Showing posts with label Town Planning. Show all posts
Showing posts with label Town Planning. Show all posts

Sunday, July 10, 2022

परवडणारी आणि कार्यक्षम वाहतूक : काळाची गरज.

परवा सहज इथे उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मधल्या जनसामान्यांच्या लोकप्रिय वाहनाविषयी पोस्ट टाकली . ती सगळी प्रकाशचित्रे इंदूर उज्जैन देवास भागात मी २०१० मध्ये गेलेलो असताना काढलेली होती. परम पूजनीय नाना महाराज तराणेकरांकडे, आमच्या गुरूगृही, इंदूरला आमचे पहिल्यांदा २००५ मध्ये जाणे झाले त्यानंतर वर्षातून एक दोन वाऱ्या होतच असतात. मधल्या काळात कोरोनामुळे त्या वाऱ्या हुकल्यात तेव्हढ्याच. 

इंदूर शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळून बघितली, अनुभवली. सर्वासामान्यांना परवडणारी अशी ही वाहतूक व्यवस्था होती आणि अजूनही आहे. २००५ मध्ये शहरातली बरीच लांबलांबची अंतरे या "डुक्कर" मधून फक्त २ रुपयात पार करता येत होती. २०१० मध्ये "अटल इंदूर बससेवे"च्या शहर बस थांब्यांवर जीपीएस प्रणालीने पुढली बस कुठली, किती वेळात येणार ? इत्यादी माहिती सहज मिळू शकता होती आणि बऱ्याच लांब अंतरासाठी तिकीटदर केवळ ५ रुपये ते १० रुपये इतका माफक होता. बरे केवळ बसेसच नाहीत तर छोट्याछोट्या मारुती व्हॅन्स टॅक्सी मधून शेअर प्रवास करणेही बसच्या भाड्याइतकेच होते आणि म्हणूनच सर्वसामान्यांना परवडण्याजोगे होते. 





रोजच्या वाहतुकीचे विविध पर्याय माफक दरात आणि खात्रीशीर पद्धतीने उपलब्द्ध असलेत की त्या शहराची औद्योगिक वाढ आणि भरभराट होत जाते. मुंबई शहर हे त्याचे जिवंत उदाहरण. कामगार वर्गाला त्यांच्या रोजच्या जीवनातला संघर्ष थोडातरी कमी करणारा, असा खात्रीशीर, सोयीचा आणि माफक दरातला वाहतूक पर्याय  कायमच आवडतो. त्यामुळेच इंदूर शहराच्या आसपास अनेक औद्योगिक आस्थापने स्थिरावलीत आणि भरभराटीला आलीत. औद्योगिक आस्थापने भरभराटीला आलीत तारा ते शहरही प्रगतीपथावर असते, शहरातही इत्तर अनेक दुय्यम, तिय्यम दर्जाच्या उद्योगधंद्यांना चालना आणि बळकटी मिळते. १९८५ ते १९९५ पर्यंत औरंगाबाद शहराची अवस्था अशीच प्रगतीपथावर असणाऱ्या शहरासारखी होती. उद्योगधंद्यांबाबतची औरंगाबादची आजची दुरावस्था हा एका वेगळ्याच  लेखाचा विषय आहे. 

मला माझ्या नागपूरची सार्वजनिक वाहतूक डोळ्यांसमोर आली. शहर बस सेवा जेव्हा एस टी कडे होती तेव्हा बरी होती असे म्हणण्याची वेळ महापालिकेने ही बससेवा ताब्यात घेतल्यानंतर (आणि खाजगी ऑपरेटर्स नेमून त्यांना चालवायला दिल्यानंतर) नागरिकांवर आलेली आहे. रिक्षा टॅक्सी ही कधीमधी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच परवडण्याजोगी नाही तर रोज प्रवास करणाऱ्या कष्टकरी वर्गाला रोज कशी परवडेल ? मेट्रो आल्यानंतर काही फरक पडेल असे वाटले होते पण मेट्रो स्टेशन्सपर्यंत जाण्यायेण्यासाठी अजूनही स्वतःचे वाहन वापरणेच सोयीस्कर ठरते आहे. "फीडर सेवे"ला अजूनही विचार आणि बळकटी मिळालेली नाही. नागपूरच्या आसपास न झालेल्या, रखडलेल्या औद्योगिक विकासासाठी नागपूरची अत्यंत अकार्यक्षम आणि महाग अशी सार्वजनिक वाहतूक सेवा कारणीभूत आहे यावर सर्व नागपूरकरांचे एकमत होईल. अशावेळी नाईलाजाने सगळ्या नागरिकांना स्वतःचे वाहन (दुचाकी किंवा चारचाकी) असणे गरजेचे न वाटले तरच नवल. पर्यायाने शहरात प्रचंड वाहनसंख्या, प्रदूषण, खोळंबा, व्यापारी भागामध्ये पार्किंगची अत्यंत गहन  समस्या इत्यादींना आपण तोंड देतोय.




सर्वदूर पोहोचणारी, परवडण्याजोगी, आणि अत्यन्त कार्यक्षम अशी वाहतूक व्यवस्था ज्या शहरात असेल तीच शहरे विकासपथावर अग्रेसर असतील. इतर शहरांची औरंगाबाद प्रमाणे हळूहळू भकास अवस्था होत जाईल हे तत्व राज्यकर्त्यांनी, नगरपित्यांनी आणि नगर नियोजनकर्त्यांनी जितक्या लवकर लक्षात घेतली तितके बरे होईल. 

- गेल्या २५ वर्षांपासून वाहतूक अभियांत्रिकी हा विषय शिकवणारा एक शिक्षक, बसगाड्या आणि रेल्वेवर बालपणापासून अत्यंत प्रेम असलेला एक निःसीम प्रेमी आणि  या क्षेत्रात सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी भरीव कार्य  करू इच्छिणारा वाहतूक अभियांत्रिकी तज्ञ प्रा. राम प्रकाश किन्हीकर. 

Monday, January 4, 2021

नागपुरात Hop On - Hop Off (Ho-Ho) बसेसची आवश्यकता : एक विचार

 नागपूर शहरातली वाहतूक हा गेल्या ३५ वर्षांपासूनच्या माझ्या चिंतनाचा आणि गेल्या २० वर्षांपासूनचा माझ्या चिंतेचा विषय आहे. बालपणापासून शाळेत जाताना बसचा वापर करणारा मी, त्या काळीही वृत्तपत्रांमधून बससेवेसाठी काही सूचना पाठवीत असे. सार्वजनिक वाहतूक खूप बेभरवशाची, उद्दाम आणि वक्तशीर नसल्यामुळेच नागपुरात वैयक्तिक वापराच्या खाजगी दुचाकी आणि आजकाल चारचाकींना पर्याय नाही अशी स्थिती उदभवली आहे. 


जास्तीत जास्त खाजगी गाड्यांचा वापर म्हणजे पार्किंगचा मोठ्ठा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न आणि एकंदरच रस्त्यांवर ट्रॅफ़िक जाम सारख्या समस्या. मुंबईसारख्या शहरातली अत्यंत भरवशाची लोकल आणि बेस्ट सेवा अनुभवल्यावर तर नागपूरच्या सेवेतील त्रुटी अधिकच प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. मुंबईत, नवी मुंबईत, ठाण्यात जर बससेवा लोकांना केंद्रबिंदू मानून चालवल्या जाऊ शकतात तर नागपुरात ही गंगा उलटी वाहण्याचे कारण काय ? हा एक मोठ्ठा यक्षप्रश्नच आहे. पूर्वी नागपुरात शहर बस सेवा एस. टी. महामंडळाकडे होती. महामंडळ ती सेवा द्यायला अपुरे पडायला लागले म्हणून २००९ च्या आसपास नागपूर महनगर पालिकेने खाजगी कंत्राटदारांच्या मदतीने स्वतःची शहर बस सेवा नागपुरात सुरू केली. पण महानगरपालिकेच्या बससेवेबाबत नियोजनशून्य कारभारामुळे कालचा गोंधळ बरा होता अशी अवस्था झाली. महानगरपालिकेच्या परिवहन समितीवरच्या सदस्यांना वाहतुकीची आखणी आणि नियोजन हा एका शास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे आणि नागपुरात त्यासाठी भरपूर प्रशिक्षित तज्ञ अभियंता मंडळी आहेत याचा पत्ताच नाही. तज्ञांचा सल्ला घेऊन अधिकाधिक सुखकर, भरवशाची आणि परवडण्याजोगी सेवा अजूनही नागपूर शहरात पुरवल्या जाऊ शकते. अजूनही उशीर झालेला नाही पण आता लक्ष दिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी अवस्था आहे. 






नागपुरात मेट्रो हळूहळू वाढते आहे. पण मेट्रोला पूरक सेवा जर एका विशिष्ट नियोजनाने विकसित झाल्या नाहीत तर मात्र नागपूर मेट्रो ही केवळ "जॉय राईड"च बनून राहील ही भविष्यातली भीषण वास्तवता आहे.


सीताबर्डी हा नागपूरचा मध्यवर्ती व्यापारी भाग. नगर नियोजनात Central Business District (C.B.D.) ची संकल्पना आहे. तसा इतवारी भागही CBD मध्येच गणला जाईल. (नवी मुंबईत मात्र बेलापूरला CBD म्हणण्याचे नेमके काय कारण आहे ? हे मला तिथे १२ वर्षे राहूनही समजले नव्हते. कदाचित शहर वसवताना तिथे मध्यवर्ती व्यापारी भाग वसविण्याचा बेत असावा पण आता तो पूर्ण भाग शासकीय कार्यालयांमुळे आणि निवासी भागामुळे CBD संकल्पनेला विसंगत असा झाला आहे.) आज सीताबर्डी आणि लगतच्या रामदासपेठ, धंतोली भागात वाहतुकीची मोठ्ठी समस्या निर्माण झालेली आहे. नागपूरकरांच्या मूळ सुशेगाद स्वभावामुळे नागपूरकर मंडळी त्या समस्येशी जुळवून घेताहेत खरे पण हे फ़ार दिवस चालणार नाही आणि या समस्येकडे लवकर लक्ष दिले नाही तर समस्येचा स्फ़ोट उग्र रूप धारण करेल हे नक्की.


सीताबर्डी आणि आसपासच्या विभागात व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात मोरभवन म्हणजे जणू एक भोज्या असावा आणि त्या भोज्याला शिवल्याशिवाय गत्यंतर नाही या आविर्भावात एस. टी. आणि नागपूर शहर बस सेवेचे आजवरचे नियोजन आहे. नागपूर मेट्रोचे ऑरेंज लाईन (उत्तर दक्षिण कॉरिडॉर) आणि ऍक्वा लाईनचे (पूर्व पश्चिम कॉरिडॉर) इंटरचेंज स्टेशनही सीताबर्डीवरच आहे. त्यात सीताबर्डी ही एक मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याने व्यापा-यांची आणि सर्वसामान्य खरेदीदारांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असतेच. गाड्यांचा ट्रॅफ़िक जाम, माणसांना चालायला जागा नाही, प्रदूषण आणि गोंधळ यामुळे येथे जाणे नकोसे होऊन जाते. या भागातल्या हॉस्पिटल्समध्ये राहणा-या रूग्णांची आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांची अवस्था बिकट होते. शहराच्या एकूणच अवस्थेवर ताण पडतो.



नागपुर शहर बस ताफ़्यात आता बॅटरीवर चालणा-या प्रदूषणविरहित बसेसची भर पडलेली आहे. आता गरज आहे ती सीताबर्डीसारख्या मध्यवर्ती भागात "शून्य प्रदूषण विभाग" म्हणून विकसित करण्याची. खालील नकाशात दाखवल्याप्रमाणे सीताबर्डी, धंतोली, रामदासपेठ हा विभाग सर्व बाजूनी बंद करून इथे फ़क्त बॅटरीवर चालणा-या शून्य प्रदूषण वाहनांना परवानगी देण्याची इथे गरज आहे. व्यापा-यांच्या मालवाहतुकीसाठी बॅटरीवर चालणा-या रिक्षा आणि प्रवाशांसाठी या हद्दीच्या सीमेवर प्रवाशांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ उभारून आत फ़क्त या बॅटरीवर चालणा-या बसेस Hop On - Hop Off (Ho-Ho) या सोयीने चालविल्या गेल्या पाहिजेत. पत्रकार निवासांना लागून असलेल्या "विदर्भ हॉकी असोसिएशन"च्या मैदानावर हॉकीचा सामना झालेला मी गेल्या २० वर्षात तरी बघितलेला नाही. उलट आजुबाजूच्या झोपडपट्टीवाल्यांचे आक्रमण थोपवता थोपवता हे मैदान आक्रसून चालले आहे. ते अधिक आक्रसण्याआधी त्यावर बहुमजली वाहनतळ बांधून होऊ शकेल. तसेच वाहनतळ यशवंत स्टेडियमशेजारी असलेल्या जागेवर आणि बारासिग्नल शेजारी असलेल्या जागांवर बांधून सर्व खाजगी वाहने तिथे थांबवता येतील.



बर्डी CBD प्रभागात सर्वत्र या Hop On Hop Off (Ho-Ho) यंत्रणेअंतर्गत शून्य प्रदूषण करणा-या बसेस चालविल्या गेल्या पाहिजेत. या बसेसना कुठूनही कुठेही प्रवास करण्याचे एका विशिष्ट कालावधीसाठी (३ ते ४ तास) एक निश्चित तिकीट असावे. ते तिकीट खाजगी गाड्या पार्किंगच्या जागी आणि बसमध्येही वाहकाकडे मिळावे. पार्किंगच्या जागांपासून निघून संपूर्ण सीताबर्डी - धंतोली -  रामदासपेठ परिसरात या बसेसने उलटसुलट फ़े-या सतत मारत असाव्यात आणि प्रवाशांना एकदाच तिकीट काढून, बसच्या नियत थांब्यावरून, त्यांच्या सोयीनुसार, कुठूनही कुठेही जाण्याची (त्या ३ ते ४ तासांमध्ये) परवानगी असावी.


यामुळे

१. सीताबर्डी भागातला ट्रॅफ़िकचा गोंधळ कमी होईल.

२. प्रदूषण पातळी खूप कमी होईल.

३. सार्वजनिक वाहनांच्या उपयोगाकडे लोकांचा कल वाढेल.

४. मेट्रो जादा प्रवासी आकृष्ट करेल. (सीताबर्डीपर्यंत जाऊन तिथे बाहेर आपली दुचाकी / चारचाकी गाडी पार्क करून बसमध्ये फ़िरणे कुणाला जिवावर येत असेल तो / ती सरळ आपल्या घरापासून मेट्रोने सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन गाठेल आणि तिथले काम / खरेदी वगैरे आटोपून परत मेट्रोने आपल्या घरी परत येईल.


यापेक्षा अधिक काही आपल्याला सुचत असल्यास कृपया कळवा. तशी एक चळवळच उभी करता येईल.


- सजग आणि पर्यावरणाविषयी कळकळ असलेला प्रवासी पक्षी, राम किन्हीकर.