Wednesday, January 21, 2026

भाषाशुद्धी : एक विचार

 पु.लं. नी लिहीलय की, " "नव्हत" जर शुद्ध,  तर "व्हत" अशुद्ध कसे ?" 


तसाच अनुभव आज मला आला. मी संगणकावर मराठी वापरताना "बरहा" वापरून टाईप करतो. यात "देईल" टाईप करताना जर दे आणि ईल या दोन शब्दांमध्ये स्पेस बार न दाबता सलग टाईप केले तर "दील" असच टाईप होत. तशीच बाब येईल ची. त्याचे "यील" असे टाईप होते. उच्चाराप्रमाणे (फ़ोनेटीक पद्धतीप्रमाणे) "दील", "यील" हेच शब्द शुद्ध ठरलेत की नाही मग. तसेच "होऊ"हा शब्द सलग टाईप करताना "हू"असेच टाईप होते. मग "हुशील" हेच शुद्ध झाले की नाही ? "होशील" हे शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध असेलही पण मौखिक ज्ञानग्रहणची आपली प्राचीन परंपरा खरी मानली तर "हुशील" हे सुद्धा अशुद्ध नाही हे आपल्या लक्षात येईल. 


मग तसा निष्कर्ष काढला तर आपल्या ग्रामीण भागात राहणारे आपले बांधवच खरी भाषा बोलताहेत की. आपण ग्रामीण भागातल्या कुणी असे बोलले तर ते अशुद्ध म्हणून धरतो. पण कदाचित पारंपारिकतेने चालत आलेल्या मौखिक ज्ञानग्रहण परंपरेत त्यांच्या कानांवर पडणा-या भाषेचे ग्रहण त्यांनी अशाच प्रकारे केले असेल आणि भाषा ते अशीच शिकली असतील तर ती अशुध्द आहे हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला ?

 

मला तरी वाटते की आपण उगाचच शुध्दलेखनाने कृत्रिम रिफाईंड केलेली भाषा वापरतोय. खरी शुध्द भाषा हीच मंडळी वापरताहेत. त्यांची हेटाळणी उपयोगाची नाही. "दील, यील " सारख्या अनेक शब्दांचे एक प्रकारचे कृत्रिम रूपांतरण "देईल, येईल" असे नंतरच्या काळात मराठीत झाले असण्याची शक्यता आहे.


सांगोला येथील आमच्या मुक्कामी अशीच गोड भाषा कानांवर पडायची. मला आठवते कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना माझे काही सोलापूर जिल्ह्यातले मित्र अशी हेल काढून भाषा बोलायचेत. "ए..... किन्हीक....र. ये की लेका. ये ना बे कडू." तेव्हा तरूण वयात त्यांचा तो हेल आणि ती लकब मला थोडी अपमानास्पद वाटायची. आपण कुठलीही एखादी नवीन गोष्ट त्यांच्या ग्रूपमध्ये मांडायला सुरूवात केली की त्यांची पहिली प्रतिक्रिया असायची. "खरं...?" ह्याचा पण मला तेव्हा फ़ार राग यायचा. "अरे, खरं नाही तर खोटं सांगतोय का मी ?" अशी स्वाभाविक प्रतिक्रिया मनात उमटायची. जशी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातल्या एका प्रहसनात अरूण कदमांनी "अच्च लिहीलय ?" असे विचारल्याबरोबर पृथ्वीक प्रताप भडकतात तसे मला माझ्या त्या मित्रांवर भडकावेसेही वाटायचे. अर्थात सार्वजनिक जीवनात, उपक्रमात आपण काम करीत असताना आपल्या भावभावना थोड्या नियंत्रणात ठेवाव्या लागतात. माणसे जोडायची असली तर ब-याचदा आपल्या मनाला, मतांना मुरड घालावी लागते हे तत्व मला माहिती होते म्हणून ही मनातली नाराजी मी चेहे-यावर किंवा वर्तनात दिसू देत नसे पण माझ्या मित्रांचा तो हेल खटकायचा हे नक्की.


पण सोलापूर जिल्ह्यात नोकरीला गेलो. तोपर्यंत फ़ार जास्त काळ इतर जगाचा भलाबुरा अनुभव येऊन गेलेला होता त्यामुळे यावेळी त्या हेलामागची, त्या लकबीमागची त्या भागातल्या भाषेची आत्मीयता कळली आणि तो हेल चक्क आवडायला लागला. मनातल्या मनात मी महाविद्यालयात शिकत असताना ज्या ज्या मित्रांचा मला त्या भाषेबद्दल राग आला होता त्या सर्वांची मी मनातल्या मनात माफ़ीही मागून घेतली. यावेळी मुलीच्या मैत्रिणींकडून आणखी एक हेल कळला. ती तिच्या छोट्या मैत्रिणींना काही काही शहरी गोष्टी सांगायला जायची. तोपर्यंत शहरी जीवनाशी फ़ारसा संबंध नसलेल्या आणि सोलापूर म्हणजेच एक मोठ्ठे शहर असे जग बघितलेल्या तिच्या छोट्या मैत्रिणी तिच्या वर्णनाची थोडी अविश्वासात्मक संभावना "हुई, हुई, असं कुटं असतय व्हई ?" अशी करायच्यात. सुरूवातीला माझ्या लेकीला त्या तिच्या मैत्रिणी काय बोलतायत हे कळतच नसे. मग मी तिला त्या बोलीभाषेतल्या खाचाखोचा समजावून सांगायला लागलो आणि तिला त्यांच्यातला तिच्या कथनावरचा अविश्वास कळल्यानंतर, मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात या बोलीभाषेविषयी जो गैरसमज करून घेतला होता तो तिचा होऊ नये म्हणून तिचे समुपदेशन करायला लागलो.


मला वाटते आज मराठी भाषा टिकून आहे ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात बोलल्या जाणा-या असंख्य बोलीभाषांमुळे. शहरी भागात आपण मराठीवर इंग्रजीचे आणि हिंदीचे इतके अतिक्रमण करून घेतले आहे की आपली मराठी शुद्ध आणि प्रमाणभाषा आहे हे आपण म्हणूच शकत नाही. याचे अत्यंत चपलख उदाहरण म्हणजे आपण जेव्हा गॅसचा नंबर लावतो तेव्हा आपल्या गॅसचा नंबर लागलाय हे सांगताना ती फ़ोनवरची बाई / मुलगी आपल्या गॅसचा नंबर जो सांगते त्याला मराठी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही भाषेत बसवता येत नाही. "सहा - टू - एक - पाच - फ़ोर - शून्य" असे दरवेळी ऐकायला मिळते. गेली ५ - ६ वर्षे हा प्रकार सुरू असूनही त्याबद्दल अजूनपर्यंत राज ठाकरेंकडे कुणी तक्रार कशी केली नाही याचेच मला आश्चर्य वाटते.


असो. तर आपण महाराष्ट्रात फ़िरत असताना तिथल्या तिथल्या बोलीभाषा समजून घेऊयात, त्यांच्यातला गोडवा आस्वादूयात आणि आपली मराठी अनेक शतके टिकवल्याबद्दल त्या सर्व बांधवांचे मनापासून आभार मानूयात. दुस्वास, दुराभिमान वगैरे गोष्टी जरा दूरच ठेवूयात. काय म्हणताय मग ?


- गडचिरोली पासून थेट कसालपर्यंत आणि अक्कलकुव्यापासून थेट मांजरसुंब्यापर्यंत सगळा महाराष्ट्र डोळसपणे फ़िरलेला आणि तिथल्या तिथल्या बोलीभाषा ऐकून त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणारा, त्या भाषांवर प्रेम करणारा आपला एक छोटा भाषाशास्त्रज्ञ रामशास्त्री.


२१ जानेवारी २०२६ 

 

#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Tuesday, January 20, 2026

मेथड इन मॅडनेस

जानेवारी १९९०, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथील आमचे दुसरे सत्र नुकतेच सुरू झालेले होते. पहिल्या सत्राचा नुकताच निकाल लागलेला होता. मी अनपेक्षितपणे चांगले गुण मिळवून पास झालेलो होतो. त्याबद्दलची गंमतजंमत इथे. जानेवारीत आमच्या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे वारे वाहायला सुरूवात झाली होती. त्यानिमित्त विविध स्पर्धा, खेळ यांचा महाविद्यालयात मस्त माहौल तयार झाला होता.


आमच्याच वर्गात मेकॅनिकल अभियांत्रिकीत नागपूरचाच शशांक चिंचोळकर म्हणून एक मुलगा होता. अतिशय हुशार, कराडच्या आमच्या हॉस्टेलच्या भाषेत "एकदम तोडू" मुलगा. त्याने पहिल्याच सत्राच्या परिक्षेत विद्यापीठात पहिल्या तिघांत येऊन आपल्या हुशारीची चुणूक दाखविलेली होती. अर्थात महाविद्यालयातली त्यानंतरची सगळी सत्रे शशांक कायम पहिल्या तीन मध्ये असायचा. त्याच्याकडे बघितल्यानंतर अभ्यास करणे ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट वाटत असे. महाविद्यालयाच्या दुस-या आणि तिस-या वर्षाला असताना आम्ही दोघे रूम पार्टनर्स होतो याचा मला आजही अगदी अभिमान वाटतो. 


पण प्रथम वर्षाला असताना आम्हा दोघांची केवळ थोडीशीच ओळख होती. फ़ार घसट अशी नव्हती. त्यावर्षी आमच्या फ़्रेशर्स पार्टीला मी नकला, गाणी असे विविध गुणदर्शन केलेले असल्याने मी त्याला माहिती असणार असे मला वाटते. आमच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त प्रश्नमंजुषेची (क्विझची) घोषणा झाली आणि त्यातल्या चमूत भाग घेण्यासाठी शशांकने मला विचारले. दोन जणांची चमू असणार होती. मला त्याने त्याच्या सोबत चमूत भाग घेणार का ? असे विचारल्यानंतर मला थोडे आश्चर्यच वाटले. त्यापूर्वी जरी अशा प्रश्नमंजुषांचे अनेक कार्यक्रम मी दूरदर्शनवर बघितलेले असले तरी अशा प्रश्नमंजुषेत स्पर्धक म्हणून मी पहिल्यांदाच उतरणार होतो. मी अगदी आनंदाने होकार दिला.


प्रश्नमंजुषा चांगलीच दर्जेदार होती. आमच्या महाविद्यालयाचा प्रश्नमंजुषाकार (क्वीझ मास्टर) संकेत आंबेरकर म्हणून आमचा सिनीयर होता. तो अगदी व्यावसायिक पद्धतीने प्रश्नमंजुषेचे संचालन करायचा. पहिल्याच राऊंडमध्ये शशांक चिंचोळकर आणि राम किन्हीकर या जोडीची एकदम हवा झाली. इतर स्पर्धकांपेक्षा खूप मोठ्ठ्याफ़रकाने आम्ही तो राऊंड जिंकलो. शशांक म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश होता. जगभरातल्या देशांच्या राजधान्या, त्यांच्या भाषा, चलन, भारतातल्या राज्यांच्या राजधान्या, महत्वाच्या नद्या, त्यांची लांबीरूंदी, लोकसंख्येचे प्रमाण वगैरे गोष्टी त्याला अगदी तोंडपाठ होत्या. दरवर्षी प्रसिद्ध होणारे मनोरमा इयर बुक तो पहिल्याच दिवशी विकत घ्यायचा आणि ते त्याला जवळपास तोंडपाठ असायचे. त्यामुळे प्रश्नमंजुषेची पहिली फ़ेरी आम्ही अगदी आरामात जिंकल्यावर आमच्याविषयी इतर फ़ेरींमधून पुढल्या फ़ेरीत आलेल्या स्पर्धाकांच्या चमूंमध्ये आदरयुक्त भिती पसरली असल्याचे वर्तमान आम्हाला आमच्या हॉस्टेलला कळले होते.


दुस-या फ़ेरीतही आम्ही इतर स्पर्धक चमूंना अत्यंत मोठ्या फ़रकाने हरविल्यानंतर आम्ही अंतिम फ़ेरीत प्रवेश केला. अंतिम फ़ेरी आमच्या स्नेहसंमेलनाच्याच पहिल्या दिवशी अगदी महाविद्यालयाच्या स्टेजवर होणार होती. खूप झगमगाटात आणि जवळजवळ आमच्या सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, प्राचार्यांच्या उपस्थितीत. त्यामुळे त्याविषयी आम्हाला पण खूप उत्सुकता होती. आम्ही आमची तयारी वाढविली.


स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. सुंदर स्टेजवर चार चमू हजर झाल्यात. सुटाबुटातला क्वीझ मास्टर संकेत आंबेरकर मोठ्या झोकात संचलन करायला लागला. स्टेजच्या समोरचे आमच्या महाविद्यालयाचे पटांगण तुडुंब भरलेले होते. आता आमच्या स्पर्धकांमध्ये होते ते म्हणजे आमच्यासारखेच या स्पर्धेच्या दोन फ़े-या जिंकून अंतिम फ़ेरीत आलेले इतर तीन चमू, सहा स्पर्धक. त्या स्पर्धकांमध्ये आम्हाला दोन वर्षे सिनीयर असलेले आणि आजवर ज्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या सगळ्या प्रश्नमंजुषा जिंकलेल्या होत्या असे पराग लपालीकर आणि अभिनव बर्वे नावाचे अत्यंत हुशार, गुणी विद्यार्थी होते. आमची खरी स्पर्धा त्यांच्या चमूशी होणार हे आम्हाला कळत होते.


अंतिम स्पर्धा सुरू झाली. आणि अपेक्षेप्रमाणे आमच्या आणि पराग + अभिनव या चमूमध्येच अगदी काटेंकी टक्कर होऊ लागली. प्रेक्षकांमधून थर्ड इयरची मुले पराग आणि अभिनव या चमूला आणि फ़र्स्ट इयरची मूले आम्हाला प्रोत्साहन देत होती. आमच्या प्रत्येक बरोबर उत्तरावर आमच्याबाजूने आरोळ्या वाढत होत्या आणि हेच जर पराग + अभिनव यांच्या चमूच्या बाबतीत घडले तर त्यांची मित्रमंडळी, वर्गमित्र आरोळ्या ठोकत होते. अगदी माहौल तयार झाला होता.


त्या स्टेजवर अंतिम फ़ेरीत एक क्षण असा आला की आमच्या क्वीझचे सगळे राऊंडस संपले होते आणि आमची चमू आणि पराग व अभिनवची चमू टायब्रेकर मध्ये आली. आता संकेत एकच प्रश्न विचारणार होता. सगळ्यात पहिल्यांदा समोरचा बझर दाबून त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर  देणारी चमू त्यावर्षीची विजेती चमू ठरणार होती.


संकेतने प्रश्न विचारायला सुरूवात केली. स्टेजवर आनंद सिनेमातले "मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने" हे गाणे वाजले. संकेतचा प्रश्न होता "या गीताचे संगीतकार ओळखा." मी एका इम्पल्सने पटकन बझर दाबला आणि उत्तर दिले "सलील चौधरी". अगदी खरे सांगतो. त्याक्षणी हे उत्तर माझ्या डोक्यात कसे आले ? हे मलाही कळले नाही. मी इतका पटकन बझर दाबून खूप जलद उत्तर दिलेले होते. उत्तर अर्थातच बरोबर होते. आमची जोडी पहिल्याच वर्षी ही स्पर्धा जिंकलेली होती. दिग्गज खेळाडूंना हरवून. आमच्या बाजूने जल्लोष सुरू झाला होता. पराग आणि अभिनवने अत्यंत खिलाडू वृत्तीने स्टेजवरच आमचे अगदी मनापासून अभिनंदन केले. परागने तर मला उचलूनच घेतले होते. सर्वत्र अगदी आनंदीआनंद होता.


आज मी त्या क्षणाच्या माझ्या मॅडनेस मागची मेथड शोधतो तेव्हा माझे मलाच अनेक दुवे जुळून आलेले दिसतात. त्या मॅडनेस मागची मेथड मला आज दिसू लागते. नागपूरला टेलीव्हिजन आल्यानंतर त्यावर आलेला पहिला बॉलीवुड चित्रपट म्हणजे "आनंद". आमच्या वडिलांच्या एका स्नेह्याच्या घरी रविवारी संध्याकाळी जाऊन आम्ही हा चित्रपट बघितलेला होता. तो चित्रपट तेव्हा मला फ़ारसा आवडला नव्हता. एकतर अमिताभ बच्चन असणार म्हणजे चित्रपटात छान फ़ायटिंग वगैरे असणार या बालसुलभ अपेक्षेने आम्ही हा चित्रपट बघायला गेलो होतो. पण यात अजिबात फ़ायटिंग नाही. त्यात अमिताभ हा साईड हिरो आणि मुख्य हिरो म्हणजे रडका राजेश खन्ना. त्यातही या चित्रपटाची कथा शोकांत, रडकी. हा चित्रपट आम्हा लहान मुलांना आवडण्याजोगे असे त्यात काहीही नव्हते. 


बरे त्याकाळी संगीत वगैरे अजिबातच कळत नव्हते. आजसारखा इंटरनेटचा प्रसार नव्हता त्यामुळे एखाद्या चित्रपटाचे गीतकार - संगीतकार हे बिनाका गीतमाला वगैरे रेडियोंच्या कार्यक्रमांमधून किंवा छायागीत , चित्रहार, रंगोली या दूरदर्शनवरी; कार्यक्रमांमधूनच कळायचेत. तेव्हाही हे गीत यातला कुठल्याही कार्यक्रमांमध्ये बघितल्याचे, ऐकल्याचे मला अजिबात आठवत नव्हते. घरी रेकॉर्ड प्लेयर किंवा रेडियो किंवा टेप रेकॉर्डर असण्याची सुबत्ता नव्हतीच. त्यामुळे या चित्रपटाच्या रेकॉर्ड्स कॅसेस वगैरेंशी संबंध आलेला नव्हता. फ़क्त हा चित्रपट एका बंगाली माणसावर आधारित आहे हे धूसरसे आठवत होते. आणि बंगाली जनतेमध्ये चौधुरी हे आडनाव असते हे सामान्य ज्ञान पक्के होते. तसे चौधरी हे नाव महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात असते हे माहिती होते पण सलील हे नाव फ़क्त मराठी आणि बंगाली लोकांमध्ये ऐकले होते. म्हणून लगेच "सलील चौधरी" हे उत्तर माझ्या तोंडातून बाहेर पडले. आणि आम्ही टायब्रेकर जिंकून क्वीझ जिंकलेलो होतो.


आज हे लिहायला, वाचायला जेव्हढा वेळ लागतोय त्यापेक्षा एक शतांश वेळात ही प्रक्रिया माझ्या मेंदूत पूर्ण झालेली होती. वरवर बघता तो मॅडनेस, इम्पल्सिव्ह डिसीजन वाटले होते तरी त्यामागे एक निश्चित मेथड होती हे आज जाणवतेय. स्वतःचा स्वतःच्या निर्णयक्षमतेचा असा स्वतःलाच शोध लागला की मनाला एक वेगळेच समाधान मिळते, हो, नं ?


- स्वतःचाच निरंतर शोध घेणारा, प्रत्येक मॅडनेसमध्ये मेथड शोधणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


२० जानेवारी २०२६ 


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Monday, January 19, 2026

परिक्षा पद्धतीतले कालसुसंगत बदल

प्राध्यापकी पेशात एखाद्या हाडाच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थ्यांमध्ये रमणे जेव्हढे आवडते तेव्हढेच त्या शिक्षकाला दोन गोष्टी अत्यंत टाळाव्याशा वाटतात. पण गंमत अशी आहे की टाळाव्याशा वाटणा-या या दोन्हीही गोष्टी त्याच्या पेशाचा अविभाज्य अंग असल्याने त्याने कितीही टाळाव्या म्हटल्यात तरी तो टाळू शकत नाही. त्या दोन गोष्टी म्हणजे

अ) परिक्षांदरम्यान पर्यवेक्षण करणे (Invigilation Duty)

आ) परिक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणे


माझ्या माझ्या बाबतीत मी या दोन्हीहीवर उतारा काढलाय. पर्यवेक्षण सुरू असताना जे आवश्यक काम आहे (परिक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांवर सह्या, बारकोडस चिटकवणे, परिक्षाविषयक इतर नोंदी करणे वगैरे) ते साधारण अर्ध्या तासात संपवून उरलेला दीड. अडीच तास हा अगदी आपला आपला वेळ असतो. या वेळात मी माझ्या लिखाणासंबंधी चिंतन करतो. एखादे टिपण घ्यावेसे वाटले तर जवळच्या छोट्या डायरीत टिपून घेतो. मनात खूप दिवसांपासून घोळत असलेल्या एखाद्या कल्पनेचा विस्तार करायचा असेल तर या वेळासारखा दुसरा वेळ नाही. हा वेळ मी असा सत्कारणी लावतो.


आणि परिक्षा झाल्याझाल्या पेपर्स तपासून घेतले म्हणजे मग पेपर तपासणीचे कामसुद्धा कंटाळवाणे होत नाही हा माझा अनुभव आहे. अशा प्रकारे शिक्षकी पेशातल्या या टाळाव्याशा वाटणा-या पण टाळता न येणा-या बाबींवर मी माझा माझा तोडगा काढलेला आहे.


या पर्यवेक्षणादरम्यान माझ्या मनात या परिक्षा पद्धतींबाबत कायमच एक प्रश्नचिन्ह तयार होत असते. आजची आपली पारंपारिक परिक्षा पद्धती ही कालबाह्य होतेय का ? आणि होत असली तर सर्वांनाच हे पटूनही त्यावर उपाययोजना का होत नाही ? हा मला पडलेला मोठ्ठा प्रश्न आहे.


पाठांतरावर आधारित परिक्षापद्धतीला माझा विरोध नाही. ज्या ज्या देशांनी, संस्कृतींनी पाठांतरावर आधारित परिक्षापद्धतीला पहिल्यापासून झुगारून दिलेले आहे त्यांच्या शिक्षणपद्धतीचे काय हाल झालेत ? ते आपण आज बघतोय. पाठांतरावर आधारित परिक्षा पद्धती हवीच पण ती पदवीला प्रवेश घेईपर्यंत. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा मेंदू पाठांतरावर छान तयार व्हायला हवा. 


पदवी परिक्षेत मात्र पाठांतरावर भर नकोय. पदवीच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच. पदवी मिळवतोय म्हणजे जो विषय आपण पदवीसाठी निवडलाय त्यात मला कौशल्य प्राप्त करायचेय. मग त्यात आपली पारंपारिक परिक्षा पद्धती थिटी पडतेय असे मला ठामपणे वाटत आलेले आहे. या सर्व परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठांतर परिक्षे ऐवजी त्यांनी त्या विषयातले किती कौशल्य अर्जित केले याचे मूल्यमापन व्हावे असे मला वाटते. आणि आजचा काळ हा सर्वार्थाने या सर्व बदलांसाठी अनुकूल असताना तर हे करणे अत्यंत सोपी आहे. फ़क्त कुणीतरी तसा ठाम निर्णय घेऊन तसे पाठबळ या नवविचारांना द्यायला हवे.


कोरोना काळात घरी बसल्या बसल्या, महाविद्यालयात रोजचे जाण्यायेण्याचे तास वाचल्याने, फ़क्त थेअरी लेक्चर्स घ्यायचे असल्याने प्रात्यक्षिकांचे तास वाचल्याने उरलेल्या वेळात आपल्यापैकी ब-याच जणांनी Coursera सारख्या ऑनलाईन माध्यमावर अनेक विषय शिकले. मी पण त्यातलाच एक होतो. माझ्या विषयाव्यतिरिक्त मी अनेक नवीन तंत्रज्ञान त्या माध्यमातून शिकलो. त्या अभ्यासक्रमात अनेक तज्ञांची व्हिडीयो लेक्चर्स असतात, त्यांच्या नोटस दिलेल्या असतात. आपण ते बघायचे आणि आपल्याला कळलेय की नाही हे बघायला त्यांच्या परिक्षा द्यायच्यात. परिक्षा पण ऑनलाईनच. परिक्षेदरम्यान त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपण त्यांचे व्हिडीयो बघू शकतो, नोटस वाचू शकतो. कारण शेवटी ही परिक्षा आपल्या आकलनाची असते आपल्या पाठांतराची नव्हे. आणि परिक्षेतले प्रश्न सुद्धा नोटस वाचून, व्हिडीयोज पाहून त्यातून थेट उत्तरे देण्यासारखे नसतात. परिक्षेतले प्रश्न सुद्धा आपल्या आकलनावर आधारित असतात आणि ब-याचशा विषयांमध्ये पास होण्यासाठी चक्क ८० टक्के गुण मिळवायचे असतात. समजा एखाद्या दिवशी आपण त्या परिक्षेत तेव्हढे गुण प्राप्त करू शकलो नाही तर पुन्हा २४ तासांनीच ती परिक्षा पुन्हा द्यायला मिळते तोपर्यंत तो पेपर आपल्या कॉम्प्युटरवर पुन्हा उघडत नाही. २४ तासात पुन्हा तेव्हढे ज्ञान प्राप्त करायचे, तेव्हढे आकलन प्राप्त करायचे आणि मग परिक्षा द्यायची. मला ही पद्धत फ़ार आवडली.


आज मी संगणक अभियांत्रिकी, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धीमत्ता वगैरे क्षेत्रातले विद्यार्थी आजच्या पारंपारिक परिक्षा पद्धतीत प्रोग्रॅमिंगचे पेपर्स लिहीताना बघितले की त्यांची, त्यांचे पेपर्स तपासणा-यांची आणि या एकूणच परिक्षा पद्धतीची कीव येते. एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम कागदावर लिहीताना तो नीट चालतोय की नाही हे त्या विद्यार्थ्याला कसे कळणार ? तो प्रोग्राम बरोबर लिहीलाय की नाही हे त्या पेपर तपासणा-याला तरी कसे कळणार ? हे माझ्यापुढ्चे गहन प्रश्न आहेत. त्यापेक्षा त्यांची अशी Coursera पद्धतीची परिक्षा झाली असती तर तो प्रोग्राम चालतोय की नाही हे त्यांचे त्यांनाच कळले असते. त्यातल्या चुका कशा काढायच्या याचे कौशल्य त्यांचे त्यांनीच मिळवले असते. यात परिक्षकाची भूमिका फ़क्त तसा पेपर देण्याची आणि अशा ऑनलाईन माध्यमात जर व्यवस्थित नियोजन केले तर प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच काठिण्यपातळीचे पण वेगवेगळे प्रोग्राम्स लिहायला सांगता येऊ शकेल त्यामुळे एकमेकांचे बघून लिहीणे वगैरे प्रकार टळू शकतील.


आजकाल तर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरून अनेक सॉफ़्टवेअर कंपन्या विद्यार्थ्यांची घरबसल्या परिक्षा घेत असतात. एकाच वेळी अक्षरशः हजारो विद्यार्थ्यांची. त्यात त्या विद्यार्थ्याने परिक्षेच्या विंडो व्यतिरिक्त दुसरी विंडो (गूगल, चॅट जीपीटी वगैरेला विचारण्यासाठी) नुसती उघडली तरी त्या विद्यार्थ्याची परिक्षाच रद्द होते. त्या विद्यार्थ्याच्या लॅपटॉप / डेस्कटॉपचा कॅमेरा त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या  हालचाली टिपत असतो. थोडीही संशयास्पद हालचाल, बोलणे त्यात दिसले की एक वॉर्निंग येते आणि त्या वॉर्निंगला भीक न घालता आपण आपले चुकीचे काम सुरूच ठेवले तर त्या विद्यार्थ्याची ती परिक्षा रद्द होते. 


हे आधुनिक तंत्रज्ञान आता सर्वत्र उपलब्ध आहे आणि सर्व विद्यापीठांना शैक्षणिक संस्थांना अगदी परवडण्यासारखे आहे. मग आजकालच्या युगातल्या परिक्षा अशा स्मार्ट पद्धतीने का होऊ नयेत ?


नरसी मोनजी विद्यापीठात अध्यापन करीत असताना माझे मार्गदर्शक आणि विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. शरद म्हैसकर आमच्या स्थापत्य अभियांत्रिकीतला एक अत्यंत कठीण विषय शिकवीत असत. भूतंत्रज्ञान अभियांत्रिकी (Geotechnical Engineering). पारंपारिक परिक्षा पद्धतीत या विषयासाठी खूप फ़ॉर्म्युले, खूप डेरिव्हेशन्स, खूप संकल्पना लक्षात ठेवाव्या लागतात आणि म्हणून हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना डोकेदुखी वाटतो. नरसी मोनजी विद्यापीठात या विषयाची "ओपन बुक" परिक्षा व्हायची. त्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके, नोट्स वापरण्याची मुभा असायची आणि पेपरमध्ये नुसते फ़ॉर्म्युले, डेरिव्हेशन्स न विचारता (नाहीतर विद्यार्थ्यांनी ते सगळे सरळ पुस्तकांमधून पाहून लिहून टाकले असते.) एखाद्या फ़ाऊंडेशनचे डिझाईन करायला विचारले जात असे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांमधून, आय एस कोडमधून त्या डिझाईनची प्रक्रिया बघून दिलेल्या डेटावरून डिझाईन करायचे असायचे. ते विद्यार्थी पदवी घेऊन आपापल्या क्षेत्रात गेल्यानंतर जर त्यांना एखादे फ़ाऊंडेशन डिझाईन करायचे असले तर त्यांच्याकडे संदर्भासाठी पुस्तके, आय एस कोडस असतीलच. फ़क्त त्यांचा वापर करून डिझाईन कसे करायचे ? हे कौशल्य त्यांना त्या अभ्यासक्रमात शिकवायचे आहे. आणि म्हणूनच त्यांची तशी परिक्षा घ्यायची आहे हे माझ्या मार्गदर्शकांनी मला सांगितले होते. किती अभिनव कल्पना ! अभियांत्रिकीसोबतच इतरही सगळ्याच पदवी परिक्षांसाठी या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना शिकवले गेले आणि तशा पद्धतीने त्यांच्या परिक्षा घेतल्या गेल्यात तर विद्यार्थ्यांचा किती कौशल्यविकास होईल, नाही ? नुसते फ़ॉर्म्युले, डेरिव्हेशन्स ही थेअरी लक्षात ठेऊन जर एखाद्या विद्यार्थ्याला ते कुठे आणि कसे वापरायचे हे कौशल्य मिळत नसेल तर परिक्षेत चांगले गुण मिळवूनसुद्धा त्याचा उपयोग कुठल्याही क्षेत्रात त्याला आणि समाजालाही होणार नाही.


आणखी एक मुद्दा. वर्षभर शिकवून वर्षाअखेर एका तीन तासांच्या परिक्षेत त्या विद्यार्थ्याचे ज्ञान जोखण्याची जुनी पद्धती कशाला ? वर्षभर त्या विद्यार्थ्याने महाविद्यालयात किती प्रोजेक्टस केलेत, किती संशोधन केले, किती विविध कौशल्ये आत्मसात केलीत, त्याची आकलन क्षमता किती आहे ? ह्याचे गुणांकन त्या त्या वेळी त्या त्या शिक्षकाने केले तर शेवटी ही परिक्षा घेणे हेच कालबाह्य ठरेल. हे त्या त्या शिक्षकांना हे जोखू द्यात ना. अंतिम तीन तासाच्या परिक्षेचा आणि त्या विद्यार्थ्याने वर्षभर केलेल्या मेहेनतीचा संबंध आपल्याला तोडता येणार नाही का ?


बरे या अंतर्गत मूल्यमापनात हे शिक्षक जर भेदभावपूर्वक वागणूक करीत असतील तर त्यावरही अंकुश ठेवण्याची यंत्रणा अगदी सहज उभारता येऊ शकते. असलेल्या कौशल्यापेक्षा जास्त मूल्यमापन करण्याचे एखाद्या संस्थेने ठरविले आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांचे ओव्हरव्हॅल्युएशन केले तर ती एक केवळ कागदी सूज ठरेल. कारण असे ओव्हरव्हॅल्युड विद्यार्थी जेव्हा नोकरीसाठी त्या त्या कंपन्यांमध्ये, आस्थापनांमध्ये जातील तेव्हा त्यांच्या या फ़ुगवलेल्या गुणांचे पितळ उघडे पडेल आणि त्या त्या महाविद्यालयाची, विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात येईल. याउलट आकसापोटी जाणूनबुजून एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण प्रदान करणा-यांवरही महाविद्यालयांतर्गत, विद्यापीठांतर्गत कठोर अंकुश ठेवण्याची यंत्रणा राबवता येईल.


थोडक्यात काय ? आजची लक्षात ठेवण्याची क्षमता तपासणारी पारंपारिक परिक्षा पध्दती आपल्याला विद्यापीठातल्या पदवी स्तरापासून पुढे नक्की टाळता येऊ शकते. त्याऐवजी विद्यार्थ्यांची कौशल्ये तपासण्याची पद्धती आणायला आजच्या युगात फ़ार श्रम पडणार नाहीत. गरज आहे ती शिक्षणतज्ञांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची आणि त्यांना सरकारमधल्या, विद्यापीठामधल्या, समाजातल्या सर्वच घटकांकडून मिळणा-या अगदी सकारात्मक सहकार्याची. 


जायचेय मग पुढे ? करायचीय नव्या युगाला सुरूवात.


आपल्या अनेकविध मतांचे स्वागत.


- गेली अडीच तपे अध्यापन क्षेत्रात असलेला आणि या क्षेत्रात नवे बदल घडवून आणण्यास इच्छूक असलेला प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१९ जानेवारी २०२६  


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Sunday, January 18, 2026

नागपुरातली नाटके

"आठवणी नागपूरच्या" या फ़ेसबुक गटात मध्यंतरी एका सदगृहस्थांची सुरेश भट सभागृहातील त्यांनी बघितलेल्या एका नाटकाबद्दल पोस्ट वाचली. सुरेश भट सभागृह हे नाट्यसंस्कृतीला कसे योग्य नाही आणि आयोजकांचा एकूणच गलथानपणा यावर त्यांनी कोरडे ओढलेले होते. मला स्वतःला आजवर सुरेश भट सभागृहात जाण्याचा कधी योगच आलेला नाही त्यामुळे त्यावर तर मी भाष्य करणारच नाही पण नागपुरातल्या नाट्य संस्कृतीविषयी मला वाटलेले प्रांजळ चिंतन मी याठिकाणी प्रकट करू इच्छितो.


महाराष्ट्रातल्या इतर शहरांइतकेच नागपूर हे नाट्यप्रेमी शहर आहे. नागपूरने मराठी नाट्यभूमीला अनेक उत्तम नट, दिग्दर्शक, लेखक आणि इतर नाट्यकर्मी दिलेले आहेत. नाट्य वर्तुळातील रूसवेफ़ुगवे, हेवेदावे, एकमेकांची कापाकापी या सगळ्या गोष्टीही नागपूरमध्ये इतर शहरांसारख्याच, त्याच प्रमाणात होत असता. पण मुंबई शहराच्या विशालतेमुळे आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या फ़ार संख्येने असलेल्या मराठी नाट्यरसिकांमुळे मुंबईत व्यावसायिक रंगभूमी बहरली तितकी ती नागपुरात बहरू शकली नाही. पुणे आणि नाशिक ही शहरे सुद्धा मुंबईवरून एका दिवसात जाऊन प्रयोग करून परतण्यासारखी असल्यामुळे तिथेही नागपूरच्या तुलनेत जास्त नाट्यप्रयोग होत असतात. मुंबईत यशस्वी ठरलेल्या व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकाचा प्रयोग नागपूरला होण्याचा योग वर्ष सहा महिन्यातून एकदाच होत असतो. त्या नाट्य संस्थेचा विदर्भ दौरा निघाला की मग अमरावती - नागपूर - चंद्रपूर असे प्रयोग करून ती नाट्यसंस्था परत मुंबईत जाते. या प्रवासासाठी एकूणच खर्च जास्त येत असतो आणि त्यामुळे त्या नाट्यसंस्थेचे व्यावसायिक गणित जुळावे म्हणून स्वाभाविकच इथल्या प्रयोगांची तिकीटे तुलनेने महाग असतात.


नागपूरकर नाट्यरसिक अशी वर्षातून सठीसामासी होणारी व्यावसायिक नाटके बघण्यासाठी हा जादा तिकीटांचा भार पण सहन करायला तयार असतो. "आपल्याला कुठे पुण्या मुंबईसारखी दर महिन्याला नाटके बघायला मिळतायत ? एखाद्या वेळेला जास्त तिकीट भरावे लागले तर भरू." हा त्याचा विशाल वैदर्भीय दृष्टीकोन असतो. पण इथे खरी गंमत सुरू होते.


नागपुरातल्या ज्या संस्थेने मुंबईतल्या नाट्य संस्थेशी संपर्क साधून या नाटकांचे आयोजन नागपुरात केलेले असते ती नाट्यसंस्था स्वतःसाठी पहिल्या ४ - ५ रांगांमधली तिकीटे राखून ठेवते. म्हणजे अगदी ५०० ते १००० रूपयांचे तिकीट काढून अशी चांगली नाटके बघायला जाणा-या नाट्यरसिकांना प्रिमीयम रांगांमध्ये बसून नाटक अनुभवण्याचा योग येत नाही. कुठेतरी आपण डावलले गेल्याची भावना मनात निर्माण होते. नागपुरातल्या दर्दी आणि स्वतःच्या खिशाला खार लावून नाट्यानुभव घेऊ इच्छिणा-या रसिकांवर हा अन्याय का ? हा मला न उलगडलेला प्रश्न आहे.


बरे या नाटकांचे आयोजक असलेली नागपुरातली नाट्यसंस्था ही प्रिमीयम तिकीटे आपल्याच सग्यासोय-यांना, दोस्तमित्रांना देत असते. त्या सगळ्यांनाच नाट्याविषयी आवड आणि तशी दृष्टी असेलच असे नाही. त्यामुळे हे नाट्यनिमंत्रण त्यातल्या अशा न नाट्य रसिकांना केवळ स्वतःचे स्टेटस, स्वतःची प्रौढी मिरवण्याची संधी वाटते आणि नाटक सुरू असताना पाळावयाचे अगदी साधे नियम या रसिकांनी न पाळल्यामुळे नाट्यसरिकांचा आणि नाट्य कलावंतांचाही अगदी रसभंग होतो. 


मध्यंतरी काही वर्षांपूर्वी प्रशांत दामलेंचे एक विक्रमी नाटक असेच नागपूरला आलेले होते. वसंतराव देशपांडे सभागृहातच नाटक होते. बुकिंग सुरू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशी पहिल्या काही मिनीटांमध्ये तिकीट काढूनही आयोजक नाट्य संस्थेने पहिल्या ५ रांगा स्वतःकडे राखून ठेवल्याने चक्क ६ व्या रांगेतून सगळ्यात महाग तिकीटे काढून नाटक बघण्याच्या योगाला आम्ही सामोरे गेलो. ठीक आहे. हरकत नाही म्हणत आम्ही सकस नाट्यानुभवासाठी आणि आनंदासाठी सभागृहात प्रवेशकर्ते झालो.


त्या नाटकात पहिल्या अंकाच्या सुरूवातीला त्या नाटकाच्या नायिका कविता लाड - मेढेकर यांचे एक मोठ्ठे स्वगत आहे. रंगमंचावर नाटक सुरू न होता हे नाटक प्रेक्षागृहातच सुरू होते. प्रेक्षकांशी संवाद साधता साधता कविता लाड - मेढेकर या प्रेक्षकांमधूनच रंगमंचावर जातात आणि मग रंगमंचावर नाटक रंगते. त्या नाटकादरम्यान पहिल्या पाच रांगांमधल्या अशाच एका फ़ुकट पासावरच्या निमंत्रित न नाट्य रसिकाने आपले मूल तिथे आणले होते. आजकाल सार्वजनिक वावराची मुलांना शिस्त लावणे हे आईवडिलांचे कर्तव्य उरलेले नसल्याने ते मूल प्रेक्षागृहात उंडारतच होते. पण कविता लाड - मेढेकरांचा हा महत्वाचा प्रवेश सुरू झाल्यावर तर ते मूल थेट त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंगाला हात लाव, स्वतःकडे त्यांचे लक्ष वेधून घे असले प्रकार करू लागलेत. कविता लाड - मेढेकरांच्या चेहे-यावर "एक लगावून द्यावे कार्ट्याला" असे वाटत असल्याचे भाव होते. पण रंगमंचावरील कलावंतांच्या मर्यादा सांभाळत त्यांनी ते स्वगत आपले बेअरींग न घालवता पूर्ण केले. त्यादिवशी त्यांच्याविषयी, त्यांच्या अभिनयाविषयीचा आदर द्विगुणित झाला. पण नाट्यरसिकांना रसभंग झाला तो झालाच. त्या प्रसंगानंतरही त्या निमंत्रितांच्या रांगेतून रसभंग होईल असे अनेक प्रसंग घडलेत. प्रेक्षागृहात इतर प्रेक्षकांमधून असे रसभंग होणे आणि अगदी समोरच्या ५ रांगांमधून असे प्रकार होणे यात त्या रंगमंचावरच्या कलावंतांची काय परिस्थिती होते ? हे एक नाट्यकर्मी, नट म्हणून मी स्वतः अनुभवलेले आहे. "नागपूरकर रसिकांना नाटकाची आवडच, चवच नाही." हे मत घेऊन मुंबई - पुण्याची मंडळी आपापल्या गावात जातात हे नागपूरसाठी खरोखर लांछनास्पद आहे.


नागपूरकर नाट्यरसिक आणि नाट्यसंस्थांनी यावर सखोल विचार करावा ही अपेक्षा.


- नागपूर आणि वैदर्भिय नाट्य सृष्टीत नट, संगीत नियोजक, रंगमंचामागील कामगार, वृत्तपत्रातील नाट्यसमिक्षक आणि मुंबईत बारा वर्षे घालवून अनेक उत्तमोत्तम नाटके कुटुंबिय आणि मित्रमंडळींसह पहिल्या दोन रांगांमधून बघितलेला एक नाट्यरसिक, नाट्यकर्मी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 


१८ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६















Saturday, January 17, 2026

नामयाचा जो जिव्हार

सकाळी उठलो आणि फ़ोनमध्ये युट्यूब उघडले. आज सकाळी सकाळी आवरताना, स्वयंपाक करताना, अभिषेकी बुवांचा शिवमत भैरव ऐकण्याची खूप मनापासून इच्छा झाली होती. "जितेंद्र अभिषेकी" हे नाव युट्यूब च्या शोध सदरात टाइप केले आणि अभिषेकी बुवांनीच गायलेला एक परिचित अभंग पहिल्या नंबरवर दिसला. मग तोच लावला. म्हटलं शिवमत भैरव यानंतर ऐकूयात. सकाळ छान सुरू झाली आणि मनात दिवसभरासाठी विचारचक्रही सुरू झाले.


संत जनाबाईंचा "संत भार पंढरीत" हा अभंग होता. आजवर अक्षरशः शेकडो वेळा ऐकलेला हा अभंग अभिषेकी बुवांनी छानच गायलाय. आणि अभिषेकी बुवांइतकाच छान आजच्या तरूण मंडळींपैकी केतकी माटेगावकरने पण गायलाय. सुंदर ठेहराव घेत, नजाकतीने, त्यातल्या जागा समजून. माझ्या प्ले लिस्ट मध्ये केतकीने गायलेला पण अभंग आहे. काहीकाही सूर दरवेळी ऐकताना मनाला हळवे करतात, डोळ्यात पाणी तरळवतात.


पण आज त्यातले शब्द वेगळ्याच अर्थाने खुणावू लागलेत. "सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार" या शब्दांनी दिवसभर मनात पिंगा घातला होता. संत जनाबाई ह्या त्याकाळात संत नामदेवांच्या घरी वाढलेली संत नामदेव महाराजांच्या कुटुंबातील एक दासी. आजच्या युगाच्या भाषेत सांगायचे तर गृह मदतनीस सखी. संत नामदेवांच्या घरी त्याकाळी त्यांचे सगळेच कुटुंबिय अभंग रचनेत आणि ईश्वरभक्तीत रममाण झालेले होते. त्याचाच परिणाम त्यांच्या या दासीवर झाला असण्याची शक्यता आहे. संत नामदेवांच्या सहवासात विचारांना पक्की बैठक लाभलेल्या आणि ईश्वराप्रती पूर्ण समर्पण पावलेल्या संत जनाबाईंनी फ़ार सुंदर शब्द या अभंगात लिहीलेत. "सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार" 


संत नामदेव महाराजांनी सर्व संतांची माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांना आपला सखा मानले होते आणि त्यांना ते आपला जिव्हार मानत असत असा एक लौकिकार्थ या अभंगातून संत जनाबाईंना मांडायचा आहे. जिव्हार या शब्दाचा एक अर्थ "जिवलग मित्र, आत्मा, प्रिय सखा" असाही होतो आणि आपण सर्वसामान्य मंडळी जिव्हार हा शब्द "हृदय" या अर्थाने सुद्धा वापरतो. एखादी गोष्ट "जिव्हारी लागणे" म्हणजे ती गोष्ट हृदयात खोचली जाणे, अगदी नेहेमीसाठी त्या गोष्टीचे स्मरण होणे या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. जिव्हार या शब्दाचा आपल्या वापरातला आणखी एक अर्थ म्हणजे आपले मर्मस्थळ.


संत ज्ञानेश्वर माऊली या सकल मराठी माणसांचे मर्मस्थळ आहेत मग ते त्यांचे शिष्य असलेल्या संत नामदेवांचे मर्मस्थळ असल्यात म्हणून नवल ते काय ? मग मनात विचार येऊन गेला की आपणही आपल्या अगदी सुहृद नातेवाईकांमध्ये, अतिशय जवळच्या मित्रमंडळींमध्ये त्यांचा त्यांचा जिव्हार होऊ शकू का ? इतकी आत्मीयता, प्रेम आपण आपल्या जवळच्या मंडळींमध्ये आपल्या वागण्या बोलण्याने आणि प्रेमळ निःस्वार्थ वृत्तीने निर्माण करू शकू का ? आणि असे जर आपण जगात वागत गेलोत तर "किंबहुना सर्वसुखी" या माऊलींनीच दाखविलेल्या आनंदाप्रत आपण सहज पोहोचू शकू, नाही का ? 


"सगळ्या मोठ्या गोष्टी या अत्यंत साध्याच असतात" असे एका पाश्चात्य विचारवंताचे मत आहे. त्या इतक्या साध्या असतात की सर्वसामान्य माणसांचा सुरूवातीला त्यावर "छे ! छे ! एव्हढी मोठी गोष्ट इतकी साधी कशी असू शकेल ?" असा अविश्वास असतो. तसेच आपण आपल्या सुहृद नातेवाईकांचा आणि जवळच्या मित्रमंडळींचा जिव्हार बनण्य़ाच्या प्रक्रियेचे आहे. त्या प्रक्रियेची मूलतत्वे फ़ार साधी आहेत आणि ती आपल्याला आपल्या प्रेमळ, निःस्वार्थ वागण्या बोलण्यातून रूजवत जायची आहेत हे इतके सोपे आहे. एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांचा तरी जिव्हार आजवर बनलोय का ? किंवा भविष्यात बनू शकतो का ? या प्रश्नाच्या धांडोळ्यात आणि त्यासाठी आपली वागणूक कशी असावी ? हे नियोजन करण्यात आजचा दिवस छान गेला.


"जिव्हार" या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे आपली जीभ. "ज्ञानोबामाऊली म्हणजे्च माझी वाणी आहेत, माझ्या सर्व अभंगांची प्रेरणा आहे "या अर्थाने तर संत नामदेवांना ज्ञानोबामाऊलींचा उल्लेख या अभंगात करायचा नव्हता ना ? हे शोधण्यात संध्याकाळ दरवळून गेली. यापूर्वी शेकडो वेळा ऐकलेल्या आणि सकाळपासून मनात रूंजी घालत असलेल्या या अभंगाने मनात अर्थाची निरनिराळी वलये निर्माण केलीत, मन अधिक सात्विकतेकडे ओढले, अधिक ईश्वरप्रवण केले हे मात्र नक्की.


- अनेक जन्म घेऊन संतांच्या चरणाची केवळ धूळ होण्याची तरी पात्रता लाभावी या प्रामाणिक आकांक्षेचा एक साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१७ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Friday, January 16, 2026

भारतीय रेल्वेचा लतेरेपणा भाग - ५ (गरीब रथ एक्सप्रेस)

भारतीय रेल्वेत सगळ्यात लतेरे आणि आपलीच मनमानी करणा-या रेल्वेमंत्र्यांची यादी करायची असेल तर लालू यादव या इसमाचे नाव अग्रगण्य ठरेल. त्यापाठोपाठ ममता बॅनर्जी आणि सी के जाफ़र ’शरीफ़’ (?) आणि नितीशकुमार यांचा्ही नंबर लागेल. पण लालूचा लतेरेपणाच्या बाबतीतला स्वॅग काही वेगळ्याच लेव्हलचा होता.


२००६ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात लालूने गरीब रथ ही संकल्पना मांडली आणि ४ ऑक्टोबर २००६ रोजी पहिली गरीब रथ एक्सप्रेस ही पंजाबमधल्या अमृतसर शहरातून बिहारमधल्या सहरसा या शहरासाठी रवाना झाली. खरेतर ही कल्पना मोठी उदात्त होती. कष्टकरी, श्रमकरी वर्गाला परवडणारा वातानुकूलित प्रवास उपलब्ध व्हावा, आपल्या जन्मभूमीवरून कर्मभूमीपर्यंत लांबच्या प्रवासात त्यांना परवडणा-या दरात आरामदायक प्रवास करता यावा म्हणून संपूर्ण वातानुकुलित पण प्रवासभाडे विना वातानुकूल शयनयान दर्जापेक्षा थोडेसेच जास्त असणारी ही गाडी लालूने भारतीय रेल्वेत आणली. 


पहिल्या गरीब रथ एक्सप्रेससाठी पंजाबमधल्या कपूरथळा रेल्वे कारखान्याला विशेष प्रकारचे कोचेस बनविण्याची ऑर्डर देण्यात आली. पहिल्या गरीब रथ एक्सप्रेससाठी असलेले कोचेस हे त्या काळातील भारतीय रेल्वेच्या कोचेसच्याच रंगसंगतीतले म्हणजे काळपट लाल रंगातले होते. नंतर मग त्यांना हिरवा आणि पिवळा रंगाचा पट्टा अशी रंगसंगती प्राप्त झाली. तेव्हा एक वेगळा प्रयोग म्हणून या रंगसंगतीकडे बघितले गेले. पण नंतर इंटरनेट सर्वत्र आणि सुलभपणे उपलब्ध झाल्यानंतर या रंगसंगतीमागे असलेले लालूचे पाकिस्तान प्रेम उघड झाले. पाकिस्तान रेल्वेची सुद्धा नेमकी हीच रंगसंगती आहे. म्हणजे या समाजवाद्यांची थेरं कुठल्या टोकाला जाऊ शकतात ? हे एका साध्या उदाहरणावरून कळून येते.




भारतात बहुतेक सर्व महत्वाच्या आणि गर्दीच्या मार्गांवर गरीब रथ रेल्वे सुरू झाली त्यामुळे लवकरच ही सेवा लोकप्रिय झाली. या सेवेसाठी कपूरथळा येथला रेल्वे कारखाना विशेष प्रकारचे कोचेस बनवायचा. त्यापूर्वी वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात प्रत्येकी ८ शायिका (बर्थस) असलेले ८ कक्ष (bays) असायचेत. म्हणजे वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात एकूण ६४ शायिका असायच्यात. गरीब रथच्या कोचेसमध्ये समोरासमोरील दोन बर्थसमधली जागा थोडी कमी करून असे ९ पूर्ण आणि १ अर्धा असे कक्ष होते. म्हणजे वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयानातील ६४ शायिकांऐवजी गरीब रथ मध्ये एका कोचमध्ये ७२ अधिक ३ अशा ७५ शायिका होत्या. साहजिकच समोरासमोर बसणा-या प्रवाशांना थोडी कमी लेगरूम मिळू लागली. पण तरीही प्रवाशांची त्याला हरकत नव्हती कारण असा कमी लेगरूममध्ये आखडून प्रवास करण्याचा वेळ हा ३ - ४ तास असायचा आणि त्यानंतर आपापल्या शायिकांवर आपली पथारी पसरून झोपी जाणे हाच कार्यक्रम असायचा. इतक्या परवडणा-या तिकीटांच्या किंमतीत असा वातानुकूल शयनयानातून प्रवास करायला मिळणे हा प्रवाशांच्या दृष्टीने आनंदोत्सव असायचा.


मला आठवतय नागपूर ते पुणे या प्रवासासाठी वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गाचे प्रवासभाडे साधारण ९५० ते ९७५ रूपये असायचे तेव्हा गरीब रथ मधील वातानुकुलित त्रिस्तरीय शयनयान वर्गात फ़क्त ५८५ रूपयांत प्रवास करता यायचा. तेव्हा विना वातानुकूल शयनयान वर्गाचे भाडे ३७५ रूपये इतके होते. थोडेसेच रूपये जास्त देऊन वातानुकूल प्रवास इच्छिणा-यांसाठी हे थोडी कमी लेगरूम चालण्यासारखी होती. आणि गरीब रथ गाडीला इतर प्रिमीयम गाड्यांप्रमाणे मधले थांबे सुद्धा मर्यादितच होते त्यामुळे प्रवास हा जलद वेगाने होत असे.


पण लालूच्या अती लोभामुळे या प्रकाराला मधल्या काळात दृष्ट लागली. प्रत्येक कक्षात मुख्य बाजूला समोरासमोर प्रत्येकी ३ असे एकूण ६ आणि पॅसेजच्या बाजूला (गाडीच्या धावण्याच्या दिशेला समांतर) असे २ साईड बर्थस असे ८ बर्थस असायचेत. त्याऐवजी साईड बर्थसना पण मध्ये एक जादाचा बर्थ बसविण्याची आणि एका कक्षात एकूण ९ बर्थस बसविण्याची कल्पना लालूच्या डोक्यातून आली. मुख्य बर्थसमध्ये एकावर एक असे ३ बर्थस अशी रचना सहज राहू शकते पण साईड बर्थसना बोगीच्या वक्राकार छतामुळे आधीच हेडरूम कमी असते त्यात मध्ये हा तिसरा बर्थ म्हणजे अजिबातच हेडरूम मिळत नव्हती. (उदाहरणार्थ खालील चित्र बघा) आणि त्यातही त्या साईडच्या मधल्या प्रवाशाने दिवसाच्या वेळी प्रवास कुठल्या आसनावर बसून करायचा ? या प्रश्नाचे समर्पक उत्तर कुणाहीजवळ नव्हते. त्यामुळे बसण्यावरून प्रवाशांमध्ये भांडणे होऊ लागलीत. आधीच साईडच्या मधल्या बर्थ वर कमी हेडरूममुळे झोपून वैतागलेला प्रवासी बसायला स्वतःची निश्चित अशी जागा नसल्याने अधिकच वैतागू लागला. सर्वसामान्य लोकांनी आरामदायक वातानुकूल प्रवास करावा म्हणून सुरू केलेली सेवा सर्वसामान्य लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू लागली. केवळ त्रिस्तरीय वातानुकूल शयनयानातून प्रवास करण्याइतपत आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून ही साईड मिडल बर्थची पिळवणूक आपण सहन करतो आहे ही भावना सर्वसामान्य प्रवाशांमध्ये बळावू लागली.




लालूने मग हेच साईड मिडल बर्थ विना वातानुकूल शयनयान वर्गातही आणून तिथेही जादा प्रवासी नेण्यासाठी सर्व रेल्वे विभागांना निर्देश दिले. वर्षभरातच प्रवाशांच्या असंख्य तक्रारी रेल्वे विभागांकडे पोहोचल्यात आणि रेल्वेने ही साईड मिडल बर्थसची कर्मदरिद्री कल्पना सोडून दिली.






रेल्वेमंत्री म्हणून लालूची राजवट संपल्यानंतर नवीन गरीब रथ गाड्यांची घोषणा झाली नाही पण जुन्या गाड्या चालूच राहिल्यात. प्रवाशांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभल्यामुळे असेल कदाचित. आता गरीब रथ गाड्यांसाठी त्रिस्तरीय वातानुकूल शयनयानात इकॉनॉमी श्रेणीचे नवीन एल एच बी कोचेस आहेत त्या गरीब रथना लागायला लागल्यात. एल एच बी कोचेसमध्ये तसेही प्रत्येकी ८ बर्थस चे ९ कक्ष (bays) असतात. त्यामुळे या प्रकारच्या इकॉनॉमी कोचेसमध्ये असे १० मुख्य कक्ष (प्रत्येकी ६ बर्थसचे) आ्णि साईडचे ९ कक्ष (प्रत्येकी २ बर्थसचे) असे ७८ बर्थस आणि शेवटल्या कक्षात केवळ मुख्य ३ बर्थस अशी ८१ शायिकांची रचना असू लागली.


गरीब रथ मध्ये No Frills Service म्हणून वातानुकुलित शयनयान वर्गात रेल्वेकडून मिळणारे अंथरूण पांघरूण कधीही मिळत नसत. मधल्या काळात कोरोनानंतर जवळपास सर्वच वर्गांमध्ये ही व्यवस्था वैकल्पिक झाली आणि त्यामुळे केवळ गरीब रथ मध्येच ही सुविधा मिळत नाही हे सर्वसामान्यांचे वैषम्य थोडॆ कमी झाले असावे.


तर असा हा गरीब रथचा लालूच्या लालची स्वभावाचा आणि लतेरेपणाचा प्रवास. भारतीय लोकांची काटकसरी आणि Value for Money जोखून बघण्याची मनोवृत्ती यामुळे या गाडीला लोकाश्रय टिकलेला आहे. नाहीतर त्या त्या रेल्वेमंत्र्याची कारकीर्द संपल्यानंतर नव्या रेल्वेमंत्र्याने त्याच्या पूर्वसुरीने सुरू केलेल्या, पूर्वसुरीचे brain child असलेल्या गाड्यांना मारून टाकण्याच्या प्रयत्नात लालूची गरीब रथ टिकली हे आश्चर्यच म्हणावे लागेल. समाजवादी मंडळींच्या खूप उदात्त कल्पना सुरूवातीला मांडून "डोंगर पोखरके उंदीर निकाल्या" सारखे त्यातून काहीतरी इंटुक दाखवेगिरी करायची या भूमिकेतली ही गाडी. 


- गरीब रथ मधून प्रवास करताना साईड मिडल बर्थवर बसलेल्या प्रवाशांचे हाल आणि वैताग अगदी जवळून बघितलेला एक सर्वसामान्य प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१६ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Thursday, January 15, 2026

चिंतनक्षण - १०


 "परमार्थात दंभ आला की तो प्रपंचच झाला." - डॉ. सुहास पेठे काका


आपले जीवन अधिक उन्नत व्हावे ही सगळ्या मनुष्यमात्रांची इच्छा असते. आपले जीवन अधोगतीला जावे असे कुणालाही कधीच वाटत नाही. आणि वाटूही नये. उन्नतीकडे मन धावणे ही मनुष्यमात्रांची स्वाभाविक वृत्ती आहे.


जीवनात थोडे कडूगोड अनुभव घेतल्यानंतर मग आपल्या मनुष्यमात्रांच्या सर्वसामान्य आकलनाच्या पलिकडे एक शक्ती आहे आणि त्या शक्तीकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या तिच्या आराधनेने आपल्याला मिळू शकतात हे सुद्धा मनुष्यमात्रांना जाणवते. त्या शक्तीला ईश्वर, सदगुरू अशी अनेक नावे प्रत्येकजण आपापल्या अनुभवांती देतो आणि तिची उपासना करू लागतो.


उपासना करीत असताना त्या त्या मनुष्य मात्रांना निरनिराळे अनुभव येत असतात. हे अनुभव कधी आपल्या इंद्रियांना जाणवणारे असतात तर ते कधी इंद्रियांनी वर्णन करता न येण्याइतके परेंद्रिय असतात. त्या मनुष्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धी प्राप्त करून स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यात सुखानुभव प्राप्त होऊ शकतात हे सुद्धा त्या सिद्धीप्राप्त व्यक्तीच्या लक्षात येते. इथेच नेमका सांभाळण्याचा क्षण असतो.


आपण ही उपासना, ही साधना जर या जगातल्या गोष्टींसाठी सुरू केलेली असेल तर बरीच मंडळी या सिद्धीप्राप्तीनंतर थांबतात, सिद्धींना भुलतात, सिद्धीत गुंततात. जी ईश्वरी शक्ती आहे ती थोडी विचारी आहे. सगळ्यांनाच आपल्यापर्यंत पोहोचू न देता विविध टप्प्यांवर विविध परिक्षा पाहून, तावून सुलाखून निघालेल्या साधकांनाच केवळ आपल्या चरणाशी अक्षय्य प्रवेश देणारी आहे. म्हणून कवी म्हणतो


मुझे जो कराना था पथ पार

बिठाए उसपर भूत पिशाच्च

रचाए उसमे गहरे गर्न

और फ़िर करने आया जॉंच.


खरा साधक जर या सिद्धींना भुलला तर तो ती ईश्वरी शक्तीची परिक्षा नापास झाला असे समजले जाते. आपली उपासना, साधना ही या जगातल्या गोष्टींसाठी आहे ? की त्या सर्वशक्तीमान ईश्वरावरील प्रेमापोटी, त्याला जाणण्यापोटी आहे याचा विवेक सगळ्या साधकाने सदैव जागृत ठेवला पाहिजे. हा विवेक नसला की त्या साधकाचा सर्वसामान्य संसारी मनुष्य होतो. कितीही उंची गाठली तरी अंतिमतः परमार्थात त्याचे अधःपतनच होते. लौकिक आयुष्यातली सर्व सुखे त्याला व त्याच्या अनुयायांना मिळतात पण ज्या कार्यासाठी ही साधना आरंभिली होती ते कार्य मात्र अनेक जन्म दूर राहते.


परम आणि अर्थ हे दोन शब्द मिळून परमार्थ हा शब्द तयार होतो. परम म्हणजे सर्वोच्च आणि अर्थ म्हणजे प्राप्त करून घेण्याची वस्तू. मनुष्य जीवनात प्राप्त करून घेण्याची सर्वोच्च वस्तू म्हणजे परमार्थ. पण इथेच भलेभले चुकतात. परम वस्तू ऐवजी सहज पुरूषार्थाने प्राप्त होणा-या गोष्टी अशा व्यक्ती निवडतात आणि आपल्याच जीवनाला धन्य मानतात. 


एका गुरू आणि शिष्याची अशीच एक बोधकथा आहे. तो शिष्य बरीच साधना करून पाण्यावरून चालत जाण्याची सिद्धी प्राप्त करतो आणि एकेदिवशी आपल्या गुरूजींना सांगतो "गुरूजी, आता तुम्हाला ही आपल्या आश्रमासमोरील नदी ओलांडून पैलतीरावर जाण्यासाठी या नावेक-यांची मनधरणी करण्याची, त्यांना त्यांच्या नावेतून प्रवासासाठी प्रवासमूल्य देण्याची गरज नाही. अनेक वर्षांच्या साधनेनंतर मी पाण्यावरून चालण्याची सिद्धी प्राप्त केलेली आहे. मी तुम्हाला अतिशय भक्तीभावाने माझ्या खांद्यावरून रोज पैलतीरी नेऊन सोडेन आणि परतही घेऊन येईन."


ते गुरूजी खिन्नपणे हसतात आणि म्हणतात. "अरे वत्सा. ज्या गोष्टीचे लौकिक मूल्य केवळ काही रूपये आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तू आपल्या आयुष्यातली काही वर्षे आणि इतकी मोठी साधना खर्ची घातलीस ? ही सिद्धी तर मला ब-याच वर्षांपासून येते. पण ती वापरून मी माझी साधना खर्ची घातली नाही."


शिष्य खजील होतो आणि परमार्थात आजवरच्या साधनेचा बॅलन्स शून्य झालाय हे मनी उमजून नव्याने साधनेला लागतो.


आपण हा परमार्थ मार्ग का निवडलाय ? आपल्याला यातून नक्की काय साधायचे आहे ? हे प्रत्येकाने स्वतःच्या मनाला अगदी प्रांजळपणे विचारावे. जर या जगातल्या लौकिक गोष्टींसाठी, सोयी सुविधांसाठी, क्षणैक प्रसिद्धीसाठी आपण हा मार्ग निवडला असेल तर आपण परमेश्वरप्राप्तीच्या आपल्या अंतिम ध्येयाला कधीही पोहोचू शकणार नाही हे नक्की लक्षात ठेवावे. हा सगळा दंभ आहे. आणि परमार्थात हा दंभ म्हणजे संसारच आहे. या अविवेकी मार्गाने आपल्याला पुढले अनेक जन्म घेत रहावे लागतील आणि त्यातही आपली साधना, आपला अक्षय्यपदाचा शोध सुरूच ठेवावा लागेल हे पक्के लक्षात ठेवावे.


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष वद्य द्वादशी शके १९४७ दिनांक १५ / १ / २०२६


१५ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Wednesday, January 14, 2026

सकारात्मक विचारसरणी : एक पुस्तक वाचण्याचा नव्हे तर जगून बघण्याचा एक भाग.

सोशल मिडीयावर राहून आणि सातत्याने लिखाण करून आता जवळपास १८ वर्षे झालीत. पहिल्यांदा ऑर्कुट, नंतर फ़ेसबुक आणि सोबतच ब्लॉगस्पॉटवर स्वतःचा ब्लॉग लिहीणे. सुरूवातीला ब्लॉग लिखाणाला प्रतिसाद फ़ार कमी होता पण चिकाटीने ४ - ५ वर्षे लेखन सुरू ठेवले. मग हळूहळू वाचकसंख्या वाढू लागली.


सगळ्याच सोशल मिडीयांवर समानशील व्यक्ती भेटल्यात. आपल्यासारखाच विचार करणारे, जीवन जगणारे दुसरे कुणीतरी आहे ही भावनाच आपला एकटेपणा दूर करून जीवन जगायला बळ देणारी असते. आपल्यासारखीच जीवनमूल्ये घेऊन जगणारी असंख्य मंडळी या जगात आहेत ही भावना जगातल्या आणि आपल्याही अंतरातल्या चांगुलपणावर विश्वास दृढ करणारी असते.


या सोशल मिडीयावर वावरताना काही पथ्ये पाळावीच लागतात. फ़ार जास्त एकांगी होऊन, मनस्वीपणे आपली मते प्रदर्शित करून, आपल्या मनातल्या वैयक्तिक रागाला तिथे मूर्त स्वरूप देऊन अजिबात चालत नाही. सगळ्याच वाचकांच्या जीवनात काही ना काही कटकटी, दुःखे, नकारात्मकता, अडचणी असतातच. त्यामुळे आपणही आपली दुःखे, कटकटी, नकारात्मकता तिथे मांडली तार वाचकांना "घरचे झाले थोडे आणि व्याहाने धाडले घोडे" अशी अवस्था होऊन जाते. म्हणून मी कटाक्षाने या गोष्टी तिथे टाळतो. कुणाचीतरी निर्वीष खिल्ली उडवणे, राजकारण्यांवर टीका टिप्पणी करणे हे चालते पण माझे बहुतांशी लेखन हे सकारात्मक असते. सुदैवाने मला लिहायला माझे छंद, माझा अवलीपणा, मला शिक्षण नोकरीदरम्यान आलेले असंख्य गंमतीदार अनुभव, माझे प्रवास असे अनेक विषय असतात. त्यामुळे मुद्दाम एखाद्या घटनेबाबत, व्यक्तिंबाबत नकारात्मक लिहावे असे काही नसते.


काही काही नियमित वाचकांकडून एक आश्चर्ययुक्त पृछा कायम येतेच. "सर, तुम्हाला सगळीकडेच कशा चांगल्या व्यक्ती भेटतात ? कधीतरी काही बदमाष, कटकट्या आणि अप्रामाणिक व्यक्ती भेटल्या असतीलच की." अशी विचारणा झाली की मग मनात विचार सुरू होतात आणि यानिमित्ताने आत्मपरिक्षण सुरू होते.


कावेबाज, बदमाष माणसे जगात सगळीकडे असतीलच. सुदैवाने माझ्या वाट्याला कमी आलीत. जी काही थोडी आली असतील त्यांचा लेखाजोखा मी पटकन पुसून टाकला. धडा शिकलो पण त्या घटना अगदी मनातून पुसून टाकल्यात. माझ्याबाबतीत झालेले अपमान, बदमाषी यांना मी मनात फ़ारसा थारा दिला नाही. त्यातून धडा शिकलो पण ती घटना मनाला चटका देत ठेवली नाही.

 

आता त्यातली एखादी घटना क्वचित आठवलीच तरी राग, चीड न येता, त्या माणसाविषयी कीव वाटते किंवा कुठल्या परिस्थितीत ती व्यक्ती अशी कावेबाज वागली असेल ? याचा मी अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो, सोडून देतो.


शिक्षकी पेशात पहिल्यापासून असल्याने कायम संपर्क तरूण मुलांशी, घडविण्याजोगा मातीच्या गोळ्यांशी, आला. ९९ % विद्यार्थी बाह्य जगाच्या दुनियादारीशी अपरिचित, निरागस असे असतात. आपल्या सकारात्मक वागण्याबोलण्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर कितपत होतोय ? याचे दरवर्षी नवनवे प्रयोग करताना स्वतःच्याच व्यक्तीमत्वात खूप सकारात्मकता येत गेली. बाह्य जगाच्या दृष्टीने भाबडा तर भाबडा, पण शिक्षक होण्याचे perks काय असतात ? हे मास्तरकी केल्याशिवाय कळत नाही. दरवर्षी तेच तेच विषय जरी शिकवायचे असलेत तरी दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळे असतात. त्यांची एकंदर बुद्धीमत्ता, त्यांची शिकण्याची पद्धती, त्यांचा कल आणि दरवर्षी बदलणारे तंत्रज्ञान या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून मग दरवर्षी आपल्या शिकवण्यात बदल करावा लागतो. दरवर्षी ही अशी आपली आपल्याशीच शर्यत असते. मागील वर्षापेक्षा अधिक चांगले होण्याची. कालपेक्षा आज आपण जास्त अपडेट आणि अपग्रेड झालोय की नाही ? हे बघण्याची शर्यत. स्वतःमध्ये निरंतर उत्कृष्टतेचा समावेश करण्याची धडपड. 


मला वाटतं की ही धडपड, ही शर्यतच आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ प्रदान करते. ख-या अर्थाने जीवनाला गती देते. ही धडपड, शर्यत जर थांबली तर मग जीवन दिशाहीन होऊन जाईल. उद्या काय करायचे ? या प्रश्नाचे उत्तर तयार नसेल, उद्याच्या कार्यक्रमांनी आजची आपली डायरी भरली नसेल तर संपलंच की सगळं. मी सर्वसामान्य माणूसच आहे त्यामुळे कधीकधी या कामांच्या सततच्या रगाड्याचा कंटाळा येतोही. एखाद्यादिवशी त्या डायरीचे दर्शनही नको वाटतं. नको तो टाइमटेबल असे सुद्धा वाटते. पण कधीमधी हे असे वाटणे हे सुद्धा स्वाभाविक आहे हे मनाने स्वीकारले की जीवनाची रंगत अजून वाढते. ९९ वेळा आपले आजच्या दिवसाचे नियोजन चुकले हे डायरीतल्या कामांवर मारलेल्या फ़ुल्यांमधून कळले तरीसुद्धा १०० व्या दिवशी ती फ़ुल्या मारलेली कामे आपल्या डायरीत घेणे आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करून त्यावर राइट मार्क घेणे हीच तरी खरी जीवनाची मजा आहे, नाही ?


"Power of positive thinking" हे Norman Vincent Peale चे पुस्तक, UPSC / MPSC ची तयारी करताना, फार वर्षांपूर्वी वाचले होते. त्यातले एक अक्षरही आता लक्षात नाही. पण एक मात्र नक्की जाणवतंय की सकारात्मक विचारसरणी आणि त्याप्रमाणे आपला स्वतःचा आचार हा एक सातत्याने प्रयत्नरत असण्याचा आणि प्रत्यक्ष अनुभवण्याचा भाग आहे.

 

आणि एकदा असे आपले आचरण राहिले की कटकट्या, कावेबाज मंडळींनी कितीही कट कारस्थाने केलीत तरी तुमच्यावर काही फरक पडत नाही. आणि तुम्ही कपटाने विचलित होत नाही म्हटल्यावर त्यांचा पराभव अटळ असतो. मग ती सगळी मंडळी आपसूकच तुमच्यातला त्यांचा रस कमी करतात, तुमच्यापासून दूर जातात. अंतिमतः फायदा तुमचाच होतो.


- "The only rule of life is that there is no single rule that suits all" हे सत्य अनुभवलेला आणि तरीही स्वतःचे नियम मांडणारा एक सरळ साधा शिक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१४ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Tuesday, January 13, 2026

एका उपवधू तरूणाचे कल्पक प्रताप

इसवीसन १९९९. एका तरूणाच्या लग्नासाठी त्यांच्या घरात हालचाली सुरू झाल्या. नोकरी लागून चांगली ४ वर्षे झालेली होती. त्यामुळे आता त्याने दोनाचे चार हात करावेत अशा चर्चा घरात आणि त्याच्या परिचितांमध्ये सुरू झालेल्या होत्या. मुलगा वाचनवेडा, पुस्तक दिसले की कर फ़स्त अशा सवयीचा. तसा साधा सरळ. कुणाच्या अध्यात मध्यात नसणारा. त्याचबरोबर विनोदप्रिय. जीवनाला खेळकर अंगाने घेणारा. त्यामुळे त्याच्या मनात त्याला हव्या असलेल्या जीवनसाथी / जीवनसारथ्याची कल्पना अगदी पक्की होती. आजूबाजूचा समाज आणि एकंदरच काळ बदलायला सुरूवात झालेली आहे याची त्याला कल्पना आलेली होती. अशा वेळी जीवनाच्या अशा महत्वाच्या टप्प्यावर आपल्याला साथ देणारी मुलगी जर आपल्या अनुरूप असली नाही तर जीवनाचे काय हाल होतील ? या कल्पनेने तो थोडा बावरला होता.



त्याकाळी त्याचा इतर चारचौघांसारखाच ठरवून केलेला विवाह होणार होता. तोपर्यंतच्या जीवनाच्या एकूणच धबडग्यात, संघर्षात प्रेम वगैरे करणे आणि त्याचे विवाहात रूपांतर होणे ही कल्पना सुद्धा त्याला आलेली नव्हती. आणि प्रेमविवाहासाठी लागणा-या बहुतांशी बाजू त्या मुलाच्या उणे बाजूकडीलच होत्या. उत्कृष्ट रूप नसणे, सर्वांवर, विशेषतः मुलींवर प्रथमदर्शनी छाप पाडणारे व्यक्तीमत्व असणे, मुलींवर खर्चायला शिल्लक पैसे असणे वगैरे वगैरे गोष्टी नव्हत्याच. प्रेमविवाह जरी असले तरी या गोष्टी त्याने आसपास घडताना बघितल्या होत्या त्यामुळे त्या मार्गाने तो जाणारच नव्हता. मग अशा ठरवलेल्या विवाहात आपल्याला अनुरूप अशा मुलीची निवड एकाच बघण्यात होईल का ? तिचे खरे व्यक्तीमत्व आपल्याला कळेल का ? आपल्या व्यक्तीमत्वाला साजेशी अशी वाचनाची आवड असलेली, विनोदप्रिय, खेळकर स्वभावाची आणि अगदी सहज जीवन जगणारी किंबहुना जीवनावोषयी फ़ार असोशी नसणारी मुलगी नक्की आपल्याला एक अर्ध्या तासाच्या "मुलगी बघण्याच्या" कार्यक्रमातून जीवनसाथी म्हणून मिळेल का ? हे विचार त्याला भेडसावत होते. कारण हे गणित जर चुकले तर आयुष्य हुकले ही त्याची धारणा अगदी पक्की होती.


मग त्याने त्यावर खूप विचार करून एक प्रश्नावली तयार केली. त्यात त्या वधूच्या नावापासून, टोपणनावापासून ते शैक्षणिक पात्रतेपर्यंत आणि त्यापुढेही इतर आवडीनिवडींबाबत काही प्रश्न होते. ते प्रश्न वरवर बघता निरूपद्रवी वाटत असले तरी त्यांच्या आलेल्या उत्तरांमध्ये तो तरूण त्याच्याशी त्या मुलीची मते, आवडीनिवडी जुळतात की नाही ? हे ताडून बघणार होता. म्हणजे या मुलाचा आवडीचा चित्रपट "प्रहार", "एक रूका हुआ फ़ैसला", "थोडासा रूमानी हो जाए" असायचा आणि त्या मुलीचा आवडता चित्रपट "मोहरा" असायचा. त्याची आवडती डिश ही पुरणपोळी असायची तर तिची पास्ता असायची. 






नाही, तशी आवडनिवड भिन्न असायला हरकत नव्हती. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" हे मनापासून मानण्याइतका तो आणि त्याच्या घरची मंडळी सुसंकृत होती. कुठलीही आवडनिवड ही अत्यंत वैयक्तिक बाब असते आणि ती तशी असणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, त्यात अधिक उणे असे काही नसते ही त्याची अगदी प्रामाणिक धारणा होती. पण जीवनरथाची दोन्हीही चाके एकाच आकाराची असलीत की रथ अधिक सुलभतेने अनेक अडथळ्यांना पार करतो हे त्याचे पक्के प्रमेय होते आणि त्यासाठी आपल्याच आकाराचे चाक तो आपल्या जीवनरथाला शोधत होता. आवडीनिवडी थोड्या इकडेतिकडे असल्यात तरी तिच्या घरची संस्कृती आणि आपल्या घरची संस्कृती यात साम्यस्थळे किती आहेत ? आणि विसंगती किती आहेत ? हे तो त्या प्रश्नावलीवरून शोधणार होता. म्हणजे पुरणपोळी आणि वडाभाताचे जेवण झाल्यानंतर संध्याकाळी बाहेर पाणीपुरी, रगडा पॅटीस खाऊन घरी पुन्हा पिठलंभात खाल्यानंतर त्या घरात "पोटात अगदी गोपालकाला झालाय" असे म्हणतात ? की "पोटात आज अगदी कॉकटेल झालय" असे म्हणतात हे त्या प्रश्नावलीवरून त्याला कळणार होते. अगदीच भिन्न संस्कृतीत, संस्कारात वाढलेले दोन जीव फ़ार क्वचितच एकत्र आणि (त्याच्या दृष्टीकोनातून) सुखाचा समाधानाचा संसार करू शकतात यावर त्याचा दृढ विश्वास होता.


स्त्री पुरूष समानतेच्या काळात केवळ मुलाकडूनच अशा प्रकारची माहिती मुलीकडून मागवली जावी हा अन्याय झाला असता हे त्याला मान्य होते. तामुळे या प्रश्नावलीच्या आधी "थोडेसे माझे" म्हणून स्वतःचे एक मनोगत, आपला हेतू विशद करणारे Preamble  त्यात समाविष्ट केलेले होते. (केंद्रीय नागरी सेवा परिक्षां साठी भारतीय राज्यघटनेचा खूप अभ्यास केल्याचे असे परिणाम होतात. कुठेही आपले Preamble वगैरे टाकणे. छे !) त्यात त्या तरूणाने अशाच प्रकारची माहिती या किंवा वधूपक्षाने ठरविलेल्या इतर कुठल्याही फ़ॉर्मॅटमध्ये देण्याची तयारी दर्शवलेली होती.



घरच्या मंडळींनी त्याचा हा आग्रह पाहून मोठ्या कष्टाने त्याला परवानगी दिली. घरच्यांचेही बरोबरच होते. त्याकाळी हा एक मोठा प्रयोग होता. "तो मुलगा काय स्वतःला मोठा टिकोजीराव समजतोय की काय ?" असा लोकापवाद पसरविणारा होता. पण तो उपवधू मुलगा आपल्या विचारांवर ठाम होता. लोकांनी काहीही म्हटले तरी आपल्याला हवी असलेली जीवनसंगिनी ही आपल्याला, आपल्या कुटुंबातील संस्कारांना अनुरूप अशीच असली पाहिजे असा त्याचा अत्याग्रह होता.


पण या फ़ॉर्मचे फ़ार प्रयोग करण्याची वेळ आली नाही. दोन मुली बघितल्यानंतर तिस-याच मुलीकडून त्याला आणि त्याच्याकडून तिला पसंतीचा होकार कळवला गेला आणि ती अगदी त्याच्या जीवनात अनुरूपपणे आली आणि ते दोघेही एकमेकांमध्ये विरघळून गेलेत.


आज त्या घटनेला पाव शतकाहून अधिक काळ लोटला आहे तरी आजही त्याकाळच्या या प्रश्नावलीच्या या सुखद आठवणी त्याला स्वतःवरचा, स्वतःच्या निर्णय क्षमतेवरचा आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीवरचा विश्वास अगदी दृढ करायला मदत करतात. 


- तारूण्यात मनाला अनेक पंख फ़ुटत असलेत तरी विचाराने आणि एका ध्येयाने जगणारा वागणारा कल्पक आणि विचारी तरूण, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


(त्याचे लग्न कसे जुळले ? आणि इतर गंमतीजंमतीच्या आठवणी इथे) 


१३ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Monday, January 12, 2026

शिक्षक प्राध्यापकांनो. ऐका हो ऐका.

आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. राष्ट्रीय युवक दिवस. आज महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आजच्या दिवसाची आठवण करून दिली. त्यांच्या युवक असण्याचे महत्व त्यांना ठसवले. स्वामीजींच्या चरित्रातील एक चारित्र्य निर्माणाची कथाही सांगितली. विद्यार्थ्यांनी ती मन लावून ऐकली, त्यांना ती पटलीही पण फ़ार काळ त्यांच्या मनःपटलावर ती राहील असे मात्र वाटले नाही. अशी चरित्रे ऐकून, वाचून त्या विचाराने झपाटले जाण्याचे दिवस आता संपलेत असे वाटून गेले. आता विविध समाजमाध्यमांवरील रील्ससुद्धा २० सेकंदांपेक्षा अधिक कालावधीच्या नसतात कारण आपल्या सगळ्यांचाच लक्ष देऊन एखादी गोष्ट ऐकण्याचा, शिकण्याचा कालावधी कमालीचा कमी झालेला आहे.


मधल्या काळात आम्हा प्राध्यापकांना आपापल्या विषयातले MOOC (Massive Open Online Courses) तयार करण्यासाठी आय आय टी च्या तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभले. त्यात त्या सगळ्यांनीच स्पष्ट सूचना दिल्यात की तुमची ऑनलाईन लेक्चर्स चित्रित करताना एव्हढी खबरदारी घ्या की एक लेक्चर हे फ़क्त १० ते १२ मिनीटे कालावधीचे असावे. कारण त्यांच्याकडे असलेल्या एका अहवालानुसार अभियांत्रिकी विद्यार्थ्या्चा, एकाचवेळी एकूणच लक्ष देण्याचा, शिकण्याचा कालावधी हा फ़क्त १० ते १२ मिनीटे एव्हढाच आहे. म्हणूनच आय आय टी च्या तज्ञ प्राध्यापकांची ऑनलाईन्स लेक्चर्स ही छोटी छोटी असतात. एका तासात, एकाच लेक्चरमध्ये एखादी संकल्पना विद्यार्थ्यांच्या गळी उतरवायची असेल तर ती संकल्पना अशी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून ५ - ६ लेक्चर्समध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगितली तर ती त्यांच्यापर्यंत अधिक चांगली पोहोचते हा आय आय टी चा अभ्यास आहे. आणि तिथली बहुतांशी प्राध्यापक मंडळी याचे पालन करीत असतात.


आजकाल महाविद्यालयात १ तासाचे लेक्चर घ्यायचे म्हटले की विद्यार्थ्यांना तब्बल तासभर आपल्या विषयात गुंतवून ठेवण्यासाठी आम्ही प्राध्यापक मंडळी किती तारेवरची कसरत करतो हे सगळ्यांच्या लक्षात येईल. बरे आपल्या विषयावरील ऑनलाईन कण्टेण्ट डाऊनलोड करून तसेच विद्यार्थ्यांना शिकवणे हे आमच्यातल्या हाडाच्या प्राध्यापकाला मंजूरच नाही. आमचे अनेक व्यवसायबंधू तसे करतात खरे, पण त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांना किती अनादर वाटतो हे आम्हाला माहिती आहे. आणि असा अनादर डोळ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ पगारासाठी शिकवणे हे मरणाहून मरण आहे हे सुद्धा आम्हाला कळतय. त्यामुळे आपला विषय तर विद्यार्थ्यांना शिकवायचाय, त्यांची लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता ही अत्यंत कमी आहे हे लक्षात घेऊन थोडी मौजमस्ती करीत, थोडी त्यांच्या विश्वातली गंमत करीत, त्यांना आपण त्यांच्यातलेच एक वाटलो पाहिजेत याची काळजी घेत आणि तरीही आपल्या विषयाशी बांधून ठेवत तासभर शिकवणे ही खरोखर तारेवरची कसरत आहे.


आजकालच्या इंटरनेटच्या महाविस्फ़ोटाच्या आणि चॅट जीपीटी किंवा तत्सम कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांच्या काळात एखाद्या विषयाची माहिती अतिशय मुबलकपणे विद्यार्थ्यांना वर्गखोलीच्या चार भिंतीबाहेर उपलब्ध आहे. ती माहिती ते त्यांच्या अतिशय रचनात्मक वेळात घेऊ शकतात. त्यासाठी महाविद्यालयात जाऊन, विशिष्ट वेळेला एका वर्गखोलीत बसून ती माहिती घेण्याचे प्रयोजन त्यांना उरले नाही. एखाद्या विद्यार्थ्याचा अत्यंत रचनात्मक वेळ रात्री ११ ते १२ असू शकतो आणि या वेळात त्याने / तिने शिकलेले त्याच्या / तिच्या डोक्यात कायमचे राहू शकते. त्यासाठी भर दुपारी प्राध्यापकांकडून लेक्चर्स ऐकून त्याविषयावर चिंतन मनन करण्याची गरज उरलेली नाही. बहुतेक दुपारची वेळ ही तशीही मेंदूच्या फ़ार रचनात्मक कार्यासाठी भारतीय उपखंडात तरी विद्यार्थ्यांकडून पसंत केली जात नाही हे माझे वैयक्तिक निरीक्षण. मग अशावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता, माहितीचा महापूर हा आपल्या शिक्षकी पेशालाच अकाली निवृत्त करतोय की काय ? अशी एक भितीची भावना आम्हा प्राध्यापकवर्गात बघायला मिळते.


पण इथेच कधी नव्हे ती प्राध्यापकांची मोठी भूमिका येते. आणि ती म्हणजे माहिती आणि ज्ञान यात असलेला फ़रक आपल्या विद्यार्थ्यांना जाणवून द्यायची. आंतरजालावर अफ़ाट माहिती उपलब्ध आहे. तिच्यातून योग्य ते निवडून त्या माहितीचे ज्ञानात, कौशल्यात कसे रूपांतर करायचे ? याचे मार्गदर्शन आजकालच्या शिक्षकांकडून अपेक्षित आहे. इंग्रजी भाषेत सांगायचे तर शिक्षक हा एक Knowledge Facilitator म्हणून विद्यार्थ्यांना हवाय. त्याहून पुढली गोष्ट म्हणजे आज विद्यार्थ्यांना हे सुद्धा अगदी प्रेमाने समजावून सांगावे लागेल की आज आपण अभ्यासक्रमात जे काही शिकतोय ते कमी अधिक कालावधीनंतर कालबाह्य होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिकण्याच्या वर्षात "एखादी गोष्ट शिकायची कशी ?" हे जर विद्यार्थ्यांनी शिकले ते त्यांच्या जीवनात पुढेपुढे नवनवीन विद्या, कौशल्ये शिकू शकतील. अगदी कुठल्याही वयात, कुठल्याही नोकरी व्यवसायात स्वतःला अपग्रेड करू शकतील, अपडेट ठेऊ शकतील. जीवनभर विद्यार्थी म्हणून नवनवीन गोष्टी शिकण्याचे त्यांना त्यांच्या जीवनात कायकाय फ़ायदे मिळणार आहेत ? हे त्यांना एकदा कळले की ते आपला वेळ, शक्ती "एखादी गोष्ट शिकायची कशी ?" याच्या अभ्यासातच घालवतील.


त्यासाठी शिक्षक प्राध्यापकांनाही आपले जुने धोरण, जुन्याच नोटसवरून पुढे चालू, तेच ते घिसेपीटे जोक्स त्याच त्याच वेळी अशा सवयी निग्रहाने त्यागाव्या लागतील. नवीन जगात काय सुरू आहे ? नवी पिढी कसा विचार करतेय ? आपल्या विद्यार्थ्यांना आजच्या बाह्य जगात कुठल्याकुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे ? याचे अद्ययावत ज्ञान शिक्षक प्राध्यापकांना घेत रहावे लागेल. आणि बाह्य जगात वावरताना केवळ विद्यार्थ्यांना शिकवणारे पंतोजी म्हणून न वावरता विद्यार्थ्यांचा कायम सांगाती म्हणून वावरावे लागेल. आज विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आलेली आहे. 







- आज ३० वर्षांपासून अध्यापन करीत असलेला आणि जवळपास दोन पिढ्यांमधील विद्यार्थी, त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांच्यातील शिक्षणाचा दृष्टीकोन डोळसपणे अभ्यासणारा, त्यांच्याहून तिस-याच पिढीतला एक शिक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


 

१२ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६