Monday, September 21, 2020

"यथा काष्ठंच काष्ठंच, समेयातां महादधौ..."


 

दोन व्यक्ती. 'क्ष' आणि 'य'. (असे लिहीले की त्या प्रबंधाला शास्त्रीय असा 'फील' वगैरे येतो म्हणे. खरेखोटे डाॅक्टरच जाणो. हे डाॅक्टर साहित्यातले हो. वैद्यकातल्या डाॅक्टरांना कुठला एवढा वेळ ? 'क्ष' आणि 'य' ओळखण्याएवढा, असो)

'क्ष' आणि 'य' या जीवनप्रवासात काही काळ एकमेकांसोबत घालवतात. एकमेकांसाठी शारिरीक, मानसिक, आर्थिक झीज वगैरे सोसतात. मोठाच आनंद असतो.
अचानक काही अनामिक कारणांनी 'क्ष' आणि 'य' चे प्रवाह वेगवेगळे होतात. पण त्यात 'क्ष' हा कधीकाळी एकत्र प्रवास केल्याच्या खुणा आठवत अट्टाहास करीत राहिला, एकमेकांसाठी सोसलेल्या झीजेचे आठव करीत राहिला. 'क्ष' जड झाला. त्याच्या प्रवाहातून फेकल्या गेला. काठावर रूतला, क्वचित नवपालवीने रूजून आला.
नवी पालवी,
नवी पानझड,
नवे मरण,
नवे लाकूडपण,
नव्या प्रवाहातले नवे वाहणे,
पुन्हा नव्या 'प'ला भेटणे, दुरावणे, कुढणे,
नवे जडत्व,
नवा काठ.
तोच प्रवास पुन्हा पुन्हा . ८४ लक्ष वेळा.
त्यामानाने 'य' मोकळ्या मनाने प्रवाहासोबत पुढे गेला. आपण 'क्ष' साठी खाल्लेल्या खस्ता वगैरे म्हणजे मागील ८३,९९,९९९ मधले काही ऋण द्यायचे बाकी होते. ते आता दिले असे त्याने मानले. तो मस्त वाहत राहिला. हलका होऊन, मनमोकळा होऊन.
अंतिमतः सागराला मिळाला, सहज. अट्टाहास न करता. पुन्हा कधीच प्रवाहात न येण्यासाठी.
आपणा सगळ्यांना 'य' व्हायचय की नाही ? ८४ लक्षांचा प्रवास टाळायचाय की नाही ? मग हलके व्हा. जे घडले ते ऋण अनुबंध होते. आता फिटलेय. त्यावर फार आठव करीत जड होऊन मिरवण्यात (आणि नंतर भिरभिरण्यात) काहीही अर्थ नसतो.
- कर्माचा सिध्दांत (part 2) लिहीण्याची मनिषा असलेले रामभाई किन्ही(ठ)क्कर.
- हा स्फुटलेख नावाशिवाय किंवा स्वतःच्या नावाने शेअर करणार्याला ८४ लक्ष गुणिले ८४ लक्ष इतके वेळा प्रवाह सुटणार नाही. "पुनरपि मरणम, पुनरपि जननम.."ची भीषणता लक्षात राहू द्या रे ब्वाॅ.
हां, आता "तोच खेळ पुन्हा पुन्हा" आवडत असेल तर प्रश्नच खुंटला.
{"नेहमीच विनोदी, हलकंफुलकं का लिहीतोस रे ? जरा कधीतरी वैचारिक वगैरे लिहीत जा." सांगणार्या दोस्तकंपूच्या आग्रहावरून ही खास पोस्ट.}

No comments:

Post a Comment