एका शिक्षकाच्या संपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमध्ये सगळ्यात वैताग आणणा-या पण तरीही टाळता न येण्याजोग्या, अत्यावश्यक (Necessary Evil) अशा दोनच गोष्टी असतात. पहिली म्हणजे पर्यवेक्षण (शुद्ध मराठीत Invigilation) आणि दुसरी म्हणजे उत्त्तरपत्रिकांची तपासणी. या दोन गोष्टी शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक जबाबदा-यांमध्ये अत्यंत अनावश्यक वाटत असतात पण विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा पुन्हा आणि ते सुद्धा विशिष्ट कालावधीतच करणे तर अपरिहार्य असते.
मागे एकदा विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेत आम्हा अभियांत्रिकी शिक्षकांसाठी एक चिंतन शिबीर भरले होते. त्यात एका ज्येष्ठ प्राध्यापकांनी या विषयावर आपले विचार मांडले होते आणि ते विचार अत्यंत व्यवहार्य असल्याने मला फ़ार पटले होते. ते म्हणाले "उत्त्तरपत्रिकांची तपासणी कंटाळवाणी का वाटते ? कारण मी आपण तपा्सायला चालढकल आणि उशीर करतो म्हणून. आपल्या विषयाचा पेपर झाल्यानंतर एक दोन दिवसातच प्राधान्याने उत्त्तरपत्रिका तपासून टाका म्हणजे चालढकलीमुळे येणारा अधिकचा कंटाळा कमी होईल. आणि पर्यवेक्षण हा तुमच्या आयुष्यातला तुम्हाला मिळालेला तुमचा असा महत्वाचा वेळ समजा. या वेळात तुम्ही तुमचे एकटे असता. या वेळात स्वतःच्या शिकविण्याविषयी चिंतन करा. ही तुमची चिंतनवेळ आहे." हे दोन्हीही उपदेश मला फ़ार पटलेत आणि त्यानंतरच्या सर्व परिक्षांमध्ये मी माझ्या माझ्यापुरते त्यांचे अगदी कटाक्षाने अनुसरण करतो.
आता ३० वर्षांच्या अनुभवातून मी पर्यवेक्षण माझ्या माझ्यापुरते सोपे करून घेतलेले आहे. पर्यवेक्षण म्हणजे वपुंच्या "जे के मालवणकर" कथेतल्या नायकाला आवडतो तसला चोर पोलिसांचा खेळच हो. वर्गात शिरल्याक्षणी माझ्या अनुभवी नजरेला अत्यंत हुशार व पेपर मिळाल्यानंतर आपण बरे की आपली उत्त्तरपत्रिका बरी या भावनेने ३ तास पेपर सोडविणारी विद्यार्थी मंडळी कोण आणि आज आसपास कायकाय आणि किती किती मार्कांची व्यवस्था होतेय ? या भावनेने अस्वस्थ विद्यार्थी कोण ? हे लगेच कळते. मग त्यात सुद्धा दोन प्रकारे या पर्यवेक्षणाला सामोरे जाता येते.
पहिला प्रकार म्हणजे चेहे-यावर अत्यंत भोळे भाव ठेऊन, येड घेऊन पेडगावाला जात दुस-या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मनात हा पर्यवेक्षक म्हणजे एक मेषपात्रच आहे, आता आपल्याला आपली कृष्णकृत्ये करण्यासाठी भरपूर वाव आहे असा विश्वास निर्माण करून विद्यार्थ्यांना त्यांचे कृत्य करताना ऐनवेळी रंगेहाथ पकडणे. हे प्रकार मी माझ्या तरूणपणी फ़ार करीत असे. या आमच्या ख्यातीमुळे मुंबईच्या दत्त्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षांच्या दरम्यान आमची कॉपी विरोधी पथकात ब-याचदा नेमणूक होत असे.
यातला दुसरा प्रकार म्हणजे वर्गात शिरल्या शिरल्याच करड्या आवाजात सूचना देऊन मला काय चालणार नाही याची जंत्री परिक्षार्थ्यांसमोर वाचणे. म्हणजे मग त्यांच्यातले जे कुंपणावरचे विद्यार्थी असतात ते आपले कुमार्गी विचार टाळून कुंपणावरून सरळ नेमस्त बाजूकडे उडी घेतात. म्हणजे परिक्षेच्या पहिल्या ५ - १० मिनीटांमध्येच त्या परिक्षागृहात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित होते. आताशी मी हा मार्ग वापरतो. नंतर नंतर तर आपण को-या उत्त्तरपत्रिकांचा गठ्ठा घेऊन ज्या वर्गात शिरतोय त्या वर्गातले विद्यार्थी त्यांच्याही नकळत आपापल्या कपाळांवर हात मारतायत आणि आजूबाजूच्या वर्गातले विद्यार्थी "सुटलो रे बाबा" असा सुटकेचा निःश्वास सोडतायत हे दृश्य दिसते. आपल्या आधी आपली ख्याती ही अशी पोहोचते.
मग खरोखर पर्यवेक्षणाचे हे तीन तास मी माझ्या चिंतनासाठी वापरतो. खरंच सांगतोय अनेक लेखांचे विषय मला या तीन तासांतच सुचलेले आहेत. आवश्यक त्या पर्यवेक्षकीय जबाबदा-या (मुलांच्या उत्त्तरपत्रिकांवर सह्या करणे, रेकॉर्डस भरणे, उत्त्तरपत्रिकांवर बार कोडस चिटकवणे वगैरे) आटोपल्यानंतर आपला स्वतःचा असा एक क्वालिटी टाईम उरतो त्यावेळी खिशात सहसा एक छोटा कोरा कागद असतोच. त्यावर तो विषय आणि त्याचा संभाव्य विस्तार कसा करायचा हे मी टिपून ठेवतो.
आताशा मन जरा अध्यात्माकडे झुकत चालले आहे. खूप आयुष्य नामाशिवाय गेले आता उरलेल्या थोड्याशा आयुष्यात तरी नामस्मरण आपल्याकडून जास्तीत जास्त व्हायला हवे या विचारांनी मनात खूप उचल खाल्ली आहे. आताशा या वेळात आपल्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण व्हावे हा माझा प्रयत्न असतो. यात स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करणे, श्वासाच्या लयीत नामस्मरण होतेय का ? याचा विचार करणे हे उद्योग चालतात आणि हे सर्व करीत असताना माझे पर्यवेक्षणाचे काम मात्र "अब राम करे काम और हम करे आराम" सारखे आपली आराध्य देवता करतेय का ? याची त्या आराध्य देवतेची परिक्षासुद्धा सुरू असते. कधीकधी वाटतं की समर्थांनी "किती भार घालू रघूनायकाला, मजकारणे शीण होईल त्याला" या ओळी केवळ आपल्यासारखी मतलबी भक्तांकडे पाहूनच लिहील्या असाव्यात. कारण दरवेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची परिक्षा असली की त्या बिचा-या रघूनायकाला आणि कधीकधी त्याच्या दासाला, पवनसुताला, या अज्ञान दासाच्या अध्यात्मिक परिक्षेला सामोरे जावे लागते आणि अजाण अज्ञान भक्ताची लाज राखावी लागते.
- भौतिक जगात जगणे हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे जाणणारा पण त्यातही अध्यात्मविचारांनी जगून या भौतिकाचा स्पर्श आपल्याला अस्पर्श होईल का ? यावर प्रयोग करीत राहणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
गुरूवार, ५ जून २०२५
नागपूर
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जून२०२५
No comments:
Post a Comment