Wednesday, June 11, 2025

एक उनाड दिवस

"एक उनाड दिवस" नावाचा एक सिनेमा आला होता.पूर्वी मराठी सिनेमे कधी यायचे आणि कधी जायचे हे कळायचंच नाही. पुरेशी जाहिरातच नसायची. त्यांच्या जाहिरातींवर बजेटच नसायचं की काय ? नकळे. आजकाल मराठी सिनेमेवाले सोशल मिडीयाचा जरा ब-यापैकी वापर करायला शिकलेले आहेत. त्यामुळे हल्लीचे मराठी सिनेमे आलेले वगैरे कळतात. ते बघण्याचे बेत आपण आखू शकतो."एक उनाड दिवस" हा सिनेमा त्यापूर्वीचा. त्यामुळे हा सिनेमा आम्ही एका ओटीटी प्लॅटफ़ॉर्मवर बघितला.


एक धनाढ्य आणि शिस्तबद्ध उद्योगपती, अशोक सराफ़. घरी, कारखान्यात सर्वत्र कडक शिस्त असावी या मताचे व आचरणाचे. पण एक दिवस असा उजाडतो की त्यांच्या बाबतीत एक अनियोजित, अकल्पित घटनांची साखळी सुरू होते. त्याच्यावर त्यांचे नियंत्रण उरत नाही आणि एक दिवस त्यांना त्यांच्या मनाविरूद्ध प्रवाहाबरोबर वाहत वाहत जगावा लागतो. पण त्या दिवसाच्या शेवटी त्यांना कळून येते की त्या दिवसाने त्यांना खूप काही गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि तो दिवस त्यांचे आयुष्य समृद्ध करून गेलेला आहे.


मनात विचार आला की रोज वेळापत्रकाप्रमाणे आणि शिस्तबद्ध आयुष्य जगणा-याला अशा उनाड दिवसाचे कौतुक. ज्या जिवांना रोज सकाळी उठल्यावर आज काय करायचे आहे ? याचे कुठलेही नियोजन नसते त्यांचा प्रत्येकच दिवस उनाडच असतो. त्यांना त्या उनाड दिवसाचे काय कौतुक ? काय अप्रूप ? उठल्यानंतर शरीराच्या मूलभूत गरजा भागवून, स्वच्छता वगैरे आटोपून आपापल्या कामधंद्यांवर जायचे. तिथेही दिवस कसा जाईल ? याचे काहीही नियोजन न करता, येईल तसा दिवस घालवायचा आणि संध्याकाळी पुन्हा परतल्यानंतर अनियोजित टिवल्याबावल्या करायच्यात. रात्री सुखाने झोपी जायचे. यातच जर काही जीवांना सुख लाभत असेल तर त्यांनी अगदी नियोजनबद्ध जगावे हा आग्रह आपण तरी का करावा ? शेवटी सगळ्या मानवांच्या सगळ्या धावपळीचे अंतिम उद्दिष्ट "सुख" हेच आहे, नाही का ?


आमच्या नशिबाने म्हणा किंवा पूर्वपुण्याईने म्हणा आम्हाला बालपणापासून शिस्तबद्ध जीवन जगण्याचे धडे देणारे आई वडील मिळालेत. त्यातही आमच्या आईसाहेबांचा कल शिस्तीकडे फ़ार होता. पहाटे अमुक एका वेळेला उठलेच पाहिजे, अमुक एका वेळेच्या आधी आंघोळ, संध्या, पूजा आटोपलीच पाहिजे, अमुक एका वेळेला शाळेसाठी, आपापल्या कामांसाठी आपण निघालेच पाहिजे, शाळेतून दुपारी, संध्याकाळी घरी परतल्यानंतर सर्वांनी काय काय घरकामे करायचीत हे सुद्धा तिने फ़ार विचारपूर्वक नियोजन करून आखून दिलेले होते. त्यामुळे सकाळची शाळा संपवून दुपारी घरी आल्यानंतर आपले जेवण करायचे. आई तिच्या शाळेत गेलेली असायची त्यामुळे जेवणानंतर आपली जागा स्वच्छ पुसून, सारवून ठेवायची आणि घरची गृहसखी (आईची घरकामातली मदतनीस) अगोदरच येऊन गेलेली असल्याने आपले ताट, वाटी, गडवा, पेला घासून, धुवून ठेवायचे. दुपारी गृहसखीने घासून ठेवलेली इतर भांडी नीट आपापल्या जागी लावून ठेवायचीत आणि आई शाळेतून येण्यापूर्वी घर झाडून ठेवायचे अशी शिस्त आम्हा सगळ्याच भावंडांना होती.


त्याचा एकंदर आयुष्यावर परिणाम असा झाला की इतक्या वर्षांनंतरही "आज काय करायचे ?" या नियोजनाचे उत्त्तर आमच्याकडे त्यादिवशी सकाळी किंवा आदल्यादिवशी रात्रीच तयार असते. आम्ही शिकण्यासाठी हॉस्टेलला गेल्यानंतरही या शिस्तीचा आम्हाला फ़ार उपयोग झाला. सगळे दिवस अगदी आखीव रेखीव असायचेत. नियोजनाप्रमाणे दररोज सगळ्याच गोष्टी होत असत असे नाही पण रात्री झोपताना दिवसभराच्या नियोजनाचा आढावा घेऊन आज कुठली गोष्ट झाली नाही ? का झाली नाही ? काहीकाही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर होत्या म्हणून नियोजन चुकले ? की आपला आळस, रेंगाळणे त्याला कारणीभूत होते ? यामुद्यांचा मनातल्या मनात विचार व्हायचा आणि दुस-या दिवशी आपसूकच आपल्या रेंगाळण्यावर, आळसावर नियंत्रण यायचे. एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या बाबींमुळे झाली नसेल तर त्या बाबींविषयी आणि त्यासंबंधींच्या भावी नियोजनाविषयी मनातल्या मनात सुधारणा करण्याविषयी सूचना दिल्या जायच्या.


त्यामुळे वर्षातून कुठे फ़िरायला वगैरे गेलो तर अजिबात नियोजन नसलेले असे उनाड दिवस वाट्याला यायचेत. पण असेही दिवस घालवायचे असतात ह्या मनोभूमेकेचे नियोजन मनात पक्के असल्यामुळे अशोक सराफ़ांना जसा त्या उनाड दिवसाचा त्या दिवसाच्या प्रारंभीच्या काही तासांमध्ये त्रास झाला तसा आम्हाला होत नाही. मुक्तपणे आम्ही तो उनाड दिवस उपभोगू शकतो.


माझ्या पदव्युत्त्तर मार्गदर्शकांचे एक म्हणणे मी कायम लक्षात ठेवलेले आहे. ते म्हणायचे, "राम, रोजच्या जीवनात आपली अगदी Infinitesimally small अशी Delta प्रगती झालीच पाहिजे. कालच्यापेक्षा मी आज अगदी थोडेतरी जास्त अपडेटेड, अगदी थोडेतरी जास्त अपग्रेडेड असलेच पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला, मानवी बुद्धीमत्त्तेला आणि मानवी आकाक्षांना अर्थ राहील. नाहीतर आहेच आपला सॉलेमन ग्रॅंडी. आला, जगला आणि गेला." ते स्वतः तसे रोज जगत असत. वयाच्या ७० व्या वर्षीसुद्धा शिकवण्याआधी आपल्या सुंदर हस्ताक्षरात दरवर्षी नवीन नोटस तयार करीत असत. दरवर्षी नवनवीन आलेली पुस्तके, त्या विषयातल्या अनेक जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले शोधनिबंध याचा आधार घेऊन नवे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न असायचा. तब्येत साथ देवो न देवो ते अखंड या ज्ञानयज्ञात समिधा टाकत असायचेत. त्यामागची धडपड एव्हढीच की माझा विद्यार्थी हा सर्वार्थाने अपडेटेड, अपगेडेड असला पाहिजे. आज असे शिक्षक अत्यंत विरळा आहेत. माझ्या शिक्षक म्हणून एकूणच व्यक्तिमत्वावर माझ्या या पदव्युत्त्तर मार्गदर्शक सरांचा फ़ार मोठा प्रभाव आहे. 


कधीकधी मात्र अशा रोजच्या शिस्तबद्ध जीवनाचा फ़ार म्हणजे फ़ारच कंटाळा येतो बरं का. आपणच काय आपल्याभोवती हे शिस्तीचे रिंगण घालून घेतलेले आहे ? आज जर थोडे बेशिस्त जगलो तर कुणाला काय फ़रक पडणार आहे ? असे बंडखोर विचार मनात येतात. तसे जगून बघण्याचा प्रयत्नही होतो पण काही तासांतच आपल्या लक्षात येते की आपला पिंड तसा उनाड जगण्याचा नाही. उनाड जगण्याविषयी, जगणा-यांविषयी कितीही कुतुहल आणि आकर्षण असले तरी आपला पिंड तो नाही. रोज शिस्तबद्ध जगणा-यांना अशा एखाद्या उनाड दिवसाचे कौतुक आणि अप्रूप.


आणि एक जाणवते की रोज शिस्तबद्ध जगणा-यांना असा एक उनाड दिवस घालवण्याचे सुख लाभेलही कारण तो दिवस असा उनाड घालवण्याचेही नियोजन त्यांनी कुठेतरी केलेले असते पण याउलट रोज उनाड दिवस घालवणा-यांना एक दिवस तरी आपल्या रोजच्या जगण्याविरूद्ध अशा शिस्तबद्ध जगण्याचे नियोजन जमेल काय ? जगता येईल काय ?


 

- नियोजनबद्ध जीवन जगणारा आणि उनाड दिवसांचा भोक्ता, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


बुधवार, ११ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५







No comments:

Post a Comment