Showing posts with label पंगा. Show all posts
Showing posts with label पंगा. Show all posts

Friday, September 23, 2022

आणि आमचा पंगा झाला - ३

 यापूर्वीचे पंगे इथे आणि इथे वाचा.


रविवार सकाळ. सकाळची आन्हिके, पूजा अर्चा वगैरे आटोपून आपण प्रसन्न चित्ताने फ़ेसबुक वगैरे बघत बसलेले असतो. एव्हढ्यात फ़ेसबुक मेसेंजर वाजते. एरव्ही फ़ेसबुक मेसेंजरकडे दिवसेंदिवस ढुंकूनही न बघणारे आपण आता हातातच मोबाईल असल्याने पटकन मेसेंजर उघडतो आणि मेसेज वाचतो. (बाकी मला माझ्याच मेसेंजरमध्ये जायला वेळ नाही. इथल्या काहीकाही बावाजींना बायकांच्या मेसेंजरमध्ये शिरून "जे१ झाले का ?" वगैरे आंबटशौक कसे जमतात ? हे मला कळत नाही.)


"सर, जालन्यावरून मुंबईला जायचे होते. सगळ्या गाड्या फ़ुल्ल आहेत. अगदी नंदीग्राम, तपोवन सुद्धा. एखादी एसी बस वगैरे आहे का ? सिनीयर सिटीझन आहेत हो सोबत." - काही वर्षांपूर्वी जुजबी ओळख झालेला एक बस कम रेल्वेफ़ॅन मित्र.


"जालना ते मुंबई थेट बसेस तर मला माहिती नाहीत पण औरंगाबादवरून मुंबईपर्यंत चिकार बसेस आहेत. खूप सा-या एसी बसेस आहेत." - १९८९ पासूनचा आपला अनुभव आपण टाईप करतो.


"सर, पण जालना ते औरंगाबाद कसे जायचे ?" बसेसची फ़्रिक्वेन्सी कशी आहे ?" -  मुंबई - पुणे - नाशिक या त्रिकोणापुढे कधीही प्रवास न केलेले हे बसफ़ॅन कोकरू.


"जालना ते औरंगाबाद दर पंधरा मिनीटांना एखादी बस मिळेल. ५० - ५५ किमी तर अंतर आहे. पण मला सांगा तुम्ही नंदीग्राम , तपोवन एक्सप्रेससाठी end to end quota ट्राय केलाय का ? " - सिनीयर सिटीझन्सच्या बसप्रवासातल्या कष्टांची काळजी असलेला आणि इतर कुणाची आई ती आपली आईच असे सहानुभूतीने मानणारा मी.


"म्हणजे काय करू सर ?" - तोच बस कम रेल्वेफ़ॅन मित्र


"म्हणजे नंदीग्राम एक्सप्रेससाठी जालना ते मुंबई असे तिकीट बघण्यापेक्षा आदिलाबाद ते मुंबई असे तिकीट try करून बघा. कदाचित २०० - ३०० रूपये तिकीट जास्त बसेल पण बसप्रवासापेक्षा, एजंट गाठा त्याच्याकडून तिकीट येईपर्यंतच्या अनिश्चिततेत हिंदकळत रहाण्यापेक्षा ते बरे पडेल." - जगमित्र असलेला फ़ुकट सल्लागार मी.


"सर, खरंच की ! नंदीग्रामला आदिलाबाद ते मुंबई RAC 5 आहे." - तोच बस कम रेल्वेफ़ॅन मित्र


"मग ताबडतोब घ्या. १०० % कन्फ़र्म होणार. बोर्डिंग पॉईंट मात्र जालना टाका." - एका गाडीला कुठल्या प्रकारचे किती कोचेस लागतात ? कुठल्या प्रकारचा किती कोटा आहे ? याचा पक्का अभ्यास असलेला रेल्वेफ़ॅन, मी.


ह्यानंतर भयाण शांतता. साधं "धन्यवाद" पण आपल्या नशीबी नसते. आत्मीयतेने एखाद्याला केलेली अशी मदत इतक्या कृतघ्नपणे संपते. मला ही फ़ेसबुक मेसेंजरवर फ़ारसे रमायला आवडत नाहीच म्हणून मी ही तिथे फ़ारसा थांबत नाही.


काही काळांनंतर त्या मित्राच्या जालना - मुंबई ट्रीपबद्दल आपण फ़ेसबुकवर वाचतो. एक लाईक करून आपण पुढे जातो.


पुन्हा काही दिवसांनी पुन्हा तोच कृतघ्न माणूस मेसेंजरवर येतो. 


"सर, मला साधारण डिसेंबरमधे नागपूर - भंडारा - चंद्रपूर - गडचिरोली असा दौरा करायचाय. मला थोड मार्गदर्शन, तिकीटे बुकिंग वगैरे करायला मदत कराल ?" - तोच कृतघ्न माणूस मेसेंजरवर.


"या सगळ्या कन्सलटन्सीचे पैसे लागतील." - मागच्या कृतघ्न अनुभवावरून शहाणा झालेला अतिव्यापारी दृष्टीकोनातला मी.


यानंतर मी सरळ ब्लॉक होतो आणि असल्या कृतघ्नांच्या तावडीतून सुटलेला मी त्या "पाताळविजयम" नावाच्या मद्रासी सिनेमातल्या राक्षसासारखा हॉ..हॉ..हॉ.. असे विकट हसत सुटतो.


- प्रभू रामचंद्रांचा "धर्मज्ञ आणि कृतज्ञ" असण्याचा गुण कायम अंगी बाळगणारा पण कृतघ्नांशी पंगे घ्यायला कधीही न घाबरणारा, राम प्रकाश किन्हीकर.  



Thursday, September 22, 2022

आणि आमचा पंगा झाला - २

 यापूर्वीचा पंगा इथे वाचा.


काय होतं की दोन वर्षांपूर्वी कन्यारत्नाच्या इंजिनीअरींग ऍडमिशनच्या वेळेला आपण त्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास वगैरे केलेला असतो. तंत्रशिक्षण संचलनालयाच्या सूचना वाचून त्यांच्या ऍड्मिशन प्रक्रियेचा, विशिष्ट महाविद्यालयात जागा वाटपाचा नक्की अल्गोरिदम काय असेल याचा आपणाला एक अंदाज आलेला असतो. कॉलेजेसचे चॉइसेस भरण्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यासाठी गेल्या दोन तीन वर्षांचे, आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजेसचे, हव्या असलेल्या ब्रॅंचेसमधले प्रत्येक राऊंडचे कट ऑफ़ बघून, आणि जागा वाटपाचे अल्गोरिदम लक्षात आणून आपण अगदी परफ़ेक्ट चॉइसेस दिलेले असतात. आपल्या मुलीसोबत तिच्या दोन तीन मैत्रिणींनाही त्या अचूक विश्लेषणाचा फ़ायदा झालेला असतो. फ़ारसा मनस्ताप न होता सगळ्यांच्या ऍडमिशन्स (त्यांच्या त्यांच्या मार्कांनुसार) सर्वोत्तम ठिकाणी पार पडलेल्या असतात. 


मग पुढल्या वर्षी एक कॉलेजमधला मित्र त्याच्या मुलीच्या ऍडमिशनबाबत आपला सल्ला घ्यायला येतो. त्याच्या मुलीला साधारण बरे मार्कस असतात. गेल्यावर्षी आपल्या मुलीला होते त्याच्या जवळपासच. आपला गेल्यावर्षीचा अनुभव ताजा असल्याने आपण त्याला नेमस्तपणे सहज मिळू शकणारी कॉलेजेस चॉइसेस म्हणून टाक हे सुचवतो. पहिल्या फ़ेरीत आपल्या मार्कांनुसार किंवा अपेक्षेपेक्षा थोडे वरचे महाविद्यालय / त्या महाविद्यालयातली ब्रॅंच मिळून गेली की डोके किती शांत होते हा माझा अनुभव. आणि तोच अनुभव, तोच आनंद सगळ्यांना मिळावा ही प्रामाणिक नेमस्त इच्छा. 


पण त्या मुलीच्या मनात काहीतरी मोठी स्वप्ने असतात. तिला पुण्याची अगदी टॉप कॉलेजेस खुणावत असतात. पुण्याची टॉप कॉलेजेस खरोखरच टॉपच आहेत, अतिशय दर्जेदार आहेत, जागतिक दर्जाप्राप्त आहेत. पण तिथे जायला लागणारे मार्कांचे पाठबळ नको का ? तिथे ऍडमिशनला लागणारे मार्कस आणि आपल्याला मिळालेले मार्कस यात एक दोन टक्क्याचा फ़रक असला तर ही महत्वाकांक्षा नैसर्गिक आहे हे मी समजू शकतो पण तिथे लागणारे मार्कस आणि आपल्याला मिळालेले मार्कस यात १० - १२ टक्के फ़रक असताना ही महत्वाकांक्षा ठरत नाही, हे दिवास्वप्न ठरते हे मी ओळखून होतो. तसे त्या मित्राला मी नेमस्त भाषेत सांगण्याचा प्रयत्नही केला.


पण काय मुलांच्या जिद्दीपुढे ब-याच आईबापांचेही काही चालत नसते. माझे ऍनालिसीसचे एक दोन तास, फ़ोनवर चॉइसेस कुठले भरावे याबद्दल जवळपास अर्धा तास दिलेला सल्ला आणि मला वेळी, अवेळी फ़ोन आल्यानंतर सुद्धा (एखादेवेळी लेक्चरमध्ये असताना कॉल घेऊ शकलो नाही तर नंतर रिटर्न केलेला कॉल, व्हॉटसऍपवर सविस्तर सांगितलेले चॉइसेस) न वैतागता दिलेले सल्ले यांचा काहीही फ़ायदा झालेला नसतो. कारण आपल्या ऍनालिसिस पेक्षा पुत्रीप्रेम वरचढ ठरते. पहिल्या राऊंडला पुण्यातल्या जागतिक दर्जाच्या इंजिनीअरींग कॉलेजेसचा चॉइस त्या मित्राने टाकून दिलेला असतो. 


पहिल्या राऊंडचे जागावाटप जाहीर होते. अपेक्षेप्रमाणे कुठल्याच कॉलेजमध्ये तिची ऍडमिशन होऊ शकलेली नसते. मग तो चिंताक्रांत मित्र पुन्हा आपल्या खनपटीला बसतो. "चॉइस भरताना तू अभ्यासपूर्ण सांगितलेले चॉइसेस न भरता मी माझ्या मुलीच्या अपेक्षेचेच चॉइसेस भरलेले आहेत" हे त्याने त्यावेळी आपल्याला घाबरून सांगितलेले नसते. आता आपल्याला सांगण्यावाचून त्याला पर्यायच नसतो. त्याच्या मुलीपेक्षा कमी मार्कस असणा-या तिच्या मैत्रिणींना आपण सांगितलेल्या नागपुरातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला असतो. ती मात्र आता दुस-या राऊंडची वाट बघत असते. पहिल्या राऊंडपेक्षा दुस-या राऊंडमध्ये जागा खूपच कमी उपलब्ध असतात हे आत्तापर्यंत तिला आणि माझ्या मित्राला कळले असते. तरीही आपण त्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी पुन्हा ऍनालिसिस करतो, सल्ले देतो.


मग आता तिसरे वर्ष येते. पुन्हा काही मित्र आणि त्यांचे सुपुत्र, सुकन्या परिक्षेला बसलेले असतात. आपण आजवर फ़ुकट केलेली मेहेनत, कळकळीने दिलेले सल्ले यांचे काहीच मोल नसल्याचे आपल्या लक्षात आलेले असते. मित्रांचे, एरव्ही लांबचे असलेल्या पण आता निकालानंतर अचानक मी जवळचा वाटू लागलेल्या काही नातेवाईकांचे (व-हाडी भाषेत अशांना "विटेस गोटे मावसभाऊ" असे संज्ञान आहे.) फ़ोन्स येऊ लागतात. गत काही अनुभवांवरून शहाणे झालेले आपण अशा प्रकारच्या सल्ल्यांची व्यावसायिक किंमत त्यांना कळवतो. नाही म्हटले तरी अशा प्रकारच्या कन्सल्टन्सीमध्ये आपली बुद्धीमत्ता, वेळ आणि काही पैसा (जिओ काय घरी फ़ुकट इंटरनेट देत नाही.) आपण खर्ची घातलेला असतो आणि फ़ुकट सल्ल्याची काहीच पत्रास लोक ठेवत नाहीत याचा अनुभव आपल्याला आलेला असतो.


दोनच दिवसांनी एखाद्या नातेवाईकाकडून "अरे, तो अमकाढमका (तोच तो, विटेस गोटा मावसभाऊ) आजकाल तू फ़ारच पैशाच्या मागे लागला आहेस असे सांगत होता" असे वर्तमान आपल्याला कळते. पीडा सुटल्याच्या आनंदातून आपण पुन्हा एकदा त्या "पाताळविजयम" नावाच्या मद्रासी सिनेमाच्या राक्षसासारखे "हॉ..हॉ..हॉ.." करत विकत हसत सुटतो. 


- "भले तरी देऊ..." या श्रीतुकोबांच्या उक्तीवर विश्वास असलेला, पण नाठाळांसाठी अगदी पाताळविजयम या मद्रासी सिनेमातला राक्षस असणारा साधा मराठी माणूस, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.


Wednesday, August 7, 2019

आणि आमचा पंगा झाला — १


(पुढे भरपूर भाग येणार म्हणून हा भाग १)
काहीकाही माणसांची personality किती मवाळ असावी ? कितीही असू देत. आमच्याइतकी नसावी.
त्याच काय झाल ? मधे आमचे एक रियुनियन झाले. शाळेपासून बिछडलेले आम्ही सर्व जवळपास पाव शतकांनी एकमेकांना भेटलो. आनंद झाला. पण काही काही लोकांच judgement at first site इतक जबरदस्त असत की पहिल्या भेटीतच हे गिर्‍हाईक मवाळ आहे हे माझ्या एका मित्राने हेरले.
मग दररोज सकाळी व्हाॅटसअॅप वरून मला जीवनविषयक उपदेशामृत (सगळे ढापलेले forwards. उसनी विद्वत्ता.) मी पण सौजन्याने कधी हसर्‍या स्मायलीज, कधी थम्सप ची खूण असे पाठवून बोटचेपे धोरण सुरू ठेवत होतो.
मनातून त्याला विचारावेसेही वाटे "बाबा रे. माझ्या मनाची अस्थिर अवस्था वगैरे झालीय हे तुला कोणी सांगितल ? आणि तुला मदत मागितलीय कुणी ?
बर, बाकीच्या इतर मित्रांकडे आडून आडून चौकशी केली तर हे येडच्याप कौन्सिलर इतर कुणाच्याही व्हाॅटसअॅपवर तसला प्रकार करत नव्हते असे कळले. विचार केला. जाऊ देत ना. न वाचता, नुसते हसरे चिन्ह, प्रोत्साहन चिन्ह पाठवायला ना आपले हात झिजत, ना फोनची screen.
पुढेपुढे या महाशयांची हिंमत अधिकच वाढली. कधीही फोन करायचे आणि उचलल्या उचलल्या आपले जीवनाचे तत्वज्ञान माझ्या कानात ओतायला सुरूवात करायचे. "बाबा रे, जीवन म्हणजे काय हे ठाऊक आहे का तुला ?" अशी उपदेशामृताला (निरर्थक) सुरूवात व्हायची ती तब्बल अर्धा तास चालायची. मधेमधे मला "हं, हं, बरोबर" यापेक्षा अधिक अवाक्षर बोलू न देता हे महापुरूष सुरूच.
एकदा गाडी चालवताना यांचा फोन. "मी गाडी चालवतोय" हे माझे सांगणे त्याच्या कानापर्यंत गेले पण मेंदूत झिरपले नाही हे मला कळले कारण त्यानंतर मी गाडी बाजूला लावून त्याची तीच टेप अर्धा तास ऐकतोय. गंतव्य स्थळी पोचायला उशीर झाला तो वेगळाच.
मग आम्ही मवाळपणा टाकायच ठरवल. पुन्हा आठवडाभरात गाडीने बाहेरगावी जाताना या येड्याचा फोन. "ड्रायव्हिंग करतोय, गावाला जायला निघालोय" हे नेहेमीप्रमाणेच ignore झाले. मग मी फोन तसाच ग्लोव्ह बाॅक्समधे ठेवला. गाडी चालवत राहिलो. मधूनमधून मोठ्ठ्याने "हो,हो. बरोबर" वगैरे परवलीचे शब्द बोलत राहिलो. सहप्रवाशांना यामागील इतिहास माहिती असल्याने त्यांना ही करमणूक मस्त झाली.
अर्धा तास झाला. जवळपास ३० किमी गाडी चालवून आम्ही गंतव्य स्थानाजवळ येत होतो. मी अंदाजे फोन उचलला. हे महाशय तिकडून बोलतच होते.
आणि अगदी अनाहूतपणे माझ्याकडून "अरे, तू बोलतोच आहे का ?" निघून गेले.

पलीकडून भयाण शांतता. 
काही दिवसांनी मित्रमंडळींच्या गृपवर "राम एक आगाऊ, उद्दाम माणूस आहे" असे हे महाशय offline बोलत असल्याचे कळले आणि पंगा यशस्वी झाल्याच्या आनंदात मी त्या पाताळविजयम नावाच्या मद्रासी सिनेमातल्या राक्षसासारखा "हाॅ..हाॅ..हाॅ.." करून हसलो.

(पुलंनी आम्हाला बिकट प्रसंगी असच विकट हसायला शिकवलय त्याला आमचा नाविलाज आहे.)
— प्रा. राम प्रकाश किन्हीकर. पाताळविजयमचे राक्षस.