Friday, July 17, 2020

कायदा आणि फ़ायदा. (अर्थात अध्यात्मातला)

आपल्या परिचयातल्या पती पत्नींची गाठ पडली आणि आपण पहिल्यांदा त्यातल्या पतीची तारीफ़ केली तर पत्नीची कळी खुलते. ती प्रसन्न होते. पण हेच उलट झाले तर ? पतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून पहिल्यांदा पत्नीची तारीफ़ केली तर त्या पतीला क्रोध येण्याची शक्यता असते. आणि पती नाराज तर पत्नीही नाराज.
म्हणून महालक्ष्मीच्या पूजेआधी भगवान विष्णुंचे स्मरण करावे असे शास्त्रकार सांगतात. श्रीसूक्ताआधी पुरूषसूक्त म्हटले जावे असाही शास्त्रांचा दंडक.
पण या नियमाला अपवाद आहेत. जर ती स्त्री आपली आईच असेल तर तिच्याकडे आधी वशिला लावला म्हणून बाबा रागावणार नाहीत. ब-याचशा गोष्टी बाबांकडे जाण्याआधी आईने मंजूर केल्यात तर बाबांचा होकार ही औपचारिकताच असते, हो ना ? अशीच आपल्या संतांची भावना असते.
ती जगज्जननी भलेही इतरांसाठी सौख्य संपत्ती आदि भौतिक गोष्टींची दात्री असेल आणि तो भलेही जगन्नियंता वगैरे असेल. पण आपले मायबाप आहेत म्हटल्यावर मग इतर सगळे मुद्दे बा्जूलाच पडतात ना हो.
शास्त्रकारांकडे सर्वत्र कायदाच कायदा असतो आणि संतांच्या सहवासात असा फ़ायदाच फ़ायदा असतो.
- "पंढरपुरी आहे माझा मायबाप" ही आरती मनापासून आवडणारा आणि तशीच भावना असणारा बालक राम.


No comments:

Post a Comment