Monday, September 28, 2020

मला आवडणारा पुणेकरांचा गुण.

 पुणेकरांना जगभर कितीही कुणीही नावे ठेवलीत, तरी त्यांचा एक गुण मला खरोखर आवडतो.

पुणेकर व्यक्तिगतरित्या स्वतः अतिशय शिस्तशीर आहेतच. (वाहतुकीच्या बाबतीत सोडून. भारतातल्या बेशिस्त वाहतूक असणार्या शहरांमध्ये पुणे पहिल्या पाचात नंबर काढेल.) पण पुण्यात काम करणार्या व्यक्ति असोत किंवा संस्था असोत त्यांच्या कामकाजातही हा पुणेरी व्यवस्थितपणा आणि शिस्तशीरपणा हेच पुणेकर आणायला लावतातच.
आता आमच्या लाडक्या एस. टी. चेच उदाहरण घ्या ना.
स्वारगेटवरून पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात जाणार्या गाड्या,
शिवाजीनगरवरून उत्तर आणि पूर्व महाराष्ट्रात जाणार्या गाड्या
आणि पुणे स्टेशन बस स्थानकातून मुंबईला जाणार्या गाड्या. गेली ५० वर्षे तरी (कदाचित जास्त ही असतील) ही शिस्त कायम आहे.
खुद्द एस. टी. च्या मुख्यालय असलेल्या मुंबईत, मुंबई सेंट्रलवरून आणि परळवरून सुटणार्या गाड्यांचे इतके काटेकोर नियोजन नसतेच.
नागपूरला तर एस. टी. च्या बाबतीत वैदर्भिय बेशिस्तीचा नमुनाच बघायला मिळतो. "चंद्रपूर - मोरभवन" असा बोर्ड असलेली गाडी मोरभवनला जाईल की गणेशपेठला जाईल हे कधीकधी खुद्द ड्रायव्हर साहेबांनाच माहिती नसते म्हणतात. मध्येच फोन आला तर मोरभवन बसला रहाटे काॅलनी चौकातून गणेशपेठकडे वळवताना बर्याचदा पाहिलेय.
औरंगाबाद म्हणजे मराठवाडी अघळपघळपणा आलाच. काहीकाही बसफेर्यांचे सिडको बसस्थानकापर्यंतच नियोजन केलय खरे,पण त्या सिडकोत थांबून कधीमधी मुख्य बसस्थानकापर्यंत येऊनही जातात.
नगर मात्र आतिथ्यशील. पुण्याकडे जाताना "माळीवाडा बस स्थानक" ही जरी सोय असली तरी पुण्याकडून परतताना मध्यवर्ती बस स्थानक आणि तारकपूर बस स्थानक दोन्हीकडे बस नेण्याचा आग्रह कायम असतोच.
नाशिक मात्र पुण्याच्या पावलावर पाऊल टाकून तयार होतेय. सीबीएस वरून कुठली बस जाणार ?, ठक्कर बस स्थानकावरून कुठली बस जाणार ? आणि महामार्ग बसस्थानकावरूनच कुठली बस "उडनछू" होणार ? याचे आराखडे (पुण्याइतके नसलेत तरी) बर्यापैकी पक्के आहेत.
तात्पर्य काय ? पुणेकरांचा शिस्तबध्दपणा संपर्कात येणार्या व्यक्तींसाठीच नव्हे तर संस्थांसाठीही infectious (लागट) आहे.
- मुंबईकर आणि नागपूरकर नागरिक झाल्यानंतर पुणेकर नागरिक होण्याची कसून तयारी करणारे प्रा. राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment