर्व लटक्या व्यवहारांचे फ़ोलपण जाणून, इंद्रियांच्या अधीन न होता, नामसाधनात जे कुणी साधक राहतील त्यांच्या घरी शांति आणि दया हे सदगुण कायम वास्तव्यास येतील. हरिपाठातले शेवटले काही अभंग लिहीताना माऊली आपले नामसाधनेचे प्रतिपादन अधिक आग्रहाने आणि अधिक भावपूर्ण करताना दिसत आहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध अष्टमी, शके १९४४ , दिनांक ०५/०८/२०२२)

Thursday, August 4, 2022

देवाचिये द्वारी - २६


 
एक तत्व नाम दृढ धरी मना I

हरीसी करूणा येईल तुझी II


ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद I

वाचेसी सदगद जपा आधी II


नामापरते तत्व नाही रे अन्यथा I

वाया आणिका पंथा जाशी झणी II


ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी I

धरोनी श्रीहरी जपे सदा. II



नाम या एका साधनावर दृढ विश्वास ठेऊन आणि सदगदित अंतःकरणाने आणि वाचेने ते नाम घेतले तरच मनुष्यमात्रांच्या जीवनाचे सार्थक होईल असे माऊली या अभंगातून आग्रहाचे प्रतिपादन करताहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध सप्तमी, शके १९४४ , दिनांक ०४/०८/२०२२)

Wednesday, August 3, 2022

देवाचिये द्वारी - २५

 


जाणीव नेणीव भगवंती नाही I

हरीउच्चारणी मोक्ष सदा II


नारायण हरी उच्चार नामाचा I

तेथे कळीकाळाचा रीघ नाही II


तेथील प्रमाण नेणवे वेदांसी I

ते जीवजंतूंसी केवी कळे II


ज्ञानदेवा फ़ळ नारायण बाठ I

सर्वत्र वैकुंठ केले असे. II


ज्या नाम महिम्याला वर्णन करता करता वेदही थकलेत ते नाम जाणीवेने किंवा अजाणतेपणाने घेतले तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतेच. असे हे भगवंताचे नाम आपण कायम घेत रहावे हे माऊली या अभंगातून सुचवताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध षष्ठी, शके १९४४, दिनांक ३/८/२०२२)


Tuesday, August 2, 2022

देवाचिये द्वारी - २४

 


जप तप कर्म क्रिया नेम धर्म I

सर्वाघटी राम भाव शुद्ध II


न सोडी हा भावो टाकी रे संदेहो I

रामकृष्ण टाहो नित्य फ़ोडी II


जात वित्त गोत कुळ शीळ मात I

भजे का त्वरित भावनायुक्त II


ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी I

तेणे वैकुंठभुवनी घर केले. II


सर्व भूतमात्रांमध्ये भगवंताचे अधिष्ठान आहे अशी भावना ठेऊन भावनायुक्त अंतःकरणाने परमेश्वराची आराधना केली तर मनुष्यमात्रांना वैकुंठ दूर नाही असे आश्वासन माऊली आपल्याला या अभंगातून देत आहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी,  शके १९४४, दिनांक २/८/२०२२)


Monday, August 1, 2022

देवाचिये द्वारी - २३

 


सात पांच तीन दशकांचा मेळा I

एक तत्वी कळा दावी हरी II


तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ I

तेथे काही कष्ट न लागती II


अजपा जपणे उलट प्राणाचा I

तेथेही मनाचा निर्धारू असे II


ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ I

रामकृष्णी पंथ क्रमियेला. II


"तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती" अध्यात्माच्या इतर साधनांसाठी मनुष्यमात्रांना जे कष्ट करावे लागतात, तेवढे सोपे नामसाधन आहे असे आग्रहाचे प्रतिपादन माऊली या अभंगात करत आहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध तृतीया, शके १९४४, दिनांक १/८/२०२२)


Sunday, July 31, 2022

देवाचिये द्वारी - २२

 


नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ I

लक्षुमी वल्लभ तयांजवळी II


नारायण हरी नारायण हरी I

भक्ति मुक्ति चारी घरी त्याच्या II


हरीविणे जन्म तो नर्कचि पै जाणा I

यमाचा पाहुणा प्राणी होय II


ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड I

गगनाहूनि वाड नाम आहे. II


नामस्मरण हा नित्यनेम करणारे साधक दुर्लभ आहेत. आणि असा नेम  करणाऱ्या साधकांसाठी प्रत्यक्ष लक्ष्मी आणि लक्ष्मीपती जवळ उभे राहून त्यांचे सकल मनोरथ पूर्ण करतात असे आश्वासन आपल्याला देऊन आपण सगळ्या साधकांना नामस्मरणाकडे वळण्याचे आवाहन माऊली आपल्याला करताहेत.  


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध तृतीया, शके १९४४, दिनांक ३१/०७/२०२२)


Saturday, July 30, 2022

देवाचिये द्वारी - २१

 


काळवेळ नाम उच्चारिता नाही I

दोन्ही पक्ष पाही उद्धरती II


रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण I

जडजीवा तारण हरि एक II


हरिनाम सार जिव्हा या नामाची I

उपमा त्या देवाची कोण वानी II


ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ I

पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. II


हरिपाठाच्या चिंतन, मनन आणि नुसत्या पठणानेही केवळ स्वतःचाच उद्धार साधतो असे नव्हे तर आपल्या पूर्वजांचाही वैकुंठमार्ग आपण सोपा करीत असतो अशी ही हरिपाठाची फ़लश्रुती माऊली आपल्याला सांगून साध्या सोप्या नामस्मरणाकडे आपल्याला वळवताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध द्वितीया, शके १९४४, दिनांक ३०/०७/२०२२)


Friday, July 29, 2022

देवाचिये द्वारी - २०

 


नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी I

पापे अनंत कोटी गेली त्यांची II


अनंत जन्माचे तप एक नाम I

सर्व मार्ग सुगम हरिपाठी II


योग यागक्रिया धर्माधर्म माया I

गेले ते विलया हरिपाठी II


ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म I

हरीविण नेम नाही दुजा. II


"अनंत जन्माचे तप एक नाम , सर्व मार्ग सुगम हरिपाठी " इतर अनेक उपायांपेक्षा नामस्मरणासारख्या सोपे सुलभ साधनाचे महत्व माऊली या अभंगातून पुन्हा पटवून सांगत आहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १९४४ , दिनांक २९/०७/२०२२)


Thursday, July 28, 2022

देवाचिये द्वारी - १९

 


वेदशास्त्रपुराण श्रुतींचे वचन I

एक नारायण सार जप II


जप तप कर्म हरिवीण धर्म I

वाऊगाची श्रम व्यर्थ जाय II


हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले I

भ्रमर गुंतले सुमनकळिके II


ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र I

यमे काळगोत्र वर्जियेले. II


"जप तप कर्म हरिवीण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय" अध्यात्मात सगळी साधने केलीत आणि जे साध्य त्या हरीलाच विसरलोत तर ते सगळे व्यर्थ असे माऊलींचे प्रतिपादन. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ अमावास्या, दीप अमावास्या, जिवती अमावास्या, शके १९४४ , दिनांक २८/०७/२०२२)


Wednesday, July 27, 2022

देवाचिये द्वारी - १८


हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन I

हरीविण सौजन्य नेणे काही II


या नरा लाधले वैकुंठ जोडले I

सकळ घडले तीर्थाटण II


मनोमार्गे गेला तो तेथे मुकला I

हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य II


ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी I

रामकृष्णी आवडी सर्वकाळी. II


अत्यंत अस्थिर अशा मानवी मनाचे ज्याने ऐकले, जो मनाच्या मागे गेला त्याची फ़रफ़ट अटळ आहे. जो हरिपाठातल्या शाश्वत अशा परमेश्वर स्वरूपाला (आणि पर्यायाने स्वस्वरूपाला) जाणता झाला तो स्थिर होईल आणि त्याचेच आयुष्य़ धन्य होईल याचे प्रतिपादन करणारा हा अभंग. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण चतुर्दशी, शके १९४४ , दिनांक २७/०७/२०२२)


Tuesday, July 26, 2022

देवाचिये द्वारी - १७

 


हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय I

पवित्रची होय देह त्याचा II


तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप I

चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे II


मातृपितृभ्राता सगोत्र अपार I

चतुर्भूज नर होऊनी ठेले II


ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले I

निवृत्तीने माझ्या हाती दिले. II


अशा या साध्या सोप्या हरिपाठाला, त्यात प्रतिपादन केलेल्या (सर्व जीवांमध्ये भेद नाही एव्हढेच काय तर मनुष्य आणि परमेश्वराच्या विभूतीतही भेद नाही हे सांगणाऱ्या) अद्वैत सिद्धांताला जो जीव जाणतो त्यात आणि परमेश्वरात भेद उरत नाही असे प्रतिपादन करणारा हा अभंग.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II




- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण त्रयोदशी, शके १९४४ , दिनांक २६/०७/२०२२)


Monday, July 25, 2022

देवाचिये द्वारी - १६

 


हरीनाम जपे तो नर दुर्लभ I

वाचेसी सुलभ राम कृष्ण II

 

राम कृष्ण नामी उन्मनी साधली I

तयासी लाधली सकळ सिद्धी II

 

सिद्धी धर्म सकळ हरिपाठी आले I

प्रपंची निवाले साधुसंगे II

 

ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा I

तेणे दशदिशा आत्माराम. II

 

 

अध्यात्माच्या अनंत साधनांमध्ये अत्यंत सोपे असे नामस्मरण ज्या साधकाला साधले त्याला सकळ सिद्धी सहज साधता येतात असे नामस्मरणाचे महत्व पटवून सांगणारा माऊलींचा हा अभंग.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण व्दादशी, शके १९४४ , दिनांक २५/०७/२०२२)


Sunday, July 24, 2022

देवाचिये द्वारी - १५


 

एक नाम हरी द्वैतनाम दूरी I

अद्वैतकुसरी विरळा जाणे II

 

समबुद्धी घेता समान श्रीहरी I

शमदमांवेरी हरी झाला II

 

सर्वांघटी राम देहादेही एक I

सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी II

 

ज्ञानदेवा चित्ती परिपाठ नेमा I

मागिलीया जन्मा मुक्त झालो. II

 

"सर्वांघटी राम देहादेही एक" सर्व प्राण्यांमध्ये एकच परमात्मतत्व भरलेले आहे या अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन करणारा हा अभंग. नेमाने हा परिपाठ करणा-या भक्ताची गतजन्मातल्या क्रियमाणांमधून मुक्तता करण्याची ग्वाहीच माऊली आपल्याला देत आहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण एकादशी , शके १९४४ , दिनांक २४/०७/२०२२)

Saturday, July 23, 2022

देवाचिये व्दारी - १४

 


नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी I

कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी II

 

रामकृष्ण वाचा अनंत राशी तप I

पापाचे कळप पळती पुढे II

 

हरिहरि हरि मंत्र हा शिवाचा I

म्हणती जे वाचा तया मोक्ष II

 

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम I

पाविजे उत्तम निजस्थान II

 

 

"नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी " असा हा हरिपाठ ज्याच्या नित्य वाचनात आहे त्याला कलीची आणि काळाची बाधा होणार नाही हे माऊलींचे हरिपाठाविषयीचे आपण सर्वांना दिलेले आश्वासन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण दशमी, शके १९४४ , दिनांक २३/०७/२०२२)

Friday, July 22, 2022

देवाचिये व्दारी - १३

 


समाधी हरीची समसुखेवीण I

न साधेल जाण व्दैतबुद्धी II

 

बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे I

एका केशिराजे सकळ सिद्धि II

 

ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी I

जव त्या परमानंदी मन नाही II

 

ज्ञानदेव रम्य रमले समाधान I

हरिचे चिंतन सर्वकाळ II

 

जोपर्यंत अव्दैताच्या परमानंदात मन बुडून जात नाही तोपर्यंत "ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी " हे सगळे उपाय मनुष्याच्या मागे नसत्या उपाधी बनून राहतील हा निखळ स्वच्छ अध्यात्माचा माऊलींचा उपदेश.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आषाढ कृष्ण नवमी शके १९४४ , दिनांक २२/०७/२०२२)