Tuesday, May 22, 2012

सांगोला - एका नव्या स्वप्नाच्या शोधात


माझ्यासाठी आजवर कधीच पाहिलेले नवीन गाव, नव्यानेच उघडलेले अभियांत्रिकी महाविद्यालय, तिथे विभागप्रमुख म्हणून रुजू होण्यासाठी आलेली नवीनच संधी, तिथे जाण्यासाठी नव्यानेच सुरू झालेली नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस, तिचा अकोल्यानंतरचा नवीनच मार्ग. यंदाच्या उन्हाळ्यात अगदी नवीन स्वप्नांच्या शोधात हा छोटासाच प्रवास करण्याचे आम्ही ठरवले.

शनिवार, दि. १२/०५/२०१२
नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचण्याच्या अगदी १५ मिनिटे अगोदर आमची "तत्काळ" तिकीटे कन्फ़र्म झाल्याचा एस.एम.एस. आला आणि तोपर्यंत टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. ११४०३ अप नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस फ़लाट क्र. वर आधीच उभी होती. आम्ही आमच्या डब्यापर्यंत गेलो.

मग नेहेमीप्रमाणे कुटुंबाला गाडीत बसवून गाडीच्या इतर निरीक्षणासाठी खाली उतरणे झाले.

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात उन्हाळी विशेष म्हणून धावलेली ही गाडी जुलैपासून नियमित झालेली आहे. सध्या नागपूर ते कोल्हापूर च्या दरम्यान धावणा-या महाराष्ट्र एक्सप्रेसपेक्षा ही नागपूर ते कोल्हापूर प्रवासाला जवळपास तास कमी घेत हा प्रवास २४ तासात पूर्ण करते. अकोल्यानंतर वाशिम, हिंगोली, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज असा पूर्णपणे नवीनच मार्ग घेत ही गाडी जाते. अकोल्यानंतर विद्युतीकरण नसल्याने हा संपूर्ण प्रवास डिझेल एंजिनाने होणार हे उघड होत.


18976 R WDM 3A
Loco built by : Diesel Loco Works, Varanasi
Rebuilt: Diesel Loco Modernization Work, Patiala, July 2005.

गाडीच्या डब्यांची पोझिशन : गार्ड पार्सल, साधारण, साधारण, साधारण, शयनयान (एस- ते एस-), वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान (बी-), वातानुकूल द्विस्तरीय शयनयान (-), साधारण, साधारण, साधारण, गार्ड पार्सल. (एकून १९ डबे)

त्यातला एस- हा विशिष्ट क्रमांकाचा डबा होता.




माझा डबा : 95103 CR, बी- कोच,
रेल्वे कोच कारखाना, कपूरथळा, ड्ब्लु जी सी सी एन ५८, नोव्हेंबर १९९५,
६२ शायिका
आमच्या शायिका ३३,३५ आणि ३८.





सहसा या त्रिस्तरीय शयनयान डब्यांना ६४ शायिका असतात पण १९९५ मध्ये या प्रकारच्या डब्यांचे नव्यानेच उत्पादन व्हायला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीच्या काही डब्यांमध्ये शायिका क्र. च्या जागेत प्रवाशांना पुरविण्यात येणा-या बेडरोल्सचे कपाट होते. नंतर रेल्वेच्या लक्षात ही चूक आली आणि बेडरोल्सचे कपाट .सी. कंपार्टमेंटच्या बाहेर (प्रवेश द्वाराजवळ) गेलेत. जुन्या कोचेसमध्ये मात्र ही वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेच.


ह्या सगळ्या नोंदी सुरू असतानाच १४.५० ला फ़लाट क्र. वर १२८१० हावडा-मुंबई मेल येउन उभी झाली. भारतीय रेल्वेच्या इतिहासातली ही खूप जुनी, अगदी ब्रिटीशकालीन गाडी. गेल्या १५० वर्षात या गाडीच्या वेळापत्रकात फ़क्त काही मिनिटांचा बदल झालेला आहे. भारतीय रेल्वेतल्या महत्वपूर्ण बदलांची ही साक्षीदार गाडी. प्रथमवर्ग वातानुकूल, द्विस्तरीय वातानुकूल आणि त्रिस्तरीय वातानुकूल असा काव्यमय न्याय देणारी ही गाडी आमच्या गाडीच्या पुढेच काढणार हे उघड होतं. झालंही तसंच. १४.५९ ला ही गाडी पुढे निघाली आणि आमची गाडी १५.०० ऐवजी १५.०७ ला रवाना झाली.

या गाडीच्या वेळापत्रकावर एक नजर टाकली असता आपल्या लक्षात येइल की धामणगाव ते बडनेरा, गंगाखेड ते परळी वैजनाथ, परळी वैजनाथ ते लातूर रोड तसेच बार्शी ते कुर्डूवाडी या स्थानकांदरम्यान गाडीला भरपूर वेळ देण्यात आलाय. अकोला ते पुढे हा एकेरी मार्ग असल्याने गाड्यांच्या क्रोसिंगसाठी जास्त वेळ समजू शकतो पण धामणगाव ते बडनेरा या गाडीला इतका जास्त वेळ देण्यात येण्याचे कारण म्हणजे दुपारी १५.४० वाजता नागपूरवरून रवाना होणारी १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस. आझाद हिंद धामणगाव ते बडनेरा या स्थानकांमध्ये नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसला मागे टाकत असणार. नागपूरवरून निघताना आझाद हिंद उशीराने धावत असल्याची उदघोषणा कानावर पडल्याची बातमी सौभाग्यवतींनी दिली. आज कदाचित हा ओव्हरटेक होणार नाही अशी आशा बाळगून आम्ही प्रवासाची मजा घ्यायला लागलो. (आपल्या गाडीला ओव्हरटेक म्हणजे नामुष्कीच की हो ! हरहर ! छे, छे ! असे होता कामा नये.)

बरोबर तास १० मिनिटांत ७९ किमी अंतर कापून गाडी वर्धेच्या फ़लाटाला लागली. चहावाला शोधण्यासाठी मी खाली उतरलो. दुपारी खूपच घाईघाईत आम्ही निघालो होतो. जेवण करता आलं तरी फ़ार झालं इतकं करकचून झालेलं नियोजन होतं. चहावाला काही मिळाला नाही. १६.२१ ला गाडीने फ़लाट सोडला.


पुलगाव लगेच येतं. तसं आजही ते १६.४४ ला आलंय. पुलगाव स्टेशनवर आमचे .पू. बापुराव महाराज उतरले होते. (त्यांच खातखेडा हे गाव इथून जवळच आहे म्हणून पुलगावच्या फ़लाटाशी जवळीक. देवळात शिरताना उंब-याला हात लावून नमस्कार आपण का करतो ? किंवा ती पायधूळ आपण मस्तकी का लावतो ? कारण आपल्या अगोदर तिथे अनेक -या भक्तमंडळींचे पाय लागले असतात. त्यांची चरणधूळ आपल्याही मस्तकाचे भूषण व्हावी म्हणून.) फ़लाटाला नमस्कार करण्याइतपत नम्रता अंगी अजून आलेली नाही पण मी गाडीतूनच हात जोडतो. (१६.४४--१६.५०)




धामणगावचा फ़लाट हा माझा मित्रच. तो मात्र मैत्रीची जाणीव ठेवतो आणि एक कटिंग का होइना, फ़र्मास चहा पाजतो. सगळ्यांना. धामणगाव (१७.१४--१७.२०).

बडनेरा येईपर्यंत मनात धाकधूक. कुठेही गाडीचा वेग मंदावला की ओव्हरटेकची शंका मनात चुकचुकायला लागायची. पण तशातला काही प्रकार झाला नाही. मागाहून येणारी आझाद हिंद एक्सप्रेस उशीरा धावत असल्याचा फ़ायदा आम्हाला मिळाला. नियोजित वेळेपेक्षा मिनिटे उशीरा १८.०६ वाजता आम्ही बडनेरा फ़लाटावर उभे.

बडने-यात शिरता शिरता अमरावतीकडून अमरावती-जबलपूर सुपर एक्सप्रेस येताना दिसली. नागपूरकरांकडून पळवलेली आणखी एक गाडी. डबे सगळे नवीन २०११ किंवा २०१२ मधले होते पण एंजिन तेव्हढ मालगाडीच होतं. 27365 AJNI WAG 7. कदाचित बडने-यानंतर पुढील प्रवासासाठी बदललंही असेल. बडने-यालाही थोडासाच मुक्काम करून आम्ही १८.१२ ला हललो.

मूर्तिजापूरचा थांबा हा नियोजित थांबा नव्हे पण उन्हाळ्यात प्रायोगिक तत्वावर तो दिल्या गेलेला आहे. मूर्तिजापूर (१८.५१--१८.५६)

आता अकोल्याचे वेध लागले होते. अकोल्यापर्यंत जर ही गाडी निर्विघ्न गेली की मग ओव्हरटेकचा प्रश्नच नव्हता. मग बाबा, तुमचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा, असं आझाद हिंदला सांगता आलं असतं. झालंही तसच. गाडी वेळेच्या १८ मिनिटे आधीच १९.२७ वाजता अकोल्याला फ़लाट क्र. वर उभी झाली. आम्ही जेवणं उरकलीत. आमच्या कंपार्टमेंटमधले सहप्रवासी वाशिमवरून बसणार होते त्यामुळे भरपूर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा आम्ही पूर्ण फ़ायदा घेतला आणि अगदी आरामात जेवणं आटोपलीत.

अकोल्याला एंजिन उलट बाजूने लागले. आत्तापर्यंत आमचा कोच गाडीच्या मागल्या बाजुकडे होता तो आता पुढल्या बाजुला आला आणि डिझेल एंजिनाचा तो मस्त आवाज ऐकत झोपी जाण्याचे भाग्य आमच्या नशिबात येणार होते. अकोल्यावरून बरोबर २०.१२ ला गाडी हलली.

वाशिम येईपर्यंत आम्ही रेल्वेने दिलेल्या पथा-या पसरल्यात आणि झोपेची तयारी केली. वाशिमला सहप्रवासी आलेत. त्यांनाही थोडं स्थिरस्थावर व्हायला साधारण अर्धा तास लागला. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण दर्शनाला निघालेली मंडळी होती.

अकोल्यानंतरचा हा प्रदेश माझ्यासाठी नवीनच होता पण रात्र झाल्यामुळे झोपण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर हिंगोलीला झोपलो.
वाशिम (२१.३८--२१.४४)
हिंगोली (२२.२५--२२.२७)

दि. १३/०५/२०१२
सकाळी जाग आली तेव्हा गाडी लातूर स्थानकात उभी होती. पावसाची रिमझिम सुरू होती. वातावरणात आल्हाददायक गारवा होता. लातूर गावापासून स्टेशन बरंच दूर असावंस वाटलं कारण गावातल्या समृद्धीच्या खुणा स्टेशनावर दिसत नव्हत्या. (तसं बघायला गेलो तर कराड, सांगली, सातारा ही स्टेशनंही अशीच फ़सवी आहेत. पहिल्यांदा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी मी कराडला महाराष्ट्र एक्सप्रेसने गेलो होतो तेव्हा ते स्टेशन पाहून निराश झालो होतो. इथूनच परत फ़िरावं असं प्रकर्षाने वाटू लागलं होतं, गावात काही भव्यदिव्य असेल असं स्टेशनकडे पाहून वाटेचना. पण चार वर्षातल्या ह्या गावाच्या सहवासाने मला केव्हाच खिशात टाकलं होतं.). 

गाडी लातूरवरून हलली तेव्हा पहाटेचे ०५.५२ झालेले होते. ४०-४५ मिनिटे मी दारात उभा राहून मुक्त निसर्गाची मजा लुटत होतो. स्वच्छ मोकळी हवा फ़ुफ़्फ़ुसांमध्ये भरून घेत होतो. अचानक एका छोट्याश्या स्टेशनावर गाडीचा वेग मंदावला आणि गाडी थांबलीच. मी मोठ्या उत्कंठेने पुढून कुठली गाडी येतेय याची वाट बघत होतो. कुठली एक्स्प्रेस असेल ? तिचं एंजिन कुठलं असेल ? तिचे डबे कसे आणि किती असतील ? ही सगळी उत्सुकता.

फ़ार वेळ ताटकळत ठेवता समोरून मोठ्ठ्याने हॊर्न वाजवत एक दुहेरी एंजिनांची मालगाडी लातूरकडे निघून गेली. गाडीतल्या बहुतेकांची झोप चाळवल्या तरी गेली आणि -याच जणांची मोडलीसुद्धा.

ढोकी गावातून गाडी निघाली. (ढोकी ०६.४२--०६.४८)

उस्मानाबाद सकाळी ०७.१८ ला आलं. हे स्टेशनही गावापासून बरंच लांबवर आहे असं वाटलं. इथला फ़लाट बार्शीकडे चांगलाच उतरता आहे हे लक्षात आलं. ब्रेक जर बरोबर लागलेले नसतील तर गाडी आपोआप बार्शीकडे चालायला लागण्याइतपत उतार तीव्र आहे. मिनीटे थांबून ०७.२३ ला आम्ही हललो.

"उस्मानाबादनंतर नाश्ता येईल, तो करून घ्या. नंतर जवळपास मिरजपर्यंत काहीही मिळणार नाही" हा जाणकारांचा उपदेश लक्षात घेउन आम्ही नाश्ता येण्याची वाट बघत बसलो.

बार्शी फ़लाटही मोठा स्वच्छ आणि नीटनेटका वाटला. १९९२ मध्ये इथे झालेल्या पाणिनी वक्तृत्व स्पर्धेतल्या माझ्या सहभागाची आठवण झाली. आजवर मी अनुभवलेली सर्वात उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा. त्या स्पर्धेत माझ्या व्याख्यानाचा विषयही "फ़लाटदादा, फ़लाटदादा" हाच होता. तिथलं भगवंत मंदीर आठवलं. पण गाडी लगेच हलली. बार्शी (०७.५७--०८.००)

लगेचच थो्डा वेळ धावून गाडी शेंद्रीला थांबली. आडबाजुचं हे स्टेशन. सुरूवातीला समोरून येणा-या गाडीची वाट पहाण्यात काही वेळ घालवला. जवळपास अर्धा तास झाला तरी गाडी हलण्याचे चिन्ह दिसेना मग हळूहळू इतरही उतारू मंडळी गाडीखाली उतरायला लागली. कदाचित एखादी मागून येणारी गाडी ओव्हरटेक करणार असेल म्हणून वाट पाहिली पण मग ड्रायव्हर साहेबांनीच खुलासा केला की समोरच्या स्टेशनात (कुर्डूवाडीला) जागा नाही म्हणून सिग्नल नाही. मग बार्शी ते कुर्डूवाडी या ३७ किमी अंतरासाठी तास वेळ देण्यातली रेल्वेची चलाखी समजली. आता इतका उशीर होउनही गाडी कुर्डूवाडीला वेळेत पोहोचणार आणि रेल्वे आमच्या गाड्या अगदी वेळेवर धावतायत म्हणून पाठ थोपटून घेणार.

मी मात्र या संधीचा फ़ायदा घेत एंजिनाचे भरपूर फ़ोटो काढलेत. पूर्ण गाडीला एक फ़ेरफ़टकाही मारला.





शेंद्रीला जवळपास ५२ मिनीटे थांबून गाडी ०९.१४ ला निघाली. आणि ०९.३८ ला कुर्डूवाडीत फ़लाट क्र. वर दाखल झाली.

कुर्डूवाडीला मजा होती. फ़लाट क्र. वर मिरज-निजामाबाद पॆसेंजर उभी होती. थोड्याच वेळात सोलापूरकडून सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस फ़लाट क्र. वर दाखल झाली. (आजकाल मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस जेव्हा सोलापूर आणि कोल्हापूरला पोहोचतात तेव्हा दिवसभर नुसतं यार्डात पडून राहण्यापेक्षा त्याच गाड्यांना अनुक्रमे सोलापूर-कोल्हापूर आणि कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस म्हणून पाठवतात. म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस--कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस--सिद्धेश्वर एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस --सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस--महालक्ष्मी एक्सप्रेस अशा रितीने त्या मुंबईला परततात. फ़क्त सोलापूर-कोल्हापूर या दोन्ही बाजुंच्या प्रवासात त्यांचा प्रथम वर्ग वातानुकूल आणि द्विस्तरीय वातानुकूल शयनयानाचा डबा बंद ठेवतात.)

आमच्याच मार्गावर जाणारी ही गाडी कानामागून आली आणि निघाली सुद्धा. तेव्हढ्यात फ़लाट क्र. वर ११०१४ अप कोइंबतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) एक्सप्रेस गाडी आली. मध्य रेल्वेच्या लाडक्या गाड्यांपैकी ही एक गाडी. नवीन प्रकारचे एंजिन या गाडीला लागले होते.



20040, WDP 4, SWR, KJM shed.

११०१४ अप गाडीची रचना : गार्ड पार्सल, साधारण, शयनयान (एस- ते एस-१०), भोजनयान, एस-११, बी- ते बी- (वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान), - (वातानुकूल द्विस्तरीय शयनयान), एच.- (वातानुकूल प्रथम वर्ग + वातानुकूल द्विस्तरीय शयनयान), साधारण, गार्ड पार्सल.

ही गाडी पण अगदी थोडाच वेळ रेंगाळली आणि रवाना झाली. एव्हाना सकाळचे दहा वाजून गेलेले होते. दौंडकडून मुंबई-पंढरपूर पॆसेंजर गाडी फ़लाट क्र. वर आली आणि आमची गाडी हलली. (१०.२९ वाजता)

कुर्डूवाडी ते पंढरपूर हा प्रदेश हिरवागार आहे. आता कुठेही थांबता गाडीने चांगला वेग घेतला. डिझेल एंजिन आपला चिरपरिचित आवाज करीत वेगाने मार्ग आक्रमू लागले. पंढरपूरच्या अगदी आधी चंद्रभागेचा पूल लागला. भर उन्हाळ्यातही नदीला पाणी भरपूर होते. नदीकडे आणि वाळवंटाकडे बघत हात जोडल्या गेलेत. किती सज्ज्न सत्पुरूषांचे आणि संतांचे पाय त्या वाळवंटाला लागले असतील, लागत असतील आणि लागतीलही.

पंढरपूर स्थानकाबाहेर बार्शी लाइट म्हणून ओळखल्या जाणा-या आणि आत्ताआत्तापर्यंत अस्तित्वात असणा-या नॆरो गेज रेल्वेचे एंजिन आणि एक डबा ठेवला आहे. पण पंढरपूर स्टेशन मला इंप्रेस करू शकले नाही. पंढरपूर (११.१७--११.२६)

सतीशला फ़ोन केलेलाच होता. आता अगदी ३० किमी वर सांगोला. सतीश स्टेशनवर घ्यायला येणार होता आणि मी नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायला उत्सुक झालो होतो. 






















Monday, May 21, 2012

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३

पूर्वपिठीका :

१९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अखेरीला दिवाळी आली. सुट्ट्या अगदी ४-५ दिवसांच्याच मिळाल्यात आणि त्यासुद्धा अगदी आठवडाभर आधीच जाहीर झाल्यात. मुंबई ते नागपूर रेल्वे आरक्षण मिळणे शक्यच नव्हते. (तेव्हा ती "तत्काळ" योजना सुद्धा नव्हती.) 


अगदी महिना दीड महिन्यापूर्वीच मुंबई-पुणे नागपूर असा बसचा प्रवास केलेला असल्यामुळे आपण पुणे मार्गे सहज नागपूरला जाउ शकू असा एक अनाठायी आत्मविश्वास आला. माझ्यासोबतच मुंबईला नागपूरचाच संजय भोयर पण रुजू झाला होता. आम्ही एकत्रच रहायचो. तो आणि मी, दोघांनीही ,हा प्रवास करण्याचे ठरले.


आमचे प्रवासाच्या व्यवस्थापनाचे गृहीतक असे की ठाण्यावरून दुपारी एक दीड वाजता निघावे. पुण्याला सहज आपण पाच पर्यंत (गेला बाजार संध्याकाळी सहा साडेसहा पर्यंत) पोहोचतोय. तेव्हाचा मुंबई - पुणे प्रवास काय सांगता महाराजा ! राष्ट्रीय महामार्ग ४ वरून बोरघाटातून पुण्याला जाताना वाहनांची ती कसरत आणि खोपोली बस स्थानकानंतरची ती वाहतूक कोंडी ! हरहर. 

मग पुण्यावरून आपल्याला एखादी तरी खाजगी ट्रॆव्हल कंपनीची आरामबस मिळेल. फ़ारफ़ारतर मागली आसने मिळतील पण आपण दुस-या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत नागपूरला असू हे नक्की. रेल्वेत जागा नसताना उभे राहून धक्के खातखात (किंवा दुस-या कुणाच्या आसनावर बसल्यावर शिव्या खात) नागपूरपर्यंत जाण्यापेक्षा आपल्या हक्काच्या जागेवर आरामशीर बसून जाऊ. फ़ारफ़ारतर मागे बसल्या मुळे थोडा हवाई प्रवासाचा आनंद मिळेल पण आम्ही दोघेही तरूण गब्रू जवान होतो.


बेत तर मोठा नामी आखला होता पण आमची अजून मुंबई-नागपूर प्रवासाची पुरती तोंडओळख व्हायची होती हे आम्हाला प्रवासानंतर कळले.

आम्ही ठाण्याला वंदना थियेटर स्थानकावर जावून ठाणे-पुणे निमाआराम एशियाड गाडीची दोन तिकीटे पण आरक्षीत केलीत आणि निर्धास्त झालोत.

ठरलेला दिवस उजाडला. मी खूप खुशीत. नागपूरला आपल्या सर्व नातेवाइक, मित्रमंडळींमध्ये दिवाळीला जायला मिळणार म्हणून. दुपारी सव्वा वाजताची बस होती. आम्ही सकाळी अकरा साडे अकरालाच घर सोडले. ऐरोली, सेक्टर ३ मधल्या साई-प्रकाश मधे जेवलो. साधारणत: दुपारी साडेबारा पाउण वाजता आम्ही वंदना (ठाणे) बस स्थानकावर आलोत. 

सुरूवातीचा अर्धा तास हा नेहमीच्या गप्पांमध्ये पसार जाला पण जवळपास सव्वा वाजत आले तरी आमच्या बसचा ठाणे स्थानकावर पत्ता नव्हता. मग पावलं "चौकशी" कडे वळलीत. तिथे कळले की ही बस पुण्यावरून येते आणि लगेच परत फ़िरते. पुण्यावरून येणारी बस नक्की कधी येइल हे सांगता येणं कुणालाही अवघडच होतं.

हळूहळू गर्दी वाढतच होती. दरम्यान पुण्याकडे जाणा-या दोनतीन बसेस आल्या आणि निघून गेल्यासुद्धा. (ठाणे-करमाळा, बोरीवली-कोल्हापूर वगैरे) थोडक्यात आमच्या लक्षात आलं की बहुतेक सर्व मंडळींनी याच एशियाडच आगाऊ आरक्षण केलेलं आहे. गाडी अगदी फ़ुल्ल होती. 

सुरूवातीच्या उत्सुकतेची जागा आता थोड्या काळजीने घेतली. आपण पुण्याला, नागपूरला जाणारी शेवटची बस निघून जाण्यापूर्वी, नक्की पोहोचू नां ? हा नकोसा प्रश्न मनात नकळत रुंजी घालायला लागला. आमच्या सारख्या इतरही प्रवाशी मंडळींच्या त्यांच्या त्यांच्या चिंता असाव्यात. हळूहळू सार्वत्रिक अस्वस्थता वाढायला लागली. कुण्याच्या ना कुणाच्या स्थानक प्रमुखांकडे चकरा वाढायला लागल्या.

एस.टी. ची अधिकारी मंडळीही वैतागली. त्यांच्या हातात काहीच नव्हते. येणा-या बस ऐवजी दुसरी बस सोडण्यासाठी आगारात बसही नव्हती.

शेवटी वाट पाहून थकलेल्या मंडळींना दूरून एशियाड चे पांढरे-हिरवे धूड येताना दिसले. पु. लं. च्याच भाषेत सांगायचे तर "कोलंबसाच्या जहाजावर जमिनीवरचे पक्षी दिसल्यावर खलाशांना जो आनंद झाला" तसा आनंद सर्वांना झाला.

गाडी आली. प्रवाशी भराभर आत चढलेत आणि आता अपेक्षा अशी की गाडी त्वरीत सुटावी. आधीच जवळपास तासभर उशीर झाला होता. पण  चालक महाशय निवांत होते. समोरच्याच एका पान टपरीवर ते निवांतपणे मावा (नागपुरी भाषेत खर्रा) घोटत होते. सर्व प्रवाशी स्थानापन्न झालेत. वाहक साहेब आत आलेत. (जवळपास पूर्णच प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलेले असल्यामुळे त्यांना नवीन तिकीटे देण्याचे कामच नव्हते. फ़क्त आरक्षणे तपासायची होती. ते काम त्यांनी सुरूही केले.) पण चालक महाशय निवांत होते. 

साधारणतः अडीचच्या सुमाराला चालकाच्या केबीनचे दार उघडण्याचा आवाज आला आणि हे महाशय आत बसलेत. प्रवाशी एव्हाना वैतागले होते. त्यातच कुणीतरी चालकाला उद्देशून काही तरी म्हणाले. झाले. त्या डायवर साहेबांनी आपली जागा सोडली, प्रवाशांच्या भागात ते आले आणि प्रवाशांना उद्देशून ते म्हणाले की आज ते रजा टाकणार आहेत. आणि उतरून गेलेत.

झालं. पुन्हा गोंधळ. मग वाहक आणि इतर काही उतारू मंडळी त्यांच्या मागे धावलीत आणि इतर काही प्रवाशी स्थानक प्रमुखांकडे धावलीत. तक्रारी करिता आणि पर्यायी व्यवस्थेकरिता. कशीबशी त्या साहेबांची पब्लिकने समजूत घातली आणि बसच्या एंजिनाचा आवाज दुपारी पावणे तीन वाजता सुरू झाला. (एकदाचा)

दि. २१/१०/१९९५
ठाणे (वंदना) ते पुणे : आसन क्र. १६, १७ (संजय भोयर)
ठाण्यावरून प्रयाण: दुपारी १४.४५ वाजता.
मार्गावरील थांबे: ठाणे रेल्वे स्टेशन, पनवेल, खोपोली (एम. टी. डी. सी. उपहार गृह), चिंचवड बस स्थानक.
बस: ठाणे निम आराम पुणे.
बस क्र.: MH-12 / Q 8073, म.का.दा. न. ले. १९९३-९४.
आगार: ठा. ठाणे-१ आगार.
चेसिस क्र.: २६५७०
मॊडेल : ASHOK LEYLAND, CHEETAH
आसन व्यवस्था: ३ x २.
पुणे आगमन: रात्री २०.१५ वाजता
एकूण अंतर: १६५ किमी.
सरासरी वेग: ३० किमी प्रतीतास.

पुन्हा एकदा बोरघाटाची मजा लुटत प्रवास केला. तसा थोडासा टेन्शनमध्येच होतो पण पुन्हा मजा आली.

पुण्यात शिवाजीनगर ला उतरलो. तिथूनच नागपूरकडे जाणा-या खाजगी ट्रॆव्हल्स सुटायच्यात. या ऒफ़िसातून त्या ऒफ़िसात. या ट्रॆव्हल कडून त्या ट्रॆव्हलकडे आम्ही फ़िरलो. बहुतेक सगळ्या नागपूरकडे जाणा-या गाड्या निघून गेलेल्या होत्या. एक दोन होत्या पण त्यांच्यात फ़क्त ड्रायव्हर केबीन मध्येच बसायला जागा होती आणि तिकीटेपण भन्नाट होती (४५० रू. मागत होते. तेव्हा नागपूर-पुणे खाजगी गाड्यांचे प्रवासभाडे रू. २०० - २५० होते. "प्रसन्न" ची फ़क्त १८ आसनांची असलेली आरामशीर अशी गोल्ड लाइन बस ५०० रू. घ्यायची.) (त्या बस मध्ये आपण बसायचच हे माझं स्वप्न होतं. पण तसे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत प्रसन्नने ती गाडीच बंद केली.)



मी जपून ठेवलेली प्रसन्न गोल्ड लाईन ची जाहिरात. हे स्वप्न पूर्ण झालंच नाही.

मग आम्ही आमचा मोर्चा शिवाजीनगरच्या एस.टी. स्थानकाकडे वळवला. तिथेही तुफ़ान गर्दी. पण आशेची गोष्ट एव्हढीच होती की दर पंधरा मिनिटांनी पुणे-अकोला अशी विशेष बसफ़ेरी सोडण्यात येत होती. कुठल्याही डेपोची (अगदी सोलापूर, सातारा, कोल्हापूर विभागातली सुद्धा) बस आली की लगेच ती अकोल्याकडे जादा बस म्हणून रवाना करायचे.

अशीच एक बस फ़लाटावर येताना दिसली आणि गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकावेत तसे त्या बसला चिटकणा-या इतर प्रवाशांमध्ये आम्ही सामील झालो.

दि. २१/१०/१९९५ व २२/१०/१९९५

पुणे ते औरंगाबाद : आसने मिळाली नाहीत.
पुण्यावरून प्रयाण: २१/१० रोजी रात्री २०.४५ वाजता.
मार्गावरील थांबे: सुपे ढाबा, अहमदनगर, नेवासे फ़ाटा.
बस: पुणे जादा अकोला.
बस क्र.:  MH-12 / Q 8950, म.का.दा. न. टा. १९९४-९५.
आगार : सो. पंढरपूर आगार.
चेसिस क्र.: GVQ ७१६७३५.
मॊडेल: TATA 1510 Air Brakes
आसन व्यवस्था: ३ x २
औरंगाबाद आगमन: २२/१० रोजी पहाटे ०३.१५ वाजता.
एकूण अंतर: २६० किमी.
सरासरी वेग: ४० किमी. प्रतीतास.




(Special Thanks to Vishal Joshi, Ratnagiri for this wonderful sketch.)


बसमध्ये आम्ही घुसलोत खरे पण थोड्याच वेळात आमचा भ्रमनिरास झाला. सगळी बस आरक्षित होती. जादा बस असूनही पूर्णपणे आरक्षण होते. आम्हाला बसायला तर सोडाच पण आमच्या बॆगा ठेवायलाही जागा नव्हती. प्रत्येकच जण दिवाळीला आपापल्या गावाला, विदर्भात चालला होता. मधल्या मार्गिकेमध्येही सगळ्यांचे सामान. आम्हाला कसेबसे पाउल ठेवण्यापुरती जागा उरलेली. मग त्या बसने अकोल्यापर्यंत जाण्याचा विचार सोडावा लागला. आता निघालोच आहोत तर औरंगाबाद पर्यंत तरी जाउ. रात्री तिथे अण्णाकाकांकडे थांबून उद्या अण्णाकाकांकडून नागपूरला जाण्याची व्यवस्था करू असे ठरले.


पहाटे पहाटे औरंगाबादला उतरलो. रात्रभर उभ्याने प्रवास झाला होता. सुप्याच्या ढाब्यानंतर आम्ही आमच्या हातातले सामान ड्रायव्हर केबीनमध्ये ठेवायची परवानगी ड्रायव्हर साहेबांना मागितली होती त्यामुळे नीट उभे तरी राहता आले होते. पण प्रचंड थकलेलो होतो. तसेच अण्णाकाकडे गेलोत आणि थोडे आडवे झालोत.

दि. २२/१०/२०१२

तास दोन तासांच्याच झोपेनंतर आम्ही उठलो. घरी चर्चा करताना लक्षात आलं की औरंगाबाद ते नागपूर जाणा-या खाजगी ट्रेव्हल्सच्या बसेस पण सगळ्या फ़ुल्ल आहेत. एस. टी. नेच जावे लागणार. सकाळी ९.३० ची औरंगाबाद-साकोली गाडी तेव्हा नुकतीच सुरू झालेली होती. त्या गाडीत जर जागा मिळाली असती तर आम्ही रात्री १०, १०.३० पर्यंत सहज नागपूरला पोहोचू शकत होतो. आरक्षण मिळाले तर पहावे आणि न जाणो, दिवाळीच्या वेळेला आरक्षणासाठी इथेही गर्दी असली तर ? म्हणून आम्ही साधारणतः सकाळी सहा साडेसहाच्याच सुमाराला औरंगाबाद बस स्थानकावर गेलो.

सकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत. स्थानक नुकतेच झोपेतून जागे झाल्यासारखे आळोखेपिळोखे देत होते. रात्री उशीरा आलेल्या गाड्या मस्त झोपल्या होत्या तर पहाटपक्षी गाड्यांची लगबग सुरू झालेली होती. आत प्रवेश केल्यावर बाजुलाच काल रात्री आलेली साकोली-औरंगाबाद निवांत झोपून होती. आता सकाळी हीच गाडी आम्हाला नागपूरला नेणार या भावनेने बरे वाटले आणि आरक्षणासाठी रांग लावायला आम्ही तिकडे निघालोत.

तिथे शुकशुकाट होता. पण आरक्षण काउंटर सुरू झालेली होती. आश्चर्याचा मोठा धक्का आम्हाला बसला. दिवाळी म्हणून की काय सगळी काउंटर्स सकाळी सहा वाजताच सुरू झालेली होती. आणि आम्ही दोघे सोडून त्या केंद्रावर आत्तातरी कुणीही नव्हते.

आम्ही आत गेलो आणि तिथल्या कर्मचा-याला औरंगाबाद-नागपूर आरक्षण मागितले. त्याने चार्ट पाहिला आणि सांगितले की संध्याकाळी साडेसहाची गाडी फ़ुल्ल आहे. आम्ही म्हटले की आम्हाला ती संध्याकाळची गाडी नकोच आहे. आत्ता साडेनवाला सुटणा-या साकोली बसचे आरक्षण द्या. त्याने सरळ नकार दिला. म्हणाला अशी गाडीच नाहीय. मी म्हटलं की अहो, गाडी सुरू होउन सहा आठ महिने झालेले आहेत आणि आत्ता ती गाडी तुमच्या मागल्या बाजुला उभी आहे.

काय कोण जाणे ? तो एकदमच भडकला. आणि कारण नसताना तो भडकल्याचे पाहून आम्ही दोघेही भडकलो. आमची वादावादी "तू बाहेर ये, तुला दाखवतो" इथपर्यंत येऊन पोहोचली. (तसा संजय पहिल्यापासून बॊडी बिल्डर आणि आम्हा दोघांमध्येही तारुण्याचा जोश. त्यातच कुणीतरी चुकीच्या कारणांसाठी अकारण भडकतोय म्हटल्यावर अन्यायाविरुद्धची चीडही उफ़ाळून आली होती.)

आमचे चढलेले आवाज ऐकून एक वरिष्ठ अधिकारी तेथे आलेत. त्यांनी पहिल्यांदा त्या कर्मचा-याला तिथून जायला सांगितले. आम्हाला तो विषय सोडून द्यायला सांगितले आणि स्वतः त्या काउंटरवर बसून आम्हाला विचारले की नक्की आमचे काम काय ? आम्ही आमचा साकोली गाडीचा विषय मांडल्यावर त्यांनी सांगितले की गाडी असेलही, पण त्याचे आरक्षण करण्याची मुभा औरंगाबाद केंद्राला नाही. 

मग आम्ही विचारात पडलो. सकाळी आत्ता पटकन घरी जाउन ही गाडी पकडायला यावे तर समजा ऐनवेळी ही गाडीही कालच्या गाड्यांसारखीच भरून गेली तर उभ्याने एव्हढा लांबचा प्रवास करण्याची आमची ताकद नव्हती. शिवाय रात्रभरच्या जागरणामुळे झोपेची खूप आवश्यकता वाटत होती.

आम्ही असे विचारात पडल्याचे पाहून ते म्हणाले अहो असला विचार कसला करताय ? नवीन गाडी सोडूयात आज नागपूरला आणि त्यांनी लगेचच त्या आरक्षण रजिस्टरवर नव्या गाडीची वेळ संध्याकाळी सात अशी लिहून आमची नावे आसन क्र. १ आणि २ वर टाकलीही. (ही आसने महाराष्ट्र एस.टी. त आमदार खासदारांसाठी राखीव असतात.) आता हा सगळा एव्हढा घोळ झाल्यानंतर ही गाडी खरंच जाणार की ही आमची वचपा काढण्यासाठी केलेली फ़सगत आहे ? हा मोठ्ठा प्रश्न आम्हाला पडलेला होता. हा प्रश्न त्यांनी मनकवड्यासारखा वाचला असावा. ते म्हणाले "घाबरू नका. तुमच्या दोघांसाठीच ही गाडी सोडत नाहीये. इतकी गर्दी आहे की आत्ता बाहेर घोषणा करायचीच खोटी की गाडी दुपारपर्यंत फ़ुल्ल होतेय बघा." आणि खरोखरच आम्ही आरक्षण करून बाहेर येइस्तोवर बाहेर जादा गाडी बाबतच्या घोषणेचा बोर्डही टांगला गेला होता.

मग काय ? आम्ही अण्णाकाकांकडे परतून रात्रीच्या झोपेची थकबाकी गोळा करायला सुरूवात केली. औरंगाबादमध्ये तसाही आमचा दिवस आरामशीरच असतो. आज मस्त झोप आणि थोडी भटकंती करून आम्ही थोड्या साशंक मनानेच सायंकाळी बस स्थानकावर गेलोत.

संध्याकाळी साडेसहाची बस साडेसहाला फ़लाटावर लागली आणि पावणेसात पर्यंत सुटलीही. बस गच्च भरून गेली पण आमचा जीव भांड्यात टाकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे आमच्या गाडीला भरपूर प्रवासी मिळालेले होते आणि आम्ही सगळेच बस फ़लाटावर लागण्याची वाट बघत होतो.

सातचे साडेसात वाजले तरी बसचा पत्ताच नाही मग आमच्यापैकी काही उत्साही आणि उतावीळ मंडळींनी औरंगाबाद स्थानकाला लागूनच असलेल्या औरंगाबाद आगाराच्या दारापाशी धाव घेतली आणि आमच्या विशेष गाडीसाठी कुठली बस पाठवणार याचे अंदाज आणि बेताबेताने खाकी कपडेवाल्या मंडळींना विचारणा सुरू केली. आणि मग कळले की गाडी पाठवायला आगारात आत्ता वेगळी अशी गाडीच नाहीये.

मग आमचे सर्वांचेच धाबे दणाणले. संध्याकाळ अधिकच निराश वाटायला लागली. आता आजची रात्रही औरंगाबादमध्येच काढावी लागतेय की काय ? अशी शंका मनात येवू लागली. त्याचा प्रश्न नव्हता पण उद्यातरी नागपूरला जायला मिळणार की नाही याबद्दल खात्री नव्हती.

रात्र अधिकच गडद वाटायला लागली होती. आठ साडेआठ वाजत आलेले होते. आणि अचानक अक्षरशः एक आशेचा किरण चमकला. एक नवीन कोरी लेलॆण्ड बस दापोडी कार्यशाळेतून औरंगाबाद आगारात सामील व्हायला औरंगाबाद आगाराजवळ आली. साधारण ५० च्या गणसंख्येच्या आसपास डेपोपाशी उभ्या असलेल्या पासिंजरांची त्या डेपो मॆनेजरला दया आली असावी त्याने त्या बसलाच औरंगाबाद-नागपूर विशेष बस म्हणून पाठवण्याचे ठरविले. ज्या चालकाने ती बस कार्यशाळेतून औरंगाबादपर्यंत आणलेली होती त्याच चालकाला विनंती केली आणि त्या भल्या माणसाने ती मान्यही केली.

दि. २२/१०/१९९५ व २३/१०/१९९५
औरंगाबाद ते नागपूर : आसन क्र. १ व २.
औरंगाबादवरून प्रयाण: २२/१० रोजी रात्री २१.३० वाजता.
मार्गावरील थांबे: जालना, देउळगावराजा, चिखली ढाबा, चिखली,अकोला, अमरावती, तळेगाव, कारंजा (घाडगे).
बस: औरंगाबाद जादा नागपूर.
बस क्र.: MH-12/ R 1950,  म.का.दा. न. ले. १९९५-९६.
आगार : औ. औरंगाबाद-२ आगार.
चेसिस क्र.: HVQ ३४५१९७
मॊडेल: ASHOK LEYLAND, CHEETAH model.
आसन व्यवस्था: ३ x २
नागपूर आगमन: २३/१० रोजी सकाळी ०८.०० वाजता.
एकूण अंतर: ५०० किमी.
सरासरी वेग: ४६.१५ किमी. प्रतीतास.

(पुन्हा एकदा विशाल जोशींचे आभार. ह्या स्केचेस त्यांनी खूप मेहेनतीने आणि कल्पकतेने काढल्या आहेत पण त्या उदार मनाने मला माझ्या लिखाणासाठी वापरू दिल्यात.)


ऐन दिवाळीत मी आणि संजय भोयर नागपूरला आलो. त्या ड्रायव्हरविषयी कृतज्ञता आजही माझ्या मनात दाटून आहे. त्या भल्या माणसाने दिवस आणि रात्रभर ती गाडी पुणे ते नागपूरपर्यंत चालवली होती ती फ़क्त "प्रवाशांच्या सेवेसाठी" आणि एस.टी. चे ब्रीद सार्थ केले होते.