गेल्या पंधरवाड्यातच कृत्रिम बुद्धीमत्त्ता वापरून तयार केले्ले ॲनिमेशन व्हिडीयो आणि त्याद्वारे प्रसन्न ट्रॅव्हल्सची केलेली जाहिरात बघितली. त्या जाहिरातीत प्रसन्न च्या "विदर्भ क्वीन" आणि "गोल्ड लाइन" या लाडक्या गाड्या दिसल्यात. मन एकदम ३० - ३५ वर्षे भूतकालात गेले. त्या काळी या गाड्या नागपूर - पुणे मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांच्याही अत्यंत लाडक्या गाड्या होत्या.
१९९० चे दशक जागतिकीकरण - उदारीकरणाचे वारे घेऊन आले. आणि महाराष्ट्रात खाजगी आराम बसेसचे अक्षरशः पेव फ़ुटलेत. नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती, नागपूर ते यवतमाळ, नागपूर ते छत्रपती संभाजीनगर, नागपूर ते पुणे अशा अनेक मार्गांवर खाजगी आराम बसेस धावू लागल्यात. त्यातला नागपूर ते पुणे हा मार्ग अनेक खाजगी बससेवा चालकांना विशेष खुणावू लागला होता. आजही शहरातल्या महत्वाच्या ७ - ८ मोठ्या खाजगी बससेवा मालकांच्या प्रत्येकी ५ अशा सेवा या मार्गावर निरंतर सेवा देत आहेत. म्हणजे नागपूर ते पुणे या मार्गावर दररोज एकाबाजूने जवळपास ५० खाजगी आराम बसेस धावत आहेत.
१९९० च्या दशकाच्या उत्त्तरार्धात जागतिकीकरण - उदारीकरणामुळे संगणक क्रांतीचे वारे वाहू लागलेले होते. त्यापूर्वीही पुणे आणि पिंपरी चिंचवड हा परिसर झपाट्याने औद्योगिकीकरणाकडे झेपावत होता. त्यामुळे नागपूर वरून पुण्याकडे नोकरीधंद्यासाठी
जाणा-यांची संख्या प्रचंड वाढलेली होती. आणि त्यादरम्यान रेल्वे आणि एस. टी. चे जे पर्याय या दोन शहरांदरम्यान प्रवासासाठी होते ते अत्यंत तुटपुंजे आणि मुख्य म्हणजे गैरसोयीचे होते.
सकाळी १० वाजता नागपूरवरून निघून दुस-या दिवशी सकाळी ६ वाजता पुण्याला पोहोचवणारी महाराष्ट्र एक्सप्रेस या ८९० किलोमीटर प्रवासासाठी जवळपास २० तास घेत असे. रेल्वेने भुसावळ - मनमाड - अहिल्यानगर मार्गे अंतर सुद्धा लांब पडायचे. त्यामानाने रस्तामार्गे हे अंतर फ़क्त ७२० किलोमीटर पडायचे पण त्याकाळातल्या रस्त्यांची, त्यांच्या देखरेखीची एकूण अवस्था बघितली तर हे अंतर कापायला एस. टी. ला सुद्धा जवळपास १८ तास लागीत असत. दुपारी १:४५ ला निघणारी नागपूर - पुणे ही एशियाड (निम आराम सेवा आताचे ब्रॅंडनेम हिरकणी) दुस-या दिवशी सकाळी ७:३० ला पुण्यात पोचत असे. आणि दुपारी ४:४५ ला निघणारी नागपूर - पुणे ही जलद सेवा दुस-या दिवशी सकाळी १० च्या आसपास पुण्यात पोचत असे. परतीच्या प्रवासातही तसेच टायमिंग्ज.
ही सगळी गरज ओळखून प्रसन्न ट्रॅव्हल्स ने नागपूर ते पुणे अशी वातानुकूल आराम बससेवा सुरू केली आणि तिला "विदर्भ क्वीन" असे नाव दिले. ही बस तेव्हाच्या प्रसन्न ट्रॅव्हल्सच्य नागपूर हेडऑफ़िसवरून, धरमपेठेतल्या बोले पेट्रोल पंपाजवळून दुपारी ३:३० ला निघत असे. आणि दुस-या दिवशी सकाळी ७:३० ला पुण्यात बालगंधर्व जवळील देवी हाईटस ला पोचून आपला प्रवास संपवीत असे. एस. टी. प्रवासापेक्षा या प्रवासाला तब्बल दोन तास कमी लागत असत आणि या प्रवासाचे इतर फ़ायदेही भरपूर होते. आज तीन दशकांनंतरही एस. टी. ला (किंवा ब-याचशा खाजगी बससेवा पुरवठादारांना सुद्धा) या मुद्यांवर योजना करून तशी सेवा देणे जमत नाही यावरून ही सेवा काळाच्या किती पुढे होती हे लक्षात येते.
अ) वक्तशीरपणा - प्रसन्न ट्रॅव्हल्स ने हा गुण अगदी पहिल्यापासून पाळलेला आहे. प्रवासी कितीही असोत "विदर्भ क्वीन" असलेल्या संख्येतल्या प्रवाशांना घेऊन आपल्या प्रवासाला सुरूवात करायची. इतर खाजगी ऑपरेटर्स पुरेशा प्रवासी संख्येसाठी बस थोडी थांबवून ठेव, एका बसला पुरेसे प्रवासी नसले तर दोन टायमिंग्जच्या बसेस एकत्र करून पाठव (म्हणजे दुपारी ४:०० च्या बसला पुरेसे प्रवासी नसलेत तर त्या बसमध्ये प्रवासी वगैरे बसलेले असतानाही ती बस नागपूरवरून सुटायचीच नाही. काहीतर कारण सांगून ती बस ताटकळत रहात असे. दुपारी ५:००, ५:३० च्या त्याच बस ऑपरेटर्स किंवा इतर ऑपरेटर्स च्या बसेसच्या बुकिंगमधले प्रवासी घेऊन ती ४:०० ची बस कधीकधी संध्याकाळी ६.०० वाजता सुद्धा रवाना होत असे.) असे प्रकार करीत असत. त्यामुळे त्याम्ची विश्वासार्हता शून्य होती. अगदी चार प्रवाशांनिशी सुद्धा प्रसन्नची "विदर्भ क्वीन" मार्गस्थ होईल हा विश्वास प्रवाशांच्या मनात असल्याने "विदर्भ क्वीन" ला प्रवाशांचा कायम उदंड प्रतिसाद लाभत असे.
आ) न रेंगाळता प्रवास - या मुद्यावर तर प्रसन्न ट्रॅव्हल्स ने एस. टी. महामंडळासकट आपल्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना मात दिलेली होती. नागपूरवरून निघालेल्या बसचा पहिला थांबा हा अमरावतीच्या इर्विन चौकातल्या प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या बुकिंग ऑफ़िसमध्येच असायचा. तिथून अमरावती - पुणे प्रवासासाठी अधिकृत प्रवाशांना घेतले की पुढला थांबा टॉवर चौक, अकोला येथले प्रसन्न ट्रॅव्हल्सचे बुकिंग ऑफ़िसच. प्रवासात मध्ये मध्ये नागपूर - कोंढाळी, कोंढाळी- तळेगाव, तळेगाव -अमरावती असे अनधिकृत प्रवासी घे. त्या प्रवाशांच्या प्रवासाच्या पैशात ड्रायव्हर - कंडक्टर्सने वाटा घे. काहीकाही तर खाजगी ऑपरेटर्स या अधल्या मधल्या प्रवाशांसाठी कुख्यात होते. त्यांच्या ड्रायव्हर्स - क्लीनर्सचा भत्त्ता अशा या अधल्या मधल्या अनधिकृत प्रवाशांच्या तिकीटांमधूनच निघायचा. परिणामी प्रवासाला उशीर व्हायचा.
एस. टी. महामंडळ तर अजूनही नागपूर ते पुणे हा प्रवास कोंढाळी - कारंजा - तळेगाव - अमरावती - मूर्तिजापूर - अकोला - खामगाव - चिखली - देऊळगाव राजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर अशा थांब्यांनिशी पूर्ण करते. त्यात या मधल्या स्थानकांवरून थेट पुणे - अहिल्यानगर ला जाणारे प्रवासी किती ? याचे विश्लेषण कधीतरी झाले आहे का ? याविषयी मला शंका आहे. बरे, थेट प्रवासी नसतील आणि मधल्या प्रवाशांसाठी ही नागपूर - पुणे सेवा सुरू असेल (उदाहरणार्थ कोंढाळी ते अमरावती, तळेगाव ते अकोला वगैरे) तर त्यांना या बससेवेशिवाय दिवसभरात इतर पर्याय उपलब्ध आहेत की नाहीत ? याचेही विश्लेषण कधी होत नाही. म्हणजे या बस आधी अर्धा तास सुटणारी आर्वी - शेगाव बस तळेगाव ते अकोला प्रवाशांसाठी उत्त्तम पर्याय ठरू शकते. कोंढाळी ते अमरावती प्रवासासाठी दिवसभर दर अर्ध्या तासाने पर्याय उपलब्ध आहेत पण नागपूर - पुणे सेवेच्या या अनेक मधल्या थांब्यांमुळे वैतागून, थेट जाणारे प्रवासी आपली सेवा नाकारताहेत का ? याचा विचार एस. टी. प्रशासनाने केलेलाच नाही.
इ) वातानुकूल आरामदायक प्रवास - त्या काळी स्लीपर बसेसची आज एव्हढी चलती नव्हती. किंबहुना नागपूरवरून कुठल्याही मार्गावर स्लीपर बसेस नव्हत्याच. त्यामुळे प्रसन्न ची "विदर्भ क्वीन" सुद्धा २ बाय २ या आसनव्यवस्थेतली सीटर बसच होती. पण अत्यंत आरामदायक आसने, बसमधली एकूणच स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण त्याचबरोबर व्यवस्थित राखलेले वातानुकूलन यामुळे नागपूर ते पुणे हा "विदर्भ क्वीन" चा प्रवास त्याकाळच्या अभिजन वर्गाच्या (Elite Class) प्रवासाचा मानबिंदू होता. "आम्ही काल विदर्भ क्वीन ने आलो हं" हे सांगण्यात प्रवाशांना आपण एका वेगळ्या वर्गात बसणारे आहोत अशी थोडीशी प्रौढीची भावना येत असे. यामागे प्रसन्न ट्रॅव्हल्स ने आपला हा ब्रॅंड तयार करण्यामागले आणि त्याला जपण्यामागचे विचार आणि श्रम होते हे नक्की. विदर्भ क्वीन या बसेस पुण्याच्या "ऑटो बॉडी" ने बांधलेल्या असत. त्यापूर्वी ही बस बांधणी कंपनी मुंबईच्या "बेस्ट" उपक्रमासाठी, पुणे महापालिका परिवहन, पिंपरी चिंचवड महापालिका परिवहन साठी शहर बसेस आणि पुण्यातल्या खाजगी उद्योगांच्या कर्मचारी वर्गाला ने आण करण्यासाठी ऑफ़िस बसेस बांधत असे. अजूनही "ऑटो बॉडी" प्रामुख्याने अशाच बसेस बांधतात. आराम बस फ़ारशा बांधत नाहीत. पण त्यांनी केलेली "विदर्भ क्वीन" ची बांधणी मजबूत आणि त्याचबरोबर आरामदायक होती हे नक्की.
ई) जेवणाच्या थांब्यांसाठी निवडलेली नेमकी वेळ व नेमके स्थान - नागपूरवरून दुपारी ३:३० ला निघालेली "विदर्भ क्वीन" अमरावती आणि अकोला इथल्या थांब्यावरून अधिकृत प्रवासी घेऊन बाळापूरनंतर खामगावपाशी असलेल्या राजपथ धाब्यावर रात्री ८:०० ते ८:३० या वेळात प्रवाशांच्या जेवणासाठी थांबत असे. परतीच्या प्रवासात सुरूरजवळच्या "स्माईल स्टोन" या ठिकाणी प्रसन्न ची "विदर्भ क्वीन" जेवण्यासाठी थांबायची. ही वेळ प्रवाशांना जेवण घेण्यासाठी अत्यंत आदर्श वेळ आहे आणि ही दोन्हीही ठिकाणे स्वच्छ, जलद आणि चांगले जेवण पुरविण्यासाठी प्रसिद्ध होती.
आज मात्र प्रसन्न ने हा वसा टाकून दिल्याचे दिसते. इतर सगळ्या ट्रॅव्हल्स प्रमाणेच प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या बसेस सुद्धा अमरावती नंतर एका अत्यंत गचाळ, महाग आणि उर्मट सेवा असणा-या ढाब्यावर रात्री ११ च्या नंतर जेवणासाठी थांबतात. त्या थांबल्या की बसला लॉक करायचेय म्हणून सर्व प्रवाशांना त्यांची इच्छा असो किंवा नसो खाली उतरायला सांगितले जाते. अशा अवेळी न जेवणारे आणि रात्री लवकर झोपणारे आमच्यासारखे प्रवासी प्रवास करीत असले की त्यांची झोपमोड आणि खाली उतरावे लागल्यामुळे वैताग असे दोन्हीही एकत्र होतात. शिवाय जेवणासाठी थांबलेल्या या ठिकाणांमधले पाणी सुद्धा प्यावेसे वाटत नाही अशी तिथली अवस्था असते. महाग आणि गचाळ. सुरूवातीच्या काळातला "विदर्भ क्वीन" च्या जमान्यातला हा ॲडव्हान्टेज प्रसन्न ट्रॅव्हल्स सारख्या विचारवंत आणि लोकाभिमुख ऑपरेटर ने का गमावला ? असेल यावर माझे दर प्रवासात चिंतन चालते.
असो, त्यादिवशी त्या ॲनिमेशनमधली "विदर्भ क्वीन" दिसली आणि अगदी दिलाची राणी दिसल्यासारखी आम्हा बसफ़ॅन्सच्या हृदयाची धडधड वाढली. तिच्या सगळ्या जुन्या आठवणी दाटून आल्यात आणि व्यक्त झाल्यात.
आपल्याकडेही या "विदर्भ क्वीन" राणीच्या आठवणी असतील तर नक्की कॉमेंटसमध्ये लिहा. पुन्हा तो सुवर्णकाळ आपण सगळेच जगू.
- एखादी सुंदर मुलगी बाजूने गेल्यानंतर कदाचित वळून न पाहणारा पण एखादी सुंदर, देखणी बस बाजूने गेल्यावर आवर्जून वळून तिच्या सौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेणारा, बसवर (आणि रेल्वेवरही) एखाद्या प्रेयसीसारखे प्रेम करणारा बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
रविवार, १५ जून २०२५
शेगाव
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
No comments:
Post a Comment